10/7/11

अन्वयार्थ

बाल्कनीतल्या उन्हात अगदी लवकर सकाळी कॉफी पीतांनाची आजी बघून मला का कोणजाणे, भरून आलं. तिची नजर दूर झाडांकडे लागलेली, पण मन मात्र आशेने स्वयंपाकघराकडे वळलेलं होतं, कि कोणी आपल्याशी बोलायला येतंय का? मी माझाही कॉफीचा मग सांभाळत दार उघडून म्हटलं, "गूड मॉर्निंग". तर हसून म्हणाली, "खूप पूर्वी आमच्या शेजारी बेबीताई रहायची, ती म्हणायची तसं, आज तुझं लवकर उजाडलेलं दिसतंय!"

तिच्या मनाने एका क्षणात त्या बेबीताई असणाऱ्या आठवणींचा पट, पुन्हा एकदा जगून मागे टाकला होता! हल्ली तिच्या दर ५ वाक्यांमागे, "खूप पूर्वी आमका......खूप पूर्वी गेलो होतो ते गाव.........खूप पूर्वी खाल्ली होती ती कचोरी.........." अशी उदाहरणं येत असतात. किशोरवय भविष्यात, तारूण्य नि प्रौढत्व वर्तमानात, तर वृद्धत्व भूतकाळात रमतं- ऐकलं होतं. पण आजीचं ते पूर्वीच्या गोष्टींत रमणं मला आजवर कधीच इतकं कासावीस करून गेलं नव्हतं. त्या रमण्यात आनंद असेलही तर अगदी थोडा होता. मनाला आता केवळ भूतकाळाचाच तर आधार उरलाय, अशी अपरिहार्य शरणागती माझ्या आजीने घ्यावी, हे अजिबातच सहन होईना.

"आपली प्रेमाची माणसं आता म्हातारी होत चालली!" हे स्वीकारायला हवं- मी मनाला समजावलं. ऐंशीच्या घरात पोचल्यावरही काळे केस, नि खणखणीत आवाजाची आजी, आता मात्र स्वत:च्याच आवर्तांमधे फिरतेय. नवीन चित्रं बघतांनाही जुन्याच चौकटींमधून त्यांचे अन्वयार्थ लावायला लागलीये. गंमतीत का होईना, मरण्याची गोष्ट काढून, "त्या क्षणाला" एकटीने सामोरं जायचं धैर्य गोळा करायला लागलीये.
एवढं आयुष्य जगून मागे टाकलं- त्याचा गोषवारा काय निघतो का ते शोधायला लागलीये.

आयुष्याच्या संध्यासमयी, हे असं आपसूक वैराग्य येऊनही रोजच्या जगण्यातला आनंद कणाकणाने साठवणारी ही माझ्या आधारवडांची पिढी, कदाचित मला सांगू पहातेय, "आता तुला मोठं व्हायला लागेल. आमच्या करता हॉस्पिटलच्या वाऱ्या, बेडपॅन देणं नि केस विंचरून आंघोळ घालणं तुला करावं लागू नये अशी खरंच कळकळीची शेवटची इच्छा आहे!
पण ही सेवा करण्यानेच का केवळ मोठेपण येतं?
बाल्कनीत कॉफी पीत बसलेल्या आजीशी जाऊन चार धीराचे, आशेचे, आनंदाचे शब्द बोलतांनाही मला ते नकळत आलंच होतं.

8/29/11

चित्तरकथा!

जेमतेम एक-चतुर्थांश वर्षे वयाच्या माझ्या पोराला केवळ मी जन्मच दिलाय म्हणून- अन्यथा सासरची सोडाच, पण माहेरची मंडळीसुद्धा, "अगदी त्याचा बाSSबा दिसतोय" म्हणायला लागली, तेव्हा मी जरा हिरिरीने माझा बाळपणीचा फोटो अ‍ॅल्बम पुस्तकांच्या कपाटातून शोधून काढला. नाक तर निर्विवाद आपलं नाही, पण थोडीशी हनुवटी, किंवा गालांचा भास तरी? माझ्याच फोटोंमधे मी माझंच बाळ कुठे दिसतंय का बघत बसले!

वितभर उंचीच्या मला, फूटभर उंचीचा हलव्याचा मुकुट घातलेला फोटो.
मग मोठ्ठा काळा गॉगल घातलेला, कुरळ्या केसांची नारळाची शेंडी घातलेला फोटो.
मग फ्रिलच्या फ्रॉकवर सोनेरी चांदण्या लावून शाळेच्या गॅदरिंगला नाच करतांनाचा फोटो...

