Showing posts with label संस्कृतीचं. Show all posts
Showing posts with label संस्कृतीचं. Show all posts

4/15/19

बोडण

माझ्या लहानपणी वेटाळातल्या बायका
सतत मानगुटीवर बसून
नियमांचे उपदेश घोकायच्या
डाव्याने वाढू नको- उजव्याने काढू नको
हिला कुंकू लाव- पण तिला लावू नको!

केसांची बट आवर !
गुडघ्यांवर झगा सावर !
हरतालिकेला पत्री आण!
संक्रांतीला देऊन ये वाण !

एरवी कांदेनवमीला झुणका-भजी,
चैत्रात डाळ पन्हं मटकावणाऱ्या खादाडणी
कधीतरी प्रायश्चित्तासाठी घालणार
एक अघोरी प्रकार-
बोडण!

पितळी परातीत अन्नाचं कालवण
पुरणपोळीवर दही, दह्यावर वरण!
माझ्या सूप्त बुलीमियाचं कारण!
काल्यात एकदा हात घातला,
की जाता जात नाही पंचपक्वांनांचंही जेवण.

बायकांचे देहाला जडलेले सोस
त्यांनाच मोडून काढायला लावायचे
भोगू द्यायची नाही
ओटीपोटातल्या विवराची भूक
दुधाच्या पातेल्यावरची साय चोरून ओरबाडतांना
शमलेला त्या भुकेचा आनंद!

गोड गोबरे नि खारट खुसखुशीत
चिरोटे
फराळाची आली 
पाळी
की ह्यांचं मचामचा चावत
बोलणं कानीकपाळी -
खाखा नको- त्रास होईल !
वजन उतरवा - बास होईल !

आईस्क्रीमचा टबात बुडवणे ह्रदयभंग
अलिप्त थंडगार शिस्तीत 
लाड असे सवंग! 
आमच्या वेळी येतच नव्हते हे प्रसंग!

आताच्या पोरींना रस्त्यावरच्या चाऊमेन चा 
भरून घेता येत असेल
नाकपुडीभर श्वास
कदाचित करतही असतील त्या आता 
फक्त स्वत:साठी
रोजे. लेंट. निर्जळी उपवास.



























1/18/19

रिक्षावाला

"ए बेबी, तुझा चक्का उलटा फिरते नं!" मागून जोरात आवाज आला.

एक सेकंद दचकून मी खाली वाकून चाकाकडे पाहिलंच, पण तेवढ्यात गंगारामच्या रिक्षाच्या टपावर बसलेल्या पोरांनी खाली उतरून त्याला जोरात धक्का मारला, आणि मला मागे टाकून हुल्लड करत रिक्षा पुढे निघून गेला! मी पण जोरजोरात सायकल हाणत ओरडले, "ए गंगाराम, काहीSSS काय सांगतो? मी आता पडले असते म्हणजे!" पण गंगाराम हसत हसत "कशी घाबरली!" करत पुढे निघून गेला.

मी तोल सावरला. जुलैच्या पावसात निसरड्या रस्त्यावर नुकतीच लांबच्या मोठ्या शाळेत मी आपली आपली सायकल घेऊन जायला लागले होते. जाऊदे, तो गंगाराम आहेच आगाऊ! असं मनातल्या मनात म्हटलं, आणि पेडल मारलं. माझी सायकल पुढेच जात होती, पण बाजूनी रिक्षा जास्त वेगाने गेल्यामुळे मला खरंच पुन्हा एकदा वाटलं, "आपली चाकं उलटी फिरतायत का?" :) :) चाकं नाही, पण मन उलटं फिरून प्राथमिक शाळेत गेलं.

पहिली ते चवथीची शाळा, मोठ्या रस्त्यावर तीन चौक टाकून होती, म्हणून आम्ही ७-८ वर्षाचे ५-६ फटाके आणि टिकल्या (मुलंमुली) गंगारामच्या सायकलरिक्षातुन शाळेत जायचो. गंगारामच्या मस्कऱ्या स्वभावाने आमची फारच करमणूक व्हायची, पण दप्तर लटकावताना मधेच जर त्याने एका मुलीची वेणी ओढली, दुसरीचा रुमाल पळवला, तर आम्हा मुलींची अस्मिता दुखावली जायची आणि आम्ही जोरात ओरडायचो. आता मी मोठी झाले, असं मला वाटलं होतं, पण मागून येऊन गंगारामने खोडी करायची ती केलीच! मला हसू आलं.

माझ्या तिप्पट चौपट वयाच्या गंगारामला आम्ही ७-८ वर्षापासूनच "ए गंगाराम" च म्हणायचो, कारण माणूस हा असा विनोदी. "अहो गंगाराम काका" वगैरे म्हणायचं, हे पण कधी सुचलं नाही, आणि कोणी शिकवलंही नाही. सगळा बेभरवशाचा कारभार, आणि रोज वेगवेगळ्या वेळी अवतारायचा नेम! :)

सकाळी सकाळी ७:०० वाजता तयार होऊन अंगणात दप्तर घेऊन उभं राहायचं, तरी सव्वासात पर्यंत ह्याचा पत्ता नाही. कि मग समोरच्या अंगणातून चित्रकाकूचा मुलगा ओरडायचा "आज गंगाराम येत नाही वाटतं!" मग धावत धावत टॉयलेटचं दार वाजवायचं, "बाबा, गंगाराम येत नाही, लौकर करा, शाळेत सोडायचं आहे." आणि नेमकी तेवढ्यात बाहेर घंटी वाजणार. कळकट शर्ट, तारवटलेले डोळे, दाढीचे खुंट वाढलेले, नाकातून सूं सूं पाणी येतंय, अशा अवतारात गंगाराम उभा. "बेबी, पायलीवाली खांडेकरनी लेट केला नं!" असं म्हणायचा, पण आजी हळूच नंतर सांगायची, "रात्री दारू पिऊन पडला असेल. तू जास्त बोलत जाऊ नको, शाळेत जायचं- यायचं.  ह्या लोकांशी कशाला जास्त वाढवा?"

पण ते काही असो, घरच्यांचा, आणि आम्हा पोरांचापण त्याच्यावर विश्वास होता, कारण बाकी तो मनाने मुलांत मूलच होता. रिक्षात बसून आम्ही धांगडधिंगा करायला लागलो, कि "ते बेबी रिक्षातून पडली नं, डॉक्टरकडे जाऊन टाकेबी पडले..." वगैरे नुसत्या कहाण्या सांगायचा, पण आम्हाला शिस्त लावणं त्याला जमणं शक्यच नव्हतं, कारण चौकात रिक्षा थांबला, कि खाली उतरून मागे "टपावर" बसायला आम्ही "टपलेले" असायचो.

