11/20/16

ग्रफेलो: 2


घुबडाच्या हातावर देऊन तुरी, पुढे निघाली उंदराची स्वारी
नागोबा तेवढ्यात सळसळत आला, फणा काढून गोड तो बोलला
"उंदीरमामा, तुला इतकी कसली घाई?
माझ्या घरी चल, करतो मस्त सरबराई!"

                                   "तुझ्या घरी, त्या ओंडक्यांच्या खाली
                  नागोबा, असेलच ना गाSS सावली
                  (मलाच कशाला ही अवदसा आठवली?)
                                     पण आज नको, मी आहे फारच घाईत
                  ग्रफेलोला भेटलो नाही, तर होईल पंचाईत!"
"ग्रफेलो, ग्रफेलो? तो कोण असतो?"
                                    "नागोबा तुला माहित कसं नाही?
                                     ग्रफेलोसमोर तुझं काही खरं नाही!
                                     डोळ्यात त्याच्या पेटल्याहेत केशरी ज्वाळा
                  जीभेचा रंग तर रात्रीहून काळा
                  पाठीवर फुटलेत जांभळे काटे
                  दुरून दिसला, तरी फार भीती वाटे!"
"बापरे! उंदीरमामा, इतकंच बोला
कुठे भेटणार तुम्ही ह्या ग्रफेलोला?"
                                   "इथे, ह्याच तळ्यापाशी येईन, तो म्हणाला
                                    सापांच्या शेवया खाईन, तो म्हणाला!"
“"बरं बरं उंदीरमामा! टाटा बाय बाय,
मला फक्त फणाच, पण का नाहीत पाय?"
नागोबाने जाताजाता केली सळसळ, आणि गवताच्या वाटेने काढला पळ!
                                    "वेडा रे नागोबा! त्याला कळलंच नाही
                   ग्रफेलो असं मुळी नसतंच काही!"

== 0==0==0==0
शेफारल्या उंदराला स्फुरणच चढलं
कोल्हा, घुबड, सापाला त्याने वेड्यातच काढलं
तितक्यात हादरले डोंगराचे कडे
मोठा एक पंजा पडला डोळ्यापुढे
अजस्त्र जबड्यात, दात, जसे खिळे!
डोकावत होते बाजूने दोन मोठे सुळे!                                              
झाडाच्या खोडासारखे खडबडीत त्याचे पाय
उंदराला झालं दे माय धरणी ठाय
नाकावर दिसली विषारी पुटकुळी,
आणि धारदार नखं बघून बसली दातखिळी
डोळ्यात त्याच्या पेटल्या केशरी ज्वाळा
जीभेचा रंग तर रात्रीहून काळा
पाठीवर त्याच्या जांभळे काटे फुटलेले
उंदराला आता कापरेच भरलेले
"देवा मला वाचव, आता मात्र मी मेलो!

हाच तो, हाच तो, हाच तो ग्रफेलो!" (तिसरा, शेवटचा भाग लवकरच टाकते!)


10/28/16

पटेल कॅश अँड कॅरी

"पटेल कॅश अँड कॅरी"
मी स्वतःशीच हसले, हे वाचून. 
आत गेल्यावर
बचकभर गवार कोंबली  
हातातल्या पारदर्शक प्लॅस्टिकमधे 

इथले व्यवहारही असेच. 
पारदर्शक पिशवीत दिसतात हिरव्या तजेलदार भाज्या 
पण आतून बेचव, कधी राठ.
बघा, पटेल, तर यू कॅन कॅश इन 
अँड कॅरी ऑन
समहाऊ.

आधी आधी चीजचॉकलेटं
खाल्ली ओ येईस्तोवर 
पण मूळचा कांद्या-मुळ्याचा, आलं-लसुणाच्या वाटण्याच्याही वास 
(का सहवास!) जाता जात नाही घरातून 
कितीही कॅण्डल लावल्या तरीही.
लोकही विचारतातच आवर्जून, "तुम्ही वडाभात कसा करता?"
आणि वडीलमाणसं तर सदा कानामागे 
"मेरा भरीत महान" गुणगुणतच असतात. 
फक्त पुढे हे पालुपद जोडून, की "आम्ही म्हातारी माणसं,
तेव्हा बघा...
पटेल तर!"

देशातून परत येतांना मात्र 
काय भरू काय नको होत राहतं
पापडासारखे मनाचे पीळ तिकडून आणायचे सहज  
इथे येऊन कडक कोरडे वाळवून घ्यायचे 
कारण ज्यादिवशी सगळी शक्ती संपलेली असते 
त्यादिवशी खिचडीला 
त्यांचाच आधार होतो 
पण नाहीच आणता आले, तर आहेच 
पटेल - कॅश अँड कॅरी 
पटेल - तुम्हालाही हळूहळू, पटेल 

रोजचीच त्रेधातिरपीट: कधी ही कणीक, कधी ती 
तरीही 
कॉइलवर, कितीही रक्त आटवलं 
तरीही 
क्षणात वातड वातड होणाऱ्या 
त्या वैतागवाण्या पोळ्या!

त्यावर उपाय म्हणून की काय 
मसाल्यात गच्चं भरलेला
गंधास्वादाचा संस्कार
आजकाल सढळ हातानेच करू लागले आहे 
कधीकधी तर भसकन पडतोच! 
मग शेजारीच नव्हे, तर पोरंही नाकं वाकडी करत विचारतात 
"मॉमी, इट सीम्स यू मेड युअर मंथली ट्रिप टू दॅट...
व्हॉचामा कॉल इट...पटेल?"


पण विसरू देत नसतो इथला बर्फ 
तुम्हाला तुमचं गोठलेलं वास्तव 
रस्तेच बंद होतात तेव्हा, ब्रेड ऑम्लेट, पास्ता, सूप 
भगवावंच लागतं 
पण शनी-रवी त्या पटेल मधली गर्दी बघून 
कधी असंही वाटतं: 
की वी शूड बी एबल टू कॅरी ऑन
विदाउट धिस........पटेल!

खूपशी स्वप्नंही मग पडून राहतात 
महिनोंमहिने फ्रीजरमध्ये 
दामटून, वा दयेपोटी, पोरं झोपलीच लवकर 
तर दोघांनी पिक्चर बघत 
एकमेकांना चमच्या-चमच्याने भरवायची.
जस्ट हीट अॅंड सर्व्ह!

