Showing posts with label कुटुंब. Show all posts
Showing posts with label कुटुंब. Show all posts

1/9/21

अनिवासी भारतीयांची कोविड डायरी.......

भारताबाहेर राहणाऱ्या भारतीयांची कोविड आणि लॉकडाऊन मुळे फारच बिकट परिस्थिती झाली. एरवी कर्मप्रिय असलेली अमेरिका २४ तास पळत असते. उरला सुरला वेळ 'देसी' मैत्रांबरोबर पार्ट्या झोडण्यात, झालंच तर थोडे सांस्कृतिक कार्यक्रम, आणि टीव्ही त सहज जातो. वीकेंड कमी पडतात, काही वेळा तर दोन ठिकाणी तोंड दाखवून (हो, तेव्हा आम्ही तोंड दाखवू शकत होतो ;) तिसरीकडे बार्बेक्यू करायला जात होतो. पोरांच्या छंदवर्गांमागे धावत होतो..... थंडीत ६ महिने घरी बसायचे म्हणून उबदार हवेत एखादी सुट्टी टाकली, नाहीतर चक्क राहायला जाण्याइतके घरोब्याचे संबंध होते (अजूनही आहेत, अशी आशा आहे) अशा मित्र मैत्रिणींकडे २-४ दिवस जाऊन येत होतो. मुख्य म्हणजे पोरांची बालपणं एकत्र गेलेली, त्यामुळे त्यांना पाहुण्यांचे येणे जाणे म्हणजे पर्वणीच होती. 

कोविड मुळे सर्वात मोठा परिणाम झालाय तो या पोरांवर. त्यांचे आयुष्य थांबल्यासारखे  झालेय, आणि दुधाची तहान झूमवर भागू शकत नाहीये. दोन असली तर वेगळे प्रश्न, आणि एकच असलं तर वेगळे, पण प्रश्न बिकट झाले. एकूणच अनिवासी लोकांची मुळं नवीन मातीत तितकीशी घट्ट रुजलेली नसतात. पैशासाठी, किंवा जीवनशैलीच्या आकर्षणाने परदेशी राहू पाहणारे अनिवासी लोक एकमेकांना धरून असतात, पण कोविडने चांगलाच दणका देऊन भानावर आणले- कि शेवटी Blood is thicker than water! ज्यांचे अगदी जवळचे कुटुंब इथे स्थायिक आहे, ते कितीही दूर  असले, तरी निदान एखादेवेळी भेटण्याची सोय होती, इतकंच नव्हे, तर निदान झूमवर सतत संपर्क करून मानसिक समाधान करून घेता येत होते. शिवाय घरूनच काम करण्याची सोय असल्यामुळे काही कुटुंबं तर बराच काळ एकमेकांकडे जाऊन राहून आली. 

आमच्या एकुलत्या एक मुलाला हे भाग्य मिळणं शक्य नाही, ह्याची मला इतकी टोचणी लागली, कि त्यापायी मीच निराशेच्या गर्तेत जात होते. कधी अती  प्रेम, तर कधी स्वतःसाठी अजिबात वेळ न देता आल्यामुळे चिडचिड होत होती. अर्थात, मुलासाठी जे जे शक्य होतं ते केलं - त्याच्या बरोबर रोज खेळणे, बाहेर जाणे, पुस्तके वाचणे, चित्रकला गाणे नि काय काय, पण आता मार्चचा डिसेंबर झाला आहे, आणि धीर सुटत चालला आहे. हे इतकं अकल्पनीय एकटेपण आहे की म्हंटलं त्याबद्दल लिहायला तरी हवंच. 

मार्च: घरी असण्याच्या आनंदात गेला. स्प्रिंग ब्रेक मध्ये बिचाऱ्या शिक्षकांनी कशीबशी पुढच्या दोन महिन्यांपुरती आखणी केली. पोहण्याचा क्लास बंद झाला. pottery क्लास बंद झाला. 

एप्रिल-मे : ऑनलाईन शाळेच्या पद्धती शिकण्यात गेला. त्यात ही मजा होती, नावीन्य होतं. बाहेरही फुलं फुलायची थांबली नव्हती, त्यामुळे पार्क मध्ये फक्त घरच्यांबरोबर  फिरणे, सायकल चालवणे हे झाले. पण एरवी बाहेर एकत्र खेळणारी कोणीच मुलं दिसेनाशी झाली. प्रत्येक वेटाळात थोड्या फार फरकाने मुलं बाहेर पडत असतील,  नसतील, पण आमच्या दुर्दैवाने आमचा शेजार फारच 'कट्टर कोविडवादी' निघाला. रोज भेटणारे मित्र पोराला २-४ महिने अक्षरश: दिसेनासे झाले. 

ऑनलाईन शाळा होती, तसेच मग पोरांनी आयपॅड वर एकमेकांच्या 'virtual' विश्वात जाऊन खेळायला सुरुवात केली. ज्या स्क्रीनपासून मुलांना लहानपणापासून दूर ठेवायला धडपडलो, तेच स्क्रीन त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यावश्यक होऊन बसले. ऑनलाईन छंदवर्गात जाणे मुलाला अजिबात आवडत नव्हते, पण आठवड्यातून एकदा ते करायला लावले.

जून-जुलै: लोक किंचित सैलावले होते, पण आमच्या गल्लीत अजूनही भीतीयुक्त वातावरण च होतं....पोरं सायकल चालवण्यापुरती मास्क लावून बाहेर पडत होती, पण बोलणे नाही की खेळणे नाही. त्यांचे त्यांचे काय वेगळे 'गट' होते माहिती नाही, पण शेजार मात्र संपल्या सारखा झाला. मी भारतातल्या लोकांना कायम सांगत असे, की आमच्या गल्लीत पोरं खेळतात, एकमेकांकडे जायला यायला वेळकाळ बघावा लागत नाही, ते पार बंद झालं. तो काळ फार फार कठीण होता... रोज घरी प्रचंड वादविवाद, आक्रस्ताळेपणा (मुख्यतः स्क्रीनवरून) होऊ लागले. मुलगा आता संपूर्णपणे स्क्रीनच्या आहारी गेला होता, पण इलाज चालत नव्हता. निराशेमुळे स्क्रीन, की स्क्रीनमुळे निराशा, हे गणित सुटेनासं झालं होतं. मार्चमध्ये निदान वर्गातल्या पोरांची मैत्री होऊन गेली होती, त्यामुळे त्यांना ऑनलाईन गप्पा मारणे सहज शक्य होते, पण शाळा संपल्यावर त्या मैत्र्या आपोआप संपल्या.....

ऑगस्ट-सप्टेंबर: आता उन्हाळ्याचे फार कमी दिवस राहिले, त्यामुळे पुन्हा पाण्याखाली जायच्या आधी खोल श्वास भरून घ्यावा, तसे आम्ही बीच, थोडं बाहेर आपापलेच फिरून आलो. गणपती, दिवाळीला कोणी येणार जाणार नव्हते, ते ही मला जरा सूक्ष्म बरंच वाटलं- किती काम पडत होतं गेल्या वर्षी, ते आठवून. जवळच्या मित्र मैत्रिणींना भेटायला पार्क मध्ये जात होतो, कधी तिथेच गवतावर दूरदूर बसून पिझ्झा, भेळ खाल्ली. शाळेतली पोरं सगळीच एकमेकांना नवीन (अमेरिकेत दरवर्षी वर्गात वेगवेगळी पोरं असतात, त्यांना मिसळता यावं म्हणून, पण इथे त्याचा उलट परिणाम झाला.) गेल्यावर्षीचे कुठलेच जिवलग मित्र आताच्या वर्गात नव्हते. 

ऑक्टॉबर-नोव्हेंबर: बाहेर थंडी असूनही, मास्क लावून Halloween ला चॉकलेटं लुटणे आणि दिवाळीला फटाके उडवणे झाले. हे गल्लीतल्या जरा पुढाकार घेणाऱ्यांनी (मी व माझी एक शेजारीण) घडवून आणलं कारण मुलांचं दुःख बघवत नव्हतं. आता मुला मध्ये एक बदल जाणवला- एरवी गणपती, दिवाळीत अजिबात रस न घेणाऱ्या मुलाने, रांगोळी काढणे, चकल्या खाणे, फटाके अगदी आवडीने उडवले. छोटे छोटे आनंद गोळा करायला मुलं शिकत होती.....कारण तेच पुरवायचे आहेत, हे कळून चुकलं होतं. 

Hybrid School चा प्रयोग: अर्धी अर्धी पोरं शाळेत दोन दोन दिवस जाऊ लागली, पण शिकवण्याचे तास कमीच राहिले. शाळेत जाऊनही शिक्षिका आणि मुलं -लॅपटॉप वरच अभ्यास करू लागली, कारण उरलेली अर्धी पोरं घरून त्यांच्या क्लास मध्ये हजार होती.... तेवढ्या साठी बसमधून येणे-जाणे,खेळ/व्यायामवर्गात जागेवरच (दुरुन) कवायती करणे काही आवडणे शक्य नव्हते. त्यामुळे मुलाने महिन्याभरातच "मी पूर्णवेळ घरूनच शाळा करीन," असं सांगून टाकलं. 

डिसेम्बर: सांता यावर्षी विशेष प्रेमात होता, मुलांना किती सोसावं लागतंय, म्हणून जास्तच केक, कुकीज आणि खेळणी घेऊन आला. ह्याच दरम्यान मुलाचं गोड खाणं ही वाढलं. साखरेने आनंदाची भावना होते - एरवी लाडू गोड पदार्थांकडे ढुंकूनही ना बघणाऱ्या मुलाचा हात डब्याकडे जाऊ लागला. काही चांगले बदल होते, घरातल्या कामांकडे लक्ष देणे, मदत करणे. ६ महिन्यांपासून वळण लावत होते, ते हळू हळू लागताना दिसत होते. आक्रस्ताळेपणा आटोक्यात आला. 

कधी कधी वाटतं - कोव्हिडच्या आधीपासूनच जी मुलं माणसात रमणारी होती, ज्यांना प्रसंगी कमीपणाची भावना, किंवा बुजरेपणा होता, त्यांना कोविडने फार त्रास सहन करावा लागला. भारतात बाहेरचं वातावरण, आणि सामाजिक बांधिलकीमुळे जे कवच मुलांना सहज मिळतंय, ते अनिवासी मुलांना मिळत नाहीये, आणि त्या अभावाने होणारे खोलवर परिणाम पुसण्यासाठी अनेक वर्ष जावी लागतील. 

