9/27/14

सोने-की-चिडिया सिंड्रोम

खूप वर्षांनी कॉलेजच्या मैत्रिणी जर भेटल्या, तर त्यांना कसं तोंड द्यायचं, हा प्रश्न भेडसावू लागला असेल, तर, पारतंत्र्यातील भारत सोने की चिडिया "था", तसं आपलं झालंय हे समजावं. साधारणपणे तीसाच्या जरासं वर वय झालं, की अनेक लोकांना हा सोने-की-चिडिया सिंड्रोम होऊ लागतो, आणि
मागे वळून, भूतकाळ घुसळत घुसळत काही कार्यकारणभावाचे नवनीत निघते का, ते बघण्याच्या छंद जडतो.
परीक्षेत पहिला नंबर, 
दिसण्यात "प्राप्ते तु शोडषे"चा असर, 
गळ्यात गोड स्वर, 
डोळ्यात सतत तेवणारे ’अक्षर’.
पुढे शंभर पर्याय होते, कष्टाची तयारी नि धमकही होती, शिवाय काहीतरी "वेगळं" करण्याचा निश्चय होता. असं सगळं असलं, की तिथून पुढे प्रगती किती कठीण असते, ते कुणी मला विचारा. 

प्रगती झाली, नाही असे नाही, पण "दाखवण्याजोगं" यश हाती लागलं नाही, तर मग ज्या मैत्रिणींना आपला एकेकाळी हेवा वाटत असेल, त्यांच्या समोर हे स्वत:चं बदललेलं रूप घेऊन प्रांजळपणे उभं राहण्याचं धैर्य गोळा करायला हवंय, असं मी स्वत:ला समजावलं. 

पारतंत्र्यात पडण्यापूर्वी भारतात छोट्या जहागिरी, राजघराणी, ह्यांची बैठक खिळखिळी होऊ लागली, एकी तुटू लागली, तशा तिशीत आल्यावर दातातल्या फटी जास्त जाणवू लागतात. (धिस इज अ टोटली डिमेंटेड थॉट, प्लीज इग्नोर.) मला खरं म्हणजे असं म्हणायचं होतं, की सोळाव्या वर्षी सतरा उद्योगांमधे वेळ वाटला जात नाही, आणि ध्येयं पण समोर उंच शिखरांसारखी स्पष्ट असतात. तिशीत मात्र, आज कुठल्या "टेकडीला" प्राधान्य द्यावं, हेच कळेनासं होतं. शिवाय, जसे जवळ जातो, तसे शिखरावर पोचूनही पायाला मातीच लागणारे, सोनं नव्हे, हे ही आकळू लागतं. पण असल्या फॉल्स जस्टिफिकेशन्सने तू कुणाला भुलवू पाहतोस, रे मना? तुझं तुलाच माहितिये, आपण खोटी साक्ष काढून पळणाऱ्यातलेही नाही. 

आजच्या घडीला दोन लठ्ठ-घट्ट चिकटलेल्या नोकऱ्या, दोन गुबगुबीत पोरं, एक चौकोनी घर, ह्या रोजच्या टेकड्यांवर तुझी नजर, तिला पुन्हा शिखरांकडे वळवायचं कसं? तेव्हा शिखरांकडच्या रस्त्यावर तू चालायला लागलीस, पण आता टेकड्यांनाच डोळे भरून बघता बघता तुझी नजर हरवतेय? 

पारतंत्र्यातल्या भारतातल्या अनेकांप्रमाणे, जे जे पाश्चात्य, ते ते उत्तम, असले सोयिस्कर निष्कर्ष काढलेस, पण "स्वत:ची प्रगती, ती स्वत्वातूनच होईल, बाह्यानुकरणाने नव्हे" हे विसरलीस? कुठल्या गोष्टींना प्राधान्य आहे, हे नेहमीच प्रत्येकाच्या मनात स्पष्टच असतं, फक्त कळपाचं प्राधान्य तेच खरं, असं मानून चालू नकोस. तडजोडींनी आयुष्य सोपं होईल, पण म्हणून तडजोडींनाच आयुष्य मानून चालू नकोस. 