अळणीच रुटीनवर, रोज भांडणांच्या फोडण्या 
घालायच्याही...दोघांनीच मिळून 
पण धुराने वाजणाऱ्या भोंग्याने 
ओशाळंही व्हायचं लागेचच! कारण पटेल, न पटेल 
तरी शेवटी हीच कॅश कॅरी करायची आहे 
जन्माची पूंजी- म्हातारपणी!

पहिल्यांदा पाऊल टाकलं होतं 
देसी ग्रोसरीत, तो क्षण...
अजूनही आठवतो 
विस्फारलेल्या डोळ्यांनी म्हंटलं होतं
"अय्या! खरंच इथे सगळंच मिळतं की!"
आता वाटतं, खरंही आहे ते......
पटेल, हळूहळू पटेल.
कॅश अँड कॅरी. 
ऑन.  





10/26/16

'Tis the season of Diwali

इथे क्रिसमसच्या सुमारास सगळ्या रेडिओ स्टेशन्सवर नाताळची गाणी लागतात. ती मला तर आवडतातच, पण लहान मुलांना अगदी वेडंच करतात. आमचं पिल्लू गेल्यावर्षी "Santaclaus is coming to town" म्हणून म्हणून आमचे कान पिकवत होतं, आणि त्याच्या पलिकडल्या वर्षी त्याला "Rudolf the red-nosed reindeer" मधला रुडॉल्फच हवा होता! रेनडियरची बाहुली शोधायला मी किती वेबसाईट पालथ्या घातल्या होत्या त्याची गणना च नाही!

पण आपल्या दिवाळीची अशी कुठली गाणी नाहीयेत, त्यामुळे मला छोट्याला काहीच शिकवता आले नाही. चित्रपटगीतं एकतर चांगली नाहीत, किंवा छोट्यांना गाता येतील अशी नाहीत. मग काय करायचे? त्याच सुमारास मी इथल्या मराठी शाळेत शिकवत असे. तिथे मुलांना "Sunday, Monday, Tuesday, Wednesday..."च्याच चालीत
"रविवार सोमवार मंगळवार बुधवार..." हे गाणे आम्ही शिकवायचो. मग त्यावरून मला सहज सुचले:

'Tis the season of Diwali, 
Fala lala la la lalala
Eat some yummy ladoo chakali, 
fala lala la la lalala
Let's make colorful Rangoli
Fala la lala la, lalala
Celebrating with family
Fala lala la la lalala
Paper-lanterns in the alley (आकाशकंदील हो!)
Fireworks will make us jolly
Fala lala la la lalala

'Tis the season of Diwali
Fala lala la la lalala
Ravan was a big bad bully
Lord Ram beat him for us, thankfully. 
Let's welcome him home, merrily
Light up lamps to show it truly!
Fala lala la la lalala

मराठी सणांचं गाणं इंग्रजीत, तर ख्रिसमसचं गाणं मराठीत म्हणायचं, म्हणजे ख्रिसमसप्रमाणेच दिवाळी, आणि मराठी, हीपण मुलांना जवळची वाटू लागतील, अशी आशा!
आणि हो, सर्वांना मनापासून

!!शुभ दीपावली!!


10/17/16

दिल है, महफ़िलमें भी तनहा हो सकता है

दिल है, महफ़िलमें भी तनहा हो सकता है 
जो पाया था, वो ही अक्सर खो सकता है 

जाँ से जाते जाते हमने ये समझा 
बारिश में पत्थर को देखो, रो सकता है 

जज़्बातों के ढ़लते मौसम जाते रहें 
यादें तो फिर हर कोई पिरो सकता है 

अपनी ख़ताएँ गिनने वाले कम न हुए 
हम जो कर गुजरे वो किससे हो सकता है!

दर्द को सुननेवाले अबके कहाँ मिले 
ख़ुशियों का बाज़ार लगा है, वो सस्ता है 

तुमसे उम्मीदें तो थीं पर फिर सोचा 
उम्मीदों से हारे कच्चा वो रिश्ता है 

शहर था खाली, दोस्त नही थे, पर खुश थे 
राह उजड़ने की देखे, दिल वो कब बसता है 

हमसे पूछो मत हाल-ए-दिल अपनी कहो
प्यारा लगता है वो बच्चा जो हँसता है 

काश के हम भी होते सूखे पात की तरह 
कागज़ के पन्नो में सिमटा सो सकता है

9/25/16

खेळ खलास!

गेल्यात जमा करावे आता क्षणिक श्वास आणि उच्छवास 
कितीक काळ टिकणार, जीवना सखया! तुझ्यावरचा विश्वास? 

कोसळो वेड्यागत पाऊस, फुटोत हिरवे कोंब कुठे 
दगडातही पाझरेल का हर्षभारितसा श्रावणमास?

ढगात काळी स्वप्ने ती का गतजन्मीचे प्रेम अवनीचे 
गोड दुःख मुरलेल्या वाटे कवळु ओलसर मृदगंधास

देव मानुनी फसली सीता, देव शोधता हरली मीरा
देव नको मज प्रेम हवे पण, तू पुससी हा हट्ट कशास!

दिले मन तुला भान हरपुनी, प्राण मागसी वर पुन्हा?
घेऊन जा जे उरले काहूर, राख उडवुया! खेळ खलास!