मला वाटतं गंगाराम टपावरच्या दोन सीट धरूनच मुलांची भरती करत असावा, कारण त्याला झेपतील, आणि मावतील त्यापेक्षा जास्तच पोरं रिक्षात असायची. (रोज कोणीतरी आजारी, कोणी उशीरा उठलेला, कोणी गावाला गेला - म्हणजे शाळेला बुट्टी, म्हणून उरलेली रिक्षात मावूनच जातील असाहि त्याचा अंदाज असावा :-) :-) शिवाय दुसऱ्या कोणा रिक्षावाल्याची बुट्टी असेल, तर तिथलं पण एखादं चिरकूट "दयाळूपणे" आणून बसवायचा (एक्स्ट्रा कमाई नं!)

इतकी पोरं सीटवर कोंबून बसायला तयार नसायची, उलट टपावर बसायलाच भांडाभांडी व्हायची! म्हणजे आम्ही मुलं पण ह्या कटात भागीदार होतो. टपावर 'बसणं' कसलं, ते रिक्षाच्या मागे लोम्बकाळणंच होतं, पण त्यात काय थ्रिल होतं, ते अनुभवल्याशिवाय कळूच शकत नाही...सायकलरिक्षाच्या दोन चाकांना जोडणाऱ्या पट्टीवर पाय, आणि सीटच्या काठाला हाताने धरलेलं, अशी सवारी करणारी एक दोन तरी पोरं प्रत्येक रिक्षात असायचीच. जरा उंची पुरली, की सीटच्या काठावर मागून चढून उलटं बसता पण यायचं, आणि उतारावर जास्त वारं खायला मिळायचं! शिवाय, दोन रिक्षातल्या शर्यतीत पुढे जायला टपावरची पोरं मधेच उतरून रिक्षाला धक्का पण मारू शकायची. काय पण labor of love होतं आमचं!!!

पुढे पाचवी ते सातवी मात्र "भाऊ" भेटले. खरं म्हणजे भाऊ वयाने गंगारामपेक्षा पुष्कळच तरुण, पण त्यांचा आपसूक आदरच वाटायचा, कारण नियमितपणा आणि शिस्तीचं हे दुसरं टोक! रिक्षा चालवण्यातपण किती शिस्त आणि निष्ठा असावी! रिक्षा अतिशय टापटीप ठेवायचे. त्यांनी रिक्षाला गिअर्स बसवून घेतले होते, आणि दप्तरं लटकवायलाही शिस्तीत दोन्ही बाजूला हुक्स, बाजूने ऊन-पाऊस लागू नये म्हणून वेगळे पडदे! स्वतः ही अगदी कडक कपडे घालायचे! उन्हाळ्यात काळ्याशार रंगाचे भाऊ, जवळजवळ तेजस्वीच दिसायचे इतका त्यांचा रंग तुकतुकीत होता! बेसबॉल कॅप घातलीकी तर आम्ही त्यांना सांगायचो, "भाऊ, आज काय स्मार्ट दिसून राहिले!"

सायकल रिक्षात वास्तविक गादीची सीट एकच असते, त्याच्या विरुद्ध बाजूला लाकडी फळकुटच असतं. तर गंगारामच्या रिक्षात उंच सीट पकडायला आम्ही शाळा सुटल्यावर सुसाट धाव घ्यायचो, नाहीतर भांडाभांडी ठरलेली. भाऊंनी मात्र एक दिवसाआडचा नियमच करून टाकला, म्हणजे काल गादीवर बसलेल्यांनी आज खाली बसायचं! गंगारामच्या रिक्षात गादी-फळकुटात फारसा फरकही नव्हता म्हणा, कारण गादी ठिकठिकाणी फाटली होती, आणि भोकातून नारळाच्या का जूटच्या झावळ्या पार्श्वभागाला टोचायच्या :) त्या पुढे भाऊंचा रिक्षा म्हणजे आमच्यासाठी limousine पेक्षा कमी नव्हता!

रिक्षात गाण्याच्या भेंड्यापासून शाळेतलं गॉसिप आणि होमवर्कपर्यंत सगळं घडायचं, कारण रस्ते अगदी लोण्यासारखे गुळगुळीत होते. नागपूरसारखे भव्य, सरळ, रिकामे रस्ते दुसऱ्या कुठेच पहिले नव्हते. ते रस्ते, आणि सायकल-रिक्षा. दोन्ही आता कालातीत झाले.

गंगारामला "उद्या वेळेवर ये" सांगून थकलो होतो, ते भाऊंना "भाऊ उद्या येऊ नका नं, म्हणजे आई शाळेत सायकलने जाऊ देईल..." असं सांगायला लागलो... आधी रहदारीच्या रस्त्यावर डावी-डावीकडून हळू सायकल चालवत होतो, ते नंतर १०वी त शर्यती लावायला लागलो. तेव्हा कधी गंगाराम, कधी भाऊ, छोट्या मुलांना घेऊन जातांना दिसत. कधी मी त्यांना हसून हात हलवला असेल, कधी दुर्लक्षही केलं असेल, कारण तेव्हा मी मोठी झाले होते नं! टागोरांच्या काबुलीवाल्याप्रमाणे आमच्या आयुष्यात रिक्षावाला, दूधवाला, ही मंडळी होती. १०वी च्या परीक्षेचा निकाल लागल्यावर भाऊ घरी येऊन मला १०० रुपये देऊन गेले! त्यांचं मात्र मला संपूर्ण नावही कधी माहिती झालं नाही.

माझी मात्र गरज सरली, की बालपण? त्यांच्याशी बोलण्यासारखं अचानक माझ्याकडे काहीच उरलं नाही...!


 






12/15/18

हैरतों के सिलसिले

लग्न झालं तेव्हा मी डोक्याने बरी पण व्यवहारात माठ होते. सासरी गेल्यावर एखाद आठवड्याने सासूबाईंनी "आज तुझ्या हातचं जेवायचं आहे" असं फर्मान सोडल्यावर "पण मी जे करू शकते ते तुम्ही खाऊ शकाल का?" असं मी अत्यंत निर्मळ मानाने विचारलं होतं! वर अजून स्वाभिमानाची फोडणी घालून "मला कोकणस्थी गोड च भाज्या आवडतात!", असं सांगून फ्लॉवरच्या रश्यात आलं लसूण सोडा, साखर घालून सगळ्यांची तोंडं गोड केली होती. आपल्या स्वयंपाकाच्या अज्ञानाबद्दल लाज किंवा वैषम्य वाटून घ्यायचं असतं, हे हि माझ्या गावीही नव्हतं. जे शिकायला हवंय, ते आपण कधी ना कधी शिकू, त्यात काय मोठं? असा निरागस आशावाद नव्हता, तर स्वतःवरचा (कदाचित थोडा अवास्तव) विश्वास होता. अभ्यासातली हुशारी साधारण बाकी ठिकाणीपण वापरता येते, ह्याचा थोडा अनुभवपण गाठीशी होता.  :)

पण मुलगी म्हणून जन्माला आल्यावर आईबापांनी ज्या धक्क्यांपासून दूर ठेवलं होतं, तेच आश्चर्याचे धक्क्यावर धक्के  मला पुढे जगाने जे दिलेयत,त्यांना तोड नाही! लग्न थोडं उशिरा झालं (त्यांच्या मते), म्हणून "लवकर मुलं होऊ द्या!" असा सल्लाही वरातीच्या साडीबरोबरच मिळालेला, पण नवरा जास्त प्रॅक्टिकल निघाला. एका चाकाच्या गाडीपेक्षा दोन चाकाची चांगली, म्हणून त्यानं तरी लग्नानंतर शिकायचं माझं "खूळ" उचलून धरलं.

