Showing posts with label कहाणी. Show all posts
Showing posts with label कहाणी. Show all posts

1/18/19

रिक्षावाला

"ए बेबी, तुझा चक्का उलटा फिरते नं!" मागून जोरात आवाज आला.

एक सेकंद दचकून मी खाली वाकून चाकाकडे पाहिलंच, पण तेवढ्यात गंगारामच्या रिक्षाच्या टपावर बसलेल्या पोरांनी खाली उतरून त्याला जोरात धक्का मारला, आणि मला मागे टाकून हुल्लड करत रिक्षा पुढे निघून गेला! मी पण जोरजोरात सायकल हाणत ओरडले, "ए गंगाराम, काहीSSS काय सांगतो? मी आता पडले असते म्हणजे!" पण गंगाराम हसत हसत "कशी घाबरली!" करत पुढे निघून गेला.

मी तोल सावरला. जुलैच्या पावसात निसरड्या रस्त्यावर नुकतीच लांबच्या मोठ्या शाळेत मी आपली आपली सायकल घेऊन जायला लागले होते. जाऊदे, तो गंगाराम आहेच आगाऊ! असं मनातल्या मनात म्हटलं, आणि पेडल मारलं. माझी सायकल पुढेच जात होती, पण बाजूनी रिक्षा जास्त वेगाने गेल्यामुळे मला खरंच पुन्हा एकदा वाटलं, "आपली चाकं उलटी फिरतायत का?" :) :) चाकं नाही, पण मन उलटं फिरून प्राथमिक शाळेत गेलं.

पहिली ते चवथीची शाळा, मोठ्या रस्त्यावर तीन चौक टाकून होती, म्हणून आम्ही ७-८ वर्षाचे ५-६ फटाके आणि टिकल्या (मुलंमुली) गंगारामच्या सायकलरिक्षातुन शाळेत जायचो. गंगारामच्या मस्कऱ्या स्वभावाने आमची फारच करमणूक व्हायची, पण दप्तर लटकावताना मधेच जर त्याने एका मुलीची वेणी ओढली, दुसरीचा रुमाल पळवला, तर आम्हा मुलींची अस्मिता दुखावली जायची आणि आम्ही जोरात ओरडायचो. आता मी मोठी झाले, असं मला वाटलं होतं, पण मागून येऊन गंगारामने खोडी करायची ती केलीच! मला हसू आलं.

माझ्या तिप्पट चौपट वयाच्या गंगारामला आम्ही ७-८ वर्षापासूनच "ए गंगाराम" च म्हणायचो, कारण माणूस हा असा विनोदी. "अहो गंगाराम काका" वगैरे म्हणायचं, हे पण कधी सुचलं नाही, आणि कोणी शिकवलंही नाही. सगळा बेभरवशाचा कारभार, आणि रोज वेगवेगळ्या वेळी अवतारायचा नेम! :)

सकाळी सकाळी ७:०० वाजता तयार होऊन अंगणात दप्तर घेऊन उभं राहायचं, तरी सव्वासात पर्यंत ह्याचा पत्ता नाही. कि मग समोरच्या अंगणातून चित्रकाकूचा मुलगा ओरडायचा "आज गंगाराम येत नाही वाटतं!" मग धावत धावत टॉयलेटचं दार वाजवायचं, "बाबा, गंगाराम येत नाही, लौकर करा, शाळेत सोडायचं आहे." आणि नेमकी तेवढ्यात बाहेर घंटी वाजणार. कळकट शर्ट, तारवटलेले डोळे, दाढीचे खुंट वाढलेले, नाकातून सूं सूं पाणी येतंय, अशा अवतारात गंगाराम उभा. "बेबी, पायलीवाली खांडेकरनी लेट केला नं!" असं म्हणायचा, पण आजी हळूच नंतर सांगायची, "रात्री दारू पिऊन पडला असेल. तू जास्त बोलत जाऊ नको, शाळेत जायचं- यायचं.  ह्या लोकांशी कशाला जास्त वाढवा?"