9/12/16

चौघीजणी समुद्रकिनाऱ्यावर

अनिता: मूळच्या अत्यंत समंजसपणामुळे साधारणतः सदैव कशा ना कशावर किंवा कोणा ना कोणावर चिडलेलीवनिता: घरचा विरोध मोडून मुंबईला, अक्षरशः हातावर पोट घेऊन नोकरी करताना उदंड उत्साह्याला ओहोटी लागली तरी मनाचे पीळ ना सुटलेलीसुनीता: हिची प्रचंड पुस्तकी बुद्धिमत्ता तिच्या एकूण भावनिक विकासाच्या आड येत असल्यामुळे सतत भेटलेल्या यशातही स्वतःच्या क्षमतांबद्दल साशंक प्रणिता: आपली, कृपाभिलाषी. अर्थात, घरच्या 'फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स' मध्ये फारशा भावना न अनुभवता आल्यामुळे इतरांच्या स्पंदानांचे हेलकावे शोधत, साहित्योपासनेत रमलेली. आनंदी-दुःखी निरीक्षिका"आपण बियर पिऊ!" अनिता तिच्या भावांकडून आणि नुक्त्या पटलेल्या 'सख्या' कडून हे बाळ'कडू' पिऊन आल्यामुळे प्रस्ताव मांडते. प्रणिताला प्रथम-जगातील सवयी माहिती असून, बियर पिण्यात अनैतिक काही नसतं, हे नक्की पटलेलं आहे. शिवाय अनेक लेखकांनी अशा गोष्टींना 'अनुभव-विश्व् विस्तारणे' असं म्हंटलेलं आहे. मुळात, इंग्रजी कादंबऱ्यांमध्ये, एक पेक्षा अधिक व्यक्तींबरोबर झोपणे (मादाम बोव्हारी), स्वतःच्या आईबद्दल आकर्षण वाटणे (इडिपस), इथपासून... बायकोचा खून करणे (मॅकबेथ) इथपर्यंत घटनांना सामोरे गेल्यावर बियर पिणं तर अगदीच क्षुल्लक सीमोल्लंघन म्हणता येईल, म्हणून बऱ्यापैकी विचारस्वातंत्र्य अनुभवत असतांना, प्रथमच आयुष्यात 'मोकळे सुटल्याचा' वारा लागलेली आहे. सुनीताची मेडिकल इंटर्नशिप त्या आडगावात- समुद्रकिनारी!!! तेवीस वर्षात प्रथमच त्या आपल्या आपल्या पिकनिकला आल्या आहेत, कारण तिथे सुनीताच्या खोलीत त्या मोजून एक रात्र जागून, पोटभर गप्पा, आणि केवढीतरी भावनांची देवाणघेवाण करू शकणार आहेत. इतका सुवर्णयोग पुन्हा जमून येणे, आणि जमवणेही......... ह्या जन्मी शक्य होईल का? नाहीच. अशक्यच! नुकतीच डिलिव्हरी वार्डमधून येऊन, बायकांचे रडणे ओरडण पाहून थोडी विस्कटलीये सुनीता, पण ते विसरण्यासाठी थोडी घेतली, तर खूप बरं वाटेल यार! शिवाय, बियरचे शारीरिक परिणाम फारसे गंभीर नसतात इतकं व्यावहारिक ज्ञान तरी डॉक्टरीच्या अभ्यासात मिळालेलं आहेच की. वनिता स्वतः पुढाकार घेणारी नाही, तरी वेडगळ साहस तिच्या रोमँटिक रक्तातच आहे. घर सोडून आल्यावर ती खूप एकटी पडलीये, पण ही मैत्री तिचा आधार आहे. पाहिलं प्रेम, पहिली आठवण, पहिल्या मानाचं, पाहिलंच अंगण! तशी पहिली बियर... धिस बियर इज बॉण्डिंग!
एका दारूच्या दुकानापाशी जाऊन त्यांनी शेवटी अत्यंत प्रयत्नपूर्वक कोरा चेहेरा ठेवत, एक बियरची बाटली मागितली. "किती?" त्याने चौघीजणी बघून विचारलं. "एकच." अनिता निग्रहाने म्हणाली. जवळजवळ पळतच त्या खोलीत परतल्या. "निदान रात्री बारा पर्यंत तरी थांबू!" वनिता नेहेमीच रोमँटिक, आणि "नको. इतका काही हा मोठा इव्हेन्ट नाहीये!" प्रणिता चा कठोर अँटी-क्लायमॅक्स. थेट चेकोव्ह सारखा!त्यांनी सुनीताच्या खोलीतले उभे स्टीलचे पेले काढले. गोमुत्रासारखी ती कुणकुणी गढूळ बियर, एक, दोन, तीन! असा जल्लोष करून घोट घेतला. घाण कडू लागली. अनिताची ही दुसरी का तिसरी वेळ, त्यामुळे तिला जरा जरा चव घेता येऊ लागली होती. सुनीता मात्र एका घोटापुढे जाईना. "मला सकाळी राउंड आहे." "हो तू आदर्शवादी डॉक्टर आहेस बाई!""हो तू उगीच रिस्क घेऊ नको""तू पिणार नव्हतीस तर कशाला आणली आपण ही एवढी मोठी बाटली!"इत्यादी संवाद झाल्यावर त्यांना थोडं हलकं हलकं वाटायला लागलं. (त्यामागे त्या बियरचा शून्य हात होता!) "आपण हे नमिता ला सांगितलं तर ती वेडी होईल!" "आपण हे सरिता ला सांगितलं तर ती एकदम आपल्याशी मैत्रीच तोडून टाकेल!""तू घरी सांगशील?" "हो, त्यात काय?" (हे फर्स्ट वर्ल्ड सुनीताच बोलू जाणे!)मग रात्रभर चेकाळल्यासारख्या गप्पांवर गप्पा झोडून त्या सकाळी सकाळी समुद्रावर गेल्या. टिक्करबिल्ला खेळून, तासंतास सायकल पदडुन, दिवसेंदिवस पत्ते, नाच गाणी, कॅरम खेळून कसंबसं बालपण मागे टाकलं. ते-वीस भली थोरली वर्ष निघून गेली,तरी आयुष्य पुढे सरकतच नाहीये. प्रेम? कि लग्न?आधी प्रेम?कि आधी लग्न?"कोण? कुठे? कधी? कसा?" सगळंच अनुत्तरित. "ए तुला आशिष आवडायचा ना?""हो पण त्याचं आहे ऑलरेडी.""मला प्रेमात पडणं अशक्य आहे. केलाही होता एकदा प्रयत्न" "म्हणजे तुला म्हणायचंय की तुला कोणाला स्वतःच्या प्रेमात पाडता येत नाहीये.""हाहाहाहाहा........ हो तसं समज.""चांगली नोकरी पाहिजे यार आधी!""घरी सांगितलं नाहीये अनिताने अजूनही""मग पुढे काय?"बोंबलायला तेवीस वर्षांच्या चढ उत्तरांच्या शेकडो रात्री गेल्या तरी आयुष्याचा निक्काल काय तो लागत नाहीये.  हे असं अजून किती दिवस चालणारे? किती वर्ष चालणारे??? ही इथे लाट पायापर्यंत येते पण डोक्यावरून चिम्ब भिजवून जात नाही. आपल्याला तर खोलात जाणं होतच नाही, पण बोंबलायला ती लाटही मिळमिळीतच निघाली..... बियरसारखी!"हाहाहाहाहाहा........ " दहा वर्षांनी पुन्हा इथेच भेटायला पाहिजे गं... नक्की भेटूया. जमवूयाच कसंही करून. तेहत्तीस वर्षांच्या त्या चौघीजणी आज पुन्हा कदाचित समुद्रकिनाऱ्यावर उभ्या असतील.  