पण साधी शाळेची म्हंटली तरी पहिली नोकरीच होती ती. मी नवीन होते, देश नवीन, आणि वातावरण तर कधी न पाहिलेलं! १२ तास काम करणाऱ्या मुलींच्या डोक्यात, संध्याकाळी ६ वाजता घरी जातांना आपोआप, अंत:प्रेरणेने, "आज जेवायला काय बनवायचं?" असे विचार येत असतील तर त्या मुलींना "देवीपद" बहाल करायला माझी अजिबात हरकत नाही, पण ती मुलगी मी नव्हते. पहिली नोकरी लागल्यावर थोडी उधळपट्टी करायचा माझा पण प्लॅन होता...
पण... पुढचा धक्का वाट बघत होता. नोकरीच्या पहिल्या वर्षातून बाहेर पडते न पडते तर "आता कशाची वाट? मुलं होऊ देत!" असा घोर मागे लागला. शिवाय, आजूबाजूच्या सगळ्यांनी नंबर लावले होते, मग त्या स्पर्धेत आम्ही उरापोटी धावायला लागलो, त्या मनस्थितीत कसली होतायत पोरं?? इथवर येता येता तिशी आली, नंतर मूल झाल्यावर जरा त्यातल्या आनंदात सैलावले, तर "आता काय आयुष्यभर घरीच बसणारेस का?" -हा धक्का मात्र नवऱ्यानेच दिला (किंवा धक्का मारला, असंही असेल त्याच्या दृष्टीने!)

एकीकडे, ज्या कामाचे पैसे मिळत नाहीत, त्या कामाची कदर केली जात नाही, पण दुसरीकडे, पैशासाठी घराची गैरसोय होऊ न देण्याची शिकवण मिळालेल्या माझ्यासारख्या बायका! " लग्न झाल्यावर हळूहळू धडे मिळत गेले- कि आपलं आयुष्य हे आपल्यासाठी नसतंच मुळी...! घरासाठी, नवऱ्यासाठी, पोरांसाठी- हे झालंच तर मग उरलेलं जमेल तर आपलं म्हणायचं! संसाराच्या वाटेतले एक एक खड्डे बुजवत राहिली ती नदी, मग तिचं केवळ डबकं होऊन राहिलं. ती वाहणार कशी?

फक्त ह्यावेळी आश्चर्य नाही वाटलं, कारण जखम खोल होत होत स्वत्वाला पोखरून पार पोचलेली होती...
हैरतों के सिलसिले सोज़े निहां तक आ गाये!

एकदा वाटलं, आपली गणितंच मुळात चुकली होती... लठ्ठ पगाराच्या घरी बसून करायच्या नोकऱ्या मिळतात, ते क्षेत्र निवडायला हवं होतं. मग वाटलं, क्षेत्राचं काय? यश कधी पाहिलंच नाही, असंही नाही. आणि शेवटी ह्या निष्कर्षाला पोचले, कि थोडं थोडं सगळंच मिळवायचा हट्ट धरून बसलीस बाई, मग थोडं जे हातात आलं, त्याच बरोबर थोडं थोडं सगळंच हातातून सुटणारच ना!

परवा मात्र एका घटस्फोटाची कथा जवळून बघायचं दुर्भाग्य आलं. लठ्ठ पगाराच्या दोन नोकऱ्या, दोन पोरं, मोठं घर, सगळं असणाऱ्या दोन व्यक्तींच्या हातून प्रेम मात्र निसटलं. जगाच्या डोळ्यात आधी खुपलं काय? बाईचा नोकरीचा माज, घराकडे दुर्लक्ष, नवऱ्यावर सत्ता गाजवणं. ते बघून मात्र जाणवलं. गणित चुकलेलं नाहीये, चुकीचंच गणित आहे.

ख़ुद तुम्हे चाके गरेबाँका शऊर आ जाएगा
तुम वहां तक आ तो जाओ, हम जहांतक आ गए!

उठण्या बसण्यापासून बोलण्या घालण्यापर्यंत, मुलींच्या प्रत्येक आचार विचाराची चिरफाड करायला बसलेलं जग. त्याच चौकटींमधून उपजलेल्या माझ्या सासूबाई, आणि माझी घटस्फोटित मैत्रीण, आणि मी. तिचं संपलेलं लग्न म्हणजे स्त्रीवादाचा सर्वात मोठा पराभव आहे. "आपल्याला नक्की काय हवंय? पुरोगामी तर व्हायचं आहे, पण ते कसं व्हायचं, आणि किती झेपेल" हे न कळलेल्या पुरुषाने तो पराभव घडवून आणला आहे. पण मोलाची साथ मात्र बायकांनी स्वतःच दिली, कसल्या कसल्या चौकटींमधून स्वतःचं प्रतिबिंब बघत अस्मिता शोधत बसल्या! माझा माठपणा माझ्या चांगलाच उपयोगी पडला. नाहीतर जितपत भान आज आलंय, तितकंही आलं नसतं.


6/8/18

Say, could that lass, be I?



Sing me a song of a lass that is gone
Say, could that lass, be I?
Merry of soul she sailed on a day
Over the sea to sky

ह्या जुन्या स्कॉटिश गाण्याच्या अनेक आवृत्ती आहेत,  पण Outlander या मालिकेच्या सुरुवातीला ह्या गाण्यामुळे जे गूढरम्य वातावरण निर्माण झालं, त्याने मला खिळवून ठेवलं. एका हरवलेल्या मुलीचं हे गाणं - ती हरवून गेलेली Lass (मुलगी) मीच असेन/असू शकेन का?
Say, could that lass, be I? या ओळीतला 'could' ह्या एका शब्दाने अर्थाची छटा बदलली, आणि तिथे प्रश्न तर निर्माण झालाच, पण एक अध्याह्रत असं स्वप्नरंजन, किंवा कदाचित एखादी अबोल, सुप्त इच्छा पण व्यक्त झाली!

कधी कधी आपल्याला पण वाटतंच नं- स्वतःच्याच आयुष्यातून पळून जावंसं? पण असं, एकाएकी स्वतःला 'हरवून', एकाच जन्मात नवीन आयुष्य जगायला मिळणं, हे केवळ स्वप्नात, किंवा कादंबऱ्यांतच होऊ शकतं! म्हणून तर ह्या मालिका लोकप्रिय होतात, आणि जोरात खपतातही.

