10/26/16

'Tis the season of Diwali

इथे क्रिसमसच्या सुमारास सगळ्या रेडिओ स्टेशन्सवर नाताळची गाणी लागतात. ती मला तर आवडतातच, पण लहान मुलांना अगदी वेडंच करतात. आमचं पिल्लू गेल्यावर्षी "Santaclaus is coming to town" म्हणून म्हणून आमचे कान पिकवत होतं, आणि त्याच्या पलिकडल्या वर्षी त्याला "Rudolf the red-nosed reindeer" मधला रुडॉल्फच हवा होता! रेनडियरची बाहुली शोधायला मी किती वेबसाईट पालथ्या घातल्या होत्या त्याची गणना च नाही!

पण आपल्या दिवाळीची अशी कुठली गाणी नाहीयेत, त्यामुळे मला छोट्याला काहीच शिकवता आले नाही. चित्रपटगीतं एकतर चांगली नाहीत, किंवा छोट्यांना गाता येतील अशी नाहीत. मग काय करायचे? त्याच सुमारास मी इथल्या मराठी शाळेत शिकवत असे. तिथे मुलांना "Sunday, Monday, Tuesday, Wednesday..."च्याच चालीत
"रविवार सोमवार मंगळवार बुधवार..." हे गाणे आम्ही शिकवायचो. मग त्यावरून मला सहज सुचले:

'Tis the season of Diwali, 
Fala lala la la lalala
Eat some yummy ladoo chakali, 
fala lala la la lalala
Let's make colorful Rangoli
Fala la lala la, lalala
Celebrating with family
Fala lala la la lalala
Paper-lanterns in the alley (आकाशकंदील हो!)
Fireworks will make us jolly
Fala lala la la lalala

'Tis the season of Diwali
Fala lala la la lalala
Ravan was a big bad bully
Lord Ram beat him for us, thankfully. 
Let's welcome him home, merrily
Light up lamps to show it truly!
Fala lala la la lalala

मराठी सणांचं गाणं इंग्रजीत, तर ख्रिसमसचं गाणं मराठीत म्हणायचं, म्हणजे ख्रिसमसप्रमाणेच दिवाळी, आणि मराठी, हीपण मुलांना जवळची वाटू लागतील, अशी आशा!
आणि हो, सर्वांना मनापासून

!!शुभ दीपावली!!


10/17/16

दिल है, महफ़िलमें भी तनहा हो सकता है

दिल है, महफ़िलमें भी तनहा हो सकता है 
जो पाया था, वो ही अक्सर खो सकता है 

जाँ से जाते जाते हमने ये समझा 
बारिश में पत्थर को देखो, रो सकता है 

जज़्बातों के ढ़लते मौसम जाते रहें 
यादें तो फिर हर कोई पिरो सकता है 

अपनी ख़ताएँ गिनने वाले कम न हुए 
हम जो कर गुजरे वो किससे हो सकता है!

दर्द को सुननेवाले अबके कहाँ मिले 
ख़ुशियों का बाज़ार लगा है, वो सस्ता है 

तुमसे उम्मीदें तो थीं पर फिर सोचा 
उम्मीदों से हारे कच्चा वो रिश्ता है 

शहर था खाली, दोस्त नही थे, पर खुश थे 
राह उजड़ने की देखे, दिल वो कब बसता है 

हमसे पूछो मत हाल-ए-दिल अपनी कहो
प्यारा लगता है वो बच्चा जो हँसता है 

काश के हम भी होते सूखे पात की तरह 
कागज़ के पन्नो में सिमटा सो सकता है

9/25/16

खेळ खलास!

गेल्यात जमा करावे आता क्षणिक श्वास आणि उच्छवास 
कितीक काळ टिकणार, जीवना सखया! तुझ्यावरचा विश्वास? 

कोसळो वेड्यागत पाऊस, फुटोत हिरवे कोंब कुठे 
दगडातही पाझरेल का हर्षभारितसा श्रावणमास?

ढगात काळी स्वप्ने ती का गतजन्मीचे प्रेम अवनीचे 
गोड दुःख मुरलेल्या वाटे कवळु ओलसर मृदगंधास

देव मानुनी फसली सीता, देव शोधता हरली मीरा
देव नको मज प्रेम हवे पण, तू पुससी हा हट्ट कशास!

दिले मन तुला भान हरपुनी, प्राण मागसी वर पुन्हा?
घेऊन जा जे उरले काहूर, राख उडवुया! खेळ खलास!