एका फोटोपाशी मन जरा जास्त रेंगाळलं. जवळजवळ माझ्या खांद्यापर्यंत येणाऱ्या मोठ्या बादलीत, माझ्या आबांनी मला आंघोळ घालायला उभं धरलंय! काळ्या-पांढऱ्या मण्यांच्या मनगट्या घातलेल्या इवल्याशा हातांनी मी बादलीची कड धरून ठेवलीये, आणि बोळकं दाखवत हसतेय. माझ्याही आईने केवळ मला जन्म दिला म्हणून. अन्यथा मी सदासर्वदा आजी-आबांना चिकटलेली असायचे, आणि आईजवळ झोपल्यावरही, अगदी मध्यरात्री तिला उठवून "आबांकडे जायचंSSSS" असं भोकाड पसरायचे- ही गोष्ट मला वेगवेगळ्या प्रसंगी आई-मावशी-आजी-बाबांनी सांगून सांगून अगदी पाठ झालीच होती.

शिवाय ह्या बादलीतला फोटोचीपण एक गंमत गोष्ट खुद्द आबांनीच सांगितली, "हा फोटो बघ- मी तुला लहानपणी आंघोळ घातलीये त्याचं प्रूफ, नाहीतर तुला वाटेल आपल्या आबांनी आपल्यासाठी काही केलं की नाही? " "अहो मला असं कसं वाटेल?" हे म्हणण्याइतकी मी मोठी होईपर्यंत, तो फोटोही त्यांनी खास त्यांच्या कपाटाच्या दारावर चिकटवून ठेवला होता. जाता येता मला विचारायचे- "सांग बरं लहानपणी तुला आंघोळ कोण घालत होतं???"

आज तो फोटो बघतांना त्यांची आठवण तर आलीच, पण माझ्या स्वत:च्या पोट्ट्यालाही त्याची आजीच (माझी आईच) अजून आंघोळ घालते, म्हणून जरा कानकोंडंही झालं. मग आईला म्हटलं, "अगं उद्यापासून माझं ट्रेनिंग. मी पायावर नाही तर टबात, पण पिटक्याला आंघोळ घालायची सवय केली पाहिजे. नाहीतर आंबांबरोबर माझा होता, तसा ह्याच्या बरोबर तुझाच- बादलीतला फोटो काढावा लागेल!"
आई एकदम तापलीच, "तुला काय वाटतं- आबा तुला आंघोळ घालत होते? अगं मीच रोज घालत होते... त्यांनी तर चुकुनसुद्धा, एकदाही तुला आंघोळ घातली नव्हती!"

तेव्हा हसायला आलं, पण नंतर उगीच हरवल्यासारखं वाटत राहिलं... गमतीत झालं म्हणून काय, त्यांनी आपल्याला खोटं का सांगितलं? अगदी प्रूफ-प्रूफ म्हणून फोटो दाखवून पाठ करून घेतलं, आणि आपणही त्या फोटोभोवतीच आठवणी विणत बसलो? आधी न दिसलेल्या गोष्टी मग एकएक करून दिसायला लागल्या- बादली कोरडी ठण्ण आहे. ती त्यांच्या खोलीत का ठेवलीये? आंघोळच घालायची तर ती बाथरूम मधे नको का? आणि मुळात बादलीत पाणी असायला हवं- बाळ नव्हे! भारतात असं टब सारखं कोणी पाण्यात बुडवून आंघोळ घालत नाहीत.......

पुन्हा अ‍ॅल्बम चाळला- माझं केवढंतरी आयुष्य केवळ त्या फोटोंमधे उरलंय आता... न आठवणारं बालपण तर सोडाच, पण आठवणारंही बरंच काही आता थोडं धूसर व्हायला लागलं- तर त्या फोटोंमधूनच पुन्हा ठसठशीत अधोरेखित करून घ्यायचं. कॅलिडोस्कोपच्या रंगीत तुकड्यांसारख्या आठवणी- दरवेळी नवीन आकार घेऊन येतात. ते आकार आठवणींचे असतात, की मनाचे? कधी उदास असतांना आठवणीतलं आभाळही भरून आलेलं असावं, नि आठवणीतल्या सख्ख्या मैत्रिणीशी प्रत्यक्षात भेटल्यावर मात्र काय बोलावं ते कळेनासं व्हावं...

जितके फोटो- तितक्या गोष्टी.