पारतंत्र्यातून बाहेर पडल्यावरही भारताला किती दशके लागली, आपल्या क्षमता, आपल्या विशेषत्वाची जाणीव व्हायला! तू तर केवळ दातात फटी पडू लागलेली, केसांत रूपेरी डोकावू लागलेली, पण कणीक मळता मळताही लिहण्या-वाचण्याचे विचार करणारी, एक तिशीची सामान्य स्त्री आहेस.









8/23/14

A Woman in Berlin

कुठल्याही युद्धात, आणि त्यातही दुसऱ्या महायुद्धासारख्या निर्घ्रुण युद्धात स्त्रीयांवर झालेल्या अत्याचारांबद्दल वाचायचे, धाडस मी केले नव्हते. चित्रपटातून बघतांना तर असे विषय इतके क्लेशकारक होतात, की  बरेचदा त्यांच्या कडू जहर सत्यापासून आपण लांबच राहणे पसंत करतो. पण A Woman in Berlin ने त्याच सत्याचे इतके पैलू दर्शविले आहेत, की हादरून जातांनाही कुठेतरी, एक उत्तम कलाकृती बघितल्याचा आनंद मिळाला, म्हणून लिहावेसे वाटले. चित्रपटाची कथाच इतकी प्रभावी आहे, की दिग्दर्शकाचे श्रेय जाणवू नये, पण तरीही, छोट्या दृश्यातूनच नव्हे, तर प्रत्येक शॉट मधून, नजरेतिल प्रत्येक भावातून त्याने ती कथा अधिक फुलवली आहे. काही दृश्यांसाठी मनाची तयारी करूनच बघावा, पण बघावा जरूर, असा हा चित्रपट, Netflix वर उपलब्ध आहे.

मूळ कादंबरी युद्धानंतर प्रसिद्ध झाल्यावर इतके वादळ उठले, की लेखिकेने आजन्मच नव्हे, तर मृत्यूनंतरही "Anonyma" बनून राहणे पसंत केले. लेखिका नाझी जर्मनीतली पत्रकार, आणि देशोदेशी फिरलेली, अनेक भाषा अवगत असलेली, बर्लिनच्या उच्चभ्रू स्तरातली सुसंस्कृत स्त्री आहे. तिचा नवरा जर्मन सैन्यात मोठ्या पदावर असल्याने युद्धासाठी निघून जातो, आणि त्यानंतर तो परत येईपर्यंतची वाताहात तिच्या नजरेतून आपल्याला पडद्यावर दिसते.

बर्लिन काबीज करायला आलेले रशियन सैनिक तिथे उरलेल्या, नि:शस्त्र, निरपराध स्त्रीयांचे शोषण करत असतांना, ही अनामिका-नायिका धैर्याने त्यांच्या कमांडर समोर उभी राहून जाब विचारते, तेव्हा मुळात सभ्य असूनही तो तिला, "थोडावेळ सहन करा, येवढं काय त्यात?" असं उत्तर देतो! जर्मनीने युद्ध सुरू केले, जर्मन सैनिकांनी जेवढे हाल आमचे केले, तेवढे आम्ही तुमचे केले असते, तर तुम्ही अजून जिवंतच राहिला नसता, असे अनेक ताशेरे, अनेक सबबी पुढे करत, हे "जेते" पुरूष निराधार स्त्रियांना जगणं नकोसं करून सोडतात, तेव्हा, अनामिका मात्र आपल्या स्त्रीत्वाचा स्वाभिमान राखत, आपल्या स्त्रीत्वाचेच शस्त्र घेऊन ठाम उभी राहते, आणि तिच्यावर अत्याचार करणाऱ्यालाच कुठेतरी तिचा गुलाम बनायला लावते, ही जया-पराजयाची लढाई  दिग्दर्शकाने अतिशय सूक्ष्म रितीने दाखवली आहे. शेवटी कमांडर तिच्यापाशी येतो, तेव्हाही, ती त्याचे हुकूम न मानता, त्याला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देते. 