१७४५च्या जेकॉबईट क्रांतीच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा "क्लेअर" नावाच्या नर्सच्या दृष्टिकोनातून उलगडते. 
१९४५ मध्ये ब्रिटिश नर्स असलेली क्लेअर युद्धानंतर आपल्या नवऱ्याबरोबर स्कॉटलंडमध्ये येते, तिथे काही गूढ घटनांमुळे काल-पटल भेदून ती चक्क २०० वर्ष मागे भूतकाळात येऊन पडते (अक्षरशः) आणि परत आपल्या 'काळात' जाण्याची धडपड करता करता तिथल्याच घटनांमध्ये अडकून जाते!

अनेक वर्षांपूर्वी मी पण इथे, अमेरिकेत येऊन 'पडले', आणि काळ जरी तोच असला, तरी बाकी ह्या जगाचं त्या जगाशी नातं विसविशीत तंतूंनीच कसंबसं जोडून धरलेलं होतं. घरी ईमेल ने चॅट ची वेळ ठरवून घ्यायची, आणि पलीकडून मिनिटाला एक शब्द, ह्या वेगाने आई-वडील टाईप करत असले, तरी जीव गोळा करून ते वाचायचं! कारण आंतरदेशीय फोन दोन -तीन आठवड्यातून एकदा लावणेच परवडायचे! पुढे वेब कॅमेरा वगैरे आले, आता तर मिनिटा-मिनिटाला मेसेज येतात, पण तेव्हा तशी सोय नव्हती. म्हणजे अगदी देवा-ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न करूनसुद्धा, देशातल्या लोकांसाठी आपण 'मेलो' च की काय? अशी शंका मनात यायची.

क्लेअर जशी आधीच्या आयुष्यात नर्स असते, पण भूतकाळात तिच्या सवयीची वैद्यकीय सामग्री नसते, त्यामुळे मिळेल त्या वनस्पती, कापडी लक्तरं वापरून मलमपट्टी करायची तिच्यावर वेळ येते, तसं मला पण माझ्या व्यवसायाची इथे नव्यानेच ओळख करून घ्यावी लागली.

क्लेअरने शाळेत १७४५ च्या बंडाचा इतिहास वाचलेला असतो, पण त्याचा खरा अर्थ कदाचित तिला त्या ऐतिहासिक घटनांच्या वादळात शिरल्यावरच कळायला लागतो, किंवा, त्या माहितीचा उपयोग करण्याची वेळही तिच्यावर येते. तसे 'युरेका' क्षण मी पण कितीतरी वेळा अनुभवले! Robert Frost च्या कवितेतले Birches, आणि Wordsworth चे Daffodils प्रत्यक्षात कसे दिसतात, ते इथे आल्यावरच कळलं!

या जगातली नवीन जीवनपद्धती बघतांना, आधी नाक उडवून शेरे मारले, पण लख्ख, निरभ्र आकाशाखाली बोचणाऱ्या, न संपणाऱ्या थंडीचा अनुभव हळूहळू रक्तात उतरल्यावर मात्र, मी पण बदलू लागले. अनेक वर्ष भारतात 'कोरडी' साहित्यसाधना केल्यावर अचानक एखाद्या कवितेशी अनुभव जोडला गेला, तेव्हा मी पण क्लेअर सारखी पुन्हा प्रेमात पडले - माझ्या आवडत्या लेखकांच्या प्रेमात!

जर्मन भाषेत 'Ausländer' किंवा इंग्रजीतील Outlander म्हणजे शब्दशः 'बाहेरगावची' व्यक्ती. स्कॉटिश लोकांच्या लेखी इंग्रज बाहेरचे होते. स्कॉटिश प्रथा, लोककथा, लोकसंगीताशी ब्रिटिशांनी नातं सांगितलं नाही, उलट ती 'highland' संस्कृती 'मागासलेली' म्हणून मोडून काढायचे प्रयत्न केले. क्लेअर ह्या सगळ्यांपेक्षा वेगळी होती, तिने काळाचा भेद ओलांडूनही स्कॉटिश लोकांवर, तिथल्या जीवनावर प्रेम केलं, तरी ती 'बाहेरची' च राहिली का? ते मालिका/पुस्तकं वाचल्यानंतरच कळेल कदाचित.

पण माझ्या स्वानुभवाशी क्लेअरचं विश्व ह्या एका अनुभवानं जोडलं गेलं. अमेरिकेचं अनिवासी लोकांशी नातं सध्या बदलू लागलं आहे. आजवर सगळ्यांना सामावून घेणाऱ्या अमेरिकेने आता थोडं कट्टर धोरण स्वीकारल्यावर, मला, इतकी वर्ष इथे राहूनही, पुन्हा परकेपणाची जाणीव झाली का? की इतक्या वर्षाची नवलाई संपली, म्हणून जुन्या आठवणी उफाळून आल्या, आणि मलाच हे जग परकं वाटायला लागलं आहे का? Outlander मालिका पाहून हे विचार मनात आले!


5/10/17

मी अमेरिकन झाले आहे का?

मी अमेरिकन झाले आहे का?

आधी कधी हा प्रश्न स्वतःला विचारला नव्हता. तो विचारावा लागला कारण- खूप जुनी एक मैत्रीण भेटली. आम्ही लहान असतांना आमचं घर ७ खोल्यांचं आणि तिचं ४ खोल्यांचं हे तिलाच आठवलं, पण आत्ता ही तिचं घर ३ खोल्यांचं आणि माझं ५, हे पण तिला जाणवलं. तिने कौतुक केलं, माझं, माझ्या घराचं, माझ्या नवऱ्याचं, माझ्या दिसण्याचं, वागण्याचं आणि स्वयंपाकाचंही!

पण कौतुकात किती आनंद होता, आणि किती खंत? कितीशी जेलसी/असूया? जरा शंका आली, तरी मला भीती वाटली.

इतक्या वर्षांची मैत्री समतोल नव्हतीच म्हणजे! कुठेतरी वर-खाली पारडी तोलण्यात सदैव माझंच पारडं खाली राहिलं. नशिबाने मिळालेल्या घराने, रूपाने, पैशानेच का माझे गुण ही मला मिळाले होते? माझे गुण मी कितीही 'कमावले' असतील, तरी तिच्या मते ते माझ्या 'पदरात' च पडले असतील तर आमची घनिष्ठ मैत्री 'निखळ' मात्र कधीच नव्हती हे मला मान्य करावंच लागेल, त्याची मला खूप खूप भीती वाटली! ते विचार मी गेली अनेक वर्ष मनाच्या तळाशी दडपून टाकले.

म्हटलं तर माझ्या पेक्षा अनेक पटींनी तिचंच करियर नेत्रदीपक! पुढे शिकायला डिग्री उरली नाही इतकी ती शिकली, आणि दरवेळी सुवर्णपदकं मिळवत शिकली! जिथे गेली तिथे सर्वांची लाडकी झाली. आणि तरीही तिला माझी असूया? मी फक्त साधी शिक्षिका आहे, मला ना तिच्या इतके पैसे मिळतात, ना भोवती तिच्या इतके मैत्र! माझ्यापाशी कोणी आपले मन मोकळे करत नाही, आणि मी ही फार कोणावर विसंबत नाही. तिचे आईवडील आपला संसार सोडून तिच्या मुलीचा सांभाळ करायला सदैव पाठीशी उभे राहिले, पण माझ्याकडे अनेक कारणांनी तशी परिस्थिती कधीच येणार नाही.