एका वाढदिवसाला आम्ही अंगणात "व्हॉट कलर" खेळतोय. नेमकं माझ्यावर राज्य आलेलं, आणि २-३ रंग सांगितले तरी ते जाईना. तेव्हा रश्मीताईने मला बोलावलं. ती माझी आतेबहीण. माझ्याहून ५-६ वर्षांनी मोठी होती, त्यामुळे आम्हा बच्चेकंपनी बरोबर खेळण्यात तिला रस नव्हता. ती कानात म्हणाली, "क्रीम कलर सांग". क्रीम कलर म्हणजे कुठला, हे सुद्धा मला माहिती नव्हतं! तर ती म्हणाली, "तुझ्या फ्रॉकवर जी फुलं आहेत नां, तोच क्रीम कलर आहे." आता माझी चंगळच झाली. क्रीम कलर ला हात लावायचा, म्हणजे सगळ्यांना माझाच फ्रॉक धरायला यावं लागलं असतं, त्यामुळे मी कोणालाही आऊट करावं!

आत्ता क्रीम रंगाची फुलं असलेल्या त्या निळ्या ड्रेसमधला फोटो दिसला, नि ही गोष्ट आठवली. अजून किती क्षणांचा बनलेला होता तो दिवस! आईने केक केला असणार-सकाळी ओवाळलं असणार-मैत्रिणींनी कायकाय भेटवस्तू दिल्या असणार. पण ते आता आठवत नाही. फक्त ही क्रीम कलरची गोष्ट तेवढी ह्या एका क्षणात बंदिस्त झालिये!आता नादच लागलाय- ह्या फोटोंच्या कोलाजमधून आयुष्याची कहाणी सलग लावता येतेय का ते बघण्याचा. लाखो करोडो घटना, पात्र आणि स्थलकालाच्या गर्दीतून हे क्षण तेवढे हाती उरले- आबा म्हणाले तसे- प्रूफ म्हणून!

अजून शेकडो दिवस जातील, माझं बाळ मोठं होईल तेव्हा त्याला, आताच्या पद्धतीप्रमाणे अक्षरश: करोडो फोटोंचं वाण आयतं मिळेल. केवळ त्याचीच नव्हे, तर माझ्या जीवनाची चित्तरकथाही मला शेवटी त्यांच्याकडूनच ऐकायची आहे हेच खरं.



5/22/11

बिम्मची आई



छोट्या बिम्मच्या छोट्याशा विश्वात तो सोडून २-३ च इतर माणसं असतात: त्याची आई, त्याला सतत छळणारी आणि स्वत:ला अतिशय शहाणी समजणारी त्याची मोठी बहीण बब्बी, आणि नेहमी घराजवळच्या मोकळ्या आवारात भेटणारे आजोबा.
पण बिम्मला त्याशिवाय भरपूर मित्र आहेत, हे ही विसरून चालणार नाही- पिवळाधमक नीनम पक्षी, भलाथोरला राहुल हत्ती, पिट्टू नावाचे कुत्र्याचे पिल्लू, कुरकुरीत ऊन खाऊन रंगीत होणारी गाय, आणि असेच कोणी कोणी.

बिम्म कसा, थोडासा खादाड, थोडासा वांड, पण बराचसा गोंडस मुलगा आहे. तो जी.ए. कुलकर्णींच्या बखरीतच भेटतो, असं जर कोणी म्हणत असेल, तर त्याने जन्मात कधी लहान मुलांशी दोस्ती केली नाहिये, किंवा स्वत:चं मूलपणच त्याला आठवत नाहिये, असं आपण ठामपणे समजू शकतो.

बिम्मची आई मात्र तशी नाहिये. आता बिम्म आणि बब्बीसारख्या दोन पोरांना एकटीने सांभाळणं काय सोपं काम आहे का महाराजा? निरनिराळ्या रंगांचे काचेचे तुकडे, चॉकलेटच्या पाकिटातली रिकामी चांदी, एखादा पेरू, बब्बीवर चुकून प्रेम उतू जात असल्यास तिच्या वेणीत घालायला दोन चुरगळलेली चाफ्याची फुलं, दोरे, दगडापासून चिकट बेलफळापर्यंत काही म्हणजे काही ही बिम्मच्या खिशातून बाहेर पडू शकतं, पण त्याच्या सुपीक डोक्यातून काय काय बाहेर पडेल, त्याची तर कोणी कल्पनाच करू शकणार नाही!

ती काही बोलत नाही, पण मनातून तिला खरं म्हणजे बिम्मच्या वेड्या खेळांत मधून भाग घ्यायला आवडतं.
तिने माजघराची नुकती पुसलेली फरशी बिम्मने आपल्या "चित्रांनी" भरून टाकली, तरी ती फारशी रागावत नाहीच, उलट त्यात बिम्मच्या समोर लाडवांचा डोंगर काढलाय, ते बघून चक्क त्याला एका ऐवजी आज दोन लाडू देते! चुकूनसुद्धा ती मुलांना कधी, "बंद करा रे तुमची ती पोरकट प्रश्न!"- असं म्हणत नाही. उलट, "बिम्म, तू आहेस कामाचा माणूस. तेव्हा तू इथेच थांब. तोवर मी ब्रह्मदेवालाच विचारून येते..." अशी दरवेळी खुसखुशीत उत्तरं देत ती दोन्ही मुलांचं मूलपणच नव्हे, तर त्यांचं उपजत शहाणपणही सांभाळत असते.

त्याचा पतंग "उडणारा" नाही, "उडवणारा" आहे, हे ती समजून घेते. बब्बी नसत्या वेळी "खरं बोलण्याचं" अर्धवट शहाणपण मिरवते, तेव्हा तिला जमीनीवर आणायला आई लगेच, "तू ही काही कमी नाहीस...." अशी बब्बीने घातलेल्या घोटाळ्यांची यादी वाचून दाखवतेच की.

पण बिम्मही तिला कधीकधी त्रास देऊन जीव नकोसा करतो. मग ती,
"तू एक नाही, दहा रूळ इंजिनं असलास, तरी मोठ्या रस्त्यावर शिटी फुंकत गेलास, तर हाडे सैल करून देईन!" अशी त्याला खरपूस धमकी देऊन ठेवते. बरं, रूळ इंजीन नाही, तर छत्री, नाहीतर झाड, असं सारखं वेगवेगळं कायकाय होतांना बिम्म त्यातून वेगवेगळ्या उचापत्या करणार, त्याच्या सतत एक पाऊल पुढे राहणं तिला भागच पडतं. "छत्री आहेस म्हणून पावसात भिजायचं नाही", आणि "झाड असशील तर स्वस्थ एका कोपऱ्यात उभं राहायला" बिम्मला बजावते. पावसात भिजायचं नाही, तर छत्री होण्यात काय मज्जा? शिवाय झाडाला लाडू वगैरे खाता येत नाहीत, आणि एका जागी उभं रहावं लागतं... हे तर त्याला मानवणारं नसतंच. मग शेवटी तो आईला, "मी आता खराखुरा बिम्मच आहे" हे सांगून टाकतो!

पण बिम्मचे बाबा असतात मुंबईला. त्यांना सारखं घरी यायला कुठे जमतंय? त्यामुळे पोरांच्या बालपणाची मजा एकटीने लुटतांना, आणि सोसतांना, ती कधीकधी फार हळवी होऊन जाते. ्परवा बिम्मने बाबांना आपल्या रेघोट्यांच्या लिपीत लिहलेलं पत्र घेऊन तर ती कितीवेळ उदास बसून राहिली. एकेदिवशी मुलं मोठी होऊन घरट्याबाहेर पडतील, आणि त्यांना त्यांच्या वस्तू, खेळ, भांडणं, खऱ्या-खोट्या गोष्टी- कश्शा कश्शाची आठवण राहणार नाही.

पण आपल्यापाशी दररोज जमतोय हा ठेवा, तो हदयात साठवून ठेवतांना तिचं मन भरून येतं, आणि ती पोरांचे खूप खूप पापे घेते. तेव्हा बिम्म आणि बब्बीला कळत नाही, आई आज अशी का वागतेय?







3/17/11

घरात...

खोल्यांतून सुबकशा मांडलेल्या कोपऱ्यांना ।
सुखावला जीव बघे रांगोळल्या ओसऱ्यांना ॥

बैठकीस उजळतो स्नेहाचा प्रकाश सोनेरी ।
मैत्रांच्या मैफिलीतून हास्य-विनोदाच्या लहरी ॥

भिंतीच्या भकास भाळी आरसा न दाखविला ।
सौभाग्याचा चित्ररूपी अलंकार चढविला ॥

कोनाड्याच्या जाळीतून ऊन हिरवे पाझरे ।
तसे पडदे शिवले खिडक्यांवरी साजरे ॥

होळी खेळती मसाले काचेच्या बरण्यांतून ।
वाट्या-पातेल्यांचे मनोरे, त्यात दिसती शोभून ॥

शांत निळी झोप येते, ढगांच्या पलंगावरी ।
शुभ्र स्वप्नांचे हिमकण शिंपडलेल्या चादरी ॥

आता मात्र पसाऱ्याचे लागले डोहाळे घराला-
सज्ज झाले चिमुकल्या खेळण्याच्या स्वागताला!

3/11/11

कॉपी

गेले कित्येक दिवस हातांना पेन लागला नव्हता. ईमेल, फेसबूक अपडेट, ट्वीट्स मधून भरपूर व्यक्त झालं, खूप काहिसं बोलतं झालं, पण "लेखणी" च हातात नसतांना त्याला "लेखन" म्हणवेना. मग खूप चुकल्या चुकल्यासारखंही वाटायला लागलं. बाहेर पावसाचं थैमान चालू असतांना बटाटेवडे आणि चहा पेक्षा "लिहायची" तल्लफ यावी, पण खूप दिवस अंथरूणात आजारी पडून राहिल्यावर एकाएकी चालायला उभं राहिले, तरी स्वत:च्या पायांवरच भरवसा वाटू नये, तसा हाताच्या त्या लिहणाऱ्या स्नायूंवर भरवसा वाटेना.

कागदावर प्रत्येक शब्दावरच्या रेघेसरशी जाणवणारी सूक्ष्म खरखर हातातून थेट मनापर्यंत पोचून एक हलकीशी शिरशिरी जाणवावी... वेलांटी फिरवतांना पेनाचा आणि हाताचा कोन बदलून अक्षराची जाडी बदलतेय असं दिसल्यावर निबची एकच दिशा कायम ठेवण्याची खटपट करावी... दुसऱ्यांनी वापरलेल्या पेनावर कमी-अधिक दाबामुळे थोड्या खिळखिळ्या झालेल्या स्प्रिंगशी जुळवून घेत पुन्हा कागदावर आपलाच ठसा उमटावा असं अक्षर काढायची एकाग्र तपस्या करता करता शरीर-मन-विचारांची एकतानता अनुभवावी.....त्या कल्पनेनेच हरखायला झालं.

शेवटी तडमडत साहित्य शोधायला उठले. पिवळी नोटपॅड्स घ्यावी, की काळ्या-पांढऱ्या टाईल्सच्या कव्हरांची इथल्या शाळेत सर्रास दिसणारी कॉम्पोझिशनची वही? बरं, दोन-चार वाक्यांचाच एक छोटासा विचार लिहायचा असेल, तर सरळ पोस्टिटच घ्यावं का? नको... त्यापेक्षा फ्रीजवर किराण्याची यादी करते ते लांबट कागदच हाताशी पटकन सापडतील, तर तेच घेते... कागदाचा इतका विचार केल्यावर पुन्हा पेनाच्या असंख्य प्रकारांतून कुठला निवडायचा?

शाळेत असतांना वर्षाच्या सुरूवातीला कॅमलचा शाईपेन, रेनॉल्ड्सचा बॉलपेन, आणि नटराजच्या पेन्सिलींचा डबा आई-बाबा घेऊन द्यायचे, तो वर्षभर चालवण्यासाठी खूप उद्योग करायचे. ह्या पेनातल्या रिफील त्या पेनात बसवायला, ब्लेडने कापायच्या. ह्या कारभाराने त्या जरा जास्तच आखूड झाल्या, की वर याव्यात म्हणून कागदाचे अगदी साबूदाण्यायेवढे छोटे गोळे पेनाच्या मागच्या बाजूला ढोसायचे!
शाईपेनाच्या निब तर लिहण्यापेक्षा, खरखरत वहीची पानं फाडायला बनवलेल्या असाव्यात अशा! मग ब्लेडने त्यांच्यावरचा गंज काढून, किंवा निबच्या मध्ये असलेली भेग कर्कटकाने मोकळी करून, शाई पुन्हा वाहती करायची खटपट चालायची.

तुमची गरीबी-श्रीमंती शाळेत तुमच्या वहीची पानं किती गुळगुळीत आहेत, त्यावरून ठरायची. शाई फुटणाऱ्या वहीची लाज वाटली, तरी मागच्य वर्षी जर ती संपली नसेल, तर नवीन वर्षी, आधीची भरलेली पानं फाडून पुन्हा तीच घेणे भाग होते! पण खूपशी सुटी पानं उरली, तर जवळच्या "बुक बाईंडिंग" च्या दुकानातून त्यांची एक नवीन " मिसळ-वही" करून आणायचो. त्यात पांढऱ्याच पानांच्या, पण वेगवेगळ्या छटा दिसायच्या, आणि एका छटेतून दुसऱ्या छटेत गेल्यावर नवीन वहीच मिळाल्यासारखी गंमत वाटायची!