=====००००००=======

१. सगळं सोडून भारतात परतावं, असं या दरम्यान अनेकांना वाटलं असेल. कोविडमधून बाहेर आल्यावरही तसंच वाटत राहील का? अर्ध्याहून अधिक आयुष्य इथे गेलेल्या माझ्यासारख्या लोकांना मात्र हाच एकटेपणा काही अंशी आयुष्यभर सोसावा लागणार आहे, हे टळटळीत सत्य कसं पचवायचं हे अजूनही कळत नाहीये. "ह्या अनुभवातून जीवना! तुला जे शिकवायचे ते लवकर शिकव, पण बाहेर काढ!" म्हणायची पाळी आली. 

२. दुसरीकडे, ह्या देशाने आपल्याला काय काय दिलंय, त्याचीही जाणीव आहे. लाखो नोकऱ्या गेल्या, हंगामी मजुरांवर ओढवलेलं संकट, छोट्या घरात राहणाऱ्यांची अवस्था पाहून, 'त्यापेक्षा आपण भाग्यवान आहोत' ही जाणीवही झाली. निदान पदार्थ  साठवणे, घरी सगळी आयुधं सज्ज असणे, बाहेर फिरताना गर्दी नसणे, ह्या मोठ्या जमेच्या बाजू होत्या. 

३. मुलासकट आता आम्ही दोघेही रोज 'कृतज्ञतेची प्रार्थना' म्हणायला लागलो आहोत. आजचा दिवस चांगला घालवण्याचा प्रयत्न करीत आहोत. एकमेकांना जपत आहोत. हे ही नसे थोडके. 

1/18/19

रिक्षावाला

"ए बेबी, तुझा चक्का उलटा फिरते नं!" मागून जोरात आवाज आला.

एक सेकंद दचकून मी खाली वाकून चाकाकडे पाहिलंच, पण तेवढ्यात गंगारामच्या रिक्षाच्या टपावर बसलेल्या पोरांनी खाली उतरून त्याला जोरात धक्का मारला, आणि मला मागे टाकून हुल्लड करत रिक्षा पुढे निघून गेला! मी पण जोरजोरात सायकल हाणत ओरडले, "ए गंगाराम, काहीSSS काय सांगतो? मी आता पडले असते म्हणजे!" पण गंगाराम हसत हसत "कशी घाबरली!" करत पुढे निघून गेला.

मी तोल सावरला. जुलैच्या पावसात निसरड्या रस्त्यावर नुकतीच लांबच्या मोठ्या शाळेत मी आपली आपली सायकल घेऊन जायला लागले होते. जाऊदे, तो गंगाराम आहेच आगाऊ! असं मनातल्या मनात म्हटलं, आणि पेडल मारलं. माझी सायकल पुढेच जात होती, पण बाजूनी रिक्षा जास्त वेगाने गेल्यामुळे मला खरंच पुन्हा एकदा वाटलं, "आपली चाकं उलटी फिरतायत का?" :) :) चाकं नाही, पण मन उलटं फिरून प्राथमिक शाळेत गेलं.

पहिली ते चवथीची शाळा, मोठ्या रस्त्यावर तीन चौक टाकून होती, म्हणून आम्ही ७-८ वर्षाचे ५-६ फटाके आणि टिकल्या (मुलंमुली) गंगारामच्या सायकलरिक्षातुन शाळेत जायचो. गंगारामच्या मस्कऱ्या स्वभावाने आमची फारच करमणूक व्हायची, पण दप्तर लटकावताना मधेच जर त्याने एका मुलीची वेणी ओढली, दुसरीचा रुमाल पळवला, तर आम्हा मुलींची अस्मिता दुखावली जायची आणि आम्ही जोरात ओरडायचो. आता मी मोठी झाले, असं मला वाटलं होतं, पण मागून येऊन गंगारामने खोडी करायची ती केलीच! मला हसू आलं.

माझ्या तिप्पट चौपट वयाच्या गंगारामला आम्ही ७-८ वर्षापासूनच "ए गंगाराम" च म्हणायचो, कारण माणूस हा असा विनोदी. "अहो गंगाराम काका" वगैरे म्हणायचं, हे पण कधी सुचलं नाही, आणि कोणी शिकवलंही नाही. सगळा बेभरवशाचा कारभार, आणि रोज वेगवेगळ्या वेळी अवतारायचा नेम! :)

सकाळी सकाळी ७:०० वाजता तयार होऊन अंगणात दप्तर घेऊन उभं राहायचं, तरी सव्वासात पर्यंत ह्याचा पत्ता नाही. कि मग समोरच्या अंगणातून चित्रकाकूचा मुलगा ओरडायचा "आज गंगाराम येत नाही वाटतं!" मग धावत धावत टॉयलेटचं दार वाजवायचं, "बाबा, गंगाराम येत नाही, लौकर करा, शाळेत सोडायचं आहे." आणि नेमकी तेवढ्यात बाहेर घंटी वाजणार. कळकट शर्ट, तारवटलेले डोळे, दाढीचे खुंट वाढलेले, नाकातून सूं सूं पाणी येतंय, अशा अवतारात गंगाराम उभा. "बेबी, पायलीवाली खांडेकरनी लेट केला नं!" असं म्हणायचा, पण आजी हळूच नंतर सांगायची, "रात्री दारू पिऊन पडला असेल. तू जास्त बोलत जाऊ नको, शाळेत जायचं- यायचं.  ह्या लोकांशी कशाला जास्त वाढवा?"

पण ते काही असो, घरच्यांचा, आणि आम्हा पोरांचापण त्याच्यावर विश्वास होता, कारण बाकी तो मनाने मुलांत मूलच होता. रिक्षात बसून आम्ही धांगडधिंगा करायला लागलो, कि "ते बेबी रिक्षातून पडली नं, डॉक्टरकडे जाऊन टाकेबी पडले..." वगैरे नुसत्या कहाण्या सांगायचा, पण आम्हाला शिस्त लावणं त्याला जमणं शक्यच नव्हतं, कारण चौकात रिक्षा थांबला, कि खाली उतरून मागे "टपावर" बसायला आम्ही "टपलेले" असायचो.

मला वाटतं गंगाराम टपावरच्या दोन सीट धरूनच मुलांची भरती करत असावा, कारण त्याला झेपतील, आणि मावतील त्यापेक्षा जास्तच पोरं रिक्षात असायची. (रोज कोणीतरी आजारी, कोणी उशीरा उठलेला, कोणी गावाला गेला - म्हणजे शाळेला बुट्टी, म्हणून उरलेली रिक्षात मावूनच जातील असाहि त्याचा अंदाज असावा :-) :-) शिवाय दुसऱ्या कोणा रिक्षावाल्याची बुट्टी असेल, तर तिथलं पण एखादं चिरकूट "दयाळूपणे" आणून बसवायचा (एक्स्ट्रा कमाई नं!)

इतकी पोरं सीटवर कोंबून बसायला तयार नसायची, उलट टपावर बसायलाच भांडाभांडी व्हायची! म्हणजे आम्ही मुलं पण ह्या कटात भागीदार होतो. टपावर 'बसणं' कसलं, ते रिक्षाच्या मागे लोम्बकाळणंच होतं, पण त्यात काय थ्रिल होतं, ते अनुभवल्याशिवाय कळूच शकत नाही...सायकलरिक्षाच्या दोन चाकांना जोडणाऱ्या पट्टीवर पाय, आणि सीटच्या काठाला हाताने धरलेलं, अशी सवारी करणारी एक दोन तरी पोरं प्रत्येक रिक्षात असायचीच. जरा उंची पुरली, की सीटच्या काठावर मागून चढून उलटं बसता पण यायचं, आणि उतारावर जास्त वारं खायला मिळायचं! शिवाय, दोन रिक्षातल्या शर्यतीत पुढे जायला टपावरची पोरं मधेच उतरून रिक्षाला धक्का पण मारू शकायची. काय पण labor of love होतं आमचं!!!

पुढे पाचवी ते सातवी मात्र "भाऊ" भेटले. खरं म्हणजे भाऊ वयाने गंगारामपेक्षा पुष्कळच तरुण, पण त्यांचा आपसूक आदरच वाटायचा, कारण नियमितपणा आणि शिस्तीचं हे दुसरं टोक! रिक्षा चालवण्यातपण किती शिस्त आणि निष्ठा असावी! रिक्षा अतिशय टापटीप ठेवायचे. त्यांनी रिक्षाला गिअर्स बसवून घेतले होते, आणि दप्तरं लटकवायलाही शिस्तीत दोन्ही बाजूला हुक्स, बाजूने ऊन-पाऊस लागू नये म्हणून वेगळे पडदे! स्वतः ही अगदी कडक कपडे घालायचे! उन्हाळ्यात काळ्याशार रंगाचे भाऊ, जवळजवळ तेजस्वीच दिसायचे इतका त्यांचा रंग तुकतुकीत होता! बेसबॉल कॅप घातलीकी तर आम्ही त्यांना सांगायचो, "भाऊ, आज काय स्मार्ट दिसून राहिले!"

सायकल रिक्षात वास्तविक गादीची सीट एकच असते, त्याच्या विरुद्ध बाजूला लाकडी फळकुटच असतं. तर गंगारामच्या रिक्षात उंच सीट पकडायला आम्ही शाळा सुटल्यावर सुसाट धाव घ्यायचो, नाहीतर भांडाभांडी ठरलेली. भाऊंनी मात्र एक दिवसाआडचा नियमच करून टाकला, म्हणजे काल गादीवर बसलेल्यांनी आज खाली बसायचं! गंगारामच्या रिक्षात गादी-फळकुटात फारसा फरकही नव्हता म्हणा, कारण गादी ठिकठिकाणी फाटली होती, आणि भोकातून नारळाच्या का जूटच्या झावळ्या पार्श्वभागाला टोचायच्या :) त्या पुढे भाऊंचा रिक्षा म्हणजे आमच्यासाठी limousine पेक्षा कमी नव्हता!

रिक्षात गाण्याच्या भेंड्यापासून शाळेतलं गॉसिप आणि होमवर्कपर्यंत सगळं घडायचं, कारण रस्ते अगदी लोण्यासारखे गुळगुळीत होते. नागपूरसारखे भव्य, सरळ, रिकामे रस्ते दुसऱ्या कुठेच पहिले नव्हते. ते रस्ते, आणि सायकल-रिक्षा. दोन्ही आता कालातीत झाले.

गंगारामला "उद्या वेळेवर ये" सांगून थकलो होतो, ते भाऊंना "भाऊ उद्या येऊ नका नं, म्हणजे आई शाळेत सायकलने जाऊ देईल..." असं सांगायला लागलो... आधी रहदारीच्या रस्त्यावर डावी-डावीकडून हळू सायकल चालवत होतो, ते नंतर १०वी त शर्यती लावायला लागलो. तेव्हा कधी गंगाराम, कधी भाऊ, छोट्या मुलांना घेऊन जातांना दिसत. कधी मी त्यांना हसून हात हलवला असेल, कधी दुर्लक्षही केलं असेल, कारण तेव्हा मी मोठी झाले होते नं! टागोरांच्या काबुलीवाल्याप्रमाणे आमच्या आयुष्यात रिक्षावाला, दूधवाला, ही मंडळी होती. १०वी च्या परीक्षेचा निकाल लागल्यावर भाऊ घरी येऊन मला १०० रुपये देऊन गेले! त्यांचं मात्र मला संपूर्ण नावही कधी माहिती झालं नाही.