मग असा फरक का? कदाचित गेली अनेक वर्ष अमेरिकेत स्थायिक होण्याने माझा सर्वात मोठा फायदा हा झाला की मला कुठेच कुणाशी तुलना करायची वेळ आली नाही, की सवय झाली नाही! त्यांच्याकडे मोठी गाडी, आपली लहान..... त्यांच्या दोन्ही रग्गड पगारी नोकऱ्या- माझी जेमतेम मुलाचा खर्च भागवणारी! असले विचार मी केलेच नाहीत कारण ह्या देशात माझ्या 'शिक्षकी' पेशात असलेलं दुसरं कोणी मला भेटलंच नाही, आणि जे थोडे भेटले, ते सगळे माझ्याच सारख्या परिस्थितीतून जातायत असं जाणवलं.

इथे येणारे सगळेच भारतीय (अनिवासी/इमिग्रंट) थोड्याफार फरकाने सारख्या टप्प्यातून जातात. आधी भाड्याचं घर, एखादी कार, व्हिसाची टांगती तलवार! त्यामुळे नवीन येणाऱ्यांबद्दल सहसा सहानुभूतीच जास्त!

अमेरिकन माणसाचा स्वभाव अघळपघळ, पण नसत्या चौकशा न करणारा. तासाचे ८ डॉलर मिळवणाऱ्या कॉफीशॉप मधल्या भारतीय/आशियाई दीदी पासून ते वॉलस्ट्रीट वर लाखो कमावणाऱ्या सुटा बुटातल्या दादा पर्यंत कुणाला एकमेकांच्या घरी किती सुबत्ता आहे, हे जाणून घेण्याची खाज नाही.

उलट भारतात शेजार्यांकडे नवीन सोफा, टीव्ही, कार आली कि लगेच कौतुक, नि लगेच असूया. अमेरिकेत 'भौतिक' सुखं आहेत असं म्हणतात, पण माझ्या साठी हे 'मानसिक' सुखच जास्त मोलाचं आहे!


10/26/16

'Tis the season of Diwali

इथे क्रिसमसच्या सुमारास सगळ्या रेडिओ स्टेशन्सवर नाताळची गाणी लागतात. ती मला तर आवडतातच, पण लहान मुलांना अगदी वेडंच करतात. आमचं पिल्लू गेल्यावर्षी "Santaclaus is coming to town" म्हणून म्हणून आमचे कान पिकवत होतं, आणि त्याच्या पलिकडल्या वर्षी त्याला "Rudolf the red-nosed reindeer" मधला रुडॉल्फच हवा होता! रेनडियरची बाहुली शोधायला मी किती वेबसाईट पालथ्या घातल्या होत्या त्याची गणना च नाही!

पण आपल्या दिवाळीची अशी कुठली गाणी नाहीयेत, त्यामुळे मला छोट्याला काहीच शिकवता आले नाही. चित्रपटगीतं एकतर चांगली नाहीत, किंवा छोट्यांना गाता येतील अशी नाहीत. मग काय करायचे? त्याच सुमारास मी इथल्या मराठी शाळेत शिकवत असे. तिथे मुलांना "Sunday, Monday, Tuesday, Wednesday..."च्याच चालीत
"रविवार सोमवार मंगळवार बुधवार..." हे गाणे आम्ही शिकवायचो. मग त्यावरून मला सहज सुचले:

'Tis the season of Diwali, 
Fala lala la la lalala
Eat some yummy ladoo chakali, 
fala lala la la lalala
Let's make colorful Rangoli
Fala la lala la, lalala
Celebrating with family
Fala lala la la lalala
Paper-lanterns in the alley (आकाशकंदील हो!)
Fireworks will make us jolly
Fala lala la la lalala

'Tis the season of Diwali
Fala lala la la lalala
Ravan was a big bad bully
Lord Ram beat him for us, thankfully. 
Let's welcome him home, merrily
Light up lamps to show it truly!
Fala lala la la lalala

मराठी सणांचं गाणं इंग्रजीत, तर ख्रिसमसचं गाणं मराठीत म्हणायचं, म्हणजे ख्रिसमसप्रमाणेच दिवाळी, आणि मराठी, हीपण मुलांना जवळची वाटू लागतील, अशी आशा!
आणि हो, सर्वांना मनापासून

!!शुभ दीपावली!!