हिंसा, प्रेम, राष्ट्राभिमानाचे अनेक अर्थ इथे प्रतीत होतात, तसेच स्त्री-पुरूषांमधल्या नात्याचेही. कारण ज्या पुरूषाने जग जिंकायला पाऊल पुढे टाकले, त्याच्या घरी मागे राहिलेल्या आया-बहिणी मात्र तो या जुगारात केव्हाच हरलेला आहे! ज्या मूल्यांसाठी तो प्राणपणाने लढला, त्याच मूल्यांची होळी तो स्वहस्ते पेटवतो आहे, केवळ आता होळी पेटलेले घर शत्रूचे आहे, येवढाच फरक! हा विरोधाभास चित्रपटामधे दर क्षणी जाणवतो, आणि तोच ह्या स्त्रीच्या कथेचा कणाही आहे. 

देशाला, सैनिकांना प्रेरित करायला हिटलरसारख्या नेत्यांनी नीतिमूल्यांचे शब्द वापरले. नायिकासुद्धा त्या शब्दांनी वहावत जाऊन श्रद्धेने जर्मनीच्या विजयाची, आपल्या नवऱ्यच्या विजयाची आस धरून बसलेली असतांनाच, शत्रूच्या नजरेतून तिला वेगळंच दृश्य दिसतं. आपल्या राष्ट्रीय-व्यक्तित्वाचा कुठला अर्थ आपले देशबांधव त्यांच्या क्रूर-कर्तृत्वाने सिद्ध करताहेत, हे लक्षात आल्यावर, ती मनातून पराभूत होते.

जर्मनीला "पितृभूमी" मानत असले, तरी, बर्लिनचे स्त्री रूपक स्पष्ट आहे. ज्या पुरूषावर प्रेमाने, विश्वासाने विसंबलो, संरक्षक म्हणून त्याची "पूजा" बांधली, तोच आता नजरेतून उतरल्यावर, शत्रूपक्षाच्या कमांडरबरोबर नवीन मांड मांडण्यावाचून नायिकेला गत्यंतर उरत नाही. कमांडरही शेवटी पुरूष असला, तरी इतरांपेक्षा जास्त सभ्य, सुसंस्कृत, आणि पर्यायाने स्त्रियांचा आदर करणारा आहे, म्हणून त्याचे मित्र, हाताखालचे सैनिकही हळूहळू त्या स्त्रियांना सहानुभूतीने वागवू लागतात. त्या स्त्रियांनी आश्रय घेतलेले घर, कुठेतरी त्या सैनिकांचे आश्रयस्थान होते, जिथे आपल्या घराच्या, बायका-मुलांच्या आठवणीत ते रमतात, गातात, नाचतात, रशियाच्या विजयाचा एकत्र जल्लोश करतात, आणि युरोपियन एकतेची स्वप्न बघतात. 

चित्रपटात लक्षात राहणारी एक गोष्ट म्हणजे उत्तम संवाद आणि लेखन. मूळ जर्मन भाषेच्या अनुवादित तळटीपा बघूनही सहज समजणारे, आणि अर्थवाही. शेवटच्या प्रसंगात अनामिका जेव्हा कमांडरला विचारते, "आम्ही तुझ्याविना कसे जगावे?" तेव्हा तो प्रश्न त्याला व्यक्तिश: तर आहेच, पण तो ज्या आदर्शांचा प्रतिनिधी आहे, त्यांनाही आहे. महायुद्धामुळे दिशा, आणि जुनी जीवनपद्धती हरवलेल्या एका संपूर्ण पिढीचा तो प्रश्न आहे!