माझी मात्र गरज सरली, की बालपण? त्यांच्याशी बोलण्यासारखं अचानक माझ्याकडे काहीच उरलं नाही...!


 






12/15/18

हैरतों के सिलसिले

लग्न झालं तेव्हा मी डोक्याने बरी पण व्यवहारात माठ होते. सासरी गेल्यावर एखाद आठवड्याने सासूबाईंनी "आज तुझ्या हातचं जेवायचं आहे" असं फर्मान सोडल्यावर "पण मी जे करू शकते ते तुम्ही खाऊ शकाल का?" असं मी अत्यंत निर्मळ मानाने विचारलं होतं! वर अजून स्वाभिमानाची फोडणी घालून "मला कोकणस्थी गोड च भाज्या आवडतात!", असं सांगून फ्लॉवरच्या रश्यात आलं लसूण सोडा, साखर घालून सगळ्यांची तोंडं गोड केली होती. आपल्या स्वयंपाकाच्या अज्ञानाबद्दल लाज किंवा वैषम्य वाटून घ्यायचं असतं, हे हि माझ्या गावीही नव्हतं. जे शिकायला हवंय, ते आपण कधी ना कधी शिकू, त्यात काय मोठं? असा निरागस आशावाद नव्हता, तर स्वतःवरचा (कदाचित थोडा अवास्तव) विश्वास होता. अभ्यासातली हुशारी साधारण बाकी ठिकाणीपण वापरता येते, ह्याचा थोडा अनुभवपण गाठीशी होता.  :)

पण मुलगी म्हणून जन्माला आल्यावर आईबापांनी ज्या धक्क्यांपासून दूर ठेवलं होतं, तेच आश्चर्याचे धक्क्यावर धक्के  मला पुढे जगाने जे दिलेयत,त्यांना तोड नाही! लग्न थोडं उशिरा झालं (त्यांच्या मते), म्हणून "लवकर मुलं होऊ द्या!" असा सल्लाही वरातीच्या साडीबरोबरच मिळालेला, पण नवरा जास्त प्रॅक्टिकल निघाला. एका चाकाच्या गाडीपेक्षा दोन चाकाची चांगली, म्हणून त्यानं तरी लग्नानंतर शिकायचं माझं "खूळ" उचलून धरलं.

पण साधी शाळेची म्हंटली तरी पहिली नोकरीच होती ती. मी नवीन होते, देश नवीन, आणि वातावरण तर कधी न पाहिलेलं! १२ तास काम करणाऱ्या मुलींच्या डोक्यात, संध्याकाळी ६ वाजता घरी जातांना आपोआप, अंत:प्रेरणेने, "आज जेवायला काय बनवायचं?" असे विचार येत असतील तर त्या मुलींना "देवीपद" बहाल करायला माझी अजिबात हरकत नाही, पण ती मुलगी मी नव्हते. पहिली नोकरी लागल्यावर थोडी उधळपट्टी करायचा माझा पण प्लॅन होता...
पण... पुढचा धक्का वाट बघत होता. नोकरीच्या पहिल्या वर्षातून बाहेर पडते न पडते तर "आता कशाची वाट? मुलं होऊ देत!" असा घोर मागे लागला. शिवाय, आजूबाजूच्या सगळ्यांनी नंबर लावले होते, मग त्या स्पर्धेत आम्ही उरापोटी धावायला लागलो, त्या मनस्थितीत कसली होतायत पोरं?? इथवर येता येता तिशी आली, नंतर मूल झाल्यावर जरा त्यातल्या आनंदात सैलावले, तर "आता काय आयुष्यभर घरीच बसणारेस का?" -हा धक्का मात्र नवऱ्यानेच दिला (किंवा धक्का मारला, असंही असेल त्याच्या दृष्टीने!)

एकीकडे, ज्या कामाचे पैसे मिळत नाहीत, त्या कामाची कदर केली जात नाही, पण दुसरीकडे, पैशासाठी घराची गैरसोय होऊ न देण्याची शिकवण मिळालेल्या माझ्यासारख्या बायका! " लग्न झाल्यावर हळूहळू धडे मिळत गेले- कि आपलं आयुष्य हे आपल्यासाठी नसतंच मुळी...! घरासाठी, नवऱ्यासाठी, पोरांसाठी- हे झालंच तर मग उरलेलं जमेल तर आपलं म्हणायचं! संसाराच्या वाटेतले एक एक खड्डे बुजवत राहिली ती नदी, मग तिचं केवळ डबकं होऊन राहिलं. ती वाहणार कशी?

फक्त ह्यावेळी आश्चर्य नाही वाटलं, कारण जखम खोल होत होत स्वत्वाला पोखरून पार पोचलेली होती...
हैरतों के सिलसिले सोज़े निहां तक आ गाये!

एकदा वाटलं, आपली गणितंच मुळात चुकली होती... लठ्ठ पगाराच्या घरी बसून करायच्या नोकऱ्या मिळतात, ते क्षेत्र निवडायला हवं होतं. मग वाटलं, क्षेत्राचं काय? यश कधी पाहिलंच नाही, असंही नाही. आणि शेवटी ह्या निष्कर्षाला पोचले, कि थोडं थोडं सगळंच मिळवायचा हट्ट धरून बसलीस बाई, मग थोडं जे हातात आलं, त्याच बरोबर थोडं थोडं सगळंच हातातून सुटणारच ना!

परवा मात्र एका घटस्फोटाची कथा जवळून बघायचं दुर्भाग्य आलं. लठ्ठ पगाराच्या दोन नोकऱ्या, दोन पोरं, मोठं घर, सगळं असणाऱ्या दोन व्यक्तींच्या हातून प्रेम मात्र निसटलं. जगाच्या डोळ्यात आधी खुपलं काय? बाईचा नोकरीचा माज, घराकडे दुर्लक्ष, नवऱ्यावर सत्ता गाजवणं. ते बघून मात्र जाणवलं. गणित चुकलेलं नाहीये, चुकीचंच गणित आहे.

ख़ुद तुम्हे चाके गरेबाँका शऊर आ जाएगा
तुम वहां तक आ तो जाओ, हम जहांतक आ गए!

उठण्या बसण्यापासून बोलण्या घालण्यापर्यंत, मुलींच्या प्रत्येक आचार विचाराची चिरफाड करायला बसलेलं जग. त्याच चौकटींमधून उपजलेल्या माझ्या सासूबाई, आणि माझी घटस्फोटित मैत्रीण, आणि मी. तिचं संपलेलं लग्न म्हणजे स्त्रीवादाचा सर्वात मोठा पराभव आहे. "आपल्याला नक्की काय हवंय? पुरोगामी तर व्हायचं आहे, पण ते कसं व्हायचं, आणि किती झेपेल" हे न कळलेल्या पुरुषाने तो पराभव घडवून आणला आहे. पण मोलाची साथ मात्र बायकांनी स्वतःच दिली, कसल्या कसल्या चौकटींमधून स्वतःचं प्रतिबिंब बघत अस्मिता शोधत बसल्या! माझा माठपणा माझ्या चांगलाच उपयोगी पडला. नाहीतर जितपत भान आज आलंय, तितकंही आलं नसतं.


10/27/17

भाग १: Pancakes, Pancakes!


एरीक कार्लच्या ह्या पुस्तकातला जॅक बाळा, सकाळी सकाळी आपल्या आईला लाडीगोडी लावून म्हणतो, "आई, आज मला पॅनकेक हवे! आज मला पॅनकेक हवे!!" त्यानंतर मला वाटलं, की फार तर फार आई त्याला सांगेल,"मी पॅनकेक करते, तोवर तू ताटं मांड." मग घरची मंडळी मिळून कसा छान ब्रेकफास्ट करतात, जॅक अगदी अमेरिकेतल्या टिपिकल शाण्या-बाळा प्रमाणे आपले आपले पॅनकेक गट्टम करतो, वगैरे वर्णन असेल...

पण झालं उलटंच! बिचाऱ्या जॅकची आई आपल्या भारतीय सासवांपेक्षाही खडूस निघाली बरं का!!!साळसूदपणे पणे त्याला म्हणाली, "अरे जॅक, पॅनकेकसाठी मला बरंच साहित्य लागेल, ते देशील का आणून?" मग तिने जॅकला सरळ शेतात पाठवलं. गहू तोडणी, मळणीपासून गिरणीतून पीठ दळेपर्यंतचा प्रवास फास्ट फॉरवर्ड मध्ये झाल्यावर म्हटलं आता तरी बिचाऱ्या जॅकच्या पोटात पॅनकेक पडतील........तर नाSSSSSही.

"कारल्याचा वेल लाव गं सुनबाई, मग जा आपल्या माहेरा!"
स्ट्रॉबेरीचा जॅम च फक्त वगळता, आईने जॅकला भरपूर दमवलं, पळवलं, पण का?

"वेलाला फुलं येऊदे सुनबाई, मग जा आपल्या माहेरा माहेरा."
कोंबडीचं अंड आण रे बाळा, मगच करूया पॅनकेक तुला, पॅनकेक तुला.
गायीचं दूध आण रे बाळा मगच करूया पॅनकेक तुला, पॅनकेक तुला.

"जॅक, माझा मुलगा शहरी-दीडशाणा व्हावा, लोकांनी त्याला नावं ठेवावी, असं का मला वाटेल? आपलं अन्न कुठून येतं, ते उगवायला, त्यावर प्रक्रिया करून ते खाण्यायोग्य बनवायला किती परिश्रम घ्यावे लागतात, ते माझ्या मुलाला माहिती असू नये..., असं का मला वाटेल? जॅक, मी तुला पीठ, मीठ आणायला पाठवलं, ते तुझा छळ करायला नव्हे रे बाळा, तुला वळण लावायला!"

असं हे मस्त पुस्तक आमचा चिटुक फक्त दोन-अडीच वर्षांचा असतांना, लायब्ररीत हाती लागलं, आणि एकदम मेंदूत नवीन पेशी तयार झाल्यासारख्या झिणझिण्या आल्या की!

भारतात, आमच्या खानदानात तीन पिढ्यांपासून कोणाचीच शेतीवाडी नव्हती. बागेत आजी गुलाब, क्रोटन लावायची, तितकाच आमचा मुळं-मातीशी संबंध. तरीसुद्धा, अधूनमधून शाळेची सहल म्हणून, किंवा बाबांच्या मित्राच्या शेतावर चिकन-पार्टी असेल तर, जायचा योग यायचा, आणि खूप आवडायचा देखील. तिथे गोठ्यातल्या गाई, तेव्हा तरी मला खूषच दिसायच्या. शेणाचा वास नाकपुड्यात भरला, तरी तो सुद्धा त्या अनुभवाचा भाग म्हणून त्याचं अप्रूपच वाटायचं. दिवसभर तिथला भन्नाट वारा प्यायचा, आणि संध्याकाळी हुरडा पार्टी- म्हणजे आहाहा!!!

