Showing posts with label पुस्तकांबद्दल. Show all posts
Showing posts with label पुस्तकांबद्दल. Show all posts

5/14/20

एक Wild वारी

काही प्रवास आपण करतो हवाबदल म्हणून. काहीवेळा सगे-सोयऱ्यांना भेटायला. पण काही प्रवास करायचे असतात स्वतःचा शोध घ्यायला. इतक्यात माझ्या ओळखीच्या काही लोकांनी नर्मदा-परिक्रमा केली, त्याचे अनुभव वाचतांना मला मात्र एका सर्वस्वी वेगळ्या प्रातांतली एक मुलगी आठवली - शेरील स्ट्रेड. एकटीच, आपल्या नावाप्रमाणे 'भरकटलेली', हरवलेली, वाट चुकलेली. 

तारुण्यात प्रवेश करण्याआधीच तिने आयुष्य खूप जवळून पाहिलं होतं, पण तिची आई जिवंत असेपर्यंत तिला उन्हातही सावली मिळाली होती. आईने सूज्ञपणे नाकर्त्या, मारकुट्या बापापासून स्वतःचा मार्ग वेगळा करून घेतला, आणि मुलांच्या आयुष्यावर त्या वाईट काळाची सावली पडू दिली नाही. पुढे त्यांना आधार देणारा, माया करणारा नवीन 'बाबा' मिळाला होता. कधी एक खोलीच्या घरात, तर कधी माळरानावर खोपटं बांधून सुद्धा ह्या कुटुंबाने आनंदाने दिवस काढले. छोटी शेरील आणि पाठची दोन भावंडं जीवनाशी दोन हात करायला शिकली, पण तगली, कारण त्यांची आई त्यांच्यासाठी जीवाचा कोट करून उभी राहिली होती. 

पण चांगले दिवस आता येणार, ही आशा पालवू लागते न लागते, तोच दैवाने फार मोठा घाव घातला- आईला कॅन्सर झालाय, हे पचनी पडायच्या आतच आईला काळाने हिरावून नेले. "बोलावू तुज आता, मी कोणत्या उपायी? आई!" असा आक्रोश करणारी शेरील दैवाशी भांडून वेडी झाली, पण गेलेली आई परत थोडीच येणार होती? आईने जोडून ठेवलेलं ते कुटुंब बघता बघता विखुरलं. सुकाणू विना हिंदकळणारी जीवननौका सांभाळू बघता शेरील व्यसनांच्या आहारी गेली, दुःख बुडवायला दैवावरचा राग स्वतःवर काढू लागली, जिवलगांपासून दूर गेली, आणि स्वतःवरचा विश्वासच गमावून बसली. 

पण एक दिवस अचानक तिला Pacific Crest Trail वरचं पुस्तक सापडलं. सापडलं, कि तिच्या डोक्यात अनेक दिवसांपासून घोळत असलेलं स्वप्न मूर्त स्वरूपात पुढे आलं कोणजाणे? "माझ्या आईच्या डोळ्यात जशी मी मला दिसत होते, तशी पुन्हा होण्यासाठी मी हा प्रवास करणार!" तिच्या डोक्याने घेतलं. काडीचा अनुभव नसताना, गाठीशी असलेले जेमतेम पुरतील इतके पैसे सगळे पणाला लावून ती एकटी, हा प्रवास करायला निघाली. 

पहिल्या दिवशी तर बॅकपॅक उचलता सुद्धा येईना, इतकी दारुण अवस्था असताना, फक्त वेड्या ध्यासापायी एक एक पाय पुढे टाकत, ही बारकीशी पोर, दक्षिणेला मोहावे च्या वाळवंटातून उत्तरेच्या 'Bridge of Gods'  पर्यंत मजल मारते, त्याची थरारक कहाणी तिने आपल्या Wild: From Lost to Found on the Pacific Crest Trail या पुस्तकांत लिहिली आहे. कथानकात येणारे चढ-उतार आणि वेगवेगळ्या हवामानातले, परिसरातले चढउतार, ह्यांचा सुरेख मेळ घालत शेरिलची लेखन-शैली आपल्यालाही त्या थरारक अनुभवातून घेऊन जाते. भावनिक सत्य सांगणं एकवेळ सोपं असेल, पण त्यातल्या सूक्ष्म छटा पकडत वाचकाला त्या सत्याचा अनुभव करवून देणं कितीक लेखकांना जमतं? शेरिलच्या तीव्र जाणिवांनी ते साध्य केलंय हे या पुस्तकाचं मोठं यश आहे!

ह्या प्रवासात डोक्यात कसले कसले विभ्रम निर्माण होतात! मनुष्यवस्तीपासून दूर, सर्व गोष्टींची आबाळ असतांना साधा गरम चहा सुद्धा स्वर्गसुखासारखा वाटू शकतो! कित्येक वर्ष न आठवलेली बडबडगीतं डोक्यात रुंजी घालायला लागतात, आणि त्यांच्या अर्धवटच येणाऱ्या शब्दांनी वेड लागतं. पाठीवर घट्टे पडतात, पण मन मात्र जास्त जास्त हळवं होऊन तिथे दोन क्षणांसाठी भेटलेल्या मुसाफ़िरांवर फिदा होऊन जातं. तर कधी असंही होतं, की रोजच्या 'जगण्याच्या' आदिम स्फूर्तीपुढे डोंगराएवढी दुःख पण छोटी वाटू लागतात. 

जेव्हा बुटात पाय मावत नसतो- तेव्हा प्रत्येक पावलागणिक यातना होतात. आत्म्याचं कवचही तसंच जुनं झालेलं असतं, म्हणून तेही तसंच असह्य होतं, पण नखं गळून पडली तरी या प्रवासात थांबायचं नसतं हेच खरं. सोबतीला खारुताईपासून अजस्त्र अस्वलापर्यंत काहीही, आणि कोणीही भेटू शकतं, पण शेवटी वाट एकटीचीच असते. निसर्गाच्या सानिध्यात, इतक्या नीरव एकांतात, दुःखावर फुंकर घालायची प्रचंड ताकद असते. कदाचित त्या खडतर वाटेवरची फुलं, जवळ भासणारी पण डोळ्यात न मावणारी बर्फाच्छादित शिखरं,किंवा पुरुषभर उंचीचं झेपावणारं गवत होऊन तिच्या आईनेच तिची पाठराखण केलेली असते! 
ऐहिक स्वरूपात हरवलेली आई आता झाडं, पानं नितळ डोहातच नव्हे, तर तिच्याच अंतर्मनात सामावलेली असते, आणि तिला सांगत असते, "स्वतःच्याच डोळ्यांत बघ- तुला मी ही दिसेन, आणि माझ्या डोळ्यातली तू ही." 

अशी ही शेरिलची कहाणी वाचून वाटलं- परिक्रमा, वारी, यात्रा करणं, ह्या धार्मिक गोष्टींमागे आत्म्याला शुद्ध करण्याचाच हेतू असावा, आणि "धर्माच्या राजकारणा" पलीकडे पाहता आलं, तर तो सहज दिसतोही, पटतोही. आज जगभर पसरलेल्या करोनामुळे दोन महिने घरबसल्या मी हीच वारी केली. त्यातून मला पण काय काय शोध लागले! पण ते सांगेन, नंतर कधीतरी.  

4/14/19

मानसीचा चित्रकार तो

कला ती अजरामर, ती कलाकारच काय, कलेचा विषय झालेल्या सौंदर्याला हि पुरून उरते, म्हणून किती तिचं कौतुक! चित्रात बंदिस्त झालेला क्षण, पण तो आपल्या हातातून मात्र कायमचा निसटलेला असतो.
"मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो!" ह्या अजरामर ओळींमध्यें 'निरंतरता' किती महत्वाची आहे!

मानसी वसलेली रूपसी, वीस वर्षांनी जेव्हा भुऱ्या केसांनिशी किंवा दोन ऐवजी चार डोळे लावून समोर येते, तेव्हा? नश्वर सौंदर्याचं हे नवीन, भीषण रूप सुद्धा त्या मानसीच्या चित्रकारा ला तितकं च भावेल काय? अनेक पावसाळे पाहिलेल्या आजीच्या चेहेऱ्यावरच्या सुरकुत्या तिचे एक एक अनुभव सांगतात, पण त्यांचं जगात खरं काय मोल? भरभर पुढे धावणाऱ्या जगाचे मानवी मूल्यांचे निकष भूतकाळात अडकून थोडेच पडणार? सतत सुंदर, सतत नवीन चेहेऱ्यांच्या मागे ते धावणार. 

पण जर, एखाद्या चित्रांमधली निरंतरता व्यक्तीमध्ये संक्रमित झाली, आणि व्यक्तीतली बदलती नश्वरता चित्रात उमटू लागली तर? चिरतारुण्याचा वर मिळालेल्या त्या माणसाच्या बाह्यरूपात तर बदल होणार नाहीत, पण अंतरंगात कुठले बदल होतील? ह्या अनोख्या कल्पनेला ऑस्कर वाईल्डच्या लेखणीने जिवंत केलं. कला, ही कलाकाराचं अस्तित्व ओलांडून अजरामर होते, पुन्हा पुन्हा जन्म घेते त्याचा प्रत्यय 'द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे' मधून आपल्यापुढे ठेवतो.

कथा सुरु होते, तेव्हा डोरियनच्या निरागस सौंदर्यावर वर निरतिशय प्रेम करणारा एक चित्रकार, अक्षरशः जीव ओतून त्याचं एक चित्र काढतो. ते चित्र विकणंच काय, पण कोणाला दाखवणंही आपल्या प्रेमाशी प्रतारणा करणं होईल, ह्या भावनेचा हा चित्रकार, डोरियनला ते चित्र भेट देतो. स्वतःच्या सौंदर्याची आजवर जाणीव नसलेला डोरियन, चित्र बघून मात्र स्तिमित होतो! स्वतःच्या चित्रावर स्वतःच मोहित व्हावं, असं निकोप, निरागस सौंदर्य डोरियन ला मिळालेलं असतं. 

त्याचा मित्र हेन्री मात्र ग्यटेच्या सैतानाशी साधर्म्य सांगणारा आहे. प्रखर बुद्धिमत्तेच्या अहंकाराने सगळ्या गोष्टींचे फक्त विच्छेदन करणारा. कधी आपला खलनायक, तर कधी सूत्रधार. 

तो डोरियनच्या डोक्यात किडा सोडतो- सौंदर्याच्या नश्वरतेची जाणीव करून देतो. "काहे भुललासी वरलिया अंगा?" मुळात सामान्य रूपाच्या व्यक्तींनी हे म्हणणं सोपं आहे, पण डोरियनला पुढचं दुर्भाग्य दिसू लागताच तो आत्म्याचं धन गहाण टाकून चिरतारुण्याचा वर मिळवतो. डोरियन Goethe च्या Faust प्रमाणे भरभरून जीवन जगण्याच्या प्रयत्नात नव्हता, तर केवळ स्वतःच्या जीवनावर प्रेम करणारा होता. त्यामुळे त्याची अधोगती तर अधिकच झपाट्याने होत जाते... 

दुसरीकडे, चित्रातल्या डोरियनचा चेहरा मात्र त्याच्या दुष्कृत्यांच्या खुणांनी भेसूर होत जातो... शेवटी कोण जिंकतं? कलाकार, त्याची कलाकृती, कि कलाकृतीमागची प्रेरणा बनलेला अप्रतिम चेहरा? त्या अप्रतिम चेहऱ्याचा धनी?

ऑस्कर वाईल्डची ही एकमेव लघु-कादंबरी. ताकदीने, सहजतेने वैचारिक उहापोह करणाऱ्या त्याच्या ओघवत्या भाषेने आपण थक्क होतो. अनेक वाक्य अशी, कि खोटी खोटी ठरवायला जावं, तितकी अधिकच खरी वाटणारी! 
"You will always be fond of me. I represent to you all the sins you never had the courage to commit.” 
“There is only one thing in the world worse than being talked about, and that is not being talked about.” 
“Nowadays most people die of a sort of creeping common sense, and discover when it is too late that the only things one never regrets are one's mistakes.” 

“The only artists I have ever known who are personally delightful are bad artists. Good artists exist simply in what they make, and consequently are perfectly uninteresting in what they are. A great poet, a really great poet, is the most unpoetical of all creatures. But inferior poets are absolutely fascinating. The worse their rhymes are, the more picturesque they look. The mere fact of having published a book of second-rate sonnets makes a man quite irresistible. He lives the poetry that he cannot write. The others write the poetry that they dare not realize.” 