9/12/16

चौघीजणी समुद्रकिनाऱ्यावर

अनिता: मूळच्या अत्यंत समंजसपणामुळे साधारणतः सदैव कशा ना कशावर किंवा कोणा ना कोणावर चिडलेलीवनिता: घरचा विरोध मोडून मुंबईला, अक्षरशः हातावर पोट घेऊन नोकरी करताना उदंड उत्साह्याला ओहोटी लागली तरी मनाचे पीळ ना सुटलेलीसुनीता: हिची प्रचंड पुस्तकी बुद्धिमत्ता तिच्या एकूण भावनिक विकासाच्या आड येत असल्यामुळे सतत भेटलेल्या यशातही स्वतःच्या क्षमतांबद्दल साशंक प्रणिता: आपली, कृपाभिलाषी. अर्थात, घरच्या 'फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स' मध्ये फारशा भावना न अनुभवता आल्यामुळे इतरांच्या स्पंदानांचे हेलकावे शोधत, साहित्योपासनेत रमलेली. आनंदी-दुःखी निरीक्षिका"आपण बियर पिऊ!" अनिता तिच्या भावांकडून आणि नुक्त्या पटलेल्या 'सख्या' कडून हे बाळ'कडू' पिऊन आल्यामुळे प्रस्ताव मांडते. प्रणिताला प्रथम-जगातील सवयी माहिती असून, बियर पिण्यात अनैतिक काही नसतं, हे नक्की पटलेलं आहे. शिवाय अनेक लेखकांनी अशा गोष्टींना 'अनुभव-विश्व् विस्तारणे' असं म्हंटलेलं आहे. मुळात, इंग्रजी कादंबऱ्यांमध्ये, एक पेक्षा अधिक व्यक्तींबरोबर झोपणे (मादाम बोव्हारी), स्वतःच्या आईबद्दल आकर्षण वाटणे (इडिपस), इथपासून... बायकोचा खून करणे (मॅकबेथ) इथपर्यंत घटनांना सामोरे गेल्यावर बियर पिणं तर अगदीच क्षुल्लक सीमोल्लंघन म्हणता येईल, म्हणून बऱ्यापैकी विचारस्वातंत्र्य अनुभवत असतांना, प्रथमच आयुष्यात 'मोकळे सुटल्याचा' वारा लागलेली आहे. सुनीताची मेडिकल इंटर्नशिप त्या आडगावात- समुद्रकिनारी!!! तेवीस वर्षात प्रथमच त्या आपल्या आपल्या पिकनिकला आल्या आहेत, कारण तिथे सुनीताच्या खोलीत त्या मोजून एक रात्र जागून, पोटभर गप्पा, आणि केवढीतरी भावनांची देवाणघेवाण करू शकणार आहेत. इतका सुवर्णयोग पुन्हा जमून येणे, आणि जमवणेही......... ह्या जन्मी शक्य होईल का? नाहीच. अशक्यच! नुकतीच डिलिव्हरी वार्डमधून येऊन, बायकांचे रडणे ओरडण पाहून थोडी विस्कटलीये सुनीता, पण ते विसरण्यासाठी थोडी घेतली, तर खूप बरं वाटेल यार! शिवाय, बियरचे शारीरिक परिणाम फारसे गंभीर नसतात इतकं व्यावहारिक ज्ञान तरी डॉक्टरीच्या अभ्यासात मिळालेलं आहेच की. वनिता स्वतः पुढाकार घेणारी नाही, तरी वेडगळ साहस तिच्या रोमँटिक रक्तातच आहे. घर सोडून आल्यावर ती खूप एकटी पडलीये, पण ही मैत्री तिचा आधार आहे. पाहिलं प्रेम, पहिली आठवण, पहिल्या मानाचं, पाहिलंच अंगण! तशी पहिली बियर... धिस बियर इज बॉण्डिंग!