शेतात काय करतात, पिकं कशी उगवतात, किती कष्टाचं काम, वगैरे सामान्य ज्ञान फारसं न शिकवताच समजलं होतं. पण ह्या स्वच्छ सुंदर अमेरिकेत माझ्या पोराला हे सगळं कसं कळायचं? नुसती जॅक न पॅनकेकच्या पुस्तकांना खऱ्या अनुभवाची सर कधी येईल का? आणि ही विचारांची आगगाडी शेवटी, "अमेरिकेत येऊन काय कमावलं, काय गमावलं!" ह्या नेहेमीच्या प्रश्नावर येऊन थांबणार. 

मुलांच्या बाबतीत कितीही केलं तरी प्रत्येक आईबापाला कुठलीतरी खंत राहूनच जाते, त्यात आम्ही इथे येऊन त्याचे आजीआजोबा, चुलत-मामे भावंडं, त्याच्यापासून हिरावूनच घेतली वगैरे आधीच्या हजार चिंतांमध्ये आता ह्या एक हजार एक व्या चिंतेची भर पडली.

म्हणावं तर अमेरिकन सुपरमार्केट मध्ये भाज्या फळं दृष्ट लागण्यासारखी दिसतात! इतकी, की जगातल्या सात आश्चर्यांमध्ये आठवं म्हणून, हे अजस्त्र, पण एकसारखे दिसणारे शुभ्रवर्णी, एकही डाग नसलेले फ्लॉवरचे गड्डे, किंवा तजेलदार कांतीचा भोपळी मिरच्या पण ठेवाव्या! पण खाऊन बघावं तर- "दुरून भाज्या साजऱ्या".

चिकन किंवा दूध कसं बनवतात, त्या प्रक्रियेबद्दल (मुद्दाम) अतिशय गोपनीयता पाळली जाते, कारण यांत्रिक पद्धतीने प्राण्यांचे 'अन्न' बनवणे - हा कारभार बघणाऱ्याला अतिशय निर्दय, निर्घृणच वाटतो, आणि त्यावरून प्राणीहिंसा विरोधकांना वगैरे पुष्कळ 'खाद्य' मिळतं.

ह्या पार्श्वभूमीवर जेव्हा शेजारणीने विचारलं, "तुम्हाला भाड्याने शेत घ्यायचं आहे का?" तेव्हा माझे डोळे च विस्फारले :) आमच्या जॅकला "पॅनकेक काय झाडावर उगवतात का?" ते कळू शकेल तर! माझं हे म्हटलं तर छोटं, म्हंटल तर मोठं अमेरिकन ड्रीम पूर्ण होईल का?

वाचा पुढील भागात.

5/10/17

मी अमेरिकन झाले आहे का?

मी अमेरिकन झाले आहे का?

आधी कधी हा प्रश्न स्वतःला विचारला नव्हता. तो विचारावा लागला कारण- खूप जुनी एक मैत्रीण भेटली. आम्ही लहान असतांना आमचं घर ७ खोल्यांचं आणि तिचं ४ खोल्यांचं हे तिलाच आठवलं, पण आत्ता ही तिचं घर ३ खोल्यांचं आणि माझं ५, हे पण तिला जाणवलं. तिने कौतुक केलं, माझं, माझ्या घराचं, माझ्या नवऱ्याचं, माझ्या दिसण्याचं, वागण्याचं आणि स्वयंपाकाचंही!

पण कौतुकात किती आनंद होता, आणि किती खंत? कितीशी जेलसी/असूया? जरा शंका आली, तरी मला भीती वाटली.

इतक्या वर्षांची मैत्री समतोल नव्हतीच म्हणजे! कुठेतरी वर-खाली पारडी तोलण्यात सदैव माझंच पारडं खाली राहिलं. नशिबाने मिळालेल्या घराने, रूपाने, पैशानेच का माझे गुण ही मला मिळाले होते? माझे गुण मी कितीही 'कमावले' असतील, तरी तिच्या मते ते माझ्या 'पदरात' च पडले असतील तर आमची घनिष्ठ मैत्री 'निखळ' मात्र कधीच नव्हती हे मला मान्य करावंच लागेल, त्याची मला खूप खूप भीती वाटली! ते विचार मी गेली अनेक वर्ष मनाच्या तळाशी दडपून टाकले.

म्हटलं तर माझ्या पेक्षा अनेक पटींनी तिचंच करियर नेत्रदीपक! पुढे शिकायला डिग्री उरली नाही इतकी ती शिकली, आणि दरवेळी सुवर्णपदकं मिळवत शिकली! जिथे गेली तिथे सर्वांची लाडकी झाली. आणि तरीही तिला माझी असूया? मी फक्त साधी शिक्षिका आहे, मला ना तिच्या इतके पैसे मिळतात, ना भोवती तिच्या इतके मैत्र! माझ्यापाशी कोणी आपले मन मोकळे करत नाही, आणि मी ही फार कोणावर विसंबत नाही. तिचे आईवडील आपला संसार सोडून तिच्या मुलीचा सांभाळ करायला सदैव पाठीशी उभे राहिले, पण माझ्याकडे अनेक कारणांनी तशी परिस्थिती कधीच येणार नाही.

मग असा फरक का? कदाचित गेली अनेक वर्ष अमेरिकेत स्थायिक होण्याने माझा सर्वात मोठा फायदा हा झाला की मला कुठेच कुणाशी तुलना करायची वेळ आली नाही, की सवय झाली नाही! त्यांच्याकडे मोठी गाडी, आपली लहान..... त्यांच्या दोन्ही रग्गड पगारी नोकऱ्या- माझी जेमतेम मुलाचा खर्च भागवणारी! असले विचार मी केलेच नाहीत कारण ह्या देशात माझ्या 'शिक्षकी' पेशात असलेलं दुसरं कोणी मला भेटलंच नाही, आणि जे थोडे भेटले, ते सगळे माझ्याच सारख्या परिस्थितीतून जातायत असं जाणवलं.

इथे येणारे सगळेच भारतीय (अनिवासी/इमिग्रंट) थोड्याफार फरकाने सारख्या टप्प्यातून जातात. आधी भाड्याचं घर, एखादी कार, व्हिसाची टांगती तलवार! त्यामुळे नवीन येणाऱ्यांबद्दल सहसा सहानुभूतीच जास्त!

अमेरिकन माणसाचा स्वभाव अघळपघळ, पण नसत्या चौकशा न करणारा. तासाचे ८ डॉलर मिळवणाऱ्या कॉफीशॉप मधल्या भारतीय/आशियाई दीदी पासून ते वॉलस्ट्रीट वर लाखो कमावणाऱ्या सुटा बुटातल्या दादा पर्यंत कुणाला एकमेकांच्या घरी किती सुबत्ता आहे, हे जाणून घेण्याची खाज नाही.

उलट भारतात शेजार्यांकडे नवीन सोफा, टीव्ही, कार आली कि लगेच कौतुक, नि लगेच असूया. अमेरिकेत 'भौतिक' सुखं आहेत असं म्हणतात, पण माझ्या साठी हे 'मानसिक' सुखच जास्त मोलाचं आहे!


2/24/16

मराठीपणा-इंग्रजीपणा

एवढ्यात  शिवाजी जयंती झाली तेव्हा माझा महाराष्ट्र, माझी मराठी या प्रकारच्या काही बातम्या आणि व्हॉटसप फॉरवर्ड आले, ते वाचून मला एकदम हुक्की आली कि काहीतरी मराठी- गौरावात्मक लिहावं . पण मनात आलं, की झालं लिहून, अशा सोयी आता आमच्या वाट्याला क्वचितच येतात (पहा: आईचा स्वत:च्या वेळेवर कधीच हक्क नसतो का?)
त्यामुळे "मनातलेच मांडे" खायची वेळ आली असे म्हणतानाच, एका मैत्रिणीचा फोन. "काय करताय  विकांताला?" बाकी काही असो. मराठी माणूस तसा मुळात आळशी असल्यामुळे, विशेषकरून विकांताला फारसे कुठले कार्यक्रम न ठरवता, 'भरपूर कौटुंबिक वेळ' घालवण्यात पटाइत :) त्यामुळे माझं ताबडतोब उत्तर, "काSSSही विशेष नाही. येताय का?" पोरं एका वयाची असल्याने आमचं चांगलं जमतं.  (आजकाल कुणाशी चांगलं जमण्याचे निकष, पोराच्या उंचीइतके 'खालावले' आहेत, हे उघड आहे :) :) सो बाकी फारसा विचार करायची गरज नव्हती, फक्त,मैत्रिणीच्या नवऱ्याला खायला काय घालायचं, हा एक मोठा प्रश्न होता. 

दिल्लीच्या, पण पटन्यात वाढलेल्या, आता आईवडील बंगलोरला स्थाईक झालेल्या आमच्या ह्या मित्राचं मला कौतुकच जास्त वाटत आलेलं आहे, कारण गेली अनेक वर्ष मी केलेले अनेक बरे वाईट मराठी पदार्थ तो बिचारा न कुरकुरता खात आलेला आहे, पण …….चेहरा मात्र मलाही नेहमी खरं सांगत आलेला आहे! आता मुळात त्याने मराठी बायको केली (माझी मैत्रीण) म्हणून मी फारसा त्या चेहऱ्याचा विचारही करत नाही, पण तरी, एखादी भाजी नेहमीची आणि एखादी आलं लसूण पनीर टाईप असतेच. आज मात्र अवचित ठरल्यामुळे, माझ्या समोर यक्ष-प्रश्न उभा ठाकला. मैत्रिणीला विचारले तर ती म्हणाली, "भजी कर." भज्यांपुढे त्याला काही दुसरं लागत नाही." 
"चला एक तरी मराठी पदार्थ तुला आवडतो!" मी त्याला गमतीने म्हटले, तर तो म्हणाला, "भजी मराठी नही है! भजी मतलब भुजिया, मराठी लोगों ने हमसे ही सिखा है!" झालं, मग आमची व्हॉटसप-वॉर  जुंपली! मी मराठी पदार्थांचे गुणगान चालवले, तर त्याने मराठी पदार्थ कसे करायला कठिण  पण खायला तरीही सहज न आवडणारे, असे आरोप लवले. अर्थात, सासूविषयी बोलायचा हक्क फक्त सुनांनाच नसतो, त्यामुळे, "आमचा सासूबाईंनी सकाळी ३ तास खपून, केलं काय तर उपासाचं थालीपीठ!" असले धमाल विनोद सुरु झाले. टू स्टेट्स सिनेमा प्रमाणे, तुम्हा पंजाबी लोकांना दुसऱ्या चवीचं काही आवडत नाही, नि तुम्ही आवडून घेतही नाही वगैरे मुद्दे मी मांडले.