वास्तवात 'काळाचा' प्रभाव कुणालाही चुकवता येत नाही. पण ज्या व्यक्ती ध्येयनिष्ठता, कर्तव्यबुद्धी, प्रेम देण्याची वृत्ती, किंवा स्वभावातले मार्दव- ह्या सनातन मूल्यांचा ध्यास घेऊन जगतात, त्यांच्या चेहऱ्यावर वृध्दपणीसुद्धा तेज दिसतं, ह्याचा अनुभव मी घेतला आहे. आदर्शवादाचं प्रवचन नाही, पण शेवटी, स्वतःचा चेहरा स्वतःलाच आरश्यात रोज बघायचा आहे, हो ना?




2/21/19

शब्द दिला!

"तिने बाळाला जन्म दिला!" असं म्हणतात. दिला? जन्म ही कुणी कोणाला देण्यासारखी गोष्ट तर नक्कीच नाही. तो कशाचा 'दाखला' होता, कि तिने दिला? कि तिला तो द्यावा लागला?
जेव्हा जन्म दिला, तेव्हा ज्यांना दिला, त्यांना तो घेण्या किंवा न घेण्याचा अधिकार असतो का?
जाऊदे. ह्या शब्दच्छलात पडण्यापेक्षा- डॉक्टरांनी 'डिलिव्हरी केली' असं म्हणावं, तर डॉक्टर काय पोस्टमन झाली, कि तिने केवळ जिथलं पार्सल तिथे पोचवण्याचं काम केलं?
आपल्या अवघ्या अनुभवविश्वाची मर्यादा, अशी शब्दांनी ठरवली जाते. जन्म देण्याचा अनुभव कसा असतो? त्याचं वर्णन करणारे शब्द एका लेखिकेला सापडू शकतील का?

Margaret Atwood ही कदाचित सध्याची सर्वात मान्यवर इंग्रजी लेखिका आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये, इतकी पारितोषिकं आणि सन्मान तिच्या नावावर आहेत. मार्गरेटचं घट्ट वास्तवाला धरूनच उत्तुंग भराऱ्या मरणारं साहित्य खरंच स्त्री जीवनाच्या खूप खूप जवळ जातं. The Handmaid's Tale लिहिताना म्हणे, तिने स्वतःवर बंधन घालून घेतलं होतं, कि जगात आजवर न घडलेल्या गोष्टी आपल्या कथेत मुद्दाम दुःख-विषाद निर्माण करण्यासाठी घालायच्या नाहीत. तरीही, ह्या डिस्टोपिअन कथेतली भीषणता सर्वांपर्यंत पोचली. तिच्या कथा, कविता मी जास्त वाचल्या - २५ एक कादंबऱ्या, ७-८ कथा संग्रह, कविता संग्रह, शिवाय, समीक्षा, ब्लॉगच नव्हे, तर 'ग्राफिक नॉव्हेल' सारख्या अतिशय नवीन प्रांतातही पाऊल ठेवलेलं. इतकं विपुल लेखन करणारी स्त्री लेखिका, आणि तरीही जे जे लिहिलं ते उत्तम, म्हणून मी अधिकाधिक भारावत गेले!

Dancing Girls मधली तिची कथा, "Giving Birth" च्या सुरुवातिचा थोडासा स्वैर अनुवाद/गोषवारा वर दिलाय. मानव"जन्मा" च्या लिखित इतिहासात, अनुभवकथनात, स्त्रियांच्या अनुभवांचं स्थान दुय्यमच नव्हे, तर केवळ अंशमात्र ठरलं. पृथ्वीच्या उत्क्रांतीपासून विश्वयुद्धापर्यंत अनेक 'महत्वाच्या' घडामोडीमध्ये स्त्रीजीवनाचा विचार फार कमी वेळा पुढे मांडला गेला. १०० प्रसिद्ध लेखकांची नावं घ्या म्हंटल, तर सहज तोंडावर येतील- शेक्सपियर/मिल्टन/चॉसर  पासून कीट्स, वर्डस्वर्थ, हार्डी, येट्स, आणि इकडे अमेरिकेत व्हिटमन, हॉथॉर्न, फिट्सजेराल्ड,आर्थर मिलर, रॉबर्ट फ्रॉस्टच नव्हे, तर लोकप्रिय लेखकात जेफ्री आर्चर, आर्थर हेली वगैरे सर्वांना माहित असतात. आता १०० इंग्रजी लेखिकांची, किंवा स्त्रीविषयक लेखनाची नावं आठवून पाहू बरं?

कठीण च होतं ते! इंग्रजीपेक्षा मग मराठी लेखिकाच लवकर आठवतील. अभिजात साहित्य लिहायला वेळ, पैसा, आणि 'स्थान', ह्या तीन गोष्टींचं गणित स्त्रियांसाठी जुळून येईपर्यंत २०वं शतक उजाडलं. व्हर्जिनिया वूल्फ म्हणाली, तसं, कादंबऱ्यांनी स्त्रियांच्या विश्वाला साहित्यात स्थान मिळवून दिलं. आणि तरीही, साहित्याच्या पुरुषप्रधान निकषांवर ते उतरायला अजून कितीतरी काळ लोटावा लागला. जेन ऑस्टेन, ब्रॉन्टे भगिनी फक्त प्रेम-घर-लग्न-कुटुंब ह्याच परिघात फिरत राहिल्या, कारण त्या पलीकडचं विश्व त्यांच्या परिचयाचंच नव्हतं...

Atwood च्या "Giving Birth" ची लेखिका/निवेदिका स्वतः आई आहे. तिची २ वर्षाची पिल्लूडी मधेच झोपेतून उठल्यावर तिला खाऊ घालणे, न्हाऊ घालणे, हे करता करता ती लिहितेय, विचार करतेय.
तिच्या मुलीला कोणीतरी दिलेली बार्बी बाहुली, त्या बाहुलीचे सगळे कपडे गायब, आणि कशी कोणजाणे, बाहुलीच्या पोटातून मधे अखंड चीर गेलीये! आणि आज बघते, तो चिमुकलीने तोंडात घालून घालून बाहुलीचे पाय पण तोडलेयत! मग लगेच मुलीचं डायपर उघडून तपासणी करावी लागते, कि पाय खाल्ले असतील, तर शी तुन बाहेर पडले का?
आता ती बीभत्स बाहुली बघवत नाही, म्हणून कचऱ्यातच टाकावी लागते!  

हे सोपस्कार पार पडून, शेवटी आपण गोष्टीतल्या नायिकेकडे वळतो- जेनेट. जेनेट सुशिक्षित, बहुधा नोकरदार, सजग स्त्री असल्यामुळे तिने प्रसूतीविषयी पुस्तकं वाचलीयेत, श्वासावर लक्ष केंद्रित करायचे, दहा आकडे म्हणायचे - असे पर्याय ती प्रसूती-कार्यशाळेतून शिकून आलीये. ह्या क्लासमध्ये सांगतात, "थोडा त्रास होणारच, पण तो आपण कसा घेतो, त्यावर आहे!" पण तिथली एक अनुभवी बाई म्हणते- "इंजेकशन घेऊन टाका- नरकयातनांपेक्षा काहीही बरं! त्रास- प्रसूती वेदनांना 'त्रास' म्हणणं म्हणजे!" पण पाहिलटकरीणी तिच्याकडे आक्रसून बघतायत - किती नकारात्मक विचार करावा उगीच!

जेव्हा वेळ येते, तेव्हा मात्र जेनेटला वाटतं- क्लासमध्ये शिकलेल्या वाचलेल्या ऐकलेल्या कितीही गोष्टी असोत, 'ह्या' अनुभवासाठी त्या पूर्णपणे निरुपयोगी आहेत!
कळांच्या वेदनेतून जाताना ती सगळ्या जगापासून तुटल्यासारखी होते. तिच्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टी संथ होतात, आणि शेवटी श्वासोच्छवास, दहा आकडे, शब्द, सगळ्यांच्या पलीकडे ती पोचते. बाळ बाहेर येतं, तेव्हा नवरा म्हणतो, "बघ,वाटलं तितकं कठीण नव्हतं, ना?"

तिचा चष्मा नवऱ्याने आणलेला नसतो, त्यामुळे "काय झालंय" ते तिला दिसू शकत नाही! स्वतःच्याच इतक्या व्यक्तिगत अनुभवाकडेही शेवटी तिला कुणा परक्याच्याच नजरेतून, त्यांनी वर्णन केलेल्या भाषेतूनच बघावं लागणार असतं. थोड्यावेळाने जाग आल्यावर मात्र, खिडकीतून बाहेर बघताना, आजवर ज्या इमारती खंबीर आणि स्थिर दिसत होत्या, त्या अचानक विरघळून जाऊ लागल्या. एक अशक्य अशी कोवळी क्षणिकता जेनेटला दिसली, तेव्हा तिला वाटलं - ती स्वतःच आता एक वेगळी व्यक्ती झाली आहे!















4/23/18

शैक्षणिक तंत्रज्ञान २

माझ्या मुलाचं हे पहिलीचं वर्ष, त्यामुळे नोंदणीची शंभर कागदपत्रं भरल्यावर जरा श्वास घेतला. 'मोठ्या' शाळेच्या पहिल्या दिवसात चिटुक काय काय नवीन शिकला ते माहिती नाही, पण मी मात्र शाळेकडून येणाऱ्या अक्षरशः रोज एक इमेलने भांबावून गेले!
१. शिक्षकांचे प्रत्येकी वेगळे वेबपेज, पालक-संगठनेचा वेगळा 'दुवा'.
२. मुलगा आजारी/अनुपस्थित असेल तर शाळेला कळवण्यात यावं, त्यासाठी वेगळा ईमेल-पत्ता!
३. शिवाय, मुलाचं 'प्रगतीपुस्तक' बघण्यासाठी वेगळ्या ठिकाणी आपलं 'पालक-खातं' बनवणे.
४. फावल्या वेळात मुलांना गणिताची गोडी लागावी म्हणून वेगळं 'app', ज्यावर आपल्या पाल्याशी आपलं खातं जोडणे, म्हणजे त्याची प्रगती आपल्याला कळेल.
५. वाचनाच्या गोडीचं तसलंच, पण वेगळं app!
६. मुलांना शाळेतुन 'डबा'/ जेवण विकत घ्यायचं असेल, तरमुलांच्या हाती पैसे सोपवावे लागू नयेत म्हणून एक पालक खातं, त्याचा फक्त 'कोड नंबर' मुलांनी शाळेत वापरायचा आहे. त्यात दर महिन्याला १०-२० डॉ. भरून ठेवता येतात.
७. जेवणाचा मेन्यू शाळेच्या वेब-पत्त्यावर उपलब्ध, तो दर महिन्याला आपण 'उतरवून' घेऊ शकतो.

हे इतके 'मायाजाल' लक्षात ठेवता ठेवता माझी सुरुवातीला तारांबळ उडाली, मग सरळ वहीत 'सदस्यनाम' + परवलीचा शब्द लिहून ठेवू लागले. मुलगा मात्र दोन दिवसात जेवणाच्या नंबरपासून अभ्यासाच्या खात्यापर्यंत सगळी नावं/पासवर्ड शिकून तरबेज झाला. मी मनाशी म्हटलं, "आपण जुन्या खोडा प्रमाणे नवीन तंत्रज्ञानाबद्दल उगीचच साशंक झालो आहोत. नवीन पिढीसाठी हे काही कठीण नाही!"

पण त्याच वर्षी, आमच्या विद्यालयानेसुद्धा नवीन Learning Management System (शिक्षण-संस्थापन तंत्रज्ञानाचं) अवलंबन करायचं ठरवलं. फर्मानं सुटली, कार्यशाळा झाल्या. वर्ष सुरु झालं. तेवढ्यातच पुन्हा नवीन फर्मानं निघाली, की इंग्रजी साठी पूर्वीचं साधं पाठ्यपुस्तक बाद करून त्या ऐवजी एक वेगळी LMS पद्धत वापरायची आहे. ह्या दोन्ही पद्धतींचा एकमेकींशी ताळमेळ घालून देण्याची अजून एक नवीन कार्यशाळा झाली!