त्यांना आता वाईनही सवयीची झालेली असेल. 

8/22/16

Syriaतले घर थकलेले संन्यासी

"घर थकलेले... संन्यासी" ह्या कवितेच्या पहिल्या ३ शब्दातच ग्रेस यांनी सगळं सांगून टाकलं असावं! इतकी अर्थघन शब्दयोजना. पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वररचनेतला दोन शब्दांमधला तो जीवघेणा अंतराळ.... त्यात निर्वासितांचं अस्तित्वच नव्हे, तर "टांगणीला" लागलेल्या जीवाचा दाटलेला हुंदका आहे!

Syria देशातून गेली अनेक वर्ष ते चालताहेत. त्यांच्या मागे बॉम्बने विदीर्ण झालेल्या त्यांच्या गावांचा आक्रोश कानापर्यंत येऊ नये म्हणून कान आवळून बंद करून. त्यांची घरं जणू "थकलेली". कुणाची "थकबाकी" असते, कर्ज थकलेलं असतं तसं, घरासाठी वाट पाहणं त्यांच्या नशीबी आलेलं. आणि जीवाच्या भीतीने पायपीट करून करून ते ही थकलेले.  त्यांना "गृहस्थ" कसं म्हणावं? जे घरदाराच्या पाशांमधून निकराने स्वतःला सोडवून निघालेले- ते संन्यासीच म्हंटले पाहिजेत.

आडोशाची "भिंतही खचते" तेव्हा आईच्या डोळ्यातलं नक्षत्र त्यांना आठवतं आहे.
५ वर्षांच्या ओमरान च्या शून्य नजरेमध्ये असेल का तेच नक्षत्र?
आई, जिच्या उबदार पंखांमागे निर्धास्त डोळे मिटून लपून जावं, आणि सगळी चिंता आपोआप विरून जावी, त्या आईचं घरटं, हे प्रत्येकाच्या मनात खोल रुतून बसलेलं एक सुरक्षित स्थान असतं. पाय कितीही भरकटले, तरी तिच्या डोळ्यातल्या नक्षत्राने वाट दाखवावी, आणि फिरून आपण आयुष्याच्या शेवटी का होईना, तिच्या कुशीत निजावं, अशी उर्मी दाटून येते.
पिलं चालू लागतात, पण त्यांची आईसुद्धा देशोधडीलाच लागलेली असते! सिरियन निर्वासितांबरोबर प्रवास करणार्‍या पत्रकरांनी त्याबद्द्ल कितीहि भरभरुन लिहिलं, तरी कमीच...

जवळजवळ २५०,००० नागरिकांचं घर हिरावून घेणारं हे कसलं जीवघेणं युद्ध? गेली ५ वर्ष सतत जाळणारं हे कुठलं "रखरखते ऊन"!
"पक्ष्यांची घरटी होती ते झाड तोडले कोणी
एकेक ओंजळीमागे असतेच झऱ्याचे पाणी"
आयुष्य पाण्यासारखं पुढेपुढे वाहत जाताना, आपण ओंजळीत त्यातले दोन क्षणही सुखाने धरून ठेवू शकत नाही. प्रेमाची माणसं कालाधीन, तर कधी दुरावलेली... हातातून निसटून जातात. प्रत्येकवेळी ओंजळ भरून घेतांना त्यांना त्यातून निसटलेला झराच आठवत असेल का?
उलट प्रवाहाविरुद्ध पोहणारे जिगीषू निर्वासित, त्यांच्यातले किती पल्याड पोचू शकतात? एका बापाला मृत पोरासाठी अश्रू ढाळत न बसता, तसंच पुढेपुढे प्रवाहपतीत होऊन जावं लागतं. एक पिलू वाहून गेलेलं, त्याला आठवलीच असेल ना आपली आई, त्या अंतिम क्षणांमध्ये?

"मी भिऊन अंधाराला अडगळीत लपुनी जाई" जर कधीकाळी ह्या वाटसरूंना आश्रय मिळाला, तरी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेला "अंधार", ते अत्याचार, रक्तपात, बलात्कार, चिंधड्या - त्यांना विसरता येतील का कधी? घरासाठी रानोमाळ फिरणाऱ्या भटक्यांना जर घर कधीकाळी मिळालंच, तर ते हि पुन्हा नव्याने तिथे रुजतील. घरातल्या "अडगळीत" त्यांना सुरक्षित वाटूही लागेल. तो सवयीचा पसारा, "माझ्या" असणाऱ्या वस्तू, हौशीने जमवलेली भांडीकुंडी....... रोज रोज डोळ्यांना दिसल्या, कि जीवनाच्या सुरळितपणाचा क्षणिक दिलासाही मिळेल.

पण एकदा ज्यांनी आपलं घर उद्ध्वस्त होणं अनुभवलं आहे, त्यांना कायमच त्या "दरीतल्या वनराईचा" धसका लागून राहणार. ती भयाण वनराई, ते भटकेपण, कधी येऊन पुन्हा घर गिळंकृत करील? करील का? सगळीकडून ती आपल्या घरावर "हलके हलके" पुन्हा अतिक्रमणकरू लागलं आहे हा भास.... त्यातून त्यांची सुटका नाही.

तोवर घरात राहूनसुद्धा "घरपण" मात्र थकलेलं च राहील!

8/8/16

कवितेचा लोचा

आमच्या जीउनात कवितेनेच सगळा लोचा केलाय. हे पक्कंच कळलंय. आदिमानवांच्या काळात भाषा अशी असावी :
आ.ई (म्हणजे आदि.आई). : झाड (झाडाकडे बोट दाखवून)
आ.बा. (आदि.बाळ): दाल
आ.ई.: झा................ड....
आ.बा.: झा.....लं, जालं, जाड, झा.......................ड!