शेवटी घरी परत आलेल्या नवऱ्याला अनामिका जेव्हा आपले अनुभवकथन वाचायला देते, तेव्हा तो ही पूर्णपुरूष श्रीरामा प्रमाणे तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन निघून जातो. पुरूषांच्या युद्धोन्मादाचे घाव दाखवणारी अनामिका, आणि बर्लिन-नगरी, एकवार पुन्हा स्त्रीस्वभावानुसार जगात सौंदर्य, सृजनता, सुजनता निर्माण करायला सिद्ध होते. पण ह्यावेळी ती केवळ स्वयंसिद्धा आहे, हेच काय ते थोडके समाधान.


8/7/14

संध्याकाळ

आज कित्येक वर्षांनी अशी संध्याकाळ झाली.
ढगांच्या किनारीतून सूर्य दिसेनासा झाला, तरी
रेंगाळलेले सोनेरी आकाश
सोडीना "सोळाव्या" हळवेपणाला.

कित्येक वर्षांनी पुन्हा अशी संध्याकाळ झाली
कृत्रिम दिव्यांच्या पिवळ्या प्रकाशात
ना बंदिस्त, ना पराभूत
ना कर्तव्यांना बांधलेली.

पुन्हा, वर्षांनी, अशी झाली संध्याकाळ:
लाटांच्या गूढ आरोहावरोहात
विरघळले मनोगत
विरघळण्याच्या बोलीवरच, बोललेले.

संध्याकाळ झाली
कि कॉन्क्रीटचे सुबक कट्टे ओस होते,
तरी आठवणींनी गजबजून गेले
ढग अचानक का दाटून आले? 

संध्याकाळ, आज पुन्हा, अशी
भिनत गेली, रात्रीच्या अंधाराला 
पापणीमागच्या सोनेरी प्रकाशात
मिसळत, अधिक गडद होत गेली.






6/11/14

व्दिधा

परक्या देशात,
परक्या भाषेच्या गल्ली बोळांतून
गाडीच्या चाकाला पकडत करकचून
मी निघाले होते.

शोधल्याही खुणा
नाही असं नाही
ओळखीचं झाड-पान,
बघितलेसे वाटलेले दुकानांचे रंग.

पण भिरभिर डोळ्यांना, क्षणोक्षणी विस्फारूनही
कितीसं ह्या जगातलं
खरोखर
येऊन वसेल मनाच्या कोपऱ्यात?

अटळपणे मग बोलावलं
सोयऱ्या सुरांना
शब्दाला लगडून आल्या
नेहमीच्या आकारांना

बाहेर अजूनही बर्फच
 काळ्यावर पांढरा,
माझ्या मनात मात्र शांत सकाळी,
काळ्या फरशीवर, शुभ्र मोगरा!

बाहेर अजूनही रस्त्यांच्या वेलांट्याजवळ
हिरव्या पाट्या उभ्या ताठ
त्यांच्यावरच तरारून आले
पिवळे रान, वारा सुसाट!

थोडावेळ विसरले
मी
ते
तिथले- इथले
असले फरक.

पण मग पुन्हा
संवेदनांच्या चुकल्या तारांतून
बेसूर आवाजात घुमला
एकच शब्द: व्दिधा!


5/8/14

तिसरा डोळा!

 दोन डोळ्यांनी बघण्याची एकच दृष्टी आपल्याला मिळालेली असते, पण त्या दृष्टीचा केवळ "बघणे" ह्या एकाच क्रियेसाठी उपयोग करेल तर तो मानव कसला? दृष्टीतून आधी अनुभूती, मग पुढे, "मा निषाद!" प्रमाणे अनुभूतीची अभिव्यक्ती, आणि अभिव्यक्तीचे वाचन करणाऱ्याला त्यातून स्थलकाल-अबाधित  एक व्यक्तिगत अनुभव मिळणे, हे सर्व एका दृष्टीनेच निर्माण झालेली साखळी आहे. 