मी स्वतःला 'जुने खोड' म्हंटले तरी खरं म्हणजे माझं तंत्रज्ञानाशी अजिबातच वाकडं नाहीये, त्यामुळे मी ह्या नवीन पद्धती बऱ्यापैकी लवकर आत्मसात केल्या. खरंतर ह्या नवीन माध्यमातल्या क्षमतांचा विद्यार्थी, तसेच शिक्षकांना खूप उपयोग होऊ शकतो: 

१. पुस्तकातले प्रश्न सोडवतांना बरेचदा पाठ करून/ दुसऱ्यांची बघून लिहिलेली उत्तरं दिसतात, पण त्यातून मुलं खरी संकल्पना (concept) शिकलीयेत की नाही, ते कळत नाही. ह्या ई-पुस्तकात प्रत्येक व्यक्ती आपल्या खात्यातूनच लॉगिन करणार, त्यामुळे उत्तरं चोरायचा प्रश्न येत नाही. शिवाय, प्रत्येक विद्यार्थ्याला, त्याच संकल्पनेबद्दल, पण वेगळे प्रश्न दिसतात! इतकंच नव्हे, तर शिक्षकांनी परवानगी दिली, तर एक 'चाचणी परीक्षा' २-३ वेळा देता येते, आणि त्यातून सर्वात चांगले गुण 'धरले' जातात.
२. अमेरिकाभर वापरली जाणारी अजून एक वेबसाईट म्हणजे 'Turnitin'.  ह्यावर विद्यार्थ्यांचे शेकडो/हजारो निबंध आधीपासून साठवलेले आहेत, त्यामुळे माझ्या विद्यार्थ्याने जर दुसऱ्या कुठूनही वाक्ये/उतारे 'चिकटवली' असतील, तर ते मला, शिक्षिकेला दिसून येतं. प्रत्येक शिक्षकाने ही व्यवस्था वापरली, तर निबंधाची संख्या वाढत जाते, व दुसऱ्याच्या कल्पना चोरून वापरणं अधिकाधिक कठीण होत जातं.
३. विद्यार्थ्यांना तर चक्क 'धडा वाचून दाखवणे' ही पण सोय ह्या नवीन ई-पुस्तकात आहे, म्हणजे अगदी जिम मध्ये व्यायाम करता करता कानाला हेडफोन लावून धडा 'ऐकता' येतोय!

इतक्या सगळ्या सोयी सुविधा असूनही माझ्या अनुभवात, मुलांना हे तंत्रज्ञान आत्मसात करणं, स्वीकारणं, खूप कठीण जात होतं. जोवर एखाद-दुसऱ्या वेबसाईटशी जुळवून घ्यायचं असेल, तोवर ठीक आहे, पण गेल्या १० वर्षात मी शिक्षिका म्हणून अशा ६-७ तरी  वेगवेगळ्या 'पद्धतींशी' जुळवून घेते आहे. नवीन विद्यालयात नवीन तंत्र, नवीन अभ्यासक्रम. 
(माझ्यासारखे 'तात्पुरते प्राध्यापक' (Adjunct Professor) यांची वणवण, हा एक अजून वेगळा घोर लावणारा विषय आहे, ते सोडा च.) 

शिक्षकांची ही कथा, तर मुलांना बहुतेक शालेय-स्तरावर अनेक वेगवेगळ्या विषयांसाठी, १५-२० तरी वेबसाईट/ऍप/सॉफ्टवेअर आत्मसात करावं लागत असणार (असा एक माझा अंदाज आहे). ह्या ओढाताणीत मुलांची स्वयंप्रेरणा मात्र कमी होऊ लागली, तर ह्या तंत्रज्ञानाचे अनेक फायदे सर्वस्वी अपयशीच ठरतील, हे त्या अनुभवातून गेल्याशिवाय पालकांना व शासकांनाही कळणार नाही, हे इथे लक्षात आणून द्यायचा माझा उद्देश आहे.  

3/31/18

The Reader: वाचाल तर वाचवाल


Kate Winslet म्हटली, कि Titanic मधली उच्चभ्रू, सुसंस्कृत तरुणी आठवते. तिच्यातली उत्स्फूर्त, प्रखर अस्मिता असलेली प्रेयसी जॅक च्या सान्निध्यात समोर येते. त्या व्यक्तिरेखेचा इतका पगडा मनावर होता, की पुढची अनेक वर्ष अभिनेत्री आणि व्यक्तिरेखेतली सीमारेषाच धूसर होती.

पण The Reader मधली केट, बघताक्षणीच वेगळी व्यक्ती असते. हॅना श्मिट्झ. जर्मनीतली, दुसऱ्या महायुद्धातली साधी ट्राम कंडक्टर असलेली ही एकसूरी जगणारी मध्यमवयीन बाई. पण तारुण्याच्या उंबरठ्यावरच्या एका मुलाची तिच्याकडे चोरून बघणारी नजर ती ओळखते. आधी निरुपद्रवी विरंगुळा म्हणून त्यांचं 'प्रेमप्रकरण' सुरु होतं. पण कोवळ्या वयाचा हा मुलगा तिच्यात गुंतत जातो, ते त्याचं त्यालाही कळत नाही. ती मात्र कायम रोकठोक अंतर राखूनच वागते. प्रत्येक भेटीत त्याला विचारते, "तुझ्या शाळेत कोणतं पुस्तक चाललंय सध्या? वाचून दाखव बरं!" तो वाचतो:
"Sing to me, Muse, of the man of twists and turns........"
ती म्हणते, "किती सुंदर हे शब्द! छान वाचतोस...." तो तिला बरेचदा पुस्तकं देऊ करतो, पण ती म्हणते, "नको, मला तू वाचून दाखवलेलंच आवडतं!"

The Reader हा चित्रपट मूळ कादंबरी Der Vorleser वर आधारित आहे, आणि Der Vorleser चा अनुवाद "वाचणारा" असा नसून "वाचून दाखवणारा/पाठक" असा होतो. हा मुलगा उन्हाळी सुट्टीतला 'पाठक' होतो. हॅना श्मिट्झवरच्या प्रेमापोटी, आपण वाचून दाखवताना बदलणारे, तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचायचा प्रयत्न करतो. पण एके दिवशी ती अचानक दुसऱ्या गावी बदली होऊन निघून जाते.

मुलगा पहिल्या प्रेमभंगातून सावरतो, मोठा होतो, आणि नामांकित 'न्यायशाळेत' वकीली शिकू लागतो. दुसरं महायुद्ध संपलेलं असतं. आउश्वित्झचे खटले (The Auschwitz Trials) सुरु असतात, तिथे सगळे न्यायशास्त्राचे विद्यार्थी उपस्थित असतात, त्यात हा मुलगाही असतो. आणि तिथे त्याला पुन्हा दिसते- हॅना श्मिट्झ. ह्यापुढे रहस्यभंग करू इच्छित नाही. बरेचदा हिन्दी चित्रपटात (रहस्यकथा असो किंवा थरार) प्रत्येक प्रतीक, प्रत्येक घटना, प्रेक्षक ४ वर्षाचे असल्याचे गृहित धरून अती स्पष्टीकरण केले जाते. "द रीडर" तसे स्पष्टीकरण देत बसत नाही, आणि ह्यामुळेच तो विचारप्रवर्तक होतो, हे आवडलं!

ह्यापुढील चित्रपट नायकाच्या अस्वस्थतेचं चित्रण करतो. एकेकाळी आपली प्रेमस्वरूप असलेली "मायभू" जर्मनी (जरी जर्मनीला पितृभूमी म्हणतात, तरी, इथे मायभू म्हणणे समर्पक ठरेल). युद्धानंतर देशप्रेमाचं परिवर्तन लज्जा आणि संभ्रमात झालेल्या पिढीचं प्रतीक आपला नायक आहे. ह्या पिढीला आपल्या इतिहासाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग हवाय, म्हणूनच, आपला तरुण नायक स्वतःलाच प्रश्न विचारून आत्मपरीक्षण करतो आहे, की "ज्यू लोकांचं शिरकाण करणाऱ्या माझ्या देशावर मी प्रेम कसे करू???" माझ्या देशाने हे अघोरी कृत्य केलंच कसं? का केलं?



"वाचाल तर वाचाल" हे आपण ऐकलेलं आहे, पण "वाचाल तर वाचवाल" हे द रीडर बघून कळलं. हे वाक्य केवळ नायकालाच लागू होत नाही, तर नायिकेलाही एका नकारात्मक पद्धतीने लागू होतं, म्हणून चित्रपटाचं आणि कादंबरीचं नाव सार्थक आहे.

आपण वाचतो, वाचन खूप महत्वाचं आहे वगैरे सर्वांना माहिती आहे, पण वाचनाचा खरा अर्थ म्हणजे केवळ माहिती मिळवणे नसून, पुस्तकातील व्यक्तींशी, घटनांशी एकरूप होणे. पुस्तकांच्या स्थल-कालाबाधित अस्तित्वातून जेव्हा आपण समग्र मानवी जीवनाशी जोडलेजातो, तेव्हा 'सहानुभूती' चा खरा अर्थ वाचनातून जाणवतो. एखाद्या सर्वस्वी वेगळ्या संस्कृती/काळातल्या व्यक्तिरेखेच्या भावानुभवाशी जोडल्या गेल्यावर 'नीती' 'दया', ह्या 'मानवी मूल्यांची' किंमत कळते.

आजकाल चमचमीत, झटपट फास्टफूडप्रमाणे वाचनसुद्धा पोषक उरलेलं नाही, कारण दृक्श्राव्य माध्यमांपुढे वाचनाची गोडी लागणे कठीण आहे. पण त्याच दृक्श्राव्यतेचा वापर जर 'द रीडर' सारख्या पोषक, विचारप्रवर्तक चित्रपटांसाठी होत असेल, तर ते हि नसे थोडके.

कथा इतकी सशक्त असल्यावर अभिनय त्या तोडीचा नसेल तर अतिशय त्रासदायक अनुभव येतो, पण इथे केवळ २-३ प्रमुख व्यक्तिरेखा असूनही त्या कलाकारांनी आपल्या अभिनयातून कथा फार ताकदीने पेलली आहे. तरुण नायकाचा (डेव्हिड क्रॉस) अभिनय नंतरच्या राल्फ फिनेसपेक्षाही फार भावला- पण आधीची निरागसता आणि नंतरची प्रौढ निराशा यातील विरोधाभासामुळेही असेल. युरोपचं सुंदर चित्रण, शिवाय हॅनाच्या खोपटेवजा घरातून अप्रतीम वातावरणनिर्मिती होते कारण ते घर, तिच्या रुक्ष जीवनाचा आरसा असतं. पार्श्वसंगीताचं अस्तित्व जाणवू नये, पण त्याने भावनिक उंची नेमकी टिपावी हा ही तोल समर्थपणे सांभाळला गेला आहे. ह्या सर्वांतून दिग्दर्शक स्टीफन डालड्री ची पकड जाणवते.


पुढील वाक्यांतून रहस्यभेद होऊ शकेल, त्यामुळे चित्रपट पाहिला नसल्यास वाचू नये:
हॅनासाठी अधिक लज्जास्पद काय होतं? निरक्षरता? की निर्दयता? जी व्यक्ती आपल्या कर्माचा 'अर्थ' समजून घेऊ शकत नाही, तिला त्यातली निर्दयताही दिसली नाही, त्यात नवल ते काय? पापणीसुद्धा न मिटता तीजन्मठेपेचा स्वीकार करते, पण शिक्षा भोगतांनाही तिच्या मनात खरा पश्चात्ताप निर्माण होत नाही. त्या अर्थी तिचा आत्मा कधीच त्या कृत्यातून मोकळा होऊ शकत नाही.

हॅना ला 'वाचवण्यासाठी', तिला 'वाचता' यावं लागणं अपरिहार्य असतं. अनेक वर्ष हा मुलगा, हॅनावरील प्रेमापोटी, पुस्तकांचा खजिना स्वतः 'वाचून', ध्वनिमुद्रित करून तिला पाठवत राहतो. तिला वाचनाची गोडी लागावी म्हणून धडपडतो. आणि एक दिवस तिचा 'आत्मा' जागृत करण्याचं सामर्थ्य त्या शब्दांमध्ये असतं. त्या अर्थी दुःखांतसुद्धा अतिशय समर्पक वाटतो. नायक आपल्या मुलीला ही गोष्ट सांगतांना स्वतः त्या अनुभवाचा स्वीकार करतो, आणि तीच पुढे जाण्याची एकमेव वाट असते...