भाषेचा विकास, हा इथेच थांबायला हवा होता. "त" वरून "ताकभात" ओळखता येण्याइतकी बुद्धी (सुदैवाने/दुर्दैवाने) माणसाला मिळालेली आहेच की. पण नाही. थांबायचं कुठे, हे ज्याला कळत नाही, तो प्राणी म्हणजे माणूस. आपली भाषा, आणि त्यायोगे आपलं जीवन, अधिकाधिक कॉम्प्लिकेटेड करायला ज्याला आवडतं, आणि मग त्या गुंतागुंती बद्द्ल रडतांनाही नवनवीन सुरात कसं रडून दाखवता येईल, ह्याचा विचार जो करतो, तो प्राणी म्हणजे माणूस. आणि म्हणूनच, माणूस = कवी. आणि म्हणूनच, काव्य-भावनेनेच सगळा लोचा केलाय, हे पक्कं.

नुसतं "झाड" म्हणून थांबायच्या ऐवजी, मग झाड हिरवं असतं, हिरव्या झाडाला खूप पानं असतात, झाडाची पानं वाऱ्यावर डुलतात, झाड सुंदर असतं, ही असली निरूपयोगी निरीक्षणे करणं, हे कवीचं काम असतं. इथे कवी= शिकार, झाडे तोडणे, एकमेकांवर स्फटिके आपटून आग लागते का बघणे, ती स्फटिके विकून चार कोंबड्या विकत घेता येतील का ते पाहणे, असले कुठलेही "अर्थपूर्ण" उद्योग करायचे सोडून, झाडाची हिरवी पानं बघत बसलेलं खुळं, हा एकच अर्थ अभिप्रेत आहे.

हे खूळ म्हणजे एक खूळच असल्यामुळे, कवीमंडळींना आत्मविश्वासाचा जबरदस्त विंचू चावलेला असावा (अगदी आदिकाळापासून), कारण, तुम्ही हे जे (इतरांना) उपयुक्त पण स्वत:ला निरूपयोगी जीवन जगताय, ते काही खरं नाही, असं सांगून त्यांनी आम जनतेलाच वेड्यात काढलं. उलट कवींना सरळ बुद्धी दे रे बाबा, म्हणून "आदि"माते ला विनवण्यापेक्षा, कवींची निरीक्षणं स्मरणात ठेवून चघळणे, एकमेकांना ऐकवणे, असल्या प्रशस्तीमुळे कवी मंडळी लई डोक्यावर चढत गेली ती गेलीच.

शिवाय, रोज रोज खाल्यावर जसे स्वयंपाकातले बारकावे कळू लागून "रसिक" जन्माला येतात, स्वत:ला गाण्यात गती नसूनही जसे "कानसेन" तयार होतात, तसेच रोज रोज हा खुळ्या शब्दखेळाचा रतीब ऐकून-वाचून वाचकही प्रगल्भ (किंवा बोअर) झाले, की त्यांनाही वर्णनात्मक कवितांनी किक बसेनाशी झाली, आणि कवींना उपमा-उत्प्रेक्षांच्या फोडण्या घालून घालून शब्द खपवायची वेळ आली.  हे मीच नव्हे, लेव्ही स्ट्राऊसनेही म्हटलंय बरंका. आणि काय म्हटलं, यापेक्षा कुणी म्हटलं, ह्याला जास्त महत्त्व आहे, असं पुलंनीही म्हटलंय, जे स्वत: पु.ल. असल्यामुळे, त्यांच्या म्हणण्याला तरी मान असणारच किनई!  इथवर ठीक होतं. खरा लोचा झाला, तो पुढेच आहे.

आता तुम्ही म्हणाल कि कवितेत मला काय प्रॉब्लेम! मी काय कवी/कवयित्री नाही. असते तर लेख लिहिण्या ऐवजी कविताच केली असती ना हो. कविता करण्या/ वाचण्याचा छंद तसा निरूपद्रवी आहे. वर सांगितल्याप्रमाणे, कवी मंडळींंचा प्रक्षोभ सक्रीयतेकडे क्वचितच पोचत असल्याने, तसाही काही धोका नाही. "आदि"कवी वाल्मिकींनाच बघा, हरणाला बाण मारणारा शिकारी बघून एखाद्याने त्याचा हात धरला असता, किंवा किमानपक्षी नंतर त्या विद्ध हरणाला मलमपट्टी केली असती, पण हे फक्त "मा निषाद!" म्हणून काव्यच करत बसले, आणि संस्कृतात वगैरे लिहिल्यामुळे त्यांचा आदिकवी म्हणून गौरव झाला, तो वेगळाच. काय नशीब असतं एकेकाचं. आम्ही जन्मल्यापासून पांढऱ्यावर काळं खरडतोय, खरडतोय, तरी ब्लॉगवर कॉमेंटाही येणं दुरापास्त. आणि इथे, दोन शब्द म्हटले, की झाले कवी!

पण ते ही मान्य. खरा लोचा झाला, तो पुढेच आहे.

सुरुवातीला कवींना राजाश्रय असे. म्हणजे खाऊन पिऊन (कदाचित जास्त पिऊन सुद्धा), कविमंडळी खूष असत. पण स्वतःला विकणं इतकं सोपं नसतं! त्यासाठी स्वतःचं व्यक्तिमत्व तसं घडवावं लागतं, मी, माझे विचार, माझ्या भावना, माझे अनुभव, सगळंच किती मनोरंजक आहे, हे दाखवावं लागतं. आणि दाखवता येण्यासाठी तसा तेवढा स्वतःवर विश्वासही असावा लागतो. किंबहुना, स्वतः सोडून दुसरा तिसरा कोणाचाही विचार करून चालतच नाही.
किंवा, दुसऱ्यांचं निरीक्षण केलंच, तरी ते "आपल्याच" रचनेतून मांडायचं, त्यासाठी त्यांच्या गोष्टी वापरायच्या.

हे असं आत्ममग्न जगणं कवींनी सुरु केलं, तिथेच देकार्त सारख्याला, "I think, therefore I am" चा साक्षात्कार झाला असावा. मी म्हणजेच माझं मन. माझं मन, माझे विचार म्हणजेच मी.
म्हणजे काय, की एकवेळ स्वत:ची मुलं नसली, तरी मी आई हे बिरूद लेऊ शकते, घर सांभाळत असले, तर "होममेकर" हे "पद" भूषवू शकते, पण मी विचारच करत नसले, तर मी अस्तित्वात आहे की नाही, हाच प्रश्न पडावा!