वाचनाचा हा अनुभव प्रत्येकाला असतो, पण आजच्या माहितीयुगात त्या पलिकडे जाऊन वाचनाकडे कुणी बघत नाही. विशेषत:, एका पुस्तकाने मिळालेल्या "दृष्टीतून" दुसरे पुस्तक, वा निव्वळ आपले रोजचे जीवन तपासून बघण्यातला "थरार" अक्षरश: अनुपम असतो. माहिती, किंवा मनोरंजन, ह्या दोन प्राथमिक उद्देशांच्या पलिकडे घेऊन जाणारे वाचन म्हणजे काय असतं? ते ह्या "तिसऱ्या नेत्राच्या" दृष्टीतून बघितल्यावर कळतं!

काही दिवसांपूर्वी मी योगायोगाने सलग ३ पुस्तकं वाचली: 
Wave 

त्यातिल "A Game of Thrones" सध्या फारच लोकप्रिय झालंय. महाभारतापेक्षाही मोठा पट मांडून लेखकाने वाचकांनाच नव्हे, तर कदाचित समीक्षकांनाही गोंधळात टाकून चांगले अभिप्राय मिळवले असावेत. कुणाला "महाभारत" तर कुणाला "कहानी घर घर की" वा तत्सम "अनंत" मालिकांप्रमाणे वाटू शकेलशा ह्या पुस्तकाचे आजवर ६ भाग (प्रत्येकी साधारण ७०० पानी) आलेत, नि लेखक महर्षी व्यासांइतका वयोवृद्ध असल्यामुळे, शेवटचा भाग न लिहिताच "प्रयाण" न करो, अशी त्याचे कट्टर वाचक प्रार्थना करताहेत. एकाच शब्दात वर्णन करायचं झालं, तर शुद्ध "मसाला"! "शोले" ला लाजवतील अशी रसभरीत पात्रं, नि वर्णनं! "२४" ला लाजवतील असे थरारक प्रसंग, आणि Lord of the Rings समजत नसेल तर आमच्या वाटेला जाऊच नका, अशी देशोदेशीची मिसळ. Francis Bacon ने म्हटल्याप्रमाणे, काही पुस्तकं चमचमीत लागतात, ती अशी. 

आजकाल अशीच पुस्तकं, मालिका, सिनेमे खपतात. प्रत्येक "प्रकरणाच्या" शेवटी एक रहस्य. रोजचा एपिसोड संपतांना पुढची झलक, पात्रं वाईटाची अचानक चांगली होणे, किंवा अपेक्षितपणे अनपेक्षित धक्के! मी पण बघते, "डोकं बाजूला ठेवून" बघते असं मात्र म्हणता येत नाही, कारण कधीकधी ह्या "मनोरंजनाच्या" बाजारात आपणही अजून मिरची, अजून थोडी आंबट चटणी, अजून थोडं आलं लसूण शोधायला आपसूकच निघतो. चर्चा करतो, खूप लोकांना तेच चटपटीत आवडलेलं असतं, म्हणून त्यांच्यात मिसळतोही. 

पण तसल्या वाचनाने ना "दृष्टी" येते, ना आपल्या आयुष्यात कुठलाही फरक पडतो. फरक पडतो, तो "Wave" सारख्या पुस्तकाने. सोनिया देरानियागालाची कथा "त्सुनामी" मधे, भूकंपात, बॉम्बस्फोटात सर्वस्व हरवलेल्या कुणाचीही असू शकेल, पण तिने ज्या धैर्याने असीम दु:खाचे पदर उलगडून दाखवले आहेत, त्याला तोड नाही. त्सुनामीने तिच्या पूर्ण कुटुंबाचा एका क्षणात घास घेतला. दोन चिमुरडी मुलं, नवराच नव्हे, तर आई-बाप आणि मैत्रही. हीच एकटी "वाचली", का, कशी, कशाला? ह्या प्रश्नांची उत्तरं कधीच मिळणार नाहीत. जन्मभराची वेदना घेऊन जगायची सवय होऊ शकते, पण त्या कधीही थांबत मात्र नाहीत, हेच सत्य सोनियाने कुठलाही मुलामा न लावता सांगितले आहे. तिच्या पुस्तकाने हेलावून जाणार नाही, असं कोण असेल? 