पण ते काही असो, घरच्यांचा, आणि आम्हा पोरांचापण त्याच्यावर विश्वास होता, कारण बाकी तो मनाने मुलांत मूलच होता. रिक्षात बसून आम्ही धांगडधिंगा करायला लागलो, कि "ते बेबी रिक्षातून पडली नं, डॉक्टरकडे जाऊन टाकेबी पडले..." वगैरे नुसत्या कहाण्या सांगायचा, पण आम्हाला शिस्त लावणं त्याला जमणं शक्यच नव्हतं, कारण चौकात रिक्षा थांबला, कि खाली उतरून मागे "टपावर" बसायला आम्ही "टपलेले" असायचो.

मला वाटतं गंगाराम टपावरच्या दोन सीट धरूनच मुलांची भरती करत असावा, कारण त्याला झेपतील, आणि मावतील त्यापेक्षा जास्तच पोरं रिक्षात असायची. (रोज कोणीतरी आजारी, कोणी उशीरा उठलेला, कोणी गावाला गेला - म्हणजे शाळेला बुट्टी, म्हणून उरलेली रिक्षात मावूनच जातील असाहि त्याचा अंदाज असावा :-) :-) शिवाय दुसऱ्या कोणा रिक्षावाल्याची बुट्टी असेल, तर तिथलं पण एखादं चिरकूट "दयाळूपणे" आणून बसवायचा (एक्स्ट्रा कमाई नं!)

इतकी पोरं सीटवर कोंबून बसायला तयार नसायची, उलट टपावर बसायलाच भांडाभांडी व्हायची! म्हणजे आम्ही मुलं पण ह्या कटात भागीदार होतो. टपावर 'बसणं' कसलं, ते रिक्षाच्या मागे लोम्बकाळणंच होतं, पण त्यात काय थ्रिल होतं, ते अनुभवल्याशिवाय कळूच शकत नाही...सायकलरिक्षाच्या दोन चाकांना जोडणाऱ्या पट्टीवर पाय, आणि सीटच्या काठाला हाताने धरलेलं, अशी सवारी करणारी एक दोन तरी पोरं प्रत्येक रिक्षात असायचीच. जरा उंची पुरली, की सीटच्या काठावर मागून चढून उलटं बसता पण यायचं, आणि उतारावर जास्त वारं खायला मिळायचं! शिवाय, दोन रिक्षातल्या शर्यतीत पुढे जायला टपावरची पोरं मधेच उतरून रिक्षाला धक्का पण मारू शकायची. काय पण labor of love होतं आमचं!!!

पुढे पाचवी ते सातवी मात्र "भाऊ" भेटले. खरं म्हणजे भाऊ वयाने गंगारामपेक्षा पुष्कळच तरुण, पण त्यांचा आपसूक आदरच वाटायचा, कारण नियमितपणा आणि शिस्तीचं हे दुसरं टोक! रिक्षा चालवण्यातपण किती शिस्त आणि निष्ठा असावी! रिक्षा अतिशय टापटीप ठेवायचे. त्यांनी रिक्षाला गिअर्स बसवून घेतले होते, आणि दप्तरं लटकवायलाही शिस्तीत दोन्ही बाजूला हुक्स, बाजूने ऊन-पाऊस लागू नये म्हणून वेगळे पडदे! स्वतः ही अगदी कडक कपडे घालायचे! उन्हाळ्यात काळ्याशार रंगाचे भाऊ, जवळजवळ तेजस्वीच दिसायचे इतका त्यांचा रंग तुकतुकीत होता! बेसबॉल कॅप घातलीकी तर आम्ही त्यांना सांगायचो, "भाऊ, आज काय स्मार्ट दिसून राहिले!"

सायकल रिक्षात वास्तविक गादीची सीट एकच असते, त्याच्या विरुद्ध बाजूला लाकडी फळकुटच असतं. तर गंगारामच्या रिक्षात उंच सीट पकडायला आम्ही शाळा सुटल्यावर सुसाट धाव घ्यायचो, नाहीतर भांडाभांडी ठरलेली. भाऊंनी मात्र एक दिवसाआडचा नियमच करून टाकला, म्हणजे काल गादीवर बसलेल्यांनी आज खाली बसायचं! गंगारामच्या रिक्षात गादी-फळकुटात फारसा फरकही नव्हता म्हणा, कारण गादी ठिकठिकाणी फाटली होती, आणि भोकातून नारळाच्या का जूटच्या झावळ्या पार्श्वभागाला टोचायच्या :) त्या पुढे भाऊंचा रिक्षा म्हणजे आमच्यासाठी limousine पेक्षा कमी नव्हता!