आणि लोचा असा, कि फक्त कवी लोक असले "विचार" करत असत, तोवर ठीक होतं. विचार करणं, हि त्यांची व्यावसायिक गरज म्हणा ना! पण इतर लोहार, कुंभार, भाजीवाले, सैनिक नि गिरणीवाले... सगळ्यांनाच हे एकदम हॉट म्हणजे एकदम हॉट प्रोफेशन वाटू लागलं ना! दुकान टाकायला एक पेन नि कागद, आणि कामाच्या नावावर नवनवीन प्रेमप्रकरणे, देशाटने, लोकसंग्रह....... शिवाय प्रसिद्धी, आब आणि किताब, कोणाला आवडणार नाही???

आणि सगळेच कवी, तिथे वाचक विरळा! लेखन, प्रकाशन आधीच इतकं सोपं होतं, ते ब्लॉगद्वारे किंवा जालावर आणखीनच सोपं झालं, आणि काही वेबसाईटतर, हजारो लोकांनी, वेगवेगळ्या मुद्द्यांवर, हरप्रकारे चर्चा करावी, ह्यासाठीच बनलेल्या आहेत. स्वत:च्या विचारांना, आणि मतांना, एवढं महत्व येऊ शकतं, हे फक्त आताच्याच पिढीने पाहिलंय.

त्यामुळे किनई, ऐकून घेण्याची कला मागेच पडलीये, आणि समंजसपणा किंवा सगळ्यांशी जुळवून घेणे हे काय असतं? आजकाल ह्या कलेला कुणी विचारतच नाही, तिची उपासना करणे तर दूरच. बघावे तिथे मी मी मी चा घोष! आत्मकेंद्रितेची फ़ॅशन.

हेच बघा ना, मी तरी दुसरं काय करतेय? घेतला लॅपटॉप कि लागले बडवायला :) म्हणूनच..... आता स्वतःलाच सल्ले द्यायची वेळ आलीये. प्रत्येकाने स्वतःला (आणि केवळ स्वतःलाच) सल्ले द्यावे, ही काळाची खरी गरज आहे. आणि अगदी कविता वगैरे लेखनाचं मनावर घेतलंच असेल, तर आधी सहृदयतेचं वाचनपुण्य गोळा करायला हवंय.

पोकीमॉन शोधतात, तसे मीरा,सूर, कबिरा शोधायला हवे आहेत. त्यांच्या मागे वेडं व्हायला हवंय. तसं वेड लागल्याशिवाय......कवीपण अंगी येत नसतं महाराजा.










8/6/16

तुझी आठवण

तुझी आठवण क्षणाक्षणाला 
बरसत गेली पानांवरती 
पागोळ्यांतून रेषेवरती 
शब्द सावळे अविरत झरती 

मेघाच्याही मनात तेव्हा 
दाटून आला एक हुंदका 
सागराच्या मनातल्या 
हिंदोळ्यांना आली भरती 

कुंद गारवा लेऊन बसले 
तरी विसावा नाही क्षणभर 
गर्द काजळी आभाळासम 
तुझी आठवण माथ्यावरती. 


4/18/16

एवढंच.

घराजवळ येताच पावलं जशी सहज होतात
तसं आयुष्य व्हावं - एवढंच
खूप थकून उशीवर निश्चिंतपणे टेकावेत श्वास
तसं मरण यावं - एवढंच.

अविरत फडफडणारे पक्षी आकाशातही
स्थिरावतात - पण क्षणभरच
त्या एका क्षणात पुन्हा तडफडण्यासाठी
बळ मिळावं - एवढंच

हातांना स्वत:चा रंग देऊन
नकळत गळून पडते मेंदी
प्रेमाच्या नक्षीतूनही तितकच अलगद
विलगता यावं - एवढंच

हातावरच्या रेषांमध्ये असूनही तारकांच्या खुणा
मातीमळल्या निखाऱ्यासारखं जळता यावं - एवढंच
प्रकाशरूप अस्तित्वालाही राखेसाठी
ओवाळून टाकता यावं - एवढंच

2/24/16

मराठीपणा-इंग्रजीपणा

एवढ्यात  शिवाजी जयंती झाली तेव्हा माझा महाराष्ट्र, माझी मराठी या प्रकारच्या काही बातम्या आणि व्हॉटसप फॉरवर्ड आले, ते वाचून मला एकदम हुक्की आली कि काहीतरी मराठी- गौरावात्मक लिहावं . पण मनात आलं, की झालं लिहून, अशा सोयी आता आमच्या वाट्याला क्वचितच येतात (पहा: आईचा स्वत:च्या वेळेवर कधीच हक्क नसतो का?)
त्यामुळे "मनातलेच मांडे" खायची वेळ आली असे म्हणतानाच, एका मैत्रिणीचा फोन. "काय करताय  विकांताला?" बाकी काही असो. मराठी माणूस तसा मुळात आळशी असल्यामुळे, विशेषकरून विकांताला फारसे कुठले कार्यक्रम न ठरवता, 'भरपूर कौटुंबिक वेळ' घालवण्यात पटाइत :) त्यामुळे माझं ताबडतोब उत्तर, "काSSSही विशेष नाही. येताय का?" पोरं एका वयाची असल्याने आमचं चांगलं जमतं.  (आजकाल कुणाशी चांगलं जमण्याचे निकष, पोराच्या उंचीइतके 'खालावले' आहेत, हे उघड आहे :) :) सो बाकी फारसा विचार करायची गरज नव्हती, फक्त,मैत्रिणीच्या नवऱ्याला खायला काय घालायचं, हा एक मोठा प्रश्न होता. 