ग्रीक शोकांतिकांबद्द्ल ॲरिस्टॉटलने म्हटलेले आठवले, "शोकांतिकेचा, किंवा शोकनाट्याचा अनुभव घेतल्यावर माणसाला एकाच वेळी स्वत:च्या क्षुद्रत्वाची जाणिव होते, व त्याच वेळी मनोमन 'बरं झालं, हे दु:खी भागधेय माझ्या वाट्याला आलं नाही!' अशी सुटकेचीही भावना होऊन समाधान मिळतं." Wave वाचल्यावर माझ्याही क्षुद्र "भावनांचा निचरा" झाला असेल कदाचित, पण त्याही पुढे जाऊन, कुठेतरी वाचनाच्या "तिसऱ्या उद्देशाची" जाणीव झाली: मनाचे उन्नयन. 
जीवनाची क्षणभंगूरता, पण त्याच वेळी, सोनियाने आपल्या कुटुंबाच्या आठवणींना स्वीकारून, त्या आठवणींमधलं प्रेम, सौंदर्य, जपण्याचा त्या पुस्तकातून केलेला प्रयत्न, आणि तो वाचतांना मला मिळालेल्या अनुभवातून माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन, काही प्रमाणात नक्कीच बदलला. शेकडो पुस्तकं वाचली, तरी काही जन्मभर स्मरणात राहतात, ती ह्याच मुळे. त्या पुस्तकाचा अंतर्यामी अनुभव आपण कधीच विसरू शकत नाही. 

दोन अत्यंत टोकाची पुस्तकं वाचली खरी, पण Fahrenheit 451 च्या दृष्टीतून बघतांना मात्र नवीनच साक्षात्कार होत गेले. भविष्यकाळात (जो आताचा वर्तमान आहे), पुस्तकं जाळण्याचे सरकारी काम करणाऱ्या एका fireman ची ही कथा. शोकांतिका अशी, की कुण्या जुलमी राज्यकर्त्याने पुस्तकांची बंदी ह्या समाजावर लादलेली नाही, तर ती समाजानेच स्वत:वर ओढवून घेतलिये, कारण त्यांना हळूहळू पुस्तकांची गरजच वाटेनाशी झालिये. घराच्या चारही भिंतींवर टी.व्ही. प्रसारणातून तुम्हीच मालिकेत सहभागी होऊ शकता. मालिका रसभरीत. मनोरंजक. दिवसभर काम, आणि थोडं मनोरंजन, ह्या पलिकडे बघायला कुणालाच वेळ नाही.  

७०० पानांची कादंबरी मग १०० पानांची झाली, तिची मग १० पानी कथा झाली, (आणि होत होत १४० अक्षरांची tweet झाली).  इतकंच काय, गाड्या दिवसेंदिवस अधिकाधिक वेगाने धावू लागल्यावर, रस्त्यांवरचे फलक वाचणेपण कठीण पडायला लागले, त्यामुळे तेही मोठमोठ्या पण कमीतकमी अक्षरांत लिहण्याची प्रथा पडली. 
उगीच नको ते वाचून नको ते विचार, आणि विचारातून व्यक्तिस्वातंत्र्य, स्वातंत्र्याचा परिणाम जबाबदारी! जबाबदारी हवीच कुणाला? सरकार तर नागरिकांना सर्वोच्च सुखासीन जीवन देण्यास करबद्धच असतं, मग एकेकाळी आग विझवून पुस्तकं वाचवणारे firefighters, आता घरांवर छापे घालून पुस्तके जाळणारे झाले. 