4/20/17

13 Reasons Why

१३ कारणे न आवडल्याची १३ कारणे आहेत, पण त्या आधी शीर्षकावरून आठवलेली ही कविता सांगते: 
"१३ प्रकारे कोकिळेकडे बघतांना" - वॅलेस स्टीव्हन्स यांची ही कविता म्हणजे "व्यक्त होणं" काय असतं त्याचा परिपूर्ण अभ्यास आहे! कवीची नजरच कवितेचा विषय 'वेगळा', काढत असते, त्यानुसार बघणाऱ्याची नजरेच्या चौकटीतूनच कुठलंही 'सत्य' व्यक्त होत असतं.... असं काहीसं स्टीव्हन्स यांच्या कवितेत प्रतीत होतं. कुठल्याही विषयाची चौकट बदलली की त्याच विषयाचे रंग आपल्याला बदलतांना दिसू लागतात. हे सगळं त्या शीर्षकातून सुचवण्याचा प्रयत्न असेल, तर निदान शीर्षक तरी आपल्याला आवडलेलं आहे :)

तर 13 Reasons Why ही नेटफ्लिक्सवरची नवी मालिका उत्साहाने सुरु केली, कारण, अमेरिकन शाळेत काही वर्ष शिकवल्यामुळे तिथलं वातावरण परिचित आहे. सगळ्या पोरांनी अभिनयपण छान केलेला पहिला भाग आवडला होता... पण... 

१. शालेय जीवनाबद्दल 'स्पीक' ही लॉरी हाल्स अँडरसन यांची कादंबरी, तसेच टॉम पेरोटा यांची 'इलेक्शन' कादंबरी प्रसिद्ध आहेत.त्या दोन्ही ह्यापेक्षा खूपच जास्त वास्तवदर्शी आहेत. (१३ कारणे ही मूळ कादंबरी मी वाचलेली नाही, पण मालिका पहिल्या नंतर वाचायची इच्छा नाही!)

2. इथे पौगंडावस्थेतल्या मुलांना 'यंग ऍडल्ट' म्हणण्याची पद्धत आहे, पण ही मुलं आपण आधी 'यंग' आहोत आणि अजून 'ऍडल्ट' झालेलो नाहीये, हे सहज विसरतात. अमेरिकन पालक त्यांना 'फुलण्याची' खुली सूट देतात, मात्र दुष्परिणामांकडे बघायला त्यांना वेळ नसतो, असं वातावरण या मालिकेत दिसतं. भावनेच्या आहारी जाऊन तिरीमिरीत निर्णय घेणाऱ्या या मुलांना 'healthy dose of reality' द्यायला मात्र कुणीच पुढे येत नाही- आपलं सामाजिक वातावरण खरोखर इतकं एककल्ली आहे का?

3. प्रमुख पात्र 'हॅना' ही अक्षरशः 'बेकर' असते (आडनाव), तर तिच्या हिरोचं नाव 'क्ले' (माती) असतं. म्हणजे ती त्याला घडवते - पण घडवते कसली 'बि'घडवते, आणि त्याचा दगड करायचाच बाकी ठेवते! 

4. 'हॅना' ही अति-संवेदनशील, पण प्रचंड आत्ममग्न आहे. १०विच्या वर्गात, नवीन शहरात आल्या आल्या ह्या बयेला आधी मित्र मिळवण्याची, त्याला किस करायची  घाई झाल्यासारखी वाटते- पण अभ्यासाचं काय? हिला ना माणसं ओळखता येतात, ना स्वतःचं भलं कळतं. बरं नसेल कळत, तरी चांगल्या मित्रमैत्रिणींच्या संगतीत राहायचं सोडून ही खो-खो खेळल्यासारखे वेगवेगळ्या मुला-मुलींशी मैत्री जोडू पाहते, आणि प्रयत्न फसले, किंवा कुणी गैरफायदा घेतला, की ना तिला सहन करता येतं, ना आवाज उठवता येतो. पुन्हा पुन्हा त्याच चुका करणाऱ्यांना मूर्ख नाही तर काय म्हणायचं?

5. बरं, ह्या १०००-२००० मुलं असलेल्या मोठ्या उच्चमहाविद्यालयात, एक क्ले सोडून एकही सुसंस्कारित मुलगा नसतो! सगळे आपले एका माळेचे मणी. कोणी मुलींच्या रंगरूपावरून त्यांची वर्गवारी करणारे, तर कुणी अश्लील फोटो काढून मोबाईलने शाळा-भर पसरवणारे. आणि ह्या गदारोळात, एकच 'देसी' मुलाचा उल्लेख येतो, तो काय करतो? व्हॅलेंटाईन डे साठी 'सॉफ्टवेअर' बनवतो :) :) :) इट इज नॉट कूल टू बी अ नर्ड! 

6. चमचमीत गोष्ट लिहायची म्हणजे त्यात शाळेतली मुलं दारूपासून ड्रग्सपर्यंत काय काय करतात त्याचा रसभरीत आढावा यायलाच पाहिजे. ही मालीका बघून प्रौढांनाही हँगओव्हर यावा इतकी दारू ही पोरं पीत असतात, आणि विषय 'यंग ऍडल्ट' असला तरी मालिका 'ऍडल्ट' असावी इतका प्रणय करत असतात! 

7.  इतकं करून दुखऱ्या मनाचं खापर फोडायला शिक्षक, आई-बाप, समाज, व्यवस्था सगळे आहेतच. आईबाप कष्ट करून पैसे जोडतात, ते ह्यांना प्रॉम डे ला नवीन गाडी घेऊन द्यायला! हेच आईवडील, आत्महत्या प्रकरणी 'आपल्या मुलाला/मुलीला पाठीशी घालून त्यांच्यावर शाळेत कोणी दादागिरी केली, त्यांच्यावर कसला मानसिक ताण होता, ह्या 'सत्याचा' शोध घेऊ पाहतात. 

8. शिक्षक तिथे घसाफोड करतात तेव्हा पोरांना चिट्ठ्या फेकण्यात जास्त रस असतो, पण, इतकं करून जर यांचा तोल ढळला, आणि यांनी जीवाचं बरंवाईट करून घेतलं, तर खापर आधी शिक्षकांवर फोडायलाही 'क्ले'चं पात्र कमी करत नाही. "तुम्हाला माहिती होतं का, ही कविता कोणी लिहिली?" तो शिक्षिकेलाच विचारतो!
झालंच तर शाळेतील मानसोपचार तज्ञालाही खलनायक बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न ही हॅना करते. कारण काय, तर ती स्पष्ट बोलायला तयार नसतांना, त्याने तिला थांबवून खोदून खोदून विचारायला हवे होते, पण त्याचा फोन खणखणत होता!

9. "सायबर बुलीइंग" ह्या नवीन पिढीच्या राक्षसाशी दोन हात करायला अनेक शाळांमध्ये मुद्दाम वेगळा वेळ दिला जातो. सायबर बुलीइंग मुळे अनेक विध्यार्थानी आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत, पण, ह्या मालिकेत केवळ तेच एक कारण दाखवले नाहीये.

10. ह्या मुलांच्या खऱ्या समस्यांचा वेध घेण्याचा एकही प्रयत्न ही मालीका करत नाही. एका मुलाची आई सतत वेगळे पुरुष घरात आणते, आणि मुलापुढे मित्राला कायम प्राधान्य देते. फाटके बूट घालूनही हा मुलगा शाळेच्या खेळ-संघाचा स्टार असतो -पण ही गोष्ट त्याच्या वर ही 'संधीसाधू' 'चारित्र्यहीन'तेचं लेबल लावून मोकळी होते. 

11. शाळा म्हणजे समाजाचा आरसा असतो, त्यात आवडते-नावडते, समंजस, असमंजस अशी सगळ्या प्रकारची मुलं असतात पण, ह्या मालिकेत एकही 'सकारात्मक' आदर्श व्यक्तिरेखा दिसत नाही. क्ले ची एकमेव 'चांगली' व्यक्तिरेखा आहे, पण तो सुरुवातीला अतिशय शामळू दाखवला आहे. सामाजिक विकृतींवर इतका झोत टाकतांना अनावधानाने इथे त्यांचा पुरस्कारच एका दृष्टीने केला जातो!

कथानकातील काही छुप्या गोष्टींची चर्चा वाचायची नसेल, त्यांनी इथे थांबावे.


12. एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येची नैतिक जबाबदारी सगळ्या शाळेवर आहे, हे दाखवायचा प्रयत्न सपशेल फसलेला आहे, कारण चक्क हॅनावर प्रेम करणाऱ्या क्लेला सुद्धा तिच्या मृत्यूसाठी आपण जबाबदार असल्याचं वाटतं! तो सगळ्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करतो, ते ही आधी सरळ त्यांना दोषी ठरवून. मात्र हॅना स्वतः कधीच क्ले जवळ मोकळी होत नाही, की त्याला आपल्या लढाईत सामील करून घेत नाही. 

13. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आत्महत्या, असा सोयीस्कर अर्थ हॅना काढते! तिच्या बरोबर झालेल्या गोष्टी तिच्यासाठी असह्य होत्या, ह्यात वादच नाही, पण म्हणून काही दिवस त्या व्यक्तींपासून स्वतःला वेगळं काढून, आईवडिलांशी बोलून, मार्ग काढायचं सोडून हॅना सरळ 'passive agressive' पद्धतीने स्वतःचं 'म्हणणं' अक्षरशः खरं करते- सर्वांना स्वतःचं म्हणणं ऐकायला लावून, आणि त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी न देता. 
तसेच जेसिकाचा मित्र तिच्यावर होणाऱ्या बलात्काराचं समर्थन करतो, त्याचा बदला घेण्याकरता ती ज्याने बलात्कार केला, त्याचा बरोबरच पुन्हा झोपते! हे पाहून हसावं की रडावं मला कळेना.

जाता जाता......... 'क्ले' चं पात्र साकारणारा मुलगा छोट्या कियानो रिव्हीज सारखा गोड गोड दिसतो, म्हणून च मी ही मालिका संपूर्ण पाहू शकले! :) 







11/20/16

ग्रफेलो: 2


घुबडाच्या हातावर देऊन तुरी, पुढे निघाली उंदराची स्वारी
नागोबा तेवढ्यात सळसळत आला, फणा काढून गोड तो बोलला
"उंदीरमामा, तुला इतकी कसली घाई?
माझ्या घरी चल, करतो मस्त सरबराई!"

                                   "तुझ्या घरी, त्या ओंडक्यांच्या खाली
                  नागोबा, असेलच ना गाSS सावली
                  (मलाच कशाला ही अवदसा आठवली?)
                                     पण आज नको, मी आहे फारच घाईत
                  ग्रफेलोला भेटलो नाही, तर होईल पंचाईत!"
"ग्रफेलो, ग्रफेलो? तो कोण असतो?"
                                    "नागोबा तुला माहित कसं नाही?
                                     ग्रफेलोसमोर तुझं काही खरं नाही!
                                     डोळ्यात त्याच्या पेटल्याहेत केशरी ज्वाळा
                  जीभेचा रंग तर रात्रीहून काळा
                  पाठीवर फुटलेत जांभळे काटे
                  दुरून दिसला, तरी फार भीती वाटे!"
"बापरे! उंदीरमामा, इतकंच बोला
कुठे भेटणार तुम्ही ह्या ग्रफेलोला?"
                                   "इथे, ह्याच तळ्यापाशी येईन, तो म्हणाला
                                    सापांच्या शेवया खाईन, तो म्हणाला!"
“"बरं बरं उंदीरमामा! टाटा बाय बाय,
मला फक्त फणाच, पण का नाहीत पाय?"
नागोबाने जाताजाता केली सळसळ, आणि गवताच्या वाटेने काढला पळ!
                                    "वेडा रे नागोबा! त्याला कळलंच नाही
                   ग्रफेलो असं मुळी नसतंच काही!"

== 0==0==0==0
शेफारल्या उंदराला स्फुरणच चढलं
कोल्हा, घुबड, सापाला त्याने वेड्यातच काढलं
तितक्यात हादरले डोंगराचे कडे
मोठा एक पंजा पडला डोळ्यापुढे
अजस्त्र जबड्यात, दात, जसे खिळे!
डोकावत होते बाजूने दोन मोठे सुळे!                                              
झाडाच्या खोडासारखे खडबडीत त्याचे पाय
उंदराला झालं दे माय धरणी ठाय
नाकावर दिसली विषारी पुटकुळी,
आणि धारदार नखं बघून बसली दातखिळी
डोळ्यात त्याच्या पेटल्या केशरी ज्वाळा
जीभेचा रंग तर रात्रीहून काळा
पाठीवर त्याच्या जांभळे काटे फुटलेले
उंदराला आता कापरेच भरलेले
"देवा मला वाचव, आता मात्र मी मेलो!

हाच तो, हाच तो, हाच तो ग्रफेलो!" (तिसरा, शेवटचा भाग लवकरच टाकते!)


8/8/16

कवितेचा लोचा

आमच्या जीउनात कवितेनेच सगळा लोचा केलाय. हे पक्कंच कळलंय. आदिमानवांच्या काळात भाषा अशी असावी :
आ.ई (म्हणजे आदि.आई). : झाड (झाडाकडे बोट दाखवून)
आ.बा. (आदि.बाळ): दाल
आ.ई.: झा................ड....
आ.बा.: झा.....लं, जालं, जाड, झा.......................ड!