दिल्लीच्या, पण पटन्यात वाढलेल्या, आता आईवडील बंगलोरला स्थाईक झालेल्या आमच्या ह्या मित्राचं मला कौतुकच जास्त वाटत आलेलं आहे, कारण गेली अनेक वर्ष मी केलेले अनेक बरे वाईट मराठी पदार्थ तो बिचारा न कुरकुरता खात आलेला आहे, पण …….चेहरा मात्र मलाही नेहमी खरं सांगत आलेला आहे! आता मुळात त्याने मराठी बायको केली (माझी मैत्रीण) म्हणून मी फारसा त्या चेहऱ्याचा विचारही करत नाही, पण तरी, एखादी भाजी नेहमीची आणि एखादी आलं लसूण पनीर टाईप असतेच. आज मात्र अवचित ठरल्यामुळे, माझ्या समोर यक्ष-प्रश्न उभा ठाकला. मैत्रिणीला विचारले तर ती म्हणाली, "भजी कर." भज्यांपुढे त्याला काही दुसरं लागत नाही." 
"चला एक तरी मराठी पदार्थ तुला आवडतो!" मी त्याला गमतीने म्हटले, तर तो म्हणाला, "भजी मराठी नही है! भजी मतलब भुजिया, मराठी लोगों ने हमसे ही सिखा है!" झालं, मग आमची व्हॉटसप-वॉर  जुंपली! मी मराठी पदार्थांचे गुणगान चालवले, तर त्याने मराठी पदार्थ कसे करायला कठिण  पण खायला तरीही सहज न आवडणारे, असे आरोप लवले. अर्थात, सासूविषयी बोलायचा हक्क फक्त सुनांनाच नसतो, त्यामुळे, "आमचा सासूबाईंनी सकाळी ३ तास खपून, केलं काय तर उपासाचं थालीपीठ!" असले धमाल विनोद सुरु झाले. टू स्टेट्स सिनेमा प्रमाणे, तुम्हा पंजाबी लोकांना दुसऱ्या चवीचं काही आवडत नाही, नि तुम्ही आवडून घेतही नाही वगैरे मुद्दे मी मांडले.

मग तेवढ्यातच बाजीराव मस्तानीचा विषय निघाल्यावर तो म्हणाला," तुम्ही मराठी लोक एकतर आपले मंगळागौरीचे खेळ वगैरे कुणाला सांगत नाही, दाखवत नाही, आणि आजकाल तर, खेळतही नहि. मराठीपणा मध्ये समरस होण्याचा फारसा मौका तुम्ही अ-मराठी लोकांना देत नहि. तुमची मराठी संस्कृती संस्कृती म्हणतात ती इतकी "बंदिस्त" गोटातली आहे, कि सहज समरस होण्यासारखं त्यात काहीच नाही, आणि जे आहे, ते हि इतरांकडून उधार घेतलेलं!"
आज मराठी घरोघरी बघाल तर, इडली सांबार (दाक्षिणात्य), नाहीतर पराठे (उत्तरेचे) सगळ्यांना आवडतात. मग मी खरंच विचार करू लागले, कि जसा उत्तरेला पनीरचा आणि दक्षिणेला इडलीचा अभिमान आहे, तसा मराठीला कशाचा असू शकतो? की खरंच आपले पदार्थ "टू मच इनपुट नॉट मच आऊटपुट" प्रकारात मोडतात?

तेव्हा एकदम सुचलं, कि मराठी संस्कृतीचं थोडंफार इंग्रजी भाषेसारखं आहे, असा पुरोगामी विचार केला तर सर्वसामावेशाकतेची लाज न वाटता, अभिमान वाटू शकेल. इंग्रजी भाषा कशी फोफावली, कारण तिने इतर भाषांमधून शब्द नि:शंकपणे आत्मसात केले. हिंदू धर्म का टिकला? कारण त्याने येणाऱ्या विविध गटांच्या, परिस्थिती, पर्यावरण-आधारित कर्म-कांडाला सरळसरळ आपले म्हटले. त्यामुळे हिंदू धर्मात दिवाळीला कोणी कुठे जुगार खेळतात तर कोणी झेंडूच्या माळा लावतात. कोणी रांगोळ्या काढतात तर कोणी पुरणपोळी करतात.

मग मराठीपणानेही कशाला कुठल्या संकुचित व्याख्येप्रमाणे स्वत:ला बदलायचा प्रयत्न करावा? मराठीने का नये अभिमानाने म्हणू कि आम्ही इडली करतो, कारण आम्ही तिला आपली मानलीये. आम्ही सगळ्या भाज्या करू, नि आवडीने खाऊ कारण आमच्याकडे नव्याचा तिरस्कार नाही, स्वीकार आहे, आणि तोच आमचा सर्वात मोठा गुण आहे. भारताच्या कुठल्या दूरच्या कोपऱ्यात नसून, महाराष्ट्र हा चक्क पोटचा गोळा आहे, त्याचा परिणाम म्हणून गुजराथी असो वा कर्नाटकी, बंगाली असो वा पंजाबी,
 सगळ्या प्रदेशांशी आमची नाळ जोडलेली आहे, हे आमचं सौभाग्यच नाही का?

ह्याचा अर्थ असा नव्हे, की मराठी पदार्थ, मराठमोळी नऊवारी आणि नथ, मराठी बडबडगीतं आणि गाणी, ह्यांचा आम्हाला अभिमान नाही, किंवा त्याचं जतन आम्ही करू नये. पण आपलं ते कार्ट …. असली संकुचित वृत्ती मराठी मनानेच काय, कुणीही ठेवू नये.

अजून एक सांगू, "दुधी, परवल, पडवळ, डींगऱ्या, चपटे वाल, कडवे वाल, दक्षिणेचा नारळ घालून असो वा उत्तरेचा बटाटा, आम्हाला प्रत्येक भाजी करायच्या सतरा पद्धती येतात, आणि आम्ही त्या करतोही. प्रत्येक नावडत्या भाजीलाही आवडते करून खाणे, हे कोणी मराठी माणसाकडून शिकावे! उपलब्ध असलेल्या साध्या सामाग्रीतून रुचकर जेवण असो, वा सजावट, मराठींकडून शिकावी.

म्हणजे, जुगाड- इन्वेन्शनचे आद्य प्रणेते आम्हीच की!"

इतिहासाच्या एका टप्प्यावर, मराठी माणसावर फार संकटं आली. अठरा विश्वे दारिद्र्य आणि दुष्काळात तेरावा महिना असतांना आम्ही जे धडे घेतले, त्यांनी मराठीमाती झालीच असेल, तर जास्त कणखर झालीये.

आज इंग्रजीने जग काबीज केलंय, ते केवळ इंग्रजी राजवटीमुळेच नव्हे, तर इंग्रजीच्या अंगभूत लवचिकतेमुळेही. नाझी जर्मनीत तावून सुलाखून निघालेले ज्युईश लोक अमेरिकेत येऊन अतिशय यशस्वी झाले, ते त्यांनी अंगी बाणवलेल्या चिवटपणामुळे. तेव्हा पंजाबच्या अफाट हिरव्या शेतीचा आणि दक्षिणेच्या द्रविडी संपत्तीचा माज करणाऱ्यांनो, सावध असा. असे न होवो, कि तुम्हालाच तुमच्या मधून मराठी लोकांना वेगळे काढणे अशक्य होवून बसेल!