9/12/16

चौघीजणी समुद्रकिनाऱ्यावर

अनिता: मूळच्या अत्यंत समंजसपणामुळे साधारणतः सदैव कशा ना कशावर किंवा कोणा ना कोणावर चिडलेलीवनिता: घरचा विरोध मोडून मुंबईला, अक्षरशः हातावर पोट घेऊन नोकरी करताना उदंड उत्साह्याला ओहोटी लागली तरी मनाचे पीळ ना सुटलेलीसुनीता: हिची प्रचंड पुस्तकी बुद्धिमत्ता तिच्या एकूण भावनिक विकासाच्या आड येत असल्यामुळे सतत भेटलेल्या यशातही स्वतःच्या क्षमतांबद्दल साशंक प्रणिता: आपली, कृपाभिलाषी. अर्थात, घरच्या 'फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स' मध्ये फारशा भावना न अनुभवता आल्यामुळे इतरांच्या स्पंदानांचे हेलकावे शोधत, साहित्योपासनेत रमलेली. आनंदी-दुःखी निरीक्षिका"आपण बियर पिऊ!" अनिता तिच्या भावांकडून आणि नुक्त्या पटलेल्या 'सख्या' कडून हे बाळ'कडू' पिऊन आल्यामुळे प्रस्ताव मांडते. प्रणिताला प्रथम-जगातील सवयी माहिती असून, बियर पिण्यात अनैतिक काही नसतं, हे नक्की पटलेलं आहे. शिवाय अनेक लेखकांनी अशा गोष्टींना 'अनुभव-विश्व् विस्तारणे' असं म्हंटलेलं आहे. मुळात, इंग्रजी कादंबऱ्यांमध्ये, एक पेक्षा अधिक व्यक्तींबरोबर झोपणे (मादाम बोव्हारी), स्वतःच्या आईबद्दल आकर्षण वाटणे (इडिपस), इथपासून... बायकोचा खून करणे (मॅकबेथ) इथपर्यंत घटनांना सामोरे गेल्यावर बियर पिणं तर अगदीच क्षुल्लक सीमोल्लंघन म्हणता येईल, म्हणून बऱ्यापैकी विचारस्वातंत्र्य अनुभवत असतांना, प्रथमच आयुष्यात 'मोकळे सुटल्याचा' वारा लागलेली आहे. सुनीताची मेडिकल इंटर्नशिप त्या आडगावात- समुद्रकिनारी!!! तेवीस वर्षात प्रथमच त्या आपल्या आपल्या पिकनिकला आल्या आहेत, कारण तिथे सुनीताच्या खोलीत त्या मोजून एक रात्र जागून, पोटभर गप्पा, आणि केवढीतरी भावनांची देवाणघेवाण करू शकणार आहेत. इतका सुवर्णयोग पुन्हा जमून येणे, आणि जमवणेही......... ह्या जन्मी शक्य होईल का? नाहीच. अशक्यच! नुकतीच डिलिव्हरी वार्डमधून येऊन, बायकांचे रडणे ओरडण पाहून थोडी विस्कटलीये सुनीता, पण ते विसरण्यासाठी थोडी घेतली, तर खूप बरं वाटेल यार! शिवाय, बियरचे शारीरिक परिणाम फारसे गंभीर नसतात इतकं व्यावहारिक ज्ञान तरी डॉक्टरीच्या अभ्यासात मिळालेलं आहेच की. वनिता स्वतः पुढाकार घेणारी नाही, तरी वेडगळ साहस तिच्या रोमँटिक रक्तातच आहे. घर सोडून आल्यावर ती खूप एकटी पडलीये, पण ही मैत्री तिचा आधार आहे. पाहिलं प्रेम, पहिली आठवण, पहिल्या मानाचं, पाहिलंच अंगण! तशी पहिली बियर... धिस बियर इज बॉण्डिंग!
एका दारूच्या दुकानापाशी जाऊन त्यांनी शेवटी अत्यंत प्रयत्नपूर्वक कोरा चेहेरा ठेवत, एक बियरची बाटली मागितली. "किती?" त्याने चौघीजणी बघून विचारलं. "एकच." अनिता निग्रहाने म्हणाली. जवळजवळ पळतच त्या खोलीत परतल्या. "निदान रात्री बारा पर्यंत तरी थांबू!" वनिता नेहेमीच रोमँटिक, आणि "नको. इतका काही हा मोठा इव्हेन्ट नाहीये!" प्रणिता चा कठोर अँटी-क्लायमॅक्स. थेट चेकोव्ह सारखा!त्यांनी सुनीताच्या खोलीतले उभे स्टीलचे पेले काढले. गोमुत्रासारखी ती कुणकुणी गढूळ बियर, एक, दोन, तीन! असा जल्लोष करून घोट घेतला. घाण कडू लागली. अनिताची ही दुसरी का तिसरी वेळ, त्यामुळे तिला जरा जरा चव घेता येऊ लागली होती. सुनीता मात्र एका घोटापुढे जाईना. "मला सकाळी राउंड आहे." "हो तू आदर्शवादी डॉक्टर आहेस बाई!""हो तू उगीच रिस्क घेऊ नको""तू पिणार नव्हतीस तर कशाला आणली आपण ही एवढी मोठी बाटली!"इत्यादी संवाद झाल्यावर त्यांना थोडं हलकं हलकं वाटायला लागलं. (त्यामागे त्या बियरचा शून्य हात होता!) "आपण हे नमिता ला सांगितलं तर ती वेडी होईल!" "आपण हे सरिता ला सांगितलं तर ती एकदम आपल्याशी मैत्रीच तोडून टाकेल!""तू घरी सांगशील?" "हो, त्यात काय?" (हे फर्स्ट वर्ल्ड सुनीताच बोलू जाणे!)मग रात्रभर चेकाळल्यासारख्या गप्पांवर गप्पा झोडून त्या सकाळी सकाळी समुद्रावर गेल्या. टिक्करबिल्ला खेळून, तासंतास सायकल पदडुन, दिवसेंदिवस पत्ते, नाच गाणी, कॅरम खेळून कसंबसं बालपण मागे टाकलं. ते-वीस भली थोरली वर्ष निघून गेली,तरी आयुष्य पुढे सरकतच नाहीये. प्रेम? कि लग्न?आधी प्रेम?कि आधी लग्न?"कोण? कुठे? कधी? कसा?" सगळंच अनुत्तरित. "ए तुला आशिष आवडायचा ना?""हो पण त्याचं आहे ऑलरेडी.""मला प्रेमात पडणं अशक्य आहे. केलाही होता एकदा प्रयत्न" "म्हणजे तुला म्हणायचंय की तुला कोणाला स्वतःच्या प्रेमात पाडता येत नाहीये.""हाहाहाहाहा........ हो तसं समज.""चांगली नोकरी पाहिजे यार आधी!""घरी सांगितलं नाहीये अनिताने अजूनही""मग पुढे काय?"बोंबलायला तेवीस वर्षांच्या चढ उत्तरांच्या शेकडो रात्री गेल्या तरी आयुष्याचा निक्काल काय तो लागत नाहीये.  हे असं अजून किती दिवस चालणारे? किती वर्ष चालणारे??? ही इथे लाट पायापर्यंत येते पण डोक्यावरून चिम्ब भिजवून जात नाही. आपल्याला तर खोलात जाणं होतच नाही, पण बोंबलायला ती लाटही मिळमिळीतच निघाली..... बियरसारखी!"हाहाहाहाहाहा........ " दहा वर्षांनी पुन्हा इथेच भेटायला पाहिजे गं... नक्की भेटूया. जमवूयाच कसंही करून. तेहत्तीस वर्षांच्या त्या चौघीजणी आज पुन्हा कदाचित समुद्रकिनाऱ्यावर उभ्या असतील.  

त्यांना आता वाईनही सवयीची झालेली असेल. 

8/8/16

कवितेचा लोचा

आमच्या जीउनात कवितेनेच सगळा लोचा केलाय. हे पक्कंच कळलंय. आदिमानवांच्या काळात भाषा अशी असावी :
आ.ई (म्हणजे आदि.आई). : झाड (झाडाकडे बोट दाखवून)
आ.बा. (आदि.बाळ): दाल
आ.ई.: झा................ड....
आ.बा.: झा.....लं, जालं, जाड, झा.......................ड!

भाषेचा विकास, हा इथेच थांबायला हवा होता. "त" वरून "ताकभात" ओळखता येण्याइतकी बुद्धी (सुदैवाने/दुर्दैवाने) माणसाला मिळालेली आहेच की. पण नाही. थांबायचं कुठे, हे ज्याला कळत नाही, तो प्राणी म्हणजे माणूस. आपली भाषा, आणि त्यायोगे आपलं जीवन, अधिकाधिक कॉम्प्लिकेटेड करायला ज्याला आवडतं, आणि मग त्या गुंतागुंती बद्द्ल रडतांनाही नवनवीन सुरात कसं रडून दाखवता येईल, ह्याचा विचार जो करतो, तो प्राणी म्हणजे माणूस. आणि म्हणूनच, माणूस = कवी. आणि म्हणूनच, काव्य-भावनेनेच सगळा लोचा केलाय, हे पक्कं.