भाषेचा विकास, हा इथेच थांबायला हवा होता. "त" वरून "ताकभात" ओळखता येण्याइतकी बुद्धी (सुदैवाने/दुर्दैवाने) माणसाला मिळालेली आहेच की. पण नाही. थांबायचं कुठे, हे ज्याला कळत नाही, तो प्राणी म्हणजे माणूस. आपली भाषा, आणि त्यायोगे आपलं जीवन, अधिकाधिक कॉम्प्लिकेटेड करायला ज्याला आवडतं, आणि मग त्या गुंतागुंती बद्द्ल रडतांनाही नवनवीन सुरात कसं रडून दाखवता येईल, ह्याचा विचार जो करतो, तो प्राणी म्हणजे माणूस. आणि म्हणूनच, माणूस = कवी. आणि म्हणूनच, काव्य-भावनेनेच सगळा लोचा केलाय, हे पक्कं.

नुसतं "झाड" म्हणून थांबायच्या ऐवजी, मग झाड हिरवं असतं, हिरव्या झाडाला खूप पानं असतात, झाडाची पानं वाऱ्यावर डुलतात, झाड सुंदर असतं, ही असली निरूपयोगी निरीक्षणे करणं, हे कवीचं काम असतं. इथे कवी= शिकार, झाडे तोडणे, एकमेकांवर स्फटिके आपटून आग लागते का बघणे, ती स्फटिके विकून चार कोंबड्या विकत घेता येतील का ते पाहणे, असले कुठलेही "अर्थपूर्ण" उद्योग करायचे सोडून, झाडाची हिरवी पानं बघत बसलेलं खुळं, हा एकच अर्थ अभिप्रेत आहे.

हे खूळ म्हणजे एक खूळच असल्यामुळे, कवीमंडळींना आत्मविश्वासाचा जबरदस्त विंचू चावलेला असावा (अगदी आदिकाळापासून), कारण, तुम्ही हे जे (इतरांना) उपयुक्त पण स्वत:ला निरूपयोगी जीवन जगताय, ते काही खरं नाही, असं सांगून त्यांनी आम जनतेलाच वेड्यात काढलं. उलट कवींना सरळ बुद्धी दे रे बाबा, म्हणून "आदि"माते ला विनवण्यापेक्षा, कवींची निरीक्षणं स्मरणात ठेवून चघळणे, एकमेकांना ऐकवणे, असल्या प्रशस्तीमुळे कवी मंडळी लई डोक्यावर चढत गेली ती गेलीच.

शिवाय, रोज रोज खाल्यावर जसे स्वयंपाकातले बारकावे कळू लागून "रसिक" जन्माला येतात, स्वत:ला गाण्यात गती नसूनही जसे "कानसेन" तयार होतात, तसेच रोज रोज हा खुळ्या शब्दखेळाचा रतीब ऐकून-वाचून वाचकही प्रगल्भ (किंवा बोअर) झाले, की त्यांनाही वर्णनात्मक कवितांनी किक बसेनाशी झाली, आणि कवींना उपमा-उत्प्रेक्षांच्या फोडण्या घालून घालून शब्द खपवायची वेळ आली.  हे मीच नव्हे, लेव्ही स्ट्राऊसनेही म्हटलंय बरंका. आणि काय म्हटलं, यापेक्षा कुणी म्हटलं, ह्याला जास्त महत्त्व आहे, असं पुलंनीही म्हटलंय, जे स्वत: पु.ल. असल्यामुळे, त्यांच्या म्हणण्याला तरी मान असणारच किनई!  इथवर ठीक होतं. खरा लोचा झाला, तो पुढेच आहे.

आता तुम्ही म्हणाल कि कवितेत मला काय प्रॉब्लेम! मी काय कवी/कवयित्री नाही. असते तर लेख लिहिण्या ऐवजी कविताच केली असती ना हो. कविता करण्या/ वाचण्याचा छंद तसा निरूपद्रवी आहे. वर सांगितल्याप्रमाणे, कवी मंडळींंचा प्रक्षोभ सक्रीयतेकडे क्वचितच पोचत असल्याने, तसाही काही धोका नाही. "आदि"कवी वाल्मिकींनाच बघा, हरणाला बाण मारणारा शिकारी बघून एखाद्याने त्याचा हात धरला असता, किंवा किमानपक्षी नंतर त्या विद्ध हरणाला मलमपट्टी केली असती, पण हे फक्त "मा निषाद!" म्हणून काव्यच करत बसले, आणि संस्कृतात वगैरे लिहिल्यामुळे त्यांचा आदिकवी म्हणून गौरव झाला, तो वेगळाच. काय नशीब असतं एकेकाचं. आम्ही जन्मल्यापासून पांढऱ्यावर काळं खरडतोय, खरडतोय, तरी ब्लॉगवर कॉमेंटाही येणं दुरापास्त. आणि इथे, दोन शब्द म्हटले, की झाले कवी!

पण ते ही मान्य. खरा लोचा झाला, तो पुढेच आहे.

सुरुवातीला कवींना राजाश्रय असे. म्हणजे खाऊन पिऊन (कदाचित जास्त पिऊन सुद्धा), कविमंडळी खूष असत. पण स्वतःला विकणं इतकं सोपं नसतं! त्यासाठी स्वतःचं व्यक्तिमत्व तसं घडवावं लागतं, मी, माझे विचार, माझ्या भावना, माझे अनुभव, सगळंच किती मनोरंजक आहे, हे दाखवावं लागतं. आणि दाखवता येण्यासाठी तसा तेवढा स्वतःवर विश्वासही असावा लागतो. किंबहुना, स्वतः सोडून दुसरा तिसरा कोणाचाही विचार करून चालतच नाही.
किंवा, दुसऱ्यांचं निरीक्षण केलंच, तरी ते "आपल्याच" रचनेतून मांडायचं, त्यासाठी त्यांच्या गोष्टी वापरायच्या.

हे असं आत्ममग्न जगणं कवींनी सुरु केलं, तिथेच देकार्त सारख्याला, "I think, therefore I am" चा साक्षात्कार झाला असावा. मी म्हणजेच माझं मन. माझं मन, माझे विचार म्हणजेच मी.
म्हणजे काय, की एकवेळ स्वत:ची मुलं नसली, तरी मी आई हे बिरूद लेऊ शकते, घर सांभाळत असले, तर "होममेकर" हे "पद" भूषवू शकते, पण मी विचारच करत नसले, तर मी अस्तित्वात आहे की नाही, हाच प्रश्न पडावा!

आणि लोचा असा, कि फक्त कवी लोक असले "विचार" करत असत, तोवर ठीक होतं. विचार करणं, हि त्यांची व्यावसायिक गरज म्हणा ना! पण इतर लोहार, कुंभार, भाजीवाले, सैनिक नि गिरणीवाले... सगळ्यांनाच हे एकदम हॉट म्हणजे एकदम हॉट प्रोफेशन वाटू लागलं ना! दुकान टाकायला एक पेन नि कागद, आणि कामाच्या नावावर नवनवीन प्रेमप्रकरणे, देशाटने, लोकसंग्रह....... शिवाय प्रसिद्धी, आब आणि किताब, कोणाला आवडणार नाही???

आणि सगळेच कवी, तिथे वाचक विरळा! लेखन, प्रकाशन आधीच इतकं सोपं होतं, ते ब्लॉगद्वारे किंवा जालावर आणखीनच सोपं झालं, आणि काही वेबसाईटतर, हजारो लोकांनी, वेगवेगळ्या मुद्द्यांवर, हरप्रकारे चर्चा करावी, ह्यासाठीच बनलेल्या आहेत. स्वत:च्या विचारांना, आणि मतांना, एवढं महत्व येऊ शकतं, हे फक्त आताच्याच पिढीने पाहिलंय.

त्यामुळे किनई, ऐकून घेण्याची कला मागेच पडलीये, आणि समंजसपणा किंवा सगळ्यांशी जुळवून घेणे हे काय असतं? आजकाल ह्या कलेला कुणी विचारतच नाही, तिची उपासना करणे तर दूरच. बघावे तिथे मी मी मी चा घोष! आत्मकेंद्रितेची फ़ॅशन.

हेच बघा ना, मी तरी दुसरं काय करतेय? घेतला लॅपटॉप कि लागले बडवायला :) म्हणूनच..... आता स्वतःलाच सल्ले द्यायची वेळ आलीये. प्रत्येकाने स्वतःला (आणि केवळ स्वतःलाच) सल्ले द्यावे, ही काळाची खरी गरज आहे. आणि अगदी कविता वगैरे लेखनाचं मनावर घेतलंच असेल, तर आधी सहृदयतेचं वाचनपुण्य गोळा करायला हवंय.

पोकीमॉन शोधतात, तसे मीरा,सूर, कबिरा शोधायला हवे आहेत. त्यांच्या मागे वेडं व्हायला हवंय. तसं वेड लागल्याशिवाय......कवीपण अंगी येत नसतं महाराजा.










3/15/15

पाए आणि वाघ: Happy Pi Day

एक होता पाए. (मराठीत "पाय" आणि "पाए" च्या उच्चारात फारसा फरक नाही, पण आशयदृष्ट्या पाय म्हटला की आपला पायच डोक्यात प्रथम येतो, म्हणून "पाए" असा वापर करते आहे.) त्याचं नाव खरंतर "पिसीन मॉलिटोर पटेल" (Piscine Molitor Patel) होतं, पण शाळेतलं चिडवणं थांबावं, म्हणून त्याने "पाए" धारण केलं, ते कायमचं. नावात काय असतं? असं शेक्स्पियर ने लाख म्हणून ठेवलं असलं, तरी "पाए" (Pi) इतकं "भारी" (भारी= मस्त असा पुणेरी अर्थ अभिप्रेत नसून भारी= loaded/आशयघन असा आहे) नाव शोधूनही सापडलं नसतं!

ह्या पाए चे वडील एक प्राणीसंग्रहालय चालवत असतात. तिथे "रिचर्ड पार्कर" नावाचा एक वाघ दाखल होतो. त्या वाघाचं नाव रिचर्ड पार्कर कसं पडलं, ह्याची पण पाएच्या नावाइतकीच मजेदार कहाणी आहे, 
Yann Martel लिखित, Life of Pi.  'कहाणी' वरून आठवलं, पुराणातल्या कथा/कहाण्यांप्रमाणेच ही कादंबरी खऱ्या-खोट्याच्या सीमारेषेवर सहज प्रवास करते. म्हटले तर अकल्पनीय/अतर्क्य अशा घटनांना पाएच्या अतिशय वस्तुनिष्ठ वर्णनामुळे वास्तवाची किनार येते, म्हणूनच वाचकांनाही ती कहाणी multidimensional (बहुआयामी) आणि विचारप्रवर्तक वाटू लागते.


तर रिचर्ड पार्कर आल्यावर छोट्या पाएला त्याचे आकर्षण वाटले, आणि तो पिंजऱ्याजवळ जाऊन आला, हे कळल्यावर त्याच्या वडिलांनी, काहीशा अघोरी पद्धतीनेच, पाएला श्वापदांचा हिंस्त्रपणा दाखवून कायमचा "धडा" दिला. पण दुसरीकडे, पॉण्डिचेरीच्या बहुढंगी वातावरणात पाए वेगवेगळ्या धर्मांचेही धडे घेत होता, आणि सगळ्याच धर्मांमधे भरपूर साम्यस्थळं असूनही लोक आपापल्या जन्मजात धर्माला चिकटून का बसतात, हे कोडं उलगडायच्या आतच, वडिलांनी बोटीवरून कॅनडाला प्रयाण करायचं ठरवलं, अगदी पोरं-बाळं-प्राणी-पक्षी ह्या सगळ्या गोतावळ्यासकट. त्या जहाजाचं, रिचर्ड पार्करचं, नि पाएचं पुढे काय झालं, हीच कथावास्तू आहे.


बोटीवरचे प्राणी म्हटल्यावर नोआहच्या गोष्टीची आठवण झाली? पाएला त्याच्या मामाने उत्तम पोहणे शिकवले, आणि त्याचे नावही एका तरणतलावावरून ठेवले, पुढे पोहता येत होते, म्हणूनच तो वाचला, त्यावरून, "भवसागर तरण्याची" आठवण झाली? अशी एक दोनच नव्हे, तर शेकडो उदाहरणं पुस्तकात सापडतील, कि परस्परसंबंधांच्या उभ्या-आडव्या जाळ्यातून, वरकरणी साध्या उदाहरणातून लेखकाने जीवनाचे तत्वज्ञानच सांगितले आहे.