2/8/16

आईचा स्वत:च्या वेळावर कधीच हक्क नसतो का?"

खालील जिब्रानचे वाक्य आहे : तुमची मुलं ही खरंतर तुमची नसतात. जीवनाच्या स्वत:वरील प्रेमाची ती प्रतीके, तुमच्या पोटी आली म्हणून तुमची म्हणायची.

खरंय, तरीही , आपण मुलांच्या जीवनात इतके समरस होउन जातो, की आपलं जगणं, त्यांच्या  जगण्यापासून वेगळं काढता येत नाही. 
माझंही कित्येक दिवस तेच चाललेलं! त्यांची  शाळा, त्यांचे डबे, त्यांचे अभ्यास, त्यांचे क्लास, त्यांचेच गोंडस राग, नि त्यांचेच गोडूले लोभ :) त्या रामरगाड्यात वाचायला वेळ काढता आला तरी सलग नाही, म्हणून हलकं फुलकं पुस्तक घेतलं, आणि सुखद धक्का बसला!

ज्या काळी  प्रकाशित  झालं , त्या काळी कदाचित शोभा डे ह्यांच्या "स्पीड पोस्टात" बायकांना स्वत:चं प्रतिबिंब दिसलं नसेल, कारण बऱ्याच मध्यमवर्गीय बायकांच्या आणि तिच्या जीवनशैलीत जमीन अस्मानाचा फरक होता, पण आता ते चित्र बदललं आहे हे नक्की. त्या काळी मुलांचे डब्बे स्वत: न भरणारी आई दुर्मिळ होती, पण आता नाहिये. त्या काळी मुलांना घरी ठेवून कामाकरिता बाहेरगावी जाणारी आई दुर्मिळ होती पण आता कुठल्याही नोकरीत "मुलं" ही सबब बायका असोत वा पुरूष, वापरू शकत नाहीत. इतकंच नव्हे, तर त्या काळापेक्षा, "तुम्हारे दो- मेरे दो- हमारे दो " अशी खट्टी -मिठी कुटुंबही सर्रास दिसू लागली अहेत.

किंवा अपर्णा वेलणकरांच्या मराठी अनुवादाची जादू असेल , पण मला शोभा डे यांची आपल्या मुलांना लिहिलेली पत्रं फारच जवळची वाटली. मुलंवर खूप प्रेम करणं म्हणजे आपलं सगळं आयुष्य त्यांच्या कारणी लावून, नंतर जन्मभर "आम्ही तुमच्या किती खस्ता खाल्ल्या!" हे त्यांना ऐकवत बसणाऱ्या आयांची पिढी कधीच पार पडली, आणि मुलांना बेबिसिटरकडे ठेवयचा जीव होत नसला, तरी कधी मधी त्यांच्या शाळेच्या दिवशी सुटी काढून बिनधास्त दोघं पिक्चर टाकून येणाऱ्या पिढीची मी आहे. शिवाय, आजकालची मुलंही, लवकर स्वावलंबी झालेली, इंटर्नेट मुळे अर्धवट, पण जास्त समज आलेली, आपल्याच विश्वात रमणारी, कदाचित जास्त निर्भीडही झालीयेत…

त्यामुळे तिचे प्रश्न, तिचा दृष्टीकोन, सगळं समजतंय, आपलं वाटतंय. "आईला राग काढायची परवानगीच नसते का? घरादाराच्या शांतीसाठी कायम तिने आपला राग, आपली चिडचिड, आपल्या दु:खाचे कढ, मनातच जीरवायचे असतात का? " हे तिचे खडे सवाल आता असमंजस किंवा अपरिपक्व वाटत नाहीत. "तुला केसांना तेल लावणारे, तुझा डबा भरणारे, तुझे मोजे शोधून देणारे हात माझे नव्हते, त्याचं  दु:ख मी कधीही मनावेगळं करू शकणार नाही" असं म्हणणारी ही आई, मला तरी सच्ची वाटली.

त्या उलट "स्मृतिचित्रे" लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक! रेव्हरंड नारायण वामन टिळकांची पत्नी म्हणून अतिशय सोशीक, धैर्यशील, पुरोगामी असणारी ही स्त्री, एक आई म्हणून कशी होती, याबद्दल पुस्तकातून फारशी माहिती मिळत नाही. टिळक बाप्तिस्मा घ्यायला गेल्यावर सुरुवातीला धसका घेऊन डिप्रेशनमधे दिवसेंदिवस खाटेवर पडून राहतांना, जीव द्यायचा प्रयत्न करतांना, त्या माउलीने आपल्या एकुलत्या एक मुलाला मात्र कधी मोठ्या बहिणीच्या तर कधी भाचीच्या सहज स्वाधीन करून टाकले होते.

मुलासाठी तिचा जीव तुटला हे नक्की, पण त्या काळी बालसंगोपनाची मदार आजकाल प्रमाणे सर्वस्वी आई-बापाच्या खांद्यावर नसे, त्यामुळे त्यांचे ते ओझे किती हलके होते हा विचार राहून राहून माझ्या मनात येत रहिला. त्या काळी पोरांना आजी-आजोबा, ढीगभर नातेवाईक असत, किंवा मोठी भावंडे सांभाळीत हे ऐकलंय.

रेव्ह. टिळकांनी कविता, भाषांतरे, धर्मांचा केवढा अभ्यास  केला, तसा आजच्या कुठल्याहि वडिलांना करता येण्याची किती कमी शक्यता आहे, तर मग कुठल्या आईने स्वत:साठी इतका वेळ देणे तर दूरच राहिले! त्यामुळे माझ्या पोराला जर मी कधी पत्रं लिहिलं, तर त्यात नक्की सांगेन, कि "

"बाळा, मी तुला रागावले, १०० खेळणी घेऊन दिली नाहीत, अभ्यासासाठी मागे लागले, माझ्या स्वभावाचा तुला त्रास झाला असेल, तुझ्या आवडीचा स्वयंपाक मी फारसा केला नसेल, वगैरे १०० तक्रारी तुझ्या माझ्याबद्दल असतील, तर त्या सगळ्या मला मान्य आहेत. फक्त….
मी तुला वेळ दिला नाही, देऊ शकले नाही, अशी तक्रार मात्र तू केलीसच, तर मी नक्की शोभा डे प्रमाणे म्हणेन, "आईचा स्वत:च्या वेळावर कधीच हक्क नसतो का?"