नुसतं "झाड" म्हणून थांबायच्या ऐवजी, मग झाड हिरवं असतं, हिरव्या झाडाला खूप पानं असतात, झाडाची पानं वाऱ्यावर डुलतात, झाड सुंदर असतं, ही असली निरूपयोगी निरीक्षणे करणं, हे कवीचं काम असतं. इथे कवी= शिकार, झाडे तोडणे, एकमेकांवर स्फटिके आपटून आग लागते का बघणे, ती स्फटिके विकून चार कोंबड्या विकत घेता येतील का ते पाहणे, असले कुठलेही "अर्थपूर्ण" उद्योग करायचे सोडून, झाडाची हिरवी पानं बघत बसलेलं खुळं, हा एकच अर्थ अभिप्रेत आहे.

हे खूळ म्हणजे एक खूळच असल्यामुळे, कवीमंडळींना आत्मविश्वासाचा जबरदस्त विंचू चावलेला असावा (अगदी आदिकाळापासून), कारण, तुम्ही हे जे (इतरांना) उपयुक्त पण स्वत:ला निरूपयोगी जीवन जगताय, ते काही खरं नाही, असं सांगून त्यांनी आम जनतेलाच वेड्यात काढलं. उलट कवींना सरळ बुद्धी दे रे बाबा, म्हणून "आदि"माते ला विनवण्यापेक्षा, कवींची निरीक्षणं स्मरणात ठेवून चघळणे, एकमेकांना ऐकवणे, असल्या प्रशस्तीमुळे कवी मंडळी लई डोक्यावर चढत गेली ती गेलीच.

शिवाय, रोज रोज खाल्यावर जसे स्वयंपाकातले बारकावे कळू लागून "रसिक" जन्माला येतात, स्वत:ला गाण्यात गती नसूनही जसे "कानसेन" तयार होतात, तसेच रोज रोज हा खुळ्या शब्दखेळाचा रतीब ऐकून-वाचून वाचकही प्रगल्भ (किंवा बोअर) झाले, की त्यांनाही वर्णनात्मक कवितांनी किक बसेनाशी झाली, आणि कवींना उपमा-उत्प्रेक्षांच्या फोडण्या घालून घालून शब्द खपवायची वेळ आली.  हे मीच नव्हे, लेव्ही स्ट्राऊसनेही म्हटलंय बरंका. आणि काय म्हटलं, यापेक्षा कुणी म्हटलं, ह्याला जास्त महत्त्व आहे, असं पुलंनीही म्हटलंय, जे स्वत: पु.ल. असल्यामुळे, त्यांच्या म्हणण्याला तरी मान असणारच किनई!  इथवर ठीक होतं. खरा लोचा झाला, तो पुढेच आहे.

आता तुम्ही म्हणाल कि कवितेत मला काय प्रॉब्लेम! मी काय कवी/कवयित्री नाही. असते तर लेख लिहिण्या ऐवजी कविताच केली असती ना हो. कविता करण्या/ वाचण्याचा छंद तसा निरूपद्रवी आहे. वर सांगितल्याप्रमाणे, कवी मंडळींंचा प्रक्षोभ सक्रीयतेकडे क्वचितच पोचत असल्याने, तसाही काही धोका नाही. "आदि"कवी वाल्मिकींनाच बघा, हरणाला बाण मारणारा शिकारी बघून एखाद्याने त्याचा हात धरला असता, किंवा किमानपक्षी नंतर त्या विद्ध हरणाला मलमपट्टी केली असती, पण हे फक्त "मा निषाद!" म्हणून काव्यच करत बसले, आणि संस्कृतात वगैरे लिहिल्यामुळे त्यांचा आदिकवी म्हणून गौरव झाला, तो वेगळाच. काय नशीब असतं एकेकाचं. आम्ही जन्मल्यापासून पांढऱ्यावर काळं खरडतोय, खरडतोय, तरी ब्लॉगवर कॉमेंटाही येणं दुरापास्त. आणि इथे, दोन शब्द म्हटले, की झाले कवी!

पण ते ही मान्य. खरा लोचा झाला, तो पुढेच आहे.

सुरुवातीला कवींना राजाश्रय असे. म्हणजे खाऊन पिऊन (कदाचित जास्त पिऊन सुद्धा), कविमंडळी खूष असत. पण स्वतःला विकणं इतकं सोपं नसतं! त्यासाठी स्वतःचं व्यक्तिमत्व तसं घडवावं लागतं, मी, माझे विचार, माझ्या भावना, माझे अनुभव, सगळंच किती मनोरंजक आहे, हे दाखवावं लागतं. आणि दाखवता येण्यासाठी तसा तेवढा स्वतःवर विश्वासही असावा लागतो. किंबहुना, स्वतः सोडून दुसरा तिसरा कोणाचाही विचार करून चालतच नाही.
किंवा, दुसऱ्यांचं निरीक्षण केलंच, तरी ते "आपल्याच" रचनेतून मांडायचं, त्यासाठी त्यांच्या गोष्टी वापरायच्या.

हे असं आत्ममग्न जगणं कवींनी सुरु केलं, तिथेच देकार्त सारख्याला, "I think, therefore I am" चा साक्षात्कार झाला असावा. मी म्हणजेच माझं मन. माझं मन, माझे विचार म्हणजेच मी.
म्हणजे काय, की एकवेळ स्वत:ची मुलं नसली, तरी मी आई हे बिरूद लेऊ शकते, घर सांभाळत असले, तर "होममेकर" हे "पद" भूषवू शकते, पण मी विचारच करत नसले, तर मी अस्तित्वात आहे की नाही, हाच प्रश्न पडावा!

आणि लोचा असा, कि फक्त कवी लोक असले "विचार" करत असत, तोवर ठीक होतं. विचार करणं, हि त्यांची व्यावसायिक गरज म्हणा ना! पण इतर लोहार, कुंभार, भाजीवाले, सैनिक नि गिरणीवाले... सगळ्यांनाच हे एकदम हॉट म्हणजे एकदम हॉट प्रोफेशन वाटू लागलं ना! दुकान टाकायला एक पेन नि कागद, आणि कामाच्या नावावर नवनवीन प्रेमप्रकरणे, देशाटने, लोकसंग्रह....... शिवाय प्रसिद्धी, आब आणि किताब, कोणाला आवडणार नाही???

आणि सगळेच कवी, तिथे वाचक विरळा! लेखन, प्रकाशन आधीच इतकं सोपं होतं, ते ब्लॉगद्वारे किंवा जालावर आणखीनच सोपं झालं, आणि काही वेबसाईटतर, हजारो लोकांनी, वेगवेगळ्या मुद्द्यांवर, हरप्रकारे चर्चा करावी, ह्यासाठीच बनलेल्या आहेत. स्वत:च्या विचारांना, आणि मतांना, एवढं महत्व येऊ शकतं, हे फक्त आताच्याच पिढीने पाहिलंय.

त्यामुळे किनई, ऐकून घेण्याची कला मागेच पडलीये, आणि समंजसपणा किंवा सगळ्यांशी जुळवून घेणे हे काय असतं? आजकाल ह्या कलेला कुणी विचारतच नाही, तिची उपासना करणे तर दूरच. बघावे तिथे मी मी मी चा घोष! आत्मकेंद्रितेची फ़ॅशन.