माणूस आणि पशूत काय फरक असतो? (हल्ली फारसा जाणवत नसला तरी) प्राण्यांना केवळ एक शरीर"धर्म"च ठाऊक असतो. जगण्यासाठी मारणे, खाणे, प्रजोत्पादन आणि संगोपन, एवढंच जीवनाचं श्रेय प्राण्यांना पुरतं. पण माणसाला त्याहून अधिक कशाचीतरी तहान असते. मारणे अथवा मरणे, ह्यापलिकडचा जीवनाचा मतितार्थ शोधायची ओढच माणसाला धर्माकडे, आणि संस्कृतीकडे घेऊन गेली. धर्माच्या प्रयोजनाची चर्चा करतांना Life of Pi  सारखी पुस्तकं नक्कीच समाविष्ट करायला हवीत, कारण पाए, आणि रिचर्ड पार्करमधील नात्याचा प्रवास हा माणसातल्या पशुत्वाचा, आणि त्याविरोधात उभ्या ठाकलेल्या माणूसपणाचा प्रवास आहे, असं मला वाटतं.

म्हटलं तर पाए म्हणजे केवळ ३.१४, असे माझ्या वर्षानुवर्षे गणिताचा गंज लागलेल्या बुद्धीला आठवलं. पण विकिपिडीया वर शोधायला गेलात, तर पाए ह्या अंकाचं असाधारण महत्त्व लक्षात येतं. पाए नावाची संकल्पना माणसाने जन्माला घातली, तीच मुळी एक "नातं" स्पष्ट करून सांगण्यासाठी. जीवनातल्या अनेक चढ-उतारांत पाए मात्र "constant" आहे, आणि तरीही, त्याचं खरं मूल्य कळण्याला कितीतरी शतके जावी लागली, किंबहुना त्याचं खरं मूल्य हे अप्राप्यच आहे. Life of Pi हे शीर्षक त्या अर्थाने, "पाए ह्या संकल्पनेचा जीवनपट/विकास" म्हणूनही समर्पकच असेल. 
पशूंप्रमाणे निरूद्देश जगण्याला कंटाळलेल्या माणसाला आस होती, नव्हे, त्याचा तो विश्वास होता, कि जगाची निर्मिती, त्यात मानवाची उत्क्रांती हा निव्व्ळ योगायोग नसावाच. म्हणूनच तो भवतालच्या सगळ्या घटनांमधले, वस्तूंमधले परस्परसंबंध शोधू लागतो. हा परस्परसंबंध सांगणाऱ्या दोन गोष्टी: पाए, आणि धर्म. माणसाला जीवनात पशूत्वाच्या पुढे जाणे जो शिकवतो, तो धर्म. 

आज धर्माचा व्यापार, त्याची भ्रष्टता, मूळ उद्दिष्टे हरवलेलं स्वरूपच आपल्याला दिसतं, पण त्याचा विकास माणसाच्या जीवनातली एक पोकळी भरून काढण्यासाठी झाला. Karen Armstrong नावाच्या विदुषीचे धर्माच्या विकास, आणि उद्दिष्टांवरचे भाष्य फार आवडले. (तिच्या लेखाचा अनुवाद करायची जबरदस्त इच्छा आहे. ते असो.) 

पाएच्या आणि वाघाच्या "कहाणीत" माणसाची आदिकालापासूनची कहाणी कुणाला सापडेल, तर कुणाला "आपण सारे अर्जुन" प्रमाणे जगण्याचे तत्वज्ञान सापडेल. मुळात पाएचा वाघ कुणालाही दिसला नाही. पण तसा तर, देव तरी कुणाला दिसलाय? तरीही, प्रत्येकाच्या अंतर्मनातल्या देवाने (अथवा वाघाने) त्याला/तिला जगण्याचं बळ, जगण्याची उमेद, जगण्याची दिशाच नव्हे, तर जिगीषाही दिलीये, हे मात्र खरं. म्हणूनच  ही पाएची कहाणी पण त्या गणिती Pi च्या कहाणी इतकीच महत्वाची आहे. 













5/8/14

तिसरा डोळा!

 दोन डोळ्यांनी बघण्याची एकच दृष्टी आपल्याला मिळालेली असते, पण त्या दृष्टीचा केवळ "बघणे" ह्या एकाच क्रियेसाठी उपयोग करेल तर तो मानव कसला? दृष्टीतून आधी अनुभूती, मग पुढे, "मा निषाद!" प्रमाणे अनुभूतीची अभिव्यक्ती, आणि अभिव्यक्तीचे वाचन करणाऱ्याला त्यातून स्थलकाल-अबाधित  एक व्यक्तिगत अनुभव मिळणे, हे सर्व एका दृष्टीनेच निर्माण झालेली साखळी आहे. 

वाचनाचा हा अनुभव प्रत्येकाला असतो, पण आजच्या माहितीयुगात त्या पलिकडे जाऊन वाचनाकडे कुणी बघत नाही. विशेषत:, एका पुस्तकाने मिळालेल्या "दृष्टीतून" दुसरे पुस्तक, वा निव्वळ आपले रोजचे जीवन तपासून बघण्यातला "थरार" अक्षरश: अनुपम असतो. माहिती, किंवा मनोरंजन, ह्या दोन प्राथमिक उद्देशांच्या पलिकडे घेऊन जाणारे वाचन म्हणजे काय असतं? ते ह्या "तिसऱ्या नेत्राच्या" दृष्टीतून बघितल्यावर कळतं!

काही दिवसांपूर्वी मी योगायोगाने सलग ३ पुस्तकं वाचली: 
Wave 

त्यातिल "A Game of Thrones" सध्या फारच लोकप्रिय झालंय. महाभारतापेक्षाही मोठा पट मांडून लेखकाने वाचकांनाच नव्हे, तर कदाचित समीक्षकांनाही गोंधळात टाकून चांगले अभिप्राय मिळवले असावेत. कुणाला "महाभारत" तर कुणाला "कहानी घर घर की" वा तत्सम "अनंत" मालिकांप्रमाणे वाटू शकेलशा ह्या पुस्तकाचे आजवर ६ भाग (प्रत्येकी साधारण ७०० पानी) आलेत, नि लेखक महर्षी व्यासांइतका वयोवृद्ध असल्यामुळे, शेवटचा भाग न लिहिताच "प्रयाण" न करो, अशी त्याचे कट्टर वाचक प्रार्थना करताहेत. एकाच शब्दात वर्णन करायचं झालं, तर शुद्ध "मसाला"! "शोले" ला लाजवतील अशी रसभरीत पात्रं, नि वर्णनं! "२४" ला लाजवतील असे थरारक प्रसंग, आणि Lord of the Rings समजत नसेल तर आमच्या वाटेला जाऊच नका, अशी देशोदेशीची मिसळ. Francis Bacon ने म्हटल्याप्रमाणे, काही पुस्तकं चमचमीत लागतात, ती अशी. 

आजकाल अशीच पुस्तकं, मालिका, सिनेमे खपतात. प्रत्येक "प्रकरणाच्या" शेवटी एक रहस्य. रोजचा एपिसोड संपतांना पुढची झलक, पात्रं वाईटाची अचानक चांगली होणे, किंवा अपेक्षितपणे अनपेक्षित धक्के! मी पण बघते, "डोकं बाजूला ठेवून" बघते असं मात्र म्हणता येत नाही, कारण कधीकधी ह्या "मनोरंजनाच्या" बाजारात आपणही अजून मिरची, अजून थोडी आंबट चटणी, अजून थोडं आलं लसूण शोधायला आपसूकच निघतो. चर्चा करतो, खूप लोकांना तेच चटपटीत आवडलेलं असतं, म्हणून त्यांच्यात मिसळतोही. 

पण तसल्या वाचनाने ना "दृष्टी" येते, ना आपल्या आयुष्यात कुठलाही फरक पडतो. फरक पडतो, तो "Wave" सारख्या पुस्तकाने. सोनिया देरानियागालाची कथा "त्सुनामी" मधे, भूकंपात, बॉम्बस्फोटात सर्वस्व हरवलेल्या कुणाचीही असू शकेल, पण तिने ज्या धैर्याने असीम दु:खाचे पदर उलगडून दाखवले आहेत, त्याला तोड नाही. त्सुनामीने तिच्या पूर्ण कुटुंबाचा एका क्षणात घास घेतला. दोन चिमुरडी मुलं, नवराच नव्हे, तर आई-बाप आणि मैत्रही. हीच एकटी "वाचली", का, कशी, कशाला? ह्या प्रश्नांची उत्तरं कधीच मिळणार नाहीत. जन्मभराची वेदना घेऊन जगायची सवय होऊ शकते, पण त्या कधीही थांबत मात्र नाहीत, हेच सत्य सोनियाने कुठलाही मुलामा न लावता सांगितले आहे. तिच्या पुस्तकाने हेलावून जाणार नाही, असं कोण असेल? 

ग्रीक शोकांतिकांबद्द्ल ॲरिस्टॉटलने म्हटलेले आठवले, "शोकांतिकेचा, किंवा शोकनाट्याचा अनुभव घेतल्यावर माणसाला एकाच वेळी स्वत:च्या क्षुद्रत्वाची जाणिव होते, व त्याच वेळी मनोमन 'बरं झालं, हे दु:खी भागधेय माझ्या वाट्याला आलं नाही!' अशी सुटकेचीही भावना होऊन समाधान मिळतं." Wave वाचल्यावर माझ्याही क्षुद्र "भावनांचा निचरा" झाला असेल कदाचित, पण त्याही पुढे जाऊन, कुठेतरी वाचनाच्या "तिसऱ्या उद्देशाची" जाणीव झाली: मनाचे उन्नयन. 
जीवनाची क्षणभंगूरता, पण त्याच वेळी, सोनियाने आपल्या कुटुंबाच्या आठवणींना स्वीकारून, त्या आठवणींमधलं प्रेम, सौंदर्य, जपण्याचा त्या पुस्तकातून केलेला प्रयत्न, आणि तो वाचतांना मला मिळालेल्या अनुभवातून माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन, काही प्रमाणात नक्कीच बदलला. शेकडो पुस्तकं वाचली, तरी काही जन्मभर स्मरणात राहतात, ती ह्याच मुळे. त्या पुस्तकाचा अंतर्यामी अनुभव आपण कधीच विसरू शकत नाही. 

दोन अत्यंत टोकाची पुस्तकं वाचली खरी, पण Fahrenheit 451 च्या दृष्टीतून बघतांना मात्र नवीनच साक्षात्कार होत गेले. भविष्यकाळात (जो आताचा वर्तमान आहे), पुस्तकं जाळण्याचे सरकारी काम करणाऱ्या एका fireman ची ही कथा. शोकांतिका अशी, की कुण्या जुलमी राज्यकर्त्याने पुस्तकांची बंदी ह्या समाजावर लादलेली नाही, तर ती समाजानेच स्वत:वर ओढवून घेतलिये, कारण त्यांना हळूहळू पुस्तकांची गरजच वाटेनाशी झालिये. घराच्या चारही भिंतींवर टी.व्ही. प्रसारणातून तुम्हीच मालिकेत सहभागी होऊ शकता. मालिका रसभरीत. मनोरंजक. दिवसभर काम, आणि थोडं मनोरंजन, ह्या पलिकडे बघायला कुणालाच वेळ नाही.  

७०० पानांची कादंबरी मग १०० पानांची झाली, तिची मग १० पानी कथा झाली, (आणि होत होत १४० अक्षरांची tweet झाली).  इतकंच काय, गाड्या दिवसेंदिवस अधिकाधिक वेगाने धावू लागल्यावर, रस्त्यांवरचे फलक वाचणेपण कठीण पडायला लागले, त्यामुळे तेही मोठमोठ्या पण कमीतकमी अक्षरांत लिहण्याची प्रथा पडली. 
उगीच नको ते वाचून नको ते विचार, आणि विचारातून व्यक्तिस्वातंत्र्य, स्वातंत्र्याचा परिणाम जबाबदारी! जबाबदारी हवीच कुणाला? सरकार तर नागरिकांना सर्वोच्च सुखासीन जीवन देण्यास करबद्धच असतं, मग एकेकाळी आग विझवून पुस्तकं वाचवणारे firefighters, आता घरांवर छापे घालून पुस्तके जाळणारे झाले. 