मग तेवढ्यातच बाजीराव मस्तानीचा विषय निघाल्यावर तो म्हणाला," तुम्ही मराठी लोक एकतर आपले मंगळागौरीचे खेळ वगैरे कुणाला सांगत नाही, दाखवत नाही, आणि आजकाल तर, खेळतही नहि. मराठीपणा मध्ये समरस होण्याचा फारसा मौका तुम्ही अ-मराठी लोकांना देत नहि. तुमची मराठी संस्कृती संस्कृती म्हणतात ती इतकी "बंदिस्त" गोटातली आहे, कि सहज समरस होण्यासारखं त्यात काहीच नाही, आणि जे आहे, ते हि इतरांकडून उधार घेतलेलं!"
आज मराठी घरोघरी बघाल तर, इडली सांबार (दाक्षिणात्य), नाहीतर पराठे (उत्तरेचे) सगळ्यांना आवडतात. मग मी खरंच विचार करू लागले, कि जसा उत्तरेला पनीरचा आणि दक्षिणेला इडलीचा अभिमान आहे, तसा मराठीला कशाचा असू शकतो? की खरंच आपले पदार्थ "टू मच इनपुट नॉट मच आऊटपुट" प्रकारात मोडतात?

तेव्हा एकदम सुचलं, कि मराठी संस्कृतीचं थोडंफार इंग्रजी भाषेसारखं आहे, असा पुरोगामी विचार केला तर सर्वसामावेशाकतेची लाज न वाटता, अभिमान वाटू शकेल. इंग्रजी भाषा कशी फोफावली, कारण तिने इतर भाषांमधून शब्द नि:शंकपणे आत्मसात केले. हिंदू धर्म का टिकला? कारण त्याने येणाऱ्या विविध गटांच्या, परिस्थिती, पर्यावरण-आधारित कर्म-कांडाला सरळसरळ आपले म्हटले. त्यामुळे हिंदू धर्मात दिवाळीला कोणी कुठे जुगार खेळतात तर कोणी झेंडूच्या माळा लावतात. कोणी रांगोळ्या काढतात तर कोणी पुरणपोळी करतात.

मग मराठीपणानेही कशाला कुठल्या संकुचित व्याख्येप्रमाणे स्वत:ला बदलायचा प्रयत्न करावा? मराठीने का नये अभिमानाने म्हणू कि आम्ही इडली करतो, कारण आम्ही तिला आपली मानलीये. आम्ही सगळ्या भाज्या करू, नि आवडीने खाऊ कारण आमच्याकडे नव्याचा तिरस्कार नाही, स्वीकार आहे, आणि तोच आमचा सर्वात मोठा गुण आहे. भारताच्या कुठल्या दूरच्या कोपऱ्यात नसून, महाराष्ट्र हा चक्क पोटचा गोळा आहे, त्याचा परिणाम म्हणून गुजराथी असो वा कर्नाटकी, बंगाली असो वा पंजाबी,
 सगळ्या प्रदेशांशी आमची नाळ जोडलेली आहे, हे आमचं सौभाग्यच नाही का?

ह्याचा अर्थ असा नव्हे, की मराठी पदार्थ, मराठमोळी नऊवारी आणि नथ, मराठी बडबडगीतं आणि गाणी, ह्यांचा आम्हाला अभिमान नाही, किंवा त्याचं जतन आम्ही करू नये. पण आपलं ते कार्ट …. असली संकुचित वृत्ती मराठी मनानेच काय, कुणीही ठेवू नये.

अजून एक सांगू, "दुधी, परवल, पडवळ, डींगऱ्या, चपटे वाल, कडवे वाल, दक्षिणेचा नारळ घालून असो वा उत्तरेचा बटाटा, आम्हाला प्रत्येक भाजी करायच्या सतरा पद्धती येतात, आणि आम्ही त्या करतोही. प्रत्येक नावडत्या भाजीलाही आवडते करून खाणे, हे कोणी मराठी माणसाकडून शिकावे! उपलब्ध असलेल्या साध्या सामाग्रीतून रुचकर जेवण असो, वा सजावट, मराठींकडून शिकावी.

म्हणजे, जुगाड- इन्वेन्शनचे आद्य प्रणेते आम्हीच की!"

इतिहासाच्या एका टप्प्यावर, मराठी माणसावर फार संकटं आली. अठरा विश्वे दारिद्र्य आणि दुष्काळात तेरावा महिना असतांना आम्ही जे धडे घेतले, त्यांनी मराठीमाती झालीच असेल, तर जास्त कणखर झालीये.

आज इंग्रजीने जग काबीज केलंय, ते केवळ इंग्रजी राजवटीमुळेच नव्हे, तर इंग्रजीच्या अंगभूत लवचिकतेमुळेही. नाझी जर्मनीत तावून सुलाखून निघालेले ज्युईश लोक अमेरिकेत येऊन अतिशय यशस्वी झाले, ते त्यांनी अंगी बाणवलेल्या चिवटपणामुळे. तेव्हा पंजाबच्या अफाट हिरव्या शेतीचा आणि दक्षिणेच्या द्रविडी संपत्तीचा माज करणाऱ्यांनो, सावध असा. असे न होवो, कि तुम्हालाच तुमच्या मधून मराठी लोकांना वेगळे काढणे अशक्य होवून बसेल!





10/21/13

तयाचा वेलू...

माझं बालपण गेलं, ते घर एका परीने अमेरिकनच म्हणायला हवं. तिथे “दिसतं तसं नसतं” चे अमेरिकन नियम अगदी १००% लागू होते. अमेरिकेत कसं, driveway मध्ये park करतात, नि parkway वरती गाडी चालवतात. हायवेवरून Exit करतांना तुम्ही खरं म्हणजे कुठल्यातरी गावात enter करत असता, तुमच्या “cousin” ची मुलं सुद्धा तुमची “cousins” च असतात.....

माझ्या लहानपणी, आमच्या घरातही अगदी तसलाच प्रकार होता. बैठकीच्या, “मधल्या खोलीत” रात्री सोफे बाजूला करून आम्ही गाद्या घालायचो, आणि कोपऱ्यातल्या एका बेडरूमला मात्र “classroom” बनवून तिथे माझे आजोबा इंग्रजीची शिकवणी करत असत. दुसऱ्या बेडरूमला आम्ही चक्क dressing room म्हणायचो, कारण तिथे आंघोळ झाल्यावर तयार व्हायचे असायचे हे एक, आणि गणेशोत्सव, शारदोत्सव, महिला मंडळ, नागरिक मंडळाच्या अनेक कार्यक्रमांची green room सुद्धा तीच होती. करता काय? “टिळकनगर” मैदानाच्या काठावरच आमचं घर पडायचं, त्यामुळे भोज्यासारखं तिथे डोकावूनच शेजारी-पाजारी पुढे जात.

दारं नि खिडक्या तर त्या घराला इतक्या होत्या, की “सातशे खिडक्या नऊशे दारं” हे गाणं आपल्याच घरावरून तयार केलंय, असं मला नेहमी वाटायचं. पुढच्या अंगणातून आत गेल्यावर नावाला सुद्धा “दार” म्हणून नव्हतं. फक्त एक जाळीचा वऱ्हांडा, नि त्याला जोडून जो पॅसेज होता, त्यातून थेट स्वयंपाकघरातल्या ओट्यापर्यंत नजर जाई. म्हणजे नको तिथे दारं, नि हवी तिथे ठेंगा!

पण त्या घरातली माणसं तरी कुठे कुणाच्या “व्याख्येत” बसणारी होती? मी ज्यांना “आजी-आजोबा” म्हणते, ते खरं म्हणजे माझे आत्या-आतोबा होते. माझी खरी आजी फार लवकर वारल्यावर तिनेच बाबांना मोठे केले, म्हणून मग तीच “आजी” झाली. अहो, आमचा कुत्रा “लालू” हा सुद्धा खरं म्हणजे आमचा कुत्रा नसून वाट चुकून आला, नि घरचाच झाला. तर मग त्याच नियमाने, “माझ्यासारख्या “शाण्या” मुलीचा एवढा खोडसाळ छोटा भाऊ नक्कीच नसेल, नक्कीच आई-बाबांनी हॉस्पिटलातून चुकून दुसराच उचलून आणलाय, असंही माझं पक्कं मत झालेलं होतं J

कोण-कुठल्या-देश-वेष-रंगरूप-भाषांच्या विविध लोकांना सामावून घेणाऱ्या अमेरिकेसारखंच ते घर, देशस्थ असो वा कोकणस्थ, मराठे असोत वा मारवाडी, सगळ्यांचंच घर झालं. रक्ताची “खरी” नाती फारशी उरलीच नसतांना, ह्या “मानलेल्या” भाऊ-काका-बहीण-मुलीच्या नात्यांत मात्र अजूनही ओलावा आहे, हक्काची माया आहे. अशी वर्ष सरली, नि पाखरं बाहेर पडली, तसं मला अजून एक सत्य समजत-उमजत गेलं.......
की आपण हे जे “आपलं” म्हणतो, ते घरच खरं म्हणजे “आपलं” नाहिये.
मोगऱ्याच्या सुवासाचं घर
आंब्याच्या रसाचं घर
टिक्करबिल्ला खेळण्याचं घर
लिंबोण्या वेचण्याचं घर
अंगण, ऊन, जाळीच्या कोनाड्यांचं,
गच्ची, पाऊस, वाऱ्याचं घर
कपाटं, माळे, कोठीही भरून
उरलेल्या पसाऱ्यांचं घर...
ते घर आमच्यासाठीच बनलं असावं, कारण गेल्या ३५ वर्षात त्याचे खरे मालक कधीच तिथे राहिलेही नव्हते. आमचं झालं, नि ते हळूहळू भरलं, आमच्यासाठी ते बदललं. त्यातल्या खोल्यांनी आपले रंगच नव्हे, तर रूपही पालटले. आजोबा गेल्यावर त्यांच्या खोलीतल्या भिंतीवर ज्ञानेश्वर महाराजांच्या बाजूला चक्क मायकल जॅकसन येऊन बसला. पण आम्ही पाखरे उडालो, त्याच सुमारास आमच्या कुटुंबावर ते घरही सोडायची वेळ आली. घरमालकांनी तिथे फ्लॅट बांधायचे ठरवले होते!