एका दारूच्या दुकानापाशी जाऊन त्यांनी शेवटी अत्यंत प्रयत्नपूर्वक कोरा चेहेरा ठेवत, एक बियरची बाटली मागितली. "किती?" त्याने चौघीजणी बघून विचारलं. "एकच." अनिता निग्रहाने म्हणाली. जवळजवळ पळतच त्या खोलीत परतल्या. "निदान रात्री बारा पर्यंत तरी थांबू!" वनिता नेहेमीच रोमँटिक, आणि "नको. इतका काही हा मोठा इव्हेन्ट नाहीये!" प्रणिता चा कठोर अँटी-क्लायमॅक्स. थेट चेकोव्ह सारखा!त्यांनी सुनीताच्या खोलीतले उभे स्टीलचे पेले काढले. गोमुत्रासारखी ती कुणकुणी गढूळ बियर, एक, दोन, तीन! असा जल्लोष करून घोट घेतला. घाण कडू लागली. अनिताची ही दुसरी का तिसरी वेळ, त्यामुळे तिला जरा जरा चव घेता येऊ लागली होती. सुनीता मात्र एका घोटापुढे जाईना. "मला सकाळी राउंड आहे." "हो तू आदर्शवादी डॉक्टर आहेस बाई!""हो तू उगीच रिस्क घेऊ नको""तू पिणार नव्हतीस तर कशाला आणली आपण ही एवढी मोठी बाटली!"इत्यादी संवाद झाल्यावर त्यांना थोडं हलकं हलकं वाटायला लागलं. (त्यामागे त्या बियरचा शून्य हात होता!) "आपण हे नमिता ला सांगितलं तर ती वेडी होईल!" "आपण हे सरिता ला सांगितलं तर ती एकदम आपल्याशी मैत्रीच तोडून टाकेल!""तू घरी सांगशील?" "हो, त्यात काय?" (हे फर्स्ट वर्ल्ड सुनीताच बोलू जाणे!)मग रात्रभर चेकाळल्यासारख्या गप्पांवर गप्पा झोडून त्या सकाळी सकाळी समुद्रावर गेल्या. टिक्करबिल्ला खेळून, तासंतास सायकल पदडुन, दिवसेंदिवस पत्ते, नाच गाणी, कॅरम खेळून कसंबसं बालपण मागे टाकलं. ते-वीस भली थोरली वर्ष निघून गेली,तरी आयुष्य पुढे सरकतच नाहीये. प्रेम? कि लग्न?आधी प्रेम?कि आधी लग्न?"कोण? कुठे? कधी? कसा?" सगळंच अनुत्तरित. "ए तुला आशिष आवडायचा ना?""हो पण त्याचं आहे ऑलरेडी.""मला प्रेमात पडणं अशक्य आहे. केलाही होता एकदा प्रयत्न" "म्हणजे तुला म्हणायचंय की तुला कोणाला स्वतःच्या प्रेमात पाडता येत नाहीये.""हाहाहाहाहा........ हो तसं समज.""चांगली नोकरी पाहिजे यार आधी!""घरी सांगितलं नाहीये अनिताने अजूनही""मग पुढे काय?"बोंबलायला तेवीस वर्षांच्या चढ उत्तरांच्या शेकडो रात्री गेल्या तरी आयुष्याचा निक्काल काय तो लागत नाहीये.  हे असं अजून किती दिवस चालणारे? किती वर्ष चालणारे??? ही इथे लाट पायापर्यंत येते पण डोक्यावरून चिम्ब भिजवून जात नाही. आपल्याला तर खोलात जाणं होतच नाही, पण बोंबलायला ती लाटही मिळमिळीतच निघाली..... बियरसारखी!"हाहाहाहाहाहा........ " दहा वर्षांनी पुन्हा इथेच भेटायला पाहिजे गं... नक्की भेटूया. जमवूयाच कसंही करून. तेहत्तीस वर्षांच्या त्या चौघीजणी आज पुन्हा कदाचित समुद्रकिनाऱ्यावर उभ्या असतील.  