ह्या भिंगातून मला Wave आणि Game of Thrones चे "खरे" रंग दिसायला लागले. खरंतर Wave असो वा GoT, दोन्ही जीवनाला आरसा दाखवतात, असेही कोणी म्हणेल. वाचनच काय, कुठल्याही उपक्रमात, "उद्देश" महत्त्वाचा तर असतोच, पण खरोखरी सकस वाचनाने कुठेतरी सहानुभूती जागृत होते. एक विचार जागा होतो, एक जाण येते. ही दृष्टी मला Fahrenheit 451 ने दिली. "Fahrenheit" च्या विश्वात सगळेच Game of Thrones वाचणारे, जगणारे. आणि ते विश्व भयानक आहे. 

ही त्सुनामी लाट हळूहळू येते आहे. त्यात माझे जिवलग: ॲरिस्टॉटल, फ्रान्सिस बेकन, शेक्सपियरच नव्हे, तर कुसुमाग्रज, शांताबाई शेळके, ग्रेस, दुर्गाबाई नि गौरी देशपांडेही वाहून जाणारेत, असा भास झाला, नि हादरले. अजून "दृष्टी" यायला हवीये.






8/6/13

स्कार्लेट ओ’हारा सिनिकल का झाली नाही?

स्कार्लेट ओ’हारा चं झालं, तसंच आपलंही होईल असं कधी वाटलं नव्हतं. पण असं असूनही, आपण सिनिकल झालो. आपल्यात कडवटपणा आलाच. तिच्यात मात्र आला नाही. असं का?

स्कार्लेट बिचारी, तिला लहानपणापासून पढवून पढवून, तिच्या मनावर बिंबवलेलं होतं, की सोज्वळ मुलींनी कसं, चारचौघात चिमणीसारखं खावं, बाहुलीसारखं मढावं, नाचावं- गावं, पण शेवटी पुरूषांसाठी जगावं. ह्या नाटकाचा तिला थोडाफार वैताग येत असे, पण त्यात फारसं काही गैर मात्र वाटत नव्हतंच, कारण शेवटी हे खुळचट पोरगे तिच्याच पायांशी आपलं हृदय ठेवणार, आणि त्यांचा ती खुशाल चक्काचूर करीत, फक्त मानाचे मुजरे झेलीत, "तिच्या" ॲश्लीच्या हातात हात देणार.

पैसा? तो काय असतो? आजीबरोबर कीर्तन ऐकतांना तर "भक्ती", "त्याग", "निर्लोभीपणा" - असल्याच गुणांचा ध्यास घ्यायचा असतो हे कळलं होतं. "स्वत:ला ओळखा", म्हणजेच, स्वत:च्या कुवती/आवडीनुसार करीयर करा, केवळ पैशाच्या मागे लागून भलत्याच मार्गाला (चुकीच्या करीयरला) जाऊ नका, असं ही होतं.
पोटापुरता पैसा "असणं", एवढंच फक्त त्याचं महत्त्व होतं. कुणीतरी, कुठेतरी पडद्याआड, पैसे कमावतं, नि जमवतं (आई-बाबा). पैसे "खर्च" करू देण्याइतके लाड त्या काळात कोणत्याच घरात होत नसतील...

स्कार्लेटलाही हे येवढंच समोर दिसत होतं: कापूस पिकतोय, घर भरतंय, गडी राबताहेत, मेजवान्या झडताहेत. "सिव्हिल वॉर" सारख्या कंटाळवाण्या विषयावर चर्चा करायला तिला अजिबात आवडत नसे. तसंही, युद्धाने कधी कुणाचं भलं झालंय? आणि बायकांचा तो प्रांतच नसतो की! गणित वगैरे शिकून, पुस्तके वाचून, फार डोकं चालवलं, तर उगीच नाचक्की व्हायची!
आपण हुशार आहोत, असा थोडा जरी संशय आला, तर सगळे प्रेमवीर पापणी मिटायच्या आत गायब व्हायचे!

पण.......स्कार्लेटचं जग Civil War ने बदललं, आपल्याला तर तेवढीही सबब उरली नाही. आपलं जग बदलतच होतं, बदलंलच होतं, आपणच झापडं लावून चालत होतो... पण तसं म्हणावं, तर "गाणं म्हणतेस का? रांगोळी काढतेस का? कुंकू लावतेस का? स्वयंपाकाची आवड आहे का?" ह्याच गोष्टी लग्नाच्या बाजारात आपल्यालाही विचारल्या होत्या!

ह्या हिशोबात मग १५- २० वर्ष जोडा. आपण, नोकरीच्या शोधात, नि आपली किंमत आता अचानक पैशात कशी मोजली जाते- ह्या कोड्यात! अर्थात् , स्कार्लेट सारखी बिकट परिस्थिती देवदयेने आपल्यावर आलेली नाही, आणि खरं म्हणजे आजूबाजूची माणसंही इतकी काही वाईट नाहीत. पण आयुष्याचा आढावा घेतांना, बेरीज- वजाबाकी फक्त आकड्यांतच करायची असते का? तशी ती करावी लागते का? हे स्वत:लाच विचारतांना, आधी कधीही न घातलेल्या, न बसणाऱ्या चष्म्यातून जग धूसर दिसावं, तसं आपलं डोकं गांगरलेलं.

स्कार्लेट मात्र, पदर बांधून मनाशी पक्का निश्चय करीत, त्या जगप्रसिद्ध ओळी बोलून गेली , "इन्शाल्लाह, मै जी-जान लगा दूंगी, लेकिन भूखी-कंगाल नही रहूंगी!" आणि नीतीमूल्यांचा फारसा विचार न करता, ते बोल तिने खरेही करून दाखविले.

आपण मात्र, नेहमीप्रमाणेच, अजूनही "रोमँटिकली सिनिकल". इतरांच्या तराजून स्वत:ला तोलत फालतू प्रश्न विचारत बसलेलो, की "स्कार्लेट सिनिकल का झाली नाही?" कशी होईल? तिच्या काळी नाटकातला "नाटकीपणा" ही शाबुत होता, आणि खऱ्या प्रेमातला खरेपणाही!


6/27/13

छोट्यांचा देव

प्रेमात, आणि आयुष्यात, कधीकधी छोट्या गोष्टींनी खूप फरक पडतो म्हणतात.
कोणीतरी एक छोटंसं स्वत:च्या बागेतलं म्हणून दिलेलं मोगऱ्याचं फूल.
अगदी आत्ता, ह्या क्षणाला  जोरात कुणाची आठवण आली असेल, आणि नेमका तेव्हाच त्याचा फोन यावा, ह्या योगायोगाला "telepathy" च मानून झालेला आनंद.
छोटेसेच चार आधाराचे शब्द, एका संध्याकाळी सहज गुणगुणलेल्या गाण्याची लकेर.
झाडावर सरसर अल्लद चढणाऱ्या खारूताईची वाटलेली गंमत.

ह्या गोष्टींचा, आणि क्षणांचा, जीव जितका छोटा, तितके ते अधिक लाडके होत जातात  नं? हृदयात खोलवर रूतून बसतात.
छोट्याच गोष्टी असतात त्या. आणि त्यांना जिवाशी घट्ट धरून झाकोळल्या जीवनप्रवासात एकाकी चालणारी माणसंही छोटीच असतात. त्यांचा देव छोटासाच, नि नशीब तर त्याहून छोटं.

मोठ्ठ्या जगात मोठ्ठ्या जगन्नाथांच्या रथापुढे शेकडो चिरडले जातात, नि काही तर चिरडून घेण्यात स्वर्गसूख मानतात. मोठ्ठ्यांचा हा देव पैशात लोळतो, राजकारण खेळतो, दंगलीत अख्खी शहरं जाळतो. तो नियम आणि मर्यादा आखून देतो. न पाळणाऱ्यांची आयुष्यं एका फुंकरीत उध्वस्त करतो.

मग प्रेमाचे चार छोटे क्षण, दोन मायेचे शब्द, नि त्या शब्दांच्या आठवणी जिवाशी घट्ट धरून जीवनप्रवास करणाऱ्या छोट्या दोन मुलांचा विचार त्या मोठ्ठ्या देवाच्या स्वप्नात तरी का यावा? "The God of Small Things" - अरुंधती रॉयच्या ह्या पुस्तकाने छोट्या क्षणांना जपणाऱ्या दोन छोट्या मुलांची जीवघेणी व्याकुळता समर्थपणे मांडली आहे. एस्था आणि राहेल ही जुळी भावंडं. त्यांच्या "अम्मू"च्या प्रेमकहाणीची शोकांतिका फक्त तिथेच न थांबता ह्या दोन निष्पाप बछड्यांची आयुष्यंही उध्वस्त करून जाते.

"कुणी कुणावर प्रेम करावं? कसं? नि किती?" "Who should be loved? And how? And how much?" ह्याचे नियम मोडण्याची फार मोठी शिक्षा त्यांना मिळते. अम्मू, एस्था, राहेल, अम्मूचा प्रियकर वेलूथा, आणि निव्व्ळ योगायोगाने तिथे अवतरलेल्या सोफी मॉलला.
नेमकी एस्थाला छोटी बोट सापडलेली, नेमकी सोफी मॉल इंग्लंडमधून तेव्हाच फिरायला म्हणून आलेली, तिच्याबरोबर बोटीतून पळून जायचा "पोरखेळ" त्या सगळ्यांनाच इतका महागात पडेल असं कुणालाच वाटलं नसतं. नेमकी तीच बोट अम्मू आणि वेलूथामधिल दुवा झाली, आणि "स्पृश्य-अस्पृश्यतेचे" भक्कम तट कोसळून तिथे कोवळ्या प्रेमाचा जन्म झाला.

त्या प्रेमाला भवितव्य नाही, हे मनोमनी कळूनसुद्धा दोघं त्यात "वाहवत" गेली. अम्मूच्या भावाने "गोऱ्या" इंग्लिश स्त्रीशी घरच्यांना न सांगता लग्न केलं, तरी त्या मडमेचं कौतुकाच्या महापूरात स्वागत करणाऱ्या कुटुंबाने, अम्मूच्या प्रेमाला मात्र लांछनास्पद ठरवून ठेचून काढलं.

"Never before has a story been told as if it were the only one". अशा शब्दात गौरविलेली ही कादंबरी, खरोखरच समाजातल्या चिरंतन झगड्याचा, आणि शोकांतिकेचा आरसा आहे. सत्तांध तमापुढे हळूच पेटलेली ठिणगी कधी ज्वलंत वणवा लावो न लावो, तिच्या विझण्यात समाजातल्या सगळ्या सुंदर, छोट्या गोष्टींचा पराभव असतो, आणि तिच्या विझण्यानंतर काळोख अधिकच काळा भासत असतो.

छोट्या निरागस आनंदांचा, प्रेमाचा, स्वप्नांचा देव अशा ठिणग्या लावत स्वैर भटकतो. ज्याच्या असण्या-नसण्याने कुणालाच फारसा फरक पडत नाही, त्याला विनाशाची भीती कुठली? It's a dangerous thing to have nothing to lose. When "Nothing matters much. Nothing much matters."
तेव्हा तो देव मग खदाखदा हसतो. केवळ स्पृश्यास्पृश्यतेवरून  वादळ उठवणाऱ्यांच्या मुस्कटात मारत बहिण-भावाच्या प्रेमाचं एक विलक्षण नाट्य घडवून आणतो. पुन्हा एकवार नियम मोडले जातात. Who should be loved, and how, and how much.











5/16/13

पुस्तक वाचतांनाचा तू

पांढऱ्या शुभ्र मोकळ्या फुसफुशीत भातावर दाणेदार मुगाच्या दालफ्रायचा पिवळा रंग, आणि त्यावर खपून केलेली कुर्कुरीत हिरवी भेंडी वाढली, तरी तुझं लक्षच गेलेलं नव्हतं.
ते बघून माझा थोडा विरस झाला, पण छान जेवण काय मी अन्नपूर्णा द्रौपदीप्रमाणे फक्त दुसऱ्यांसाठीच केलेलं नव्हतं, म्हणून मी त्या चवींमधे गुंग झाले.

हल्ली हे असंच होतंय पण. बोलायला काही फारसं नसतंच. त्यामुळे तू तुझ्या विश्वात नि मी माझ्या. पण तरीही, हे लक्ष नसणं वेगळंच होतं. खाण्याच्या आवडीपलिकडे काहीतरी तुझ्या डोक्यात शिजत असलेलं तुझ्या हातातल्या पुस्तकातून मला दिसत होतं. एरवी जेवतांना आपण ए.आर रहमान ऐकतो, किंवा कधी पावसाळी हवा असेल तर किशोरकुमार, तर आज हे कोण पियानोवर सूर नाचवतंय?