रिक्षात गाण्याच्या भेंड्यापासून शाळेतलं गॉसिप आणि होमवर्कपर्यंत सगळं घडायचं, कारण रस्ते अगदी लोण्यासारखे गुळगुळीत होते. नागपूरसारखे भव्य, सरळ, रिकामे रस्ते दुसऱ्या कुठेच पहिले नव्हते. ते रस्ते, आणि सायकल-रिक्षा. दोन्ही आता कालातीत झाले.

गंगारामला "उद्या वेळेवर ये" सांगून थकलो होतो, ते भाऊंना "भाऊ उद्या येऊ नका नं, म्हणजे आई शाळेत सायकलने जाऊ देईल..." असं सांगायला लागलो... आधी रहदारीच्या रस्त्यावर डावी-डावीकडून हळू सायकल चालवत होतो, ते नंतर १०वी त शर्यती लावायला लागलो. तेव्हा कधी गंगाराम, कधी भाऊ, छोट्या मुलांना घेऊन जातांना दिसत. कधी मी त्यांना हसून हात हलवला असेल, कधी दुर्लक्षही केलं असेल, कारण तेव्हा मी मोठी झाले होते नं! टागोरांच्या काबुलीवाल्याप्रमाणे आमच्या आयुष्यात रिक्षावाला, दूधवाला, ही मंडळी होती. १०वी च्या परीक्षेचा निकाल लागल्यावर भाऊ घरी येऊन मला १०० रुपये देऊन गेले! त्यांचं मात्र मला संपूर्ण नावही कधी माहिती झालं नाही.

माझी मात्र गरज सरली, की बालपण? त्यांच्याशी बोलण्यासारखं अचानक माझ्याकडे काहीच उरलं नाही...!


 






6/8/18

Say, could that lass, be I?



Sing me a song of a lass that is gone
Say, could that lass, be I?
Merry of soul she sailed on a day
Over the sea to sky

ह्या जुन्या स्कॉटिश गाण्याच्या अनेक आवृत्ती आहेत,  पण Outlander या मालिकेच्या सुरुवातीला ह्या गाण्यामुळे जे गूढरम्य वातावरण निर्माण झालं, त्याने मला खिळवून ठेवलं. एका हरवलेल्या मुलीचं हे गाणं - ती हरवून गेलेली Lass (मुलगी) मीच असेन/असू शकेन का?
Say, could that lass, be I? या ओळीतला 'could' ह्या एका शब्दाने अर्थाची छटा बदलली, आणि तिथे प्रश्न तर निर्माण झालाच, पण एक अध्याह्रत असं स्वप्नरंजन, किंवा कदाचित एखादी अबोल, सुप्त इच्छा पण व्यक्त झाली!

कधी कधी आपल्याला पण वाटतंच नं- स्वतःच्याच आयुष्यातून पळून जावंसं? पण असं, एकाएकी स्वतःला 'हरवून', एकाच जन्मात नवीन आयुष्य जगायला मिळणं, हे केवळ स्वप्नात, किंवा कादंबऱ्यांतच होऊ शकतं! म्हणून तर ह्या मालिका लोकप्रिय होतात, आणि जोरात खपतातही.

१७४५च्या जेकॉबईट क्रांतीच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा "क्लेअर" नावाच्या नर्सच्या दृष्टिकोनातून उलगडते. 
१९४५ मध्ये ब्रिटिश नर्स असलेली क्लेअर युद्धानंतर आपल्या नवऱ्याबरोबर स्कॉटलंडमध्ये येते, तिथे काही गूढ घटनांमुळे काल-पटल भेदून ती चक्क २०० वर्ष मागे भूतकाळात येऊन पडते (अक्षरशः) आणि परत आपल्या 'काळात' जाण्याची धडपड करता करता तिथल्याच घटनांमध्ये अडकून जाते!