ऐकून डोळे भरून आले, आणि “माहेर” म्हटल्यावर आता दुसरी कुठली वास्तू डोळ्यासमोर आणू म्हटली तरी आणता येईना. पण नाईलाजाने बाहेर पडलो. माळे, गाळे रिकामे झाले, पण आमच्या आठवणींचे हजारो काजवे अजून त्याच अंधाऱ्या खोल्यांमधून चमचम करत असतील असं मला वाटत राहिलं... काही दिवसांपूर्वी आई म्हणाली, “जुन्या घरच्या शेजारच्या काकूंकडे हळदीकुंकू होतं गं. गेलो, तर घर आपलं बंजर भूतबंगल्यासारखं दिसतंय. तण वाढलं, मोगऱ्याचे वेल पार जळून गेलेत...” आईचा आवाज हळवा झाला.

समोरच्या जाळीवर दोन्हीकडे नक्षीची कमान काढल्यासारखे ते भरघोस वेल डोळ्यांपुढे आले. त्यांचा सुवास मनात दरवळला. आणि त्याच सुमारास, इथे न्यू जर्सीतले आमचे मावशी-काका, त्यांचे अनेक वर्षांचे घर विकून एल. ए. ला स्थायिक व्हायला निघाले. पॅकिंग, नि टाकून द्यायच्या सामानाची आवराआवरी करायला आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. पुन्हा माझ्या मनाने, मागच्याच दु:खावरची खपली काढली. पुन्हा रिकाम्या भिंतींना सामोरं जावं लागणार होतं.

आणि तेवढ्यातच, काकांनी माझ्या हातात मोगऱ्याची छोटी कुंडी ठेवली. “ह्याच उन्हाळ्यात आणलाय हा! त्याला दोन-चार फुलंही आली... मोठ्या कुंडीत लावून बघ, टिकतोय का.” मी अवाक्! त्या घरचा मोगरा, ह्या रूपात इथे आला माझ्यासाठी? तिथल्या आठवणींचा दरवळ आता मी इथे जपावा म्हणून, त्याला पाणी घालायचा वसा मी इथे घ्यावा म्हणून! त्या घराने, त्यातल्या माणसांनी दिलेल्या मायेचा सडा इथे पडावा, नि वाढावा म्हणून!

बघता बघता मीच मग मोगरा झाले. टपटप करीत मोत्यांच्या सड्यातून अंगणात उतरले, हरवलेला सुगंध अंतरात गवसल्यावर घमघमले. कुणी रूजविला, कुणी शिंपिला, तयाचा वेलू, गगनावरी गेला!


5/16/13

पुस्तक वाचतांनाचा तू

पांढऱ्या शुभ्र मोकळ्या फुसफुशीत भातावर दाणेदार मुगाच्या दालफ्रायचा पिवळा रंग, आणि त्यावर खपून केलेली कुर्कुरीत हिरवी भेंडी वाढली, तरी तुझं लक्षच गेलेलं नव्हतं.
ते बघून माझा थोडा विरस झाला, पण छान जेवण काय मी अन्नपूर्णा द्रौपदीप्रमाणे फक्त दुसऱ्यांसाठीच केलेलं नव्हतं, म्हणून मी त्या चवींमधे गुंग झाले.

हल्ली हे असंच होतंय पण. बोलायला काही फारसं नसतंच. त्यामुळे तू तुझ्या विश्वात नि मी माझ्या. पण तरीही, हे लक्ष नसणं वेगळंच होतं. खाण्याच्या आवडीपलिकडे काहीतरी तुझ्या डोक्यात शिजत असलेलं तुझ्या हातातल्या पुस्तकातून मला दिसत होतं. एरवी जेवतांना आपण ए.आर रहमान ऐकतो, किंवा कधी पावसाळी हवा असेल तर किशोरकुमार, तर आज हे कोण पियानोवर सूर नाचवतंय?

"Keith Jarret." फक्त येवढंच बोलून तू पुन्हा पुस्तकात डोकं खुपसलंस.
आता मला जरा वैतागच यायला लागलेला होता. तो अगस्त्य सेन तुझ्या ऑलरेडी तिरकस डोक्यात थैमान घालतोय म्हणजे साध्या गोष्टींवर तुझे विचार भन्नाट वेगाने वळत-वळत पळत असणार आणि त्या वेगात माझ्या शुद्ध मराठी भाषेचा आणि त्या क्षणी मला पडलेल्या प्रश्नांचा भोंगा तुला अजिबात ऐकू येत नसणार म्हणजे मला एकदम तुझ्यामागून त्या पुस्तकात शिरावं आणि तुला हात धरून खेचून बाहेर काढावंस वाटायला लागलं होतं. किंवा त्या पुस्तकात तुझ्याच चाललेल्या पानात उडी मारावंसं.

मग मी आशाळभूतपणे, "मी तुला read aloud करून सांगू?" असं विचारलं, पण तुला तो मानसिक बदलही तेव्हा नकोसा होता, मग मी पुन्हा तुझ्या वाचणाऱ्या मख्ख चेहऱ्याकडे बघत बघत आपली दालफ्राय चमच्याने संपवून टाकली. त्या पुस्तकापायी मला जेवणाची चवही आली नाही. शी - stupid.

पण हे असं आजच नाही झालंय. ते पुस्तक तिथे टेबलवर धूळ खात असो वा पोराच्या खेळाच्या बादलीत वेडवाकडं मुडपून पडलं असो, मला काही त्याला हात लावायला फुरसत नव्हती, आणि फुरसत मिळेल तेव्हा त्या येड्या अगस्त्य सेनच्या डोक्यात शिरण्याची काहीएक गरजही वाटत नव्हती.
पण परवा पुन्हा, आपल्याकडे आलेल्या पाहुण्याच्या देखत, जेवता जेवता, गप्पांतूनही तुझी त्या पुस्तकावर थबकणारी नजर बघितली आणि मला कळलं....

कोणे एके काळी मीपण ते अनुभवलं होतं. जरी त्याला आता काळ लोटला तरी, ते विसरता येणं मला शक्य नव्हतं. ते महिनोन्महिने एकाच  पुस्तकात राहणं. त्याच्या जगात वावरणं. त्यातली माणसं खऱ्या पुढे बसलेल्या माणसांपेक्षासुद्धा खरी वाटणं. त्या जगाच्या नजरेने आपल्या जगातल्या विसंगती दिसणं.

हे सगळं सगळं मी अनुभवलं होतं. खूप पूर्वी.
पण आता नाही.
उद्या त्रिकोणी पापुद्रे सुटणाऱ्या खरपूस पराठ्यावर लाल-हिरवा टोमॅटो-मिरचीचा साल्सा आणि वर किसून चीज घालून व्हेज फ्रॅन्की करायचा माझा बेत होत.

कोणी म्हणतं, ह्या फेसबूक-इमेलच्या जमान्यातला माणूस अधिक एकटा आहे. पण आता मी विचार करते- पुस्तकांच्या जगातला माणूस? तो ही तितकाच एकटा नव्हता का?





10/29/10

जजमेंट

प्रत्येका कडे पहिल्या डावात १०-१० पानं. हुकुम ठरलेलाच असतो. बदाम.
वडील: "हुकुमाची ३ पानं आहेत, पण त्यातलं एक जरा हलकं. आणि चौकटचा राजा. आपल्याकडे सगळ्या रंगाची पानं असल्यामुळे तसा राजाचा हात व्हायला हरकत नाही. तरीपण, इकडचे तिकडचे सोडून २ च हात सांगावे. नेहमी पदर पाहून पाय पसरावे. नजर आकाशावर, आणि पोच फक्त खिडकीपर्यंत, त्यापेक्षा नकोच ते! अडी-अडचणीला, सणा-सुदीला पैसे लागतील म्हणून जपून जपून शिल्लक टाकायची आपली सवय! ती ह्या नवीन पिढीला काय कळणार?"
नवरा: "ह्या! तुम्ही आग्रह केला म्हणून हे असले फालतू खेळ खेळावे लागतायत." असं आधीच म्हणून टाकलं, की कितीही हात होवोत, न होवोत, उगीच विचार करायचं काम नाय. आता सगळ्या घोड्यांवर थोडी थोडी इस्टेट लावून टाकली, की एखादं तरी घोडं जिंकेल, तश्या ह्या ४ भारी पानांपैकी ३ तरी हात होतील, झालं सांगून टाकावं. मग इतरांचे डिसिजन होईपर्यंत हळूच iphone :)"
आई: "आई म्हटलं की सगळ्या गोष्टींवर प्रेमच करावं लागतं. मुलाबाळांवर प्रेम, आता सुनांवर प्रेम, एवढंच नव्हे, तर भाजी पाल्यावर प्रेम, साड्यांवर प्रेम आणि पत्त्यांवरही प्रेमच. मगाशी नेमका माझा एक्क्याचा हात कापलान सुनबाईने. आपणही त्या एवढ्याशा हार-जीतीवर किती हीरिरीने अडून बसलेलो होतो! शेवटी सगळे हात मोजायला लागल्यावर मी फेकून दिलं ते कापलेलं पान, आणि झालेच माझे बोलल्याप्रमाणे २ हात. तर काय? परवा ५-३-२ खेळत होतो, तिने २ हात काय ओढले माझे- तेव्हाही इतकं लागलं मनाला... ह्यावेळी नाही हं. करूनच दाखवीन ३ हात, तर मज्जा येईल.
इतकी वर्ष हातात एकच धड पान असलं, तरी त्याच्या भरोशावर अगदी १० माणसांचा नाही, पण ४-५ जणांचा संसार चालवतांना कशी जिवाची तडफड झाली, हे आजकालच्या मुलींना नाही कळायचं. त्यांना स्वत:चे हात करून हातभार लावता येतो म्हणून टिमकी मिरवतात... पण आधी रोजच्या भाजीत मीठाचा अंदाज येत नाही अजून, आणि चालल्या जजमेंट खेळायला! आता मात्र मी ठरवलंय. मन म्हणेल तसं जगायचं. आधीही सासूच्या राज्यात आम्हीच मन मारलं, आणि आताही सुनेच्या राज्यात आम्हीच का म्हणून मारायचं? हं. माझे दणकून लिहि रे ४ हात.!"
माऊ: "सध्या माझे मज्जेचे दिवस चाललेत अगदी. दादा-वहिनीने अमेरिकेतून amazing कपडे आणलेत, आणि कॉलेजला सुट्टी असल्यामुळे नुसते पार्ट्यांना, आईसक्रीम खायला जातांना ते अगदी perfect होतायत. परवा शीना म्हणाली, "ए तुझ्या दादा-वहिनीला सांग ना माझ्यासाठीपण next time स्वेटशर्ट आणायला! मी पैसे देईन इथे." मनात म्हटलं, हो, सगळ्यांसाठी आणायला बसलेत माझे दादा-वहिनी रिकामे. प्लस, सगळ्यांनाच आणले, तर माझं स्पेशल काय राहिल त्यात?" हो हो. हातच सांगायचेत ना.......... १० पानं........ बाबांचे २-दादाचे ३ आणि आईला तर absolutely हिशोब येत नाही. म्हणजे आपण रिस्क घेऊन ५ सांगितले तरी होतीलच आपले. वहिनी गोSSड्च आहे. मागच्या डावात म्हणाली, "मार दिया जाए...?" पण सोडला माझा एक critical हात.
तसाही ५ is my lucky number. 12th चा रोल नंबर, आता माझ्या नवीन स्कूटीचा नंबर, आणि अक्षयचा बर्थ डे......इश्य......
मी: सगळ्यांनी नाही नाही म्हणता वेळ घेतलाच हात बोलायला, आणि आता सगळ्यांचे झालेत बोलून, तर माझ्या मागे घाई. सगळ्यांनी भरभरून हात सांगितलेत. एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून ह्यांच्याकडे? आणि नाही झाले, तर स्वत:च नाही, दुसऱ्यांनाही बुडवतील स्वत:बरोबर. बहुतेक तरी बुडणारी मीच एकटी असणार. त्यांच्या सारखा विचार करणं जमतच नाही अजूनही- संसाराला इतकी वर्ष झाली तरी. विचार करण्याची "कुळकर्णी" पद्धत आणि "देशपांडे" पद्धत..... असे क्लास घ्यायला हवे होते दोन्ही पक्षी लग्ना-आधी.
पानं १०च, तरी माऊ ५ हात बोललीये येडी. मागच्या डावात मी सगळे राग-रंग ओळखून शून्य हात सांगितले, तर ते ही होऊ नयेत माझे सुरळीत? हा डावच आपला नाही म्हणा. पत्ते वाटणाऱ्याला स्वातंत्र्य नसतंच, मनासारखे हात बोलण्याचं. तसेही, सगळ्यांचे विचार असे आदळतायत कानांवर चोहीकडून, की मला खरोखर, मनापासून किती हात करायचेत? तेच उमगेनासं झालंय. ओ गॉड, आता मी जितका वेळ लावेन, तितके कॉमेंट्स येतील. "किती हळूहळू काम असतं न हिचं! आंघोळीलाच तासभर लावते रोज." घ्या, आता नवरोबाही त्यात सामील. अहो, देवीजी, तंद्रीतून बाहेर या ना आता....."
हं. शून्य. पुन्हा शून्य? हो. पुन्हा शून्य. आता खेळ संपेपर्यंत शून्यच फक्त. फारसा विचार करावा लागत नाही शून्य बोललो की. पानं जाळत बसायचं आरामात. खेळलोच नाही असं तर होणार नाही....
मग एकदा मज्जा करायची. चांगली पानं आली तरी शून्य. आणि कसे बुडतील सगळे गंमत बघायची. थोडा थोडा आनंद चोरायचा. The one who laughs at last....