त्यांना आता वाईनही सवयीची झालेली असेल. 

8/22/16

Syriaतले घर थकलेले संन्यासी

"घर थकलेले... संन्यासी" ह्या कवितेच्या पहिल्या ३ शब्दातच ग्रेस यांनी सगळं सांगून टाकलं असावं! इतकी अर्थघन शब्दयोजना. पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वररचनेतला दोन शब्दांमधला तो जीवघेणा अंतराळ.... त्यात निर्वासितांचं अस्तित्वच नव्हे, तर "टांगणीला" लागलेल्या जीवाचा दाटलेला हुंदका आहे!

Syria देशातून गेली अनेक वर्ष ते चालताहेत. त्यांच्या मागे बॉम्बने विदीर्ण झालेल्या त्यांच्या गावांचा आक्रोश कानापर्यंत येऊ नये म्हणून कान आवळून बंद करून. त्यांची घरं जणू "थकलेली". कुणाची "थकबाकी" असते, कर्ज थकलेलं असतं तसं, घरासाठी वाट पाहणं त्यांच्या नशीबी आलेलं. आणि जीवाच्या भीतीने पायपीट करून करून ते ही थकलेले.  त्यांना "गृहस्थ" कसं म्हणावं? जे घरदाराच्या पाशांमधून निकराने स्वतःला सोडवून निघालेले- ते संन्यासीच म्हंटले पाहिजेत.

आडोशाची "भिंतही खचते" तेव्हा आईच्या डोळ्यातलं नक्षत्र त्यांना आठवतं आहे.
५ वर्षांच्या ओमरान च्या शून्य नजरेमध्ये असेल का तेच नक्षत्र?
आई, जिच्या उबदार पंखांमागे निर्धास्त डोळे मिटून लपून जावं, आणि सगळी चिंता आपोआप विरून जावी, त्या आईचं घरटं, हे प्रत्येकाच्या मनात खोल रुतून बसलेलं एक सुरक्षित स्थान असतं. पाय कितीही भरकटले, तरी तिच्या डोळ्यातल्या नक्षत्राने वाट दाखवावी, आणि फिरून आपण आयुष्याच्या शेवटी का होईना, तिच्या कुशीत निजावं, अशी उर्मी दाटून येते.
पिलं चालू लागतात, पण त्यांची आईसुद्धा देशोधडीलाच लागलेली असते! सिरियन निर्वासितांबरोबर प्रवास करणार्‍या पत्रकरांनी त्याबद्द्ल कितीहि भरभरुन लिहिलं, तरी कमीच...

जवळजवळ २५०,००० नागरिकांचं घर हिरावून घेणारं हे कसलं जीवघेणं युद्ध? गेली ५ वर्ष सतत जाळणारं हे कुठलं "रखरखते ऊन"!
"पक्ष्यांची घरटी होती ते झाड तोडले कोणी
एकेक ओंजळीमागे असतेच झऱ्याचे पाणी"
आयुष्य पाण्यासारखं पुढेपुढे वाहत जाताना, आपण ओंजळीत त्यातले दोन क्षणही सुखाने धरून ठेवू शकत नाही. प्रेमाची माणसं कालाधीन, तर कधी दुरावलेली... हातातून निसटून जातात. प्रत्येकवेळी ओंजळ भरून घेतांना त्यांना त्यातून निसटलेला झराच आठवत असेल का?
उलट प्रवाहाविरुद्ध पोहणारे जिगीषू निर्वासित, त्यांच्यातले किती पल्याड पोचू शकतात? एका बापाला मृत पोरासाठी अश्रू ढाळत न बसता, तसंच पुढेपुढे प्रवाहपतीत होऊन जावं लागतं. एक पिलू वाहून गेलेलं, त्याला आठवलीच असेल ना आपली आई, त्या अंतिम क्षणांमध्ये?

"मी भिऊन अंधाराला अडगळीत लपुनी जाई" जर कधीकाळी ह्या वाटसरूंना आश्रय मिळाला, तरी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेला "अंधार", ते अत्याचार, रक्तपात, बलात्कार, चिंधड्या - त्यांना विसरता येतील का कधी? घरासाठी रानोमाळ फिरणाऱ्या भटक्यांना जर घर कधीकाळी मिळालंच, तर ते हि पुन्हा नव्याने तिथे रुजतील. घरातल्या "अडगळीत" त्यांना सुरक्षित वाटूही लागेल. तो सवयीचा पसारा, "माझ्या" असणाऱ्या वस्तू, हौशीने जमवलेली भांडीकुंडी....... रोज रोज डोळ्यांना दिसल्या, कि जीवनाच्या सुरळितपणाचा क्षणिक दिलासाही मिळेल.

पण एकदा ज्यांनी आपलं घर उद्ध्वस्त होणं अनुभवलं आहे, त्यांना कायमच त्या "दरीतल्या वनराईचा" धसका लागून राहणार. ती भयाण वनराई, ते भटकेपण, कधी येऊन पुन्हा घर गिळंकृत करील? करील का? सगळीकडून ती आपल्या घरावर "हलके हलके" पुन्हा अतिक्रमणकरू लागलं आहे हा भास.... त्यातून त्यांची सुटका नाही.

तोवर घरात राहूनसुद्धा "घरपण" मात्र थकलेलं च राहील!