अनेक वर्षांपूर्वी मी पण इथे, अमेरिकेत येऊन 'पडले', आणि काळ जरी तोच असला, तरी बाकी ह्या जगाचं त्या जगाशी नातं विसविशीत तंतूंनीच कसंबसं जोडून धरलेलं होतं. घरी ईमेल ने चॅट ची वेळ ठरवून घ्यायची, आणि पलीकडून मिनिटाला एक शब्द, ह्या वेगाने आई-वडील टाईप करत असले, तरी जीव गोळा करून ते वाचायचं! कारण आंतरदेशीय फोन दोन -तीन आठवड्यातून एकदा लावणेच परवडायचे! पुढे वेब कॅमेरा वगैरे आले, आता तर मिनिटा-मिनिटाला मेसेज येतात, पण तेव्हा तशी सोय नव्हती. म्हणजे अगदी देवा-ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न करूनसुद्धा, देशातल्या लोकांसाठी आपण 'मेलो' च की काय? अशी शंका मनात यायची.

क्लेअर जशी आधीच्या आयुष्यात नर्स असते, पण भूतकाळात तिच्या सवयीची वैद्यकीय सामग्री नसते, त्यामुळे मिळेल त्या वनस्पती, कापडी लक्तरं वापरून मलमपट्टी करायची तिच्यावर वेळ येते, तसं मला पण माझ्या व्यवसायाची इथे नव्यानेच ओळख करून घ्यावी लागली.

क्लेअरने शाळेत १७४५ च्या बंडाचा इतिहास वाचलेला असतो, पण त्याचा खरा अर्थ कदाचित तिला त्या ऐतिहासिक घटनांच्या वादळात शिरल्यावरच कळायला लागतो, किंवा, त्या माहितीचा उपयोग करण्याची वेळही तिच्यावर येते. तसे 'युरेका' क्षण मी पण कितीतरी वेळा अनुभवले! Robert Frost च्या कवितेतले Birches, आणि Wordsworth चे Daffodils प्रत्यक्षात कसे दिसतात, ते इथे आल्यावरच कळलं!

या जगातली नवीन जीवनपद्धती बघतांना, आधी नाक उडवून शेरे मारले, पण लख्ख, निरभ्र आकाशाखाली बोचणाऱ्या, न संपणाऱ्या थंडीचा अनुभव हळूहळू रक्तात उतरल्यावर मात्र, मी पण बदलू लागले. अनेक वर्ष भारतात 'कोरडी' साहित्यसाधना केल्यावर अचानक एखाद्या कवितेशी अनुभव जोडला गेला, तेव्हा मी पण क्लेअर सारखी पुन्हा प्रेमात पडले - माझ्या आवडत्या लेखकांच्या प्रेमात!

जर्मन भाषेत 'Ausländer' किंवा इंग्रजीतील Outlander म्हणजे शब्दशः 'बाहेरगावची' व्यक्ती. स्कॉटिश लोकांच्या लेखी इंग्रज बाहेरचे होते. स्कॉटिश प्रथा, लोककथा, लोकसंगीताशी ब्रिटिशांनी नातं सांगितलं नाही, उलट ती 'highland' संस्कृती 'मागासलेली' म्हणून मोडून काढायचे प्रयत्न केले. क्लेअर ह्या सगळ्यांपेक्षा वेगळी होती, तिने काळाचा भेद ओलांडूनही स्कॉटिश लोकांवर, तिथल्या जीवनावर प्रेम केलं, तरी ती 'बाहेरची' च राहिली का? ते मालिका/पुस्तकं वाचल्यानंतरच कळेल कदाचित.