10/27/10

ओळख


एकदा ना, एक साधूबाबा होते. ते रोज सकाळी गावातल्या रस्त्यावरून नदीकडे स्नानाला जायचे. आणि रोज एक दुष्ट माणूस आपल्या घराच्या गच्चीवरून त्यांच्यावर कचरा फेकायचा, त्यांना शिव्यांची लाखोली वहायचा. एक दिवस तरी हे साधूबाबा चिडतील, वैतागतील, आणि मग आपण त्यांची मजा पाहू अशी लालसा त्याच्या मनात होती. पण साधूबाबांची मन:शांती एकदाही ढळली नाही. ह्याने कचरा फेकला, की ते शांतपणे जाऊन पुन्हा स्नान करून येत. ह्याने शिव्याशाप दिले, तरी त्याच्याकडे बघून सदैव स्मित करीत.
आपण काहीही केले, तरी साधूबाबांवर परिणाम होत नाही, असे बघून मग एक दिवस ह्याला उपरती झाली. त्यांच्या पायावर लोळण घेऊन ह्याने विचारले- "बाबा, मी तुम्हाला एवढा त्रास दिला, तरी तुम्ही कधीही माझ्यावर संतापला नाहीत. हे एवढं चांगलं वागणं तुम्हाला कसं जमतं?" तर बाबा म्हणाले, "अरे सोप्पंय ते. तू मला शिव्या दिल्यास, त्रास दिलास, पण तो मी घेतला कुठे! त्यामुळे तो मला झालाच नाही."

ही गोष्ट मला परवा आठवली, आणि आरशात स्वत:चाच चेहरा बघून दचकायला झालं. लहानपणचा निरागस चांगुलपणा, परीकथांवर विश्वास, मनाचे श्लोक पाठ करणेच नव्हे, तर त्यातले "संस्कार" मनापासून पाळणारं ते माझं भारतीयत्व होतं, की फक्त कोवळं वय? बालपणातला तो देवत्त्वाचा अंश होता, की एका सुरक्षित, स्वप्नाळू बालपणाची झापडं?

आता संसारात, सासूरवासात ऐकून घ्यायला लागणारे निरर्थक टोमणे, न पटणाऱ्या अपेक्षा, रोजचे अनाहूत सल्ले ह्यांना तोंड देतांना का आठवत नव्हती मला त्या साधूबाबाची गोष्ट?
"तुम्हा आजकालच्या मुलींना संसाराची आवडच नाही!"
" नवऱ्याला अरेतुरे करता, तिथेच सगळं बिघडतं"
" सकाळी लवकर उठून कशी झटझट कामं झाली पाहिजेत."
" हे झिपरे केस, डोक्याला ना टिकली, ना गळ्यात मंगळसूत्र! ह्या आमच्या मुली-सुना म्हणायची लाज वाटते."
" देवाजवळ रोज दिवा तरी लावत जा- बाकी काही नसेल."
" एवढ्या सुखात रहाता, तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम असतात? ३-४ च महिन्यांसाठी काय तो सासुरवास. अमेरिकन सून ही चालली असती की मग आम्हाला."
" दोघांपैकी एकाने (म्हणजे बायकोने) ऐकून घ्यायलाच पाहिजे. नाहीतर तुम्ही रात्र अशीच भांडणात घालवणार!"

मी साधूबाबा असते तर माझ्याही अंगावरून ओघळून गेल्या असत्या ह्या गोष्टी. पण मग मीच एक का म्हणून भगवे घालून चांगुलपणाच्या वाटेवर कुचुकुचु काटे टोचून घेत चालायचं?" रांगोळ्या घालण्यापासून पुरणपोळी असो, की स्तोत्र असोत, सगळ्या सो कॉल्ड संस्कारांचं बाळकडू माझ्या सुदैवाने मला मिळालं, आणि ते मनापासून आवडत ही होतं.
फरक फक्त येवढा, की माझ्या संस्कारांचा उगम शिक्षणात होता, विश्वासात आणि समर्पणात नव्हे. मोठ्यांनी "हे कर" सांगितलं, की ते करायचं, इतक्या सरधोपट आणि विचारहीन पद्धतीने मी ह्या गोष्टी आत्मसात केल्या नव्हत्या.

चांगलं वागणं नेहमीच जास्त कठीण असतं. लहानपणी तसेही फारसे कलह आपल्या आयुष्यात नसतात, म्हणून ते सोप्पं वाटत असतं. पण आता तेच सालस विचारही "कर्तव्याचा" काटेरी मुकुट घालून पुढे येतात, तेव्हा मनावर ओरखडे उठणारच!

पण मग भारतीयत्त्व, साधूबाबा, चांगुलपणा, हे सगळे आदर्शवाद मी गुंडाळून माळ्यावर टाकले, आणि आधुनिकतेच्या धर्मातला पहिला धडा उघडला- प्रॅक्टिकली विचार करायला लागले. पण खरं म्हणजे आपण साधूबाबांसारखं व्हायचं, ते आपल्या मन:शांती साठी, हे सोप्पं लॉजिक लावलं, आणि प्रश्न सुटला. बोलणं सोप्पंय, वागणं अवघड, पण आता ते तसं का वागायचं, हे तरी कळलंय. आरशातल्या चेहऱ्याची, त्यातल्या बदलांसकट ओळख पटलीये.




1/29/09

कंप्यूटरने आयुष्य...

"कोहम" प्रेरणेने.......
केवळ गाडी चालवतांना झालेला कंप्यूटरचा विरह सहन न होऊन, घरी आल्या आल्या चहातल्या बिस्किटाबरोबर कंप्यूटर चघळत, तिच्यासाठी हिऱ्याच्या कुड्या आणल्याच्या आवेशात
तो: ए लवकर इकडे ये- मी तुला एक गंमत दाखवतो!
ती: मागच्या वेळी तुझी गमतीची व्याख्या म्हणजे बिकिनीतली सूपरमॉडेल होती. त्यामुळे सध्या मी पोळ्यांवर चित्त एकाग्र करतेय, तेच बरं.
तो: अगं नाही, ही खरंच एकदम सूपर गंमत आहे- आणि बघ मी तुला करून देतो... हे गूगलचं "रीडर" म्हणजे काय कमाल आहे- तुला रोज वाचायच्या असलेल्या, जगभरातल्या, अख्ख्या मायाजालावरच्या सगळ्याच्या सगळ्या वेबसाईट इथे ह्या गूगलच्या एकाच पानावर मिळतील...हा शोध मला आधीच लागला असता तर!
ती: (बुद्धाने ज्या निर्विकारपणे राग-द्वेष-मोह-दु:खाचा स्वीकार केला, त्या निर्विकारपणे): ह्म्म्म्म्म्म्म.
तो (तिच्या निर्विकारपणाने अधिकच चिरडीला येऊन): अगं हे मायाजाल म्हणजे अलिबाबाची गुहा आहे- ह्यात काय काय रत्न दडलियेत... (मग पुन्हा, हुकमी एक्का चालवल्याच्या आवेशात) आता मला सांग- मागच्या महिन्यात आपला किराण्याचा खर्च काय झाला?
ती (ते माझं काम नव्हे - असं मनात घोळवत): ह्म्म्म
तो: हा माझा ऑनलाईन हिशोब सांगतोय की आपण चक्क ४०० डॉलर किराण्यात घालवले. No offense, पण आपल्या घरी काय पंचपक्वान्नांचं साग्रसंगीत जेवण रोज असतं असंही नाही!
ती (आता कधी तो सीमारेषा ओलांडतो, आणि कधी आपण क्षेपणास्त्र चालवतो, ह्या ईर्शेने): अच्छा- म्हणजे तुला आज वरणभाता ऐवजी पुरणपोळी चालणारे का?
तो (जे लोणच्याने जमत नाही, ते लोण्याने होतंय का अशा विचारात): अगं असं नाही. पण हेच बघ. तो अक्षयकुमारचा नवीन पिक्चर निघाला- त्याची तिकिटं ऑनलाईन अर्ध्या किमतीत मिळतायत. जायचं का मग?
ती (त्याचाच डाव त्याच्यावरच उलटवत): त्यापेक्षा YouTube वर येईलच ना फुकटात- तेच बघूया!
तो: तेच तर म्हणतोय मी- की आपल्याला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे, त्यांची माहिती मिळायला नको का? तू तुझ्या सगळ्या साळकाया-माळकायांना Twitter वर बोलाव- म्हणजे पिक्चरपासून रोटी-मेकरच्या नवीन मॉडेलबद्दल तुला लगेच बातम्या कळतील......
ती( ८वीत असतांना फ्रीज, टीव्ही, मिक्सरपासून फोन, गाडी, कंप्यूटर, वॉशिंगमशीन- ह्या गरजा की सोयी? अशा अर्थाचा निबंध लिहिला होता, त्याचा पुनर्विचार करत): अरे उत्क्रांतीवादात माणसाची शेपूट गळाली, ती गरज होती की सोय, की चक्क एक hobby? !!
तो(नेमकं तिचं म्हणणं काय आहे, हे कधीच कळत नसल्यामुळे वैतागून): पण वॉशिंगमशीनमधून धुण्याचं सायकल संपलं, की तुला ट्विटरवर अपडेट येईल बघ!
ती (आडून आडून वार करण्याचा कंटाळा येऊन, सरळ हल्याच्या पवित्र्यात): अरे पण ते कपडे आपोआप जाऊन पडत नसतात ना तिथे! बा पामरा- नुसतं कंप्यूटरवर बसून आयुष्य चालत नसतं. काल पुढच्या दाराची कडी बिनसलिये. त्याचं काय करणारेस कंप्यूटरवर?
तो (पटकन उत्तर सुचल्याचा जल्लोष करत): आपल्या Maintenance वाल्याची वेबसाईट असेलच ना- तिथे ऑनलाईन कम्प्लेंट नोंदवतो आत्ताच्या आत्ता- बोल- काय म्हणणं आहे तुझं ह्यावर?
ती (निकराने): पण स्वत: उठून तु कधी साधा बल्बही बदलू नकोस- त्यासाठी, किंवा चहा, पोळ्या, कपड्यांच्या घड्या घालायला ऑनलाईन काही सॉफ्टवेअर मिळतंय का बघ.
तो (निर्वाणाची दीक्षा नुकतीच मिळाल्याप्रमाणे, थोड्या सात्त्विक, थोड्या विस्मयचकित स्वरात): ह्म्म्म. मी झालोय खरा कंप्यूटर-ऍडिक्ट.
आणि मग.....................................................
तो लगेच संगणकपेटी बंद करून, तत्परतेने उठून, टीव्हीपुढे समाधी लावून बसतो.....................