ह्या भिंगातून मला Wave आणि Game of Thrones चे "खरे" रंग दिसायला लागले. खरंतर Wave असो वा GoT, दोन्ही जीवनाला आरसा दाखवतात, असेही कोणी म्हणेल. वाचनच काय, कुठल्याही उपक्रमात, "उद्देश" महत्त्वाचा तर असतोच, पण खरोखरी सकस वाचनाने कुठेतरी सहानुभूती जागृत होते. एक विचार जागा होतो, एक जाण येते. ही दृष्टी मला Fahrenheit 451 ने दिली. "Fahrenheit" च्या विश्वात सगळेच Game of Thrones वाचणारे, जगणारे. आणि ते विश्व भयानक आहे. 

ही त्सुनामी लाट हळूहळू येते आहे. त्यात माझे जिवलग: ॲरिस्टॉटल, फ्रान्सिस बेकन, शेक्सपियरच नव्हे, तर कुसुमाग्रज, शांताबाई शेळके, ग्रेस, दुर्गाबाई नि गौरी देशपांडेही वाहून जाणारेत, असा भास झाला, नि हादरले. अजून "दृष्टी" यायला हवीये.






3/11/14

हसत हसत!

काल स्वप्नात आजी आली.
कोरडेच डोळे पुसल्यासारखे करीत,
म्हणाली,
"बाई गं श्वास धरून बस...
ही आयुष्याची छोटी छोटी ओझी...
पेलायची तुझी तुलाच.
मोठ्या दु:खांना मिळतील अश्रू
मिळतील सांत्वना, मिळतील आधारस्तंभ.

पण रोजचे हे जीवघेणे मन:स्ताप-
गोड आमरसाचे कडवट पिवळे डाग,
पंख्यावर चिकटलेली जळमटे
खडखड दारावरचे आडमुठे कुलूप.
हेच ठरतात बघ जन्माचे वैरी."

आजीला मी म्हटले,
"एवढा विचार कोण करतंय?"
तर ती न बोलताच हसली होती फक्त.
"त्याहून मोठा विचार,
येईल तुला करता?"
तिचा प्रश्नच मला कळला नव्हता,
अनेक वर्ष!

आता ती स्वप्नात येते,
तेव्हा हसत असते.
कारण मला माहितीये- तिने कशी पेलली ओझी
खूप मोठी, खूप जीवघेणी...
हसत हसत.






2/26/14

ती मुलगी...

प्रिय, 

कुणालातरी कडकडून पत्र लिहावंसं वाटत होतं, म्हणून तुला लिहिते. तू टोटली नालायक आहेस, आणि मला गेल्या १० वर्षात एकदाही पत्र तर सोड, इमेलसुद्धा केलेली नाहीस, तरी लिहितेय, कारण... देवाणी-घेवाणीची मला आता पर्वा उरली नाही म्हण, किंवा, तुला पत्र लिहितांना मलाच काहीतरी मिळतंय असं म्हण! तसंही, पडके २-३ दात, किडक्या हातां-खांद्यांवर टांगलेला फ्रॉक आणि नाकात लोंबलेला शेंबूड ह्या वयात झालेल्या मैत्रित देवाण-घेवाणी करण्यासाठी आपल्याकडे होतंच असं काय?

तुझी चित्रकला: १. जास्वंदीचं फूल २. गुलाबाचं फूल (शेडिंग वगैरे उत्तम असलं तरी हे दोनच नमूने), आणि माझी हस्तकला: १. पेन्सिलींना टोक करतांना, टोक तुटो, साल राहो अशा आकांताने जमवलेल्या सालांची चिकटवलेली फुलं २.ओरिगामी कठीण म्हणून कातरकाम चिकटवलेली ग्रीटिंगं.