पण माझ्या स्वानुभवाशी क्लेअरचं विश्व ह्या एका अनुभवानं जोडलं गेलं. अमेरिकेचं अनिवासी लोकांशी नातं सध्या बदलू लागलं आहे. आजवर सगळ्यांना सामावून घेणाऱ्या अमेरिकेने आता थोडं कट्टर धोरण स्वीकारल्यावर, मला, इतकी वर्ष इथे राहूनही, पुन्हा परकेपणाची जाणीव झाली का? की इतक्या वर्षाची नवलाई संपली, म्हणून जुन्या आठवणी उफाळून आल्या, आणि मलाच हे जग परकं वाटायला लागलं आहे का? Outlander मालिका पाहून हे विचार मनात आले!


3/15/15

पाए आणि वाघ: Happy Pi Day

एक होता पाए. (मराठीत "पाय" आणि "पाए" च्या उच्चारात फारसा फरक नाही, पण आशयदृष्ट्या पाय म्हटला की आपला पायच डोक्यात प्रथम येतो, म्हणून "पाए" असा वापर करते आहे.) त्याचं नाव खरंतर "पिसीन मॉलिटोर पटेल" (Piscine Molitor Patel) होतं, पण शाळेतलं चिडवणं थांबावं, म्हणून त्याने "पाए" धारण केलं, ते कायमचं. नावात काय असतं? असं शेक्स्पियर ने लाख म्हणून ठेवलं असलं, तरी "पाए" (Pi) इतकं "भारी" (भारी= मस्त असा पुणेरी अर्थ अभिप्रेत नसून भारी= loaded/आशयघन असा आहे) नाव शोधूनही सापडलं नसतं!

ह्या पाए चे वडील एक प्राणीसंग्रहालय चालवत असतात. तिथे "रिचर्ड पार्कर" नावाचा एक वाघ दाखल होतो. त्या वाघाचं नाव रिचर्ड पार्कर कसं पडलं, ह्याची पण पाएच्या नावाइतकीच मजेदार कहाणी आहे, 
Yann Martel लिखित, Life of Pi.  'कहाणी' वरून आठवलं, पुराणातल्या कथा/कहाण्यांप्रमाणेच ही कादंबरी खऱ्या-खोट्याच्या सीमारेषेवर सहज प्रवास करते. म्हटले तर अकल्पनीय/अतर्क्य अशा घटनांना पाएच्या अतिशय वस्तुनिष्ठ वर्णनामुळे वास्तवाची किनार येते, म्हणूनच वाचकांनाही ती कहाणी multidimensional (बहुआयामी) आणि विचारप्रवर्तक वाटू लागते.


तर रिचर्ड पार्कर आल्यावर छोट्या पाएला त्याचे आकर्षण वाटले, आणि तो पिंजऱ्याजवळ जाऊन आला, हे कळल्यावर त्याच्या वडिलांनी, काहीशा अघोरी पद्धतीनेच, पाएला श्वापदांचा हिंस्त्रपणा दाखवून कायमचा "धडा" दिला. पण दुसरीकडे, पॉण्डिचेरीच्या बहुढंगी वातावरणात पाए वेगवेगळ्या धर्मांचेही धडे घेत होता, आणि सगळ्याच धर्मांमधे भरपूर साम्यस्थळं असूनही लोक आपापल्या जन्मजात धर्माला चिकटून का बसतात, हे कोडं उलगडायच्या आतच, वडिलांनी बोटीवरून कॅनडाला प्रयाण करायचं ठरवलं, अगदी पोरं-बाळं-प्राणी-पक्षी ह्या सगळ्या गोतावळ्यासकट. त्या जहाजाचं, रिचर्ड पार्करचं, नि पाएचं पुढे काय झालं, हीच कथावास्तू आहे.


बोटीवरचे प्राणी म्हटल्यावर नोआहच्या गोष्टीची आठवण झाली? पाएला त्याच्या मामाने उत्तम पोहणे शिकवले, आणि त्याचे नावही एका तरणतलावावरून ठेवले, पुढे पोहता येत होते, म्हणूनच तो वाचला, त्यावरून, "भवसागर तरण्याची" आठवण झाली? अशी एक दोनच नव्हे, तर शेकडो उदाहरणं पुस्तकात सापडतील, कि परस्परसंबंधांच्या उभ्या-आडव्या जाळ्यातून, वरकरणी साध्या उदाहरणातून लेखकाने जीवनाचे तत्वज्ञानच सांगितले आहे.