"Keith Jarret." फक्त येवढंच बोलून तू पुन्हा पुस्तकात डोकं खुपसलंस.
आता मला जरा वैतागच यायला लागलेला होता. तो अगस्त्य सेन तुझ्या ऑलरेडी तिरकस डोक्यात थैमान घालतोय म्हणजे साध्या गोष्टींवर तुझे विचार भन्नाट वेगाने वळत-वळत पळत असणार आणि त्या वेगात माझ्या शुद्ध मराठी भाषेचा आणि त्या क्षणी मला पडलेल्या प्रश्नांचा भोंगा तुला अजिबात ऐकू येत नसणार म्हणजे मला एकदम तुझ्यामागून त्या पुस्तकात शिरावं आणि तुला हात धरून खेचून बाहेर काढावंस वाटायला लागलं होतं. किंवा त्या पुस्तकात तुझ्याच चाललेल्या पानात उडी मारावंसं.

मग मी आशाळभूतपणे, "मी तुला read aloud करून सांगू?" असं विचारलं, पण तुला तो मानसिक बदलही तेव्हा नकोसा होता, मग मी पुन्हा तुझ्या वाचणाऱ्या मख्ख चेहऱ्याकडे बघत बघत आपली दालफ्राय चमच्याने संपवून टाकली. त्या पुस्तकापायी मला जेवणाची चवही आली नाही. शी - stupid.

पण हे असं आजच नाही झालंय. ते पुस्तक तिथे टेबलवर धूळ खात असो वा पोराच्या खेळाच्या बादलीत वेडवाकडं मुडपून पडलं असो, मला काही त्याला हात लावायला फुरसत नव्हती, आणि फुरसत मिळेल तेव्हा त्या येड्या अगस्त्य सेनच्या डोक्यात शिरण्याची काहीएक गरजही वाटत नव्हती.
पण परवा पुन्हा, आपल्याकडे आलेल्या पाहुण्याच्या देखत, जेवता जेवता, गप्पांतूनही तुझी त्या पुस्तकावर थबकणारी नजर बघितली आणि मला कळलं....

कोणे एके काळी मीपण ते अनुभवलं होतं. जरी त्याला आता काळ लोटला तरी, ते विसरता येणं मला शक्य नव्हतं. ते महिनोन्महिने एकाच  पुस्तकात राहणं. त्याच्या जगात वावरणं. त्यातली माणसं खऱ्या पुढे बसलेल्या माणसांपेक्षासुद्धा खरी वाटणं. त्या जगाच्या नजरेने आपल्या जगातल्या विसंगती दिसणं.

हे सगळं सगळं मी अनुभवलं होतं. खूप पूर्वी.
पण आता नाही.
उद्या त्रिकोणी पापुद्रे सुटणाऱ्या खरपूस पराठ्यावर लाल-हिरवा टोमॅटो-मिरचीचा साल्सा आणि वर किसून चीज घालून व्हेज फ्रॅन्की करायचा माझा बेत होत.

कोणी म्हणतं, ह्या फेसबूक-इमेलच्या जमान्यातला माणूस अधिक एकटा आहे. पण आता मी विचार करते- पुस्तकांच्या जगातला माणूस? तो ही तितकाच एकटा नव्हता का?





5/22/11

बिम्मची आई



छोट्या बिम्मच्या छोट्याशा विश्वात तो सोडून २-३ च इतर माणसं असतात: त्याची आई, त्याला सतत छळणारी आणि स्वत:ला अतिशय शहाणी समजणारी त्याची मोठी बहीण बब्बी, आणि नेहमी घराजवळच्या मोकळ्या आवारात भेटणारे आजोबा.
पण बिम्मला त्याशिवाय भरपूर मित्र आहेत, हे ही विसरून चालणार नाही- पिवळाधमक नीनम पक्षी, भलाथोरला राहुल हत्ती, पिट्टू नावाचे कुत्र्याचे पिल्लू, कुरकुरीत ऊन खाऊन रंगीत होणारी गाय, आणि असेच कोणी कोणी.

बिम्म कसा, थोडासा खादाड, थोडासा वांड, पण बराचसा गोंडस मुलगा आहे. तो जी.ए. कुलकर्णींच्या बखरीतच भेटतो, असं जर कोणी म्हणत असेल, तर त्याने जन्मात कधी लहान मुलांशी दोस्ती केली नाहिये, किंवा स्वत:चं मूलपणच त्याला आठवत नाहिये, असं आपण ठामपणे समजू शकतो.

बिम्मची आई मात्र तशी नाहिये. आता बिम्म आणि बब्बीसारख्या दोन पोरांना एकटीने सांभाळणं काय सोपं काम आहे का महाराजा? निरनिराळ्या रंगांचे काचेचे तुकडे, चॉकलेटच्या पाकिटातली रिकामी चांदी, एखादा पेरू, बब्बीवर चुकून प्रेम उतू जात असल्यास तिच्या वेणीत घालायला दोन चुरगळलेली चाफ्याची फुलं, दोरे, दगडापासून चिकट बेलफळापर्यंत काही म्हणजे काही ही बिम्मच्या खिशातून बाहेर पडू शकतं, पण त्याच्या सुपीक डोक्यातून काय काय बाहेर पडेल, त्याची तर कोणी कल्पनाच करू शकणार नाही!

ती काही बोलत नाही, पण मनातून तिला खरं म्हणजे बिम्मच्या वेड्या खेळांत मधून भाग घ्यायला आवडतं.
तिने माजघराची नुकती पुसलेली फरशी बिम्मने आपल्या "चित्रांनी" भरून टाकली, तरी ती फारशी रागावत नाहीच, उलट त्यात बिम्मच्या समोर लाडवांचा डोंगर काढलाय, ते बघून चक्क त्याला एका ऐवजी आज दोन लाडू देते! चुकूनसुद्धा ती मुलांना कधी, "बंद करा रे तुमची ती पोरकट प्रश्न!"- असं म्हणत नाही. उलट, "बिम्म, तू आहेस कामाचा माणूस. तेव्हा तू इथेच थांब. तोवर मी ब्रह्मदेवालाच विचारून येते..." अशी दरवेळी खुसखुशीत उत्तरं देत ती दोन्ही मुलांचं मूलपणच नव्हे, तर त्यांचं उपजत शहाणपणही सांभाळत असते.

त्याचा पतंग "उडणारा" नाही, "उडवणारा" आहे, हे ती समजून घेते. बब्बी नसत्या वेळी "खरं बोलण्याचं" अर्धवट शहाणपण मिरवते, तेव्हा तिला जमीनीवर आणायला आई लगेच, "तू ही काही कमी नाहीस...." अशी बब्बीने घातलेल्या घोटाळ्यांची यादी वाचून दाखवतेच की.

पण बिम्मही तिला कधीकधी त्रास देऊन जीव नकोसा करतो. मग ती,
"तू एक नाही, दहा रूळ इंजिनं असलास, तरी मोठ्या रस्त्यावर शिटी फुंकत गेलास, तर हाडे सैल करून देईन!" अशी त्याला खरपूस धमकी देऊन ठेवते. बरं, रूळ इंजीन नाही, तर छत्री, नाहीतर झाड, असं सारखं वेगवेगळं कायकाय होतांना बिम्म त्यातून वेगवेगळ्या उचापत्या करणार, त्याच्या सतत एक पाऊल पुढे राहणं तिला भागच पडतं. "छत्री आहेस म्हणून पावसात भिजायचं नाही", आणि "झाड असशील तर स्वस्थ एका कोपऱ्यात उभं राहायला" बिम्मला बजावते. पावसात भिजायचं नाही, तर छत्री होण्यात काय मज्जा? शिवाय झाडाला लाडू वगैरे खाता येत नाहीत, आणि एका जागी उभं रहावं लागतं... हे तर त्याला मानवणारं नसतंच. मग शेवटी तो आईला, "मी आता खराखुरा बिम्मच आहे" हे सांगून टाकतो!

पण बिम्मचे बाबा असतात मुंबईला. त्यांना सारखं घरी यायला कुठे जमतंय? त्यामुळे पोरांच्या बालपणाची मजा एकटीने लुटतांना, आणि सोसतांना, ती कधीकधी फार हळवी होऊन जाते. ्परवा बिम्मने बाबांना आपल्या रेघोट्यांच्या लिपीत लिहलेलं पत्र घेऊन तर ती कितीवेळ उदास बसून राहिली. एकेदिवशी मुलं मोठी होऊन घरट्याबाहेर पडतील, आणि त्यांना त्यांच्या वस्तू, खेळ, भांडणं, खऱ्या-खोट्या गोष्टी- कश्शा कश्शाची आठवण राहणार नाही.

पण आपल्यापाशी दररोज जमतोय हा ठेवा, तो हदयात साठवून ठेवतांना तिचं मन भरून येतं, आणि ती पोरांचे खूप खूप पापे घेते. तेव्हा बिम्म आणि बब्बीला कळत नाही, आई आज अशी का वागतेय?







4/23/10

Life is a two way street.

आज हा ही अनुभव घेतला. काय असतं "नोकरी जाणं"? जेव्हा हातातून काहीतरी निसटत असतं, तेव्हा आपल्याला काय काय मिळालंय, ह्याची जाणीव होणं?

लाखो लोक येतात आपापली स्वप्न घेऊन, अमेरिकेत. The American Dream.

१० खोल्यांचा महाल, त्यात संगमरवरी स्विमिंगपूल, दारात ४ गाड्या, घरात ४ मुलं..... सगळं मिळालंच पाहिजे, आणि ते ही भरभरून मिळालं पाहिजे हा अट्टहास म्हणजे खरं अमेरिकन स्वप्न नव्हे. आज जगात अमेरिकेची image काही ही असो, पण स्वत:च्या निष्ठेने आणि कष्टांनी, स्वतंत्रपणे जे हवं ते मिळवता येण्यासाठी जी सामाजिक घडण लागते, ती सगळ्यांना उपलब्ध असणं, हे खरं अमेरिकन स्वप्न आहे.

ह्याचा अर्थ असा नव्हे, की ह्या समाजात असमता नाही. पण जेव्हा अमेरिकेत पहिल्या वसाहती निर्माण झाल्या, तेव्हा जुन्या पश्चिमी राजवटीला पर्याय शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कुणाच्या धर्म, जात, सामाजिक स्तरावरून त्यांच्या कर्तृत्वाची झेप ठरू नये, ह्या विचारातून capitalism आणि individualism चा उदय झाला.

गेली ५ वर्ष मी थोड्या अंशी ते अमेरिकन स्वप्न जगते आहे. आणि आज त्याचं झालेलं दु: स्वप्न ही अनुभवायला मिळालं. इतर कुठल्या देशातल्या विद्यार्थ्यांनी, सहकाऱ्यांनी, मला इतकं सहज समजून घेतलं असतं? इतर कुठल्या देशात माझा रंग नाही, तर केवळ माझे विचार आणि गुणवत्ता हे निकष ठरले असते?

अर्थात, अमेरिकेतही वेगवेगळ्या राज्यांमधे खूप तफावत आहे, व्यक्तिसापेक्षही खूप तफावत आहे. पण माझ्यापुरतं, माझ्या छोट्या कुटुंबापुरतं तरी ते स्वप्न आजवर खरं होतं.

माझी नोकरी गेली. चूक कोणाची? कोण बरोबर? हे विचार आधी मनात आले ही होते. वेगवेगळ्या लोकांना (स्वत:सकट) दोष देऊन झाले ही होते. Rather, सगळंच एकट्या माणसाच्या खांद्यावर टाकून वर मानभावी पणे, "हे अमेरिका आहे- इथे कोणीही नशीब काढू शकतं, आणि तुम्ही नशीब काढलं नाही तर तुमच्यातच काहीतरी कमी आहे!" हे सांगणाऱ्या अमेरिकन स्वप्नाच्या विचारसरणीलाही निकालात काढून झालं.

पण आज जेव्हा ती वेळ आली, तेंव्हा मिटिंगरूम मधे गंभीर चेहऱ्याने मला "वाईट बातमी" सांगणारे लोकच मला स्वत:पेक्षाही जास्त ओशाळलेले वाटले. तेंव्हा मला पुन्हा आरशात लख्ख माझा चेहरा दिसला. कधी माझा वृथा अभिमान दिसला, कधी वैयक्तिक कारणांमुळे हरवलेल्या दिशा दिसल्या, कधी निव्वळ कामाने थकून गेलेला जीवही दिसला.

आणि मला कळलं- Life is a two way street. मनातून जी साद निघते, त्याचे अगदी तस्सेच पडसाद नियतीत/जगात/आसमंतात उठत असतात. आता थांबून पुन्हा मनन करायला हवे...