हेच बघा ना, मी तरी दुसरं काय करतेय? घेतला लॅपटॉप कि लागले बडवायला :) म्हणूनच..... आता स्वतःलाच सल्ले द्यायची वेळ आलीये. प्रत्येकाने स्वतःला (आणि केवळ स्वतःलाच) सल्ले द्यावे, ही काळाची खरी गरज आहे. आणि अगदी कविता वगैरे लेखनाचं मनावर घेतलंच असेल, तर आधी सहृदयतेचं वाचनपुण्य गोळा करायला हवंय.

पोकीमॉन शोधतात, तसे मीरा,सूर, कबिरा शोधायला हवे आहेत. त्यांच्या मागे वेडं व्हायला हवंय. तसं वेड लागल्याशिवाय......कवीपण अंगी येत नसतं महाराजा.










2/24/16

मराठीपणा-इंग्रजीपणा

एवढ्यात  शिवाजी जयंती झाली तेव्हा माझा महाराष्ट्र, माझी मराठी या प्रकारच्या काही बातम्या आणि व्हॉटसप फॉरवर्ड आले, ते वाचून मला एकदम हुक्की आली कि काहीतरी मराठी- गौरावात्मक लिहावं . पण मनात आलं, की झालं लिहून, अशा सोयी आता आमच्या वाट्याला क्वचितच येतात (पहा: आईचा स्वत:च्या वेळेवर कधीच हक्क नसतो का?)
त्यामुळे "मनातलेच मांडे" खायची वेळ आली असे म्हणतानाच, एका मैत्रिणीचा फोन. "काय करताय  विकांताला?" बाकी काही असो. मराठी माणूस तसा मुळात आळशी असल्यामुळे, विशेषकरून विकांताला फारसे कुठले कार्यक्रम न ठरवता, 'भरपूर कौटुंबिक वेळ' घालवण्यात पटाइत :) त्यामुळे माझं ताबडतोब उत्तर, "काSSSही विशेष नाही. येताय का?" पोरं एका वयाची असल्याने आमचं चांगलं जमतं.  (आजकाल कुणाशी चांगलं जमण्याचे निकष, पोराच्या उंचीइतके 'खालावले' आहेत, हे उघड आहे :) :) सो बाकी फारसा विचार करायची गरज नव्हती, फक्त,मैत्रिणीच्या नवऱ्याला खायला काय घालायचं, हा एक मोठा प्रश्न होता. 

दिल्लीच्या, पण पटन्यात वाढलेल्या, आता आईवडील बंगलोरला स्थाईक झालेल्या आमच्या ह्या मित्राचं मला कौतुकच जास्त वाटत आलेलं आहे, कारण गेली अनेक वर्ष मी केलेले अनेक बरे वाईट मराठी पदार्थ तो बिचारा न कुरकुरता खात आलेला आहे, पण …….चेहरा मात्र मलाही नेहमी खरं सांगत आलेला आहे! आता मुळात त्याने मराठी बायको केली (माझी मैत्रीण) म्हणून मी फारसा त्या चेहऱ्याचा विचारही करत नाही, पण तरी, एखादी भाजी नेहमीची आणि एखादी आलं लसूण पनीर टाईप असतेच. आज मात्र अवचित ठरल्यामुळे, माझ्या समोर यक्ष-प्रश्न उभा ठाकला. मैत्रिणीला विचारले तर ती म्हणाली, "भजी कर." भज्यांपुढे त्याला काही दुसरं लागत नाही." 
"चला एक तरी मराठी पदार्थ तुला आवडतो!" मी त्याला गमतीने म्हटले, तर तो म्हणाला, "भजी मराठी नही है! भजी मतलब भुजिया, मराठी लोगों ने हमसे ही सिखा है!" झालं, मग आमची व्हॉटसप-वॉर  जुंपली! मी मराठी पदार्थांचे गुणगान चालवले, तर त्याने मराठी पदार्थ कसे करायला कठिण  पण खायला तरीही सहज न आवडणारे, असे आरोप लवले. अर्थात, सासूविषयी बोलायचा हक्क फक्त सुनांनाच नसतो, त्यामुळे, "आमचा सासूबाईंनी सकाळी ३ तास खपून, केलं काय तर उपासाचं थालीपीठ!" असले धमाल विनोद सुरु झाले. टू स्टेट्स सिनेमा प्रमाणे, तुम्हा पंजाबी लोकांना दुसऱ्या चवीचं काही आवडत नाही, नि तुम्ही आवडून घेतही नाही वगैरे मुद्दे मी मांडले.

मग तेवढ्यातच बाजीराव मस्तानीचा विषय निघाल्यावर तो म्हणाला," तुम्ही मराठी लोक एकतर आपले मंगळागौरीचे खेळ वगैरे कुणाला सांगत नाही, दाखवत नाही, आणि आजकाल तर, खेळतही नहि. मराठीपणा मध्ये समरस होण्याचा फारसा मौका तुम्ही अ-मराठी लोकांना देत नहि. तुमची मराठी संस्कृती संस्कृती म्हणतात ती इतकी "बंदिस्त" गोटातली आहे, कि सहज समरस होण्यासारखं त्यात काहीच नाही, आणि जे आहे, ते हि इतरांकडून उधार घेतलेलं!"
आज मराठी घरोघरी बघाल तर, इडली सांबार (दाक्षिणात्य), नाहीतर पराठे (उत्तरेचे) सगळ्यांना आवडतात. मग मी खरंच विचार करू लागले, कि जसा उत्तरेला पनीरचा आणि दक्षिणेला इडलीचा अभिमान आहे, तसा मराठीला कशाचा असू शकतो? की खरंच आपले पदार्थ "टू मच इनपुट नॉट मच आऊटपुट" प्रकारात मोडतात?

तेव्हा एकदम सुचलं, कि मराठी संस्कृतीचं थोडंफार इंग्रजी भाषेसारखं आहे, असा पुरोगामी विचार केला तर सर्वसामावेशाकतेची लाज न वाटता, अभिमान वाटू शकेल. इंग्रजी भाषा कशी फोफावली, कारण तिने इतर भाषांमधून शब्द नि:शंकपणे आत्मसात केले. हिंदू धर्म का टिकला? कारण त्याने येणाऱ्या विविध गटांच्या, परिस्थिती, पर्यावरण-आधारित कर्म-कांडाला सरळसरळ आपले म्हटले. त्यामुळे हिंदू धर्मात दिवाळीला कोणी कुठे जुगार खेळतात तर कोणी झेंडूच्या माळा लावतात. कोणी रांगोळ्या काढतात तर कोणी पुरणपोळी करतात.

मग मराठीपणानेही कशाला कुठल्या संकुचित व्याख्येप्रमाणे स्वत:ला बदलायचा प्रयत्न करावा? मराठीने का नये अभिमानाने म्हणू कि आम्ही इडली करतो, कारण आम्ही तिला आपली मानलीये. आम्ही सगळ्या भाज्या करू, नि आवडीने खाऊ कारण आमच्याकडे नