Showing posts with label भावनांचा निचरा. Show all posts
Showing posts with label भावनांचा निचरा. Show all posts

1/9/21

अनिवासी भारतीयांची कोविड डायरी.......

भारताबाहेर राहणाऱ्या भारतीयांची कोविड आणि लॉकडाऊन मुळे फारच बिकट परिस्थिती झाली. एरवी कर्मप्रिय असलेली अमेरिका २४ तास पळत असते. उरला सुरला वेळ 'देसी' मैत्रांबरोबर पार्ट्या झोडण्यात, झालंच तर थोडे सांस्कृतिक कार्यक्रम, आणि टीव्ही त सहज जातो. वीकेंड कमी पडतात, काही वेळा तर दोन ठिकाणी तोंड दाखवून (हो, तेव्हा आम्ही तोंड दाखवू शकत होतो ;) तिसरीकडे बार्बेक्यू करायला जात होतो. पोरांच्या छंदवर्गांमागे धावत होतो..... थंडीत ६ महिने घरी बसायचे म्हणून उबदार हवेत एखादी सुट्टी टाकली, नाहीतर चक्क राहायला जाण्याइतके घरोब्याचे संबंध होते (अजूनही आहेत, अशी आशा आहे) अशा मित्र मैत्रिणींकडे २-४ दिवस जाऊन येत होतो. मुख्य म्हणजे पोरांची बालपणं एकत्र गेलेली, त्यामुळे त्यांना पाहुण्यांचे येणे जाणे म्हणजे पर्वणीच होती. 

कोविड मुळे सर्वात मोठा परिणाम झालाय तो या पोरांवर. त्यांचे आयुष्य थांबल्यासारखे  झालेय, आणि दुधाची तहान झूमवर भागू शकत नाहीये. दोन असली तर वेगळे प्रश्न, आणि एकच असलं तर वेगळे, पण प्रश्न बिकट झाले. एकूणच अनिवासी लोकांची मुळं नवीन मातीत तितकीशी घट्ट रुजलेली नसतात. पैशासाठी, किंवा जीवनशैलीच्या आकर्षणाने परदेशी राहू पाहणारे अनिवासी लोक एकमेकांना धरून असतात, पण कोविडने चांगलाच दणका देऊन भानावर आणले- कि शेवटी Blood is thicker than water! ज्यांचे अगदी जवळचे कुटुंब इथे स्थायिक आहे, ते कितीही दूर  असले, तरी निदान एखादेवेळी भेटण्याची सोय होती, इतकंच नव्हे, तर निदान झूमवर सतत संपर्क करून मानसिक समाधान करून घेता येत होते. शिवाय घरूनच काम करण्याची सोय असल्यामुळे काही कुटुंबं तर बराच काळ एकमेकांकडे जाऊन राहून आली. 

आमच्या एकुलत्या एक मुलाला हे भाग्य मिळणं शक्य नाही, ह्याची मला इतकी टोचणी लागली, कि त्यापायी मीच निराशेच्या गर्तेत जात होते. कधी अती  प्रेम, तर कधी स्वतःसाठी अजिबात वेळ न देता आल्यामुळे चिडचिड होत होती. अर्थात, मुलासाठी जे जे शक्य होतं ते केलं - त्याच्या बरोबर रोज खेळणे, बाहेर जाणे, पुस्तके वाचणे, चित्रकला गाणे नि काय काय, पण आता मार्चचा डिसेंबर झाला आहे, आणि धीर सुटत चालला आहे. हे इतकं अकल्पनीय एकटेपण आहे की म्हंटलं त्याबद्दल लिहायला तरी हवंच. 

मार्च: घरी असण्याच्या आनंदात गेला. स्प्रिंग ब्रेक मध्ये बिचाऱ्या शिक्षकांनी कशीबशी पुढच्या दोन महिन्यांपुरती आखणी केली. पोहण्याचा क्लास बंद झाला. pottery क्लास बंद झाला. 

एप्रिल-मे : ऑनलाईन शाळेच्या पद्धती शिकण्यात गेला. त्यात ही मजा होती, नावीन्य होतं. बाहेरही फुलं फुलायची थांबली नव्हती, त्यामुळे पार्क मध्ये फक्त घरच्यांबरोबर  फिरणे, सायकल चालवणे हे झाले. पण एरवी बाहेर एकत्र खेळणारी कोणीच मुलं दिसेनाशी झाली. प्रत्येक वेटाळात थोड्या फार फरकाने मुलं बाहेर पडत असतील,  नसतील, पण आमच्या दुर्दैवाने आमचा शेजार फारच 'कट्टर कोविडवादी' निघाला. रोज भेटणारे मित्र पोराला २-४ महिने अक्षरश: दिसेनासे झाले. 

ऑनलाईन शाळा होती, तसेच मग पोरांनी आयपॅड वर एकमेकांच्या 'virtual' विश्वात जाऊन खेळायला सुरुवात केली. ज्या स्क्रीनपासून मुलांना लहानपणापासून दूर ठेवायला धडपडलो, तेच स्क्रीन त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यावश्यक होऊन बसले. ऑनलाईन छंदवर्गात जाणे मुलाला अजिबात आवडत नव्हते, पण आठवड्यातून एकदा ते करायला लावले.

जून-जुलै: लोक किंचित सैलावले होते, पण आमच्या गल्लीत अजूनही भीतीयुक्त वातावरण च होतं....पोरं सायकल चालवण्यापुरती मास्क लावून बाहेर पडत होती, पण बोलणे नाही की खेळणे नाही. त्यांचे त्यांचे काय वेगळे 'गट' होते माहिती नाही, पण शेजार मात्र संपल्या सारखा झाला. मी भारतातल्या लोकांना कायम सांगत असे, की आमच्या गल्लीत पोरं खेळतात, एकमेकांकडे जायला यायला वेळकाळ बघावा लागत नाही, ते पार बंद झालं. तो काळ फार फार कठीण होता... रोज घरी प्रचंड वादविवाद, आक्रस्ताळेपणा (मुख्यतः स्क्रीनवरून) होऊ लागले. मुलगा आता संपूर्णपणे स्क्रीनच्या आहारी गेला होता, पण इलाज चालत नव्हता. निराशेमुळे स्क्रीन, की स्क्रीनमुळे निराशा, हे गणित सुटेनासं झालं होतं. मार्चमध्ये निदान वर्गातल्या पोरांची मैत्री होऊन गेली होती, त्यामुळे त्यांना ऑनलाईन गप्पा मारणे सहज शक्य होते, पण शाळा संपल्यावर त्या मैत्र्या आपोआप संपल्या.....

ऑगस्ट-सप्टेंबर: आता उन्हाळ्याचे फार कमी दिवस राहिले, त्यामुळे पुन्हा पाण्याखाली जायच्या आधी खोल श्वास भरून घ्यावा, तसे आम्ही बीच, थोडं बाहेर आपापलेच फिरून आलो. गणपती, दिवाळीला कोणी येणार जाणार नव्हते, ते ही मला जरा सूक्ष्म बरंच वाटलं- किती काम पडत होतं गेल्या वर्षी, ते आठवून. जवळच्या मित्र मैत्रिणींना भेटायला पार्क मध्ये जात होतो, कधी तिथेच गवतावर दूरदूर बसून पिझ्झा, भेळ खाल्ली. शाळेतली पोरं सगळीच एकमेकांना नवीन (अमेरिकेत दरवर्षी वर्गात वेगवेगळी पोरं असतात, त्यांना मिसळता यावं म्हणून, पण इथे त्याचा उलट परिणाम झाला.) गेल्यावर्षीचे कुठलेच जिवलग मित्र आताच्या वर्गात नव्हते. 

ऑक्टॉबर-नोव्हेंबर: बाहेर थंडी असूनही, मास्क लावून Halloween ला चॉकलेटं लुटणे आणि दिवाळीला फटाके उडवणे झाले. हे गल्लीतल्या जरा पुढाकार घेणाऱ्यांनी (मी व माझी एक शेजारीण) घडवून आणलं कारण मुलांचं दुःख बघवत नव्हतं. आता मुला मध्ये एक बदल जाणवला- एरवी गणपती, दिवाळीत अजिबात रस न घेणाऱ्या मुलाने, रांगोळी काढणे, चकल्या खाणे, फटाके अगदी आवडीने उडवले. छोटे छोटे आनंद गोळा करायला मुलं शिकत होती.....कारण तेच पुरवायचे आहेत, हे कळून चुकलं होतं. 

Hybrid School चा प्रयोग: अर्धी अर्धी पोरं शाळेत दोन दोन दिवस जाऊ लागली, पण शिकवण्याचे तास कमीच राहिले. शाळेत जाऊनही शिक्षिका आणि मुलं -लॅपटॉप वरच अभ्यास करू लागली, कारण उरलेली अर्धी पोरं घरून त्यांच्या क्लास मध्ये हजार होती.... तेवढ्या साठी बसमधून येणे-जाणे,खेळ/व्यायामवर्गात जागेवरच (दुरुन) कवायती करणे काही आवडणे शक्य नव्हते. त्यामुळे मुलाने महिन्याभरातच "मी पूर्णवेळ घरूनच शाळा करीन," असं सांगून टाकलं. 

डिसेम्बर: सांता यावर्षी विशेष प्रेमात होता, मुलांना किती सोसावं लागतंय, म्हणून जास्तच केक, कुकीज आणि खेळणी घेऊन आला. ह्याच दरम्यान मुलाचं गोड खाणं ही वाढलं. साखरेने आनंदाची भावना होते - एरवी लाडू गोड पदार्थांकडे ढुंकूनही ना बघणाऱ्या मुलाचा हात डब्याकडे जाऊ लागला. काही चांगले बदल होते, घरातल्या कामांकडे लक्ष देणे, मदत करणे. ६ महिन्यांपासून वळण लावत होते, ते हळू हळू लागताना दिसत होते. आक्रस्ताळेपणा आटोक्यात आला. 

कधी कधी वाटतं - कोव्हिडच्या आधीपासूनच जी मुलं माणसात रमणारी होती, ज्यांना प्रसंगी कमीपणाची भावना, किंवा बुजरेपणा होता, त्यांना कोविडने फार त्रास सहन करावा लागला. भारतात बाहेरचं वातावरण, आणि सामाजिक बांधिलकीमुळे जे कवच मुलांना सहज मिळतंय, ते अनिवासी मुलांना मिळत नाहीये, आणि त्या अभावाने होणारे खोलवर परिणाम पुसण्यासाठी अनेक वर्ष जावी लागतील. 

=====००००००=======

१. सगळं सोडून भारतात परतावं, असं या दरम्यान अनेकांना वाटलं असेल. कोविडमधून बाहेर आल्यावरही तसंच वाटत राहील का? अर्ध्याहून अधिक आयुष्य इथे गेलेल्या माझ्यासारख्या लोकांना मात्र हाच एकटेपणा काही अंशी आयुष्यभर सोसावा लागणार आहे, हे टळटळीत सत्य कसं पचवायचं हे अजूनही कळत नाहीये. "ह्या अनुभवातून जीवना! तुला जे शिकवायचे ते लवकर शिकव, पण बाहेर काढ!" म्हणायची पाळी आली. 

२. दुसरीकडे, ह्या देशाने आपल्याला काय काय दिलंय, त्याचीही जाणीव आहे. लाखो नोकऱ्या गेल्या, हंगामी मजुरांवर ओढवलेलं संकट, छोट्या घरात राहणाऱ्यांची अवस्था पाहून, 'त्यापेक्षा आपण भाग्यवान आहोत' ही जाणीवही झाली. निदान पदार्थ  साठवणे, घरी सगळी आयुधं सज्ज असणे, बाहेर फिरताना गर्दी नसणे, ह्या मोठ्या जमेच्या बाजू होत्या. 

३. मुलासकट आता आम्ही दोघेही रोज 'कृतज्ञतेची प्रार्थना' म्हणायला लागलो आहोत. आजचा दिवस चांगला घालवण्याचा प्रयत्न करीत आहोत. एकमेकांना जपत आहोत. हे ही नसे थोडके. 

12/15/18

हैरतों के सिलसिले

लग्न झालं तेव्हा मी डोक्याने बरी पण व्यवहारात माठ होते. सासरी गेल्यावर एखाद आठवड्याने सासूबाईंनी "आज तुझ्या हातचं जेवायचं आहे" असं फर्मान सोडल्यावर "पण मी जे करू शकते ते तुम्ही खाऊ शकाल का?" असं मी अत्यंत निर्मळ मानाने विचारलं होतं! वर अजून स्वाभिमानाची फोडणी घालून "मला कोकणस्थी गोड च भाज्या आवडतात!", असं सांगून फ्लॉवरच्या रश्यात आलं लसूण सोडा, साखर घालून सगळ्यांची तोंडं गोड केली होती. आपल्या स्वयंपाकाच्या अज्ञानाबद्दल लाज किंवा वैषम्य वाटून घ्यायचं असतं, हे हि माझ्या गावीही नव्हतं. जे शिकायला हवंय, ते आपण कधी ना कधी शिकू, त्यात काय मोठं? असा निरागस आशावाद नव्हता, तर स्वतःवरचा (कदाचित थोडा अवास्तव) विश्वास होता. अभ्यासातली हुशारी साधारण बाकी ठिकाणीपण वापरता येते, ह्याचा थोडा अनुभवपण गाठीशी होता.  :)

पण मुलगी म्हणून जन्माला आल्यावर आईबापांनी ज्या धक्क्यांपासून दूर ठेवलं होतं, तेच आश्चर्याचे धक्क्यावर धक्के  मला पुढे जगाने जे दिलेयत,त्यांना तोड नाही! लग्न थोडं उशिरा झालं (त्यांच्या मते), म्हणून "लवकर मुलं होऊ द्या!" असा सल्लाही वरातीच्या साडीबरोबरच मिळालेला, पण नवरा जास्त प्रॅक्टिकल निघाला. एका चाकाच्या गाडीपेक्षा दोन चाकाची चांगली, म्हणून त्यानं तरी लग्नानंतर शिकायचं माझं "खूळ" उचलून धरलं.

पण साधी शाळेची म्हंटली तरी पहिली नोकरीच होती ती. मी नवीन होते, देश नवीन, आणि वातावरण तर कधी न पाहिलेलं! १२ तास काम करणाऱ्या मुलींच्या डोक्यात, संध्याकाळी ६ वाजता घरी जातांना आपोआप, अंत:प्रेरणेने, "आज जेवायला काय बनवायचं?" असे विचार येत असतील तर त्या मुलींना "देवीपद" बहाल करायला माझी अजिबात हरकत नाही, पण ती मुलगी मी नव्हते. पहिली नोकरी लागल्यावर थोडी उधळपट्टी करायचा माझा पण प्लॅन होता...
पण... पुढचा धक्का वाट बघत होता. नोकरीच्या पहिल्या वर्षातून बाहेर पडते न पडते तर "आता कशाची वाट? मुलं होऊ देत!" असा घोर मागे लागला. शिवाय, आजूबाजूच्या सगळ्यांनी नंबर लावले होते, मग त्या स्पर्धेत आम्ही उरापोटी धावायला लागलो, त्या मनस्थितीत कसली होतायत पोरं?? इथवर येता येता तिशी आली, नंतर मूल झाल्यावर जरा त्यातल्या आनंदात सैलावले, तर "आता काय आयुष्यभर घरीच बसणारेस का?" -हा धक्का मात्र नवऱ्यानेच दिला (किंवा धक्का मारला, असंही असेल त्याच्या दृष्टीने!)

एकीकडे, ज्या कामाचे पैसे मिळत नाहीत, त्या कामाची कदर केली जात नाही, पण दुसरीकडे, पैशासाठी घराची गैरसोय होऊ न देण्याची शिकवण मिळालेल्या माझ्यासारख्या बायका! " लग्न झाल्यावर हळूहळू धडे मिळत गेले- कि आपलं आयुष्य हे आपल्यासाठी नसतंच मुळी...! घरासाठी, नवऱ्यासाठी, पोरांसाठी- हे झालंच तर मग उरलेलं जमेल तर आपलं म्हणायचं! संसाराच्या वाटेतले एक एक खड्डे बुजवत राहिली ती नदी, मग तिचं केवळ डबकं होऊन राहिलं. ती वाहणार कशी?

फक्त ह्यावेळी आश्चर्य नाही वाटलं, कारण जखम खोल होत होत स्वत्वाला पोखरून पार पोचलेली होती...
हैरतों के सिलसिले सोज़े निहां तक आ गाये!

एकदा वाटलं, आपली गणितंच मुळात चुकली होती... लठ्ठ पगाराच्या घरी बसून करायच्या नोकऱ्या मिळतात, ते क्षेत्र निवडायला हवं होतं. मग वाटलं, क्षेत्राचं काय? यश कधी पाहिलंच नाही, असंही नाही. आणि शेवटी ह्या निष्कर्षाला पोचले, कि थोडं थोडं सगळंच मिळवायचा हट्ट धरून बसलीस बाई, मग थोडं जे हातात आलं, त्याच बरोबर थोडं थोडं सगळंच हातातून सुटणारच ना!

परवा मात्र एका घटस्फोटाची कथा जवळून बघायचं दुर्भाग्य आलं. लठ्ठ पगाराच्या दोन नोकऱ्या, दोन पोरं, मोठं घर, सगळं असणाऱ्या दोन व्यक्तींच्या हातून प्रेम मात्र निसटलं. जगाच्या डोळ्यात आधी खुपलं काय? बाईचा नोकरीचा माज, घराकडे दुर्लक्ष, नवऱ्यावर सत्ता गाजवणं. ते बघून मात्र जाणवलं. गणित चुकलेलं नाहीये, चुकीचंच गणित आहे.

ख़ुद तुम्हे चाके गरेबाँका शऊर आ जाएगा
तुम वहां तक आ तो जाओ, हम जहांतक आ गए!

उठण्या बसण्यापासून बोलण्या घालण्यापर्यंत, मुलींच्या प्रत्येक आचार विचाराची चिरफाड करायला बसलेलं जग. त्याच चौकटींमधून उपजलेल्या माझ्या सासूबाई, आणि माझी घटस्फोटित मैत्रीण, आणि मी. तिचं संपलेलं लग्न म्हणजे स्त्रीवादाचा सर्वात मोठा पराभव आहे. "आपल्याला नक्की काय हवंय? पुरोगामी तर व्हायचं आहे, पण ते कसं व्हायचं, आणि किती झेपेल" हे न कळलेल्या पुरुषाने तो पराभव घडवून आणला आहे. पण मोलाची साथ मात्र बायकांनी स्वतःच दिली, कसल्या कसल्या चौकटींमधून स्वतःचं प्रतिबिंब बघत अस्मिता शोधत बसल्या! माझा माठपणा माझ्या चांगलाच उपयोगी पडला. नाहीतर जितपत भान आज आलंय, तितकंही आलं नसतं.


5/8/14

तिसरा डोळा!

 दोन डोळ्यांनी बघण्याची एकच दृष्टी आपल्याला मिळालेली असते, पण त्या दृष्टीचा केवळ "बघणे" ह्या एकाच क्रियेसाठी उपयोग करेल तर तो मानव कसला? दृष्टीतून आधी अनुभूती, मग पुढे, "मा निषाद!" प्रमाणे अनुभूतीची अभिव्यक्ती, आणि अभिव्यक्तीचे वाचन करणाऱ्याला त्यातून स्थलकाल-अबाधित  एक व्यक्तिगत अनुभव मिळणे, हे सर्व एका दृष्टीनेच निर्माण झालेली साखळी आहे. 

वाचनाचा हा अनुभव प्रत्येकाला असतो, पण आजच्या माहितीयुगात त्या पलिकडे जाऊन वाचनाकडे कुणी बघत नाही. विशेषत:, एका पुस्तकाने मिळालेल्या "दृष्टीतून" दुसरे पुस्तक, वा निव्वळ आपले रोजचे जीवन तपासून बघण्यातला "थरार" अक्षरश: अनुपम असतो. माहिती, किंवा मनोरंजन, ह्या दोन प्राथमिक उद्देशांच्या पलिकडे घेऊन जाणारे वाचन म्हणजे काय असतं? ते ह्या "तिसऱ्या नेत्राच्या" दृष्टीतून बघितल्यावर कळतं!

काही दिवसांपूर्वी मी योगायोगाने सलग ३ पुस्तकं वाचली: 
Wave 

त्यातिल "A Game of Thrones" सध्या फारच लोकप्रिय झालंय. महाभारतापेक्षाही मोठा पट मांडून लेखकाने वाचकांनाच नव्हे, तर कदाचित समीक्षकांनाही गोंधळात टाकून चांगले अभिप्राय मिळवले असावेत. कुणाला "महाभारत" तर कुणाला "कहानी घर घर की" वा तत्सम "अनंत" मालिकांप्रमाणे वाटू शकेलशा ह्या पुस्तकाचे आजवर ६ भाग (प्रत्येकी साधारण ७०० पानी) आलेत, नि लेखक महर्षी व्यासांइतका वयोवृद्ध असल्यामुळे, शेवटचा भाग न लिहिताच "प्रयाण" न करो, अशी त्याचे कट्टर वाचक प्रार्थना करताहेत. एकाच शब्दात वर्णन करायचं झालं, तर शुद्ध "मसाला"! "शोले" ला लाजवतील अशी रसभरीत पात्रं, नि वर्णनं! "२४" ला लाजवतील असे थरारक प्रसंग, आणि Lord of the Rings समजत नसेल तर आमच्या वाटेला जाऊच नका, अशी देशोदेशीची मिसळ. Francis Bacon ने म्हटल्याप्रमाणे, काही पुस्तकं चमचमीत लागतात, ती अशी. 

आजकाल अशीच पुस्तकं, मालिका, सिनेमे खपतात. प्रत्येक "प्रकरणाच्या" शेवटी एक रहस्य. रोजचा एपिसोड संपतांना पुढची झलक, पात्रं वाईटाची अचानक चांगली होणे, किंवा अपेक्षितपणे अनपेक्षित धक्के! मी पण बघते, "डोकं बाजूला ठेवून" बघते असं मात्र म्हणता येत नाही, कारण कधीकधी ह्या "मनोरंजनाच्या" बाजारात आपणही अजून मिरची, अजून थोडी आंबट चटणी, अजून थोडं आलं लसूण शोधायला आपसूकच निघतो. चर्चा करतो, खूप लोकांना तेच चटपटीत आवडलेलं असतं, म्हणून त्यांच्यात मिसळतोही. 

पण तसल्या वाचनाने ना "दृष्टी" येते, ना आपल्या आयुष्यात कुठलाही फरक पडतो. फरक पडतो, तो "Wave" सारख्या पुस्तकाने. सोनिया देरानियागालाची कथा "त्सुनामी" मधे, भूकंपात, बॉम्बस्फोटात सर्वस्व हरवलेल्या कुणाचीही असू शकेल, पण तिने ज्या धैर्याने असीम दु:खाचे पदर उलगडून दाखवले आहेत, त्याला तोड नाही. त्सुनामीने तिच्या पूर्ण कुटुंबाचा एका क्षणात घास घेतला. दोन चिमुरडी मुलं, नवराच नव्हे, तर आई-बाप आणि मैत्रही. हीच एकटी "वाचली", का, कशी, कशाला? ह्या प्रश्नांची उत्तरं कधीच मिळणार नाहीत. जन्मभराची वेदना घेऊन जगायची सवय होऊ शकते, पण त्या कधीही थांबत मात्र नाहीत, हेच सत्य सोनियाने कुठलाही मुलामा न लावता सांगितले आहे. तिच्या पुस्तकाने हेलावून जाणार नाही, असं कोण असेल? 

ग्रीक शोकांतिकांबद्द्ल ॲरिस्टॉटलने म्हटलेले आठवले, "शोकांतिकेचा, किंवा शोकनाट्याचा अनुभव घेतल्यावर माणसाला एकाच वेळी स्वत:च्या क्षुद्रत्वाची जाणिव होते, व त्याच वेळी मनोमन 'बरं झालं, हे दु:खी भागधेय माझ्या वाट्याला आलं नाही!' अशी सुटकेचीही भावना होऊन समाधान मिळतं." Wave वाचल्यावर माझ्याही क्षुद्र "भावनांचा निचरा" झाला असेल कदाचित, पण त्याही पुढे जाऊन, कुठेतरी वाचनाच्या "तिसऱ्या उद्देशाची" जाणीव झाली: मनाचे उन्नयन. 
जीवनाची क्षणभंगूरता, पण त्याच वेळी, सोनियाने आपल्या कुटुंबाच्या आठवणींना स्वीकारून, त्या आठवणींमधलं प्रेम, सौंदर्य, जपण्याचा त्या पुस्तकातून केलेला प्रयत्न, आणि तो वाचतांना मला मिळालेल्या अनुभवातून माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन, काही प्रमाणात नक्कीच बदलला. शेकडो पुस्तकं वाचली, तरी काही जन्मभर स्मरणात राहतात, ती ह्याच मुळे. त्या पुस्तकाचा अंतर्यामी अनुभव आपण कधीच विसरू शकत नाही. 

दोन अत्यंत टोकाची पुस्तकं वाचली खरी, पण Fahrenheit 451 च्या दृष्टीतून बघतांना मात्र नवीनच साक्षात्कार होत गेले. भविष्यकाळात (जो आताचा वर्तमान आहे), पुस्तकं जाळण्याचे सरकारी काम करणाऱ्या एका fireman ची ही कथा. शोकांतिका अशी, की कुण्या जुलमी राज्यकर्त्याने पुस्तकांची बंदी ह्या समाजावर लादलेली नाही, तर ती समाजानेच स्वत:वर ओढवून घेतलिये, कारण त्यांना हळूहळू पुस्तकांची गरजच वाटेनाशी झालिये. घराच्या चारही भिंतींवर टी.व्ही. प्रसारणातून तुम्हीच मालिकेत सहभागी होऊ शकता. मालिका रसभरीत. मनोरंजक. दिवसभर काम, आणि थोडं मनोरंजन, ह्या पलिकडे बघायला कुणालाच वेळ नाही.  

७०० पानांची कादंबरी मग १०० पानांची झाली, तिची मग १० पानी कथा झाली, (आणि होत होत १४० अक्षरांची tweet झाली).  इतकंच काय, गाड्या दिवसेंदिवस अधिकाधिक वेगाने धावू लागल्यावर, रस्त्यांवरचे फलक वाचणेपण कठीण पडायला लागले, त्यामुळे तेही मोठमोठ्या पण कमीतकमी अक्षरांत लिहण्याची प्रथा पडली. 
उगीच नको ते वाचून नको ते विचार, आणि विचारातून व्यक्तिस्वातंत्र्य, स्वातंत्र्याचा परिणाम जबाबदारी! जबाबदारी हवीच कुणाला? सरकार तर नागरिकांना सर्वोच्च सुखासीन जीवन देण्यास करबद्धच असतं, मग एकेकाळी आग विझवून पुस्तकं वाचवणारे firefighters, आता घरांवर छापे घालून पुस्तके जाळणारे झाले. 

ह्या भिंगातून मला Wave आणि Game of Thrones चे "खरे" रंग दिसायला लागले. खरंतर Wave असो वा GoT, दोन्ही जीवनाला आरसा दाखवतात, असेही कोणी म्हणेल. वाचनच काय, कुठल्याही उपक्रमात, "उद्देश" महत्त्वाचा तर असतोच, पण खरोखरी सकस वाचनाने कुठेतरी सहानुभूती जागृत होते. एक विचार जागा होतो, एक जाण येते. ही दृष्टी मला Fahrenheit 451 ने दिली. "Fahrenheit" च्या विश्वात सगळेच Game of Thrones वाचणारे, जगणारे. आणि ते विश्व भयानक आहे. 

ही त्सुनामी लाट हळूहळू येते आहे. त्यात माझे जिवलग: ॲरिस्टॉटल, फ्रान्सिस बेकन, शेक्सपियरच नव्हे, तर कुसुमाग्रज, शांताबाई शेळके, ग्रेस, दुर्गाबाई नि गौरी देशपांडेही वाहून जाणारेत, असा भास झाला, नि हादरले. अजून "दृष्टी" यायला हवीये.






2/5/10

शिक्षकी आणि डीटॉक्स

आजकाल शाळेत शुक्रवारीच वीकेंड झाल्यासारखी मुलं वागतात. वैताग आला अगदी. चीड आली मनातून, एका श्रीमंत देशात लाखो सोईसुविधा असूनही शिक्षणाचं महत्त्व न कळलेल्या मुलांची. ह्या माझ्या अमेरिकन विद्यार्थ्यांना, "मी तुमच्या साठी किती "रक्त आटवलं" किंवा "घसाफोड" केली, असले वाक्प्रचारही कळू शकत नाहीत. त्यामुळे मी आणि माझा संताप! जातोय कुठे?

मी तेव्हा खरंच विचार करायला लागले. कशाला मी हौसेने शिक्षिका झाले? मी शाळेत असतांना ज्या एकमार्गी अभ्यासाला लागले, ती अगदी कालपर्यंत शिकत होते. विद्यार्थिनी म्हणून जे यश मिळत गेलं, तेच शिक्षिका म्हणूनही मिळेल असं माझंच गृहितक माझ्याच अंगाशी आलं कि काय? असा ही एक वाटून गेलं.

खरं म्हणजे शिकवतांना, "मुलांचं भलं व्हावं, त्यांना ४ गोष्टी कळाव्या" हा असला खोटा नि:स्वार्थ हेतू घेऊन काही मी ह्यात पडले नव्हते. उलटं, मला शिकवायला आवडतं, त्यात माझी हुशारी दिसते, असला सरळसरळ स्वार्थ कुठेतरी डोक्यात होता. तेव्हा तो जाणवला नव्हता, येवढंच. पण माझं साहित्यावर प्रेम आहे हे ही तेवढंच खरं. शिकवतांना आवडत्या विषयावर चर्चा करायला मिळेल, हा पण एक उद्देश त्यात होता.
त्यात शिक्षिका म्हणून माझी पात्रता किती, हातोटी कशी असेल, ह्या गोष्टी तेंव्हा दुय्यमच नव्हे, तर अगदी क्षुल्लकच वाटल्या होत्या.

मी शाळेत असतांना माझा एक साधा विश्वास होता, कि हे ज्ञान आयुष्यात महत्त्वाचं आहे. हे पुढे कुठेतरी आपल्याला लागणार आहे, म्हणूनच आपण हे शिकतोय, आणि आपल्याला हे शिकायला हवंय. तसला विश्वास घेऊन माझे विद्यार्थी काही माझ्या वर्गात आले नाहीत. तुम्हाला लाख साहित्याची चाड असेल, पण आम्ही हे "boring" पुस्तक का म्हणून वाचावं? असले प्रश्न घेऊन ती मुलं आली. मी ही दुधखुळी नाहिये, आणि वर्गातल्या सगळ्या मुलांपैकी ४-५ च जर हे विचारत असती, तर ठीक होतं, असं मला वाटायचं. पण आज सगळीच मुलं ते विचारताहेत.

बरं, शिक्षक-प्रशिक्षणात ज्या युक्त्या, क्लुप्त्या शिकले होते, त्या सगळ्या वापरूनही मुलांमधे काहीच बदल होत नाहिये, हे मी आज पाहिलं, आणि हात टेकले. त्या एका वर्गाच्या आणि माझ्या तारा कधीच जुळणार नाहीत असं आता मला स्पष्ट दिसतंय, पण त्यामुळे आता काळजी वाटते. कशी ही मुलं परीक्षा पास होणार? पुस्तकांबद्दल काडीचा इन्टरेस्ट किंवा साधं कुतुहलही नसतांना, केवळ मार्कांच्या मागे लागलेली ही मुलं! ह्यांचं मन मी कसं बदलू शकणार?

शिक्षक नेहमी आशावादी असतात असं म्हणतात. पण तो आशावाद शिकू इच्छिणाऱ्यांना लागू होतो! घोड्याला पाण्याजवळ नेलं खरं, पण त्याला तहान लागावी असं शिकवायचं! जे हे करू शकतात, ते खरे महान शिक्षक!

सगळ्या विचारांची पुन्हा पुन्हा उजळणी करूनही उत्तर का चुकत राहतं? माझा सुपरव्हायझर म्हणाला, " ह्या अनुभवातून आपण विनय शिकायचा असतो, येवढंच. तुझी चिडचिड होणं स्वाभाविक आहे, पण जाऊदे. डीटॉक्स (detox) करायचं. "

खूप विचार करून मग मला उमजलं.

सगळे उत्तम पदार्थ असूनही कधीकधी शंकरपाळे का फसतात? चकली का हसते? हे तसंच आहे. चकलीवर राग काढून काय साधणारे? हे येवढं पथ्य पाळायचं जरी जमलं, तर शिक्षकी जमो वा न जमो, काहीतरी मिळवलं असं समजेन.





12/10/08

झाड

ते एकटं, चैतन्याने सळसळणारं, स्थितप्रज्ञ.
मी गराड्यात, उरापोटी धावणारी, थकलेली.

त्याची अपार माया, पानापानांतून वाहणारी.
माझं मीपण कोंडून ठेवल्यागत, आसक्त.

त्याचा डौल- ते सृजन! ती नव्हाळी!
माझं पिकलेलं मन, अंतर्नादविहीन- तरी ही जिव्हाळी?

त्याचं जमीनीशी अतूट नातं, मुळांतून नसानसांत भिनलेलं.
माझी आधांतरीची फडफड, वठू पाहणाऱ्या जीवनाची.

त्या झाडाच्या सावलीत वाटतं
पुढच्या जन्मी तरी झाड व्हावं.

कारणांची गरज नसलेलं जगणं कळावं-
वाऱ्यात भरून मनांमधे सळसळावं!