हायलायटर तर लोक कशाला वापरतात, तेच मला कित्येक दिवस माहिती नव्हतं. आम्ही आपले महत्त्वाची वाक्य सरळ पेन्सिलीने अधोरेखित करणाऱ्यातले होतो! समासात व्याख्या-शब्दार्थांपासून डूडलपर्यंत काहीही काढून भरवलेलं ते पुस्तक किती "आपलं" वाटायचं! इथे मुलांना पाठ्यपुस्तकं शाळेतून वर्षभरासाठी वापरायला देतात, त्यामुळे त्यावर पेन्सिलीने लिहिणं वगैरे चालत नाही, ही कल्पनाच मला पटायला जड गेली.

अमेरिका नवीन होती, तेव्हा सगळ्यात जास्त अप्रूप इथल्या सुपरमार्केटमधल्या "स्टेशनरी" सेक्शनचं वाटलं होतं. वेगवेगळ्या रंगांचे कार्डपेपर, साध्या फाईल, अकॉर्डियन फाईल, जेल-पेन, नाहीतर बॉलपेनचे शेकडो प्रकार, कुठल्याही कॉन्फरन्सला गेलं, तर तिथल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या, बॅंकेच्या, अगदी nonprofit संस्थांच्या टेबलवरही, बूथवर खेळणी आणि खाऊ ठेवावा, तसे पेन/हायलायटर/की-चेन असले प्रकार मुक्तहस्ते लुटले जातायत आणि आपल्याला आता फारसं लिहावं लागतच नाही, हे विसरून आपण त्यांच्या मोहात पडतोय, असं माझं कित्येकदा झालंय.

असल्या हव्यासापायी घरी केवढा कचरा वाढलाय, म्हणून आवरायला गेले, तर नवीनच चमत्कार! त्या फुकटातल्या चांदीपैकी एकूण-एक पेन चालत होता........! शाई सुकली नव्हती, की टोपण हरवलं नव्हतं. स्प्रिंग व्यवस्थित "टकटकटक" वाजत उघडमीटही होत होती!

साहित्य जुळवता जुळवताच मन किती वर्ष प्रवास करून आलं होतं! पण लिहायला बसले, तर शंभरदा वेगवेगळे कागद-पेन बदलूनही, हवं तितकं भराभर लिहिता येईना. माझं परिश्रमाने घडवलेलं, एकेकाळी मोत्यांसारखं असलेलं अक्षर, आता सवईच्या वळणा-वेलांट्यांवरूनसुद्धा अडखळत अडखळत पुढे सरकत होतं... "अ" आणि "म" चे पाय पुरेसे लांब येत नव्हते, की T आणि J ची उंची... अक्षरांतला जीवनोत्साह संपल्यासारखा, strokes मधला बुटकेपणा, कि विचारांच्या वेगाने हात धावत नव्हते म्हणून थोडासा "टाकणं टाकल्याचा" भाव सगळ्या परिच्छेदभर पसरल्यावरती, शेवटी नाइलाजाने टाईप करायला लागावं, त्यावर हसू का रडू हे ही कळेना..

पण आज कष्टाने लिहायचीच भूक भागवायची होती. म्हणून जे हाताला लागेल ते पुस्तक उघडून, पहिल्या पानापासून, सरळ समोरच्या वहीमधे उतरवून घ्यायला लागले...

3/5/11

उमाळ्याची स्वप्न

धूसर डोंगरावर पलित्यांप्रमाणे
निळ्या आकाशाकडे ज्या आवेगाने
वैशाख वणवा झेपावतो
त्या आवेगाने भस्म होण्याला
जगणं म्हणावं.

कडेकपारी चढून ओरखडलेले हात
रखरखल्या केसांनिशी, रापल्या चेहया
थकल्या डोळ्यांनिशी
वाऱ्यावर झिंगून बेभान पडावं.

अशी उमाळ्याची स्वप्न
मऊ गालिच्यात चिणलियेत
आरस्पानी पातेल्यात उकळलीयेत
इस्त्री फिरवून, समांतर कोपरे नेमके दुमडून
पुस्तकात घडी करून
ठेवलियेत.

अनवधानाने पान उघडतं
जेंव्हा "वेडाला"
लोक "खूळ" म्हणतात
तेंव्हा.