10/30/08

ओवाळणी

असं का होतं? जे खरंच, अगदी मनापासून लिहायचं असतं, त्याच्याच साठी शब्द का सापडू नयेत? दु:खाबद्दल लिहणं सोपं असतं म्हणतात, पण दिवाळीच्या प्रकाशाने उजळलेल्या मंगल संध्याकाळच्या आनंदाबद्द्ल कसं लिहावं?

काल पाडवा झाला. घरी दोघंच होतो, आणि इथल्या नियमांमुळे पणत्यांऐवजी टी-लाईट्स लावले, दिव्यांची माळ सोडली, आणि थंडीत कुडकुडत सूप पीत बसलो! ह्यावेळी खरं भारतात जायचं होतं, पण नाहीच जमलं- आणि तेंव्हा वाटून गेलं- आधीची मी असते, तर "घरची" आठवण काढून बादल्या बादल्या रडले असते- पण आता, हे आमच्या दोघांचं विश्व किती सुबक आणि सुरक्षित वाटतंय! लाडू चिवड्याचे बकाणे भरतांना एखादी आठवण ताजी होते, तेवढीच. बाकी हा वर्तमान, त्या दिव्यांच्या मंद ज्योतीसारखा इथल्या कडाक्यातही अखंड तेवतो आहे. त्याचीच ऊब सगळीकडे आमच्या Central Heating सारखी पसरली आहे!

दिवाळी म्हणून ना सुट्टी होती, ना कुठे जाण्याची लगबग. तर मग ikea तून नुकतं आणलेलं फर्निचर जोडत बसलो. काडीकाडी जोडून पक्षी घरट्यात संसार मांडतात म्हणे- आम्ही आपले power screwdriver आणि ikea manual घेऊन सज्ज झालो. माझ्या साठी एक workstation बनवायचं होतं. माझी हौस म्हणून सरळ दोन मोठ्या bookcases न घेता, एक निमुळती, एक रूंद, अशी मांडणी करता करता पाठ तुटायला आली, पण घर जरा लागल्यासारखं झालं.
एरवी कुरकुर करणारा नवरा, आज निमूट घाम गाळत होता, ते पाहून मलाच कसंतरी झालं.

मग मी नवऱ्याला म्हटलं, "चल, तुला ओवाळते, आणि होहोबा (jojoba) तेलाने मसाज करते मस्तपैकी. मग तू आंघोळ करायची तर कर, नाहीतर उद्यापर्यंत मुरू दे...!"
अगदी सोफ्याखाली रांगोळी काढण्यापासून दोघंच होतो तरी कपडे बदलण्यापर्यंत छान तयारी केली. मी ओवाळतांना म्हटलं, "मग काय आहे माझी ओवाळणी?"
"आता येवढं सामान घेतलं, घर तुझ्या मर्जीने सजवलं, तरी पुन्हा ओवाळणी मागतेय बयाबाई!" असं उत्तर ऐकायला कान अगदी सरावले होते, तेवढ्यात...
"मी काहीच जास्ती देऊ शकत नाहिये तुला पाडव्याला, फक्त Dunkin Donuts मधून कॉफीसाठी हे घे!" अगदी चेहरा पाडून त्याने मोजून दोन डॉलर माझ्या ताम्हनात टाकले. बहुतेक स्वारी घरी येतायेता पाडव्याबद्द्ल पार विसरली असावी. करोडोपती झालास तरी कॅश साठी बायकोकडे हात पसरायचे- नेहमीची सवय. त्यामुळे पाकिटात जेवढे होते, त्याने भागवायची वेळ आली होती.

त्या क्षणी त्याचा गोडूला बिच्चारा चेहरा बघून जे माझ्या पोटात कालवलं, ते शब्दात पकडायचा खूप प्रयत्न केला- नाही जमलं. मी सरळ त्याच्या गळ्यात गळाच टाकला, आणि एकच शब्द सुचला, "कृतज्ञता". किती मागतो आपण आयुष्याकडून, आणि मला आजवर ते सगळंच मिळत गेलं. सहजच. कधीकधी, न मागताही! कधीकधी मागायच्याही आधी.

किती गृहित धरतो आपल्या अपेक्षा, आणि त्या अपेक्षांची पूर्तीही! पण कधीच का सांगू शकत नाही येवढ्या आनंदाबद्द्ल, की ज्याने डोळे भरून येतात- अगदी दिवाळीच्या दिवशीही???
तो मिळाला, त्या क्षणीच माझी ओवाळणी तर मला मिळाली होती!

...................................

मग आम्ही जोडीने भेंडीची भाजी आणि फ्रोझन पोळ्या जेवलो, आणि सोफ्यावर बसून जोडीने निवडणूक-विशेष बघायला लागलो :) :) :)

8/11/08

उलटी अमेरिका

आज कित्येक वर्षांनी पुन्हा
आई-बाबांचा हात धरून
उत्साहाने गेले फिरायला.
फक्त,
आज मी गोष्टी सांगतेय,
ते ऐकतात, कौतुहलाने!
मी रस्ते दाखवते,
ते येताहेत मागून
ह्या नव्या जगातली प्रत्येक गोष्ट
लहान मुलांच्या डोळ्यांनी
मनात साठवत....
“अय्या! इथे दारं उलटी, दिव्यांची बटनं उलटी,
गाड्या तर उलट्या धावतातच!”
“छे, इथल्या भाज्यांना चवच नाही मुळी!”
“बाSSSSSपरे! येवढ्या मोठ्या पार्किंग लॉट मधे, गाड्या फक्त तीन?”

------मीच बोलले नव्हते का ही वाक्य,
अमेरिकेतल्या माझ्या पहिल्या वहिल्या दिवशी?

पिढ्यांचं चक्रही, ह्या उलट्या अमेरिकेने उलटंच फिरवलंय की!
“तुम्हाला पोरं झाली की कळेल...” हे त्यांचं टिपिकल वाक्य.
“तुम्हाला इथे राहून थोडे दिवस झाले, की कळेल....” हे माझं.

मॉलमधे कपड्यांवरची लेबलं बघून
त्यांचे भांबावलेले चेहरे बघतांना
दाटून आला गळा-
वाटलं, त्यांनीही करावा माझ्याकडे हट्ट-
स्वेटर, घड्याळ, मोत्याची माळ
पर्स घेऊन देण्याचा.....
पण ३ डॉलरच्या कॉफीतच होतात शेवटी त्यांचे लाड
तेव्हा कळते त्यांची धडपड-
आपल्या बालपणीच्या लाखो मागण्या पूर्ण करायची!

कधीकधी होतातही वाद,
“तुम्हीच अमेरिकन झालात, तर तुमची पोरं कसली मराठी बोलणार?”
-----“पण त्यांनी मराठी बोलावं, हा अट्टहास का तुमचा?”
“आपण नायगराला पराठे घेऊन जाऊ...”
------ “ह्म्म....तुमच्या चवी काही बदलायच्या नाहीत!”
“इथे तुम्हाला माणसांचंच वावडं आहे!”
-------”हो, तिकडे शेजाऱ्यांना चांभार चौकशा असतात, त्यापेक्षा हेच बरं!”

पण आतून कधीतरी आपणही घातलेलेच असतात ना हे वाद स्वत:शी?
बर्गरला आपलं म्हणता येईपर्यंत गेलीच ना ५ वर्ष?
त्यांनीही अशीच समजून घेतली असेल ना- माझी स्वयंपाकाची नावड,
माझी नोकरीची जिद्द, मी उडवून लावलेले उपास-तापास......
साडी नेसून  दाखवण्याच्या कार्यक्रमाबद्द्ल पोटातून चीड!

आणि आज मी सांगतेय त्यांना,
की हे जे इथे असं आहे, ते तसंच स्वीकारावं लागतं.
इथल्या माणसांमधे, मिळून मिसळून रहावं लागतं- नव्हे, रहायला आवडतंही.

पण मग त्यांना विमानात बसवून आलो,
की हेच इथलं रोजचं जग अनोळखी वाटायला लागतं...
वैराण वाळवंटात येऊन पडल्याचा भास!
कसे विसरलो आपण जन्मापासून भारतात घेतलेले श्वास?
जाऊया का परत?

नकोच.
त्यांना मिळू दे आता इथे आपल्याकडे-
पुन्हा एकदा- एक निर्भर निश्चिंत बालपण.
म्हणतात ना, “लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते...”