मग आपण स्वत:लाच पुढे केलं मैत्रीकरिता, आणि केलं असलं तरी घेतलं नाहीच काही एकमेकींचं. घेणार तरी कसं? स्वप्ना- म्हणजे- शिष्ठ, मनीषा- एकलकोंडी, कविता- भोळीभाबडी, प्रणीता- नीटनेटकी, तू- आळशी, नि मी.....मी सगळंच थोडं धर-थोडं सोड करणारी - अशा ठळक/ढोबळ रेषांनी आपण रंगवत राहिलो एकमेकिंच्या मनाचे आकार.

अजूनही मनीषा कसं म्हणायची, "हं, पुरे आता." किंवा तू कसं म्हणायचीस, "क...शाSSSला काय करायचंय?" ते आठवून आपण किती हसतो, भेटलो की. आणि नाही भेटलो की, अगदी २ महिने उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्याला गेलो, तरी एकमेकिंना पत्रं पाठवायचो. 

पण नाही भेटलो गेल्या १० वर्षात. सगळ्या बायकांचं होतं तेच आपलंही झालं. तेंव्हा, जागरण कर-करून तात्विक चर्चांचा कोळ करून प्यालो,  पण आता संसारात, नि व्यवहारात, अडकलोच. 

पण परवा तू फेसबूकवर काय एक कॉमेंट केलीस माझ्या फोटोवर, आणि मला आपले फुलपंखी दिवस लख्ख आठवले गं पुन्हा! पुन्हा लहान झाल्यासारखं नाही वाटलं, पण "लहान असतांना आपण असे होतो का?" असं वाटलं. मला १०वीला कोणत्या विषयात किती मार्कं होते, ते तुझ्या बरोब्बर लक्षात! मी चाट. पेपर लिहून झाला, की कोणत्या प्रश्नाला काय उत्तर लिहिलं ते स्वत:चंच स्वत:ला न आठवणारी मी, आणि २० वर्षांपूर्वीच्या माझ्या मार्कांचा नकाशा डोळ्यापुढे आणून फेसबूकवर माझ्याशी बोलू पाहणारी तू. 

पुला खालून किती पाणी वाहून गेलं, पण थोडंसंतरी ओंजळीत उरलं, ते तुझ्यामुळे. आपण कोण होतो, शाळा-कॉलेजात समोर हजारो रस्ते, आणि हजारो शक्यता, पण मनावर अर्धवट उमललेल्या स्वप्नांचं ओझं! मी सांभाळलं (तू ही असशील, असं वाटतं), ते आपल्या मैत्रीमुळे. मी तुझ्यासारखी नव्हे, पण तू ही माझ्यासारखी नाहीसच, हे जाणून मला, स्वत:ला स्वीकारण्याचं बळ आलं असावं. 

आता नवरा, मुलं, सासू-सासरे, अगदी आई-बाबा-भावालाही जी मुलगी कधीच माहिती नव्हती, ती फक्त तुझ्याकडे थोडीशी उरली आहे. ती मुलगी, निदान थोडे क्षण तरी, मला भेटायला हवीये. तिच्याकडून मला पुन्हा थोडी स्वप्नं विणून घ्यायची आहेत. तिला तुझ्या पत्रातून पाठवतेस का? 
मी बदलले, ते काही वाईट नाही, तरीही, 
कुणीतरी लागतं असं- जमेल/न जमेल, झेपेल/न झेपेल असल्या फालतू विचारांना, निखळ प्रेमाने बगल देऊन, तुम्हाला पुढे ढकलणारं. 
कुणीतरी लागतंच असं- तुम्हाला तुमच्या फुलपंखी दिवसांतल्या नावाने ओळखणारं. 

इतकंSSS सेंटी पत्र लिहिलंय मी, तर मठ्ठ मुली, आतातरी पेन उचल. किंवा, नकोच उचलू. फ़ेसबूकवर कॉमेंटी कर फक्त- उचलला माऊस, केलं क्लिक. आळशे, "बूडही हलवायला" लागत नाही पत्र लिहायला. म्हणून लिही. 

तुझी...