माणूस आणि पशूत काय फरक असतो? (हल्ली फारसा जाणवत नसला तरी) प्राण्यांना केवळ एक शरीर"धर्म"च ठाऊक असतो. जगण्यासाठी मारणे, खाणे, प्रजोत्पादन आणि संगोपन, एवढंच जीवनाचं श्रेय प्राण्यांना पुरतं. पण माणसाला त्याहून अधिक कशाचीतरी तहान असते. मारणे अथवा मरणे, ह्यापलिकडचा जीवनाचा मतितार्थ शोधायची ओढच माणसाला धर्माकडे, आणि संस्कृतीकडे घेऊन गेली. धर्माच्या प्रयोजनाची चर्चा करतांना Life of Pi  सारखी पुस्तकं नक्कीच समाविष्ट करायला हवीत, कारण पाए, आणि रिचर्ड पार्करमधील नात्याचा प्रवास हा माणसातल्या पशुत्वाचा, आणि त्याविरोधात उभ्या ठाकलेल्या माणूसपणाचा प्रवास आहे, असं मला वाटतं.

म्हटलं तर पाए म्हणजे केवळ ३.१४, असे माझ्या वर्षानुवर्षे गणिताचा गंज लागलेल्या बुद्धीला आठवलं. पण विकिपिडीया वर शोधायला गेलात, तर पाए ह्या अंकाचं असाधारण महत्त्व लक्षात येतं. पाए नावाची संकल्पना माणसाने जन्माला घातली, तीच मुळी एक "नातं" स्पष्ट करून सांगण्यासाठी. जीवनातल्या अनेक चढ-उतारांत पाए मात्र "constant" आहे, आणि तरीही, त्याचं खरं मूल्य कळण्याला कितीतरी शतके जावी लागली, किंबहुना त्याचं खरं मूल्य हे अप्राप्यच आहे. Life of Pi हे शीर्षक त्या अर्थाने, "पाए ह्या संकल्पनेचा जीवनपट/विकास" म्हणूनही समर्पकच असेल. 
पशूंप्रमाणे निरूद्देश जगण्याला कंटाळलेल्या माणसाला आस होती, नव्हे, त्याचा तो विश्वास होता, कि जगाची निर्मिती, त्यात मानवाची उत्क्रांती हा निव्व्ळ योगायोग नसावाच. म्हणूनच तो भवतालच्या सगळ्या घटनांमधले, वस्तूंमधले परस्परसंबंध शोधू लागतो. हा परस्परसंबंध सांगणाऱ्या दोन गोष्टी: पाए, आणि धर्म. माणसाला जीवनात पशूत्वाच्या पुढे जाणे जो शिकवतो, तो धर्म. 

आज धर्माचा व्यापार, त्याची भ्रष्टता, मूळ उद्दिष्टे हरवलेलं स्वरूपच आपल्याला दिसतं, पण त्याचा विकास माणसाच्या जीवनातली एक पोकळी भरून काढण्यासाठी झाला. Karen Armstrong नावाच्या विदुषीचे धर्माच्या विकास, आणि उद्दिष्टांवरचे भाष्य फार आवडले. (तिच्या लेखाचा अनुवाद करायची जबरदस्त इच्छा आहे. ते असो.) 

पाएच्या आणि वाघाच्या "कहाणीत" माणसाची आदिकालापासूनची कहाणी कुणाला सापडेल, तर कुणाला "आपण सारे अर्जुन" प्रमाणे जगण्याचे तत्वज्ञान सापडेल. मुळात पाएचा वाघ कुणालाही दिसला नाही. पण तसा तर, देव तरी कुणाला दिसलाय? तरीही, प्रत्येकाच्या अंतर्मनातल्या देवाने (अथवा वाघाने) त्याला/तिला जगण्याचं बळ, जगण्याची उमेद, जगण्याची दिशाच नव्हे, तर जिगीषाही दिलीये, हे मात्र खरं. म्हणूनच  ही पाएची कहाणी पण त्या गणिती Pi च्या कहाणी इतकीच महत्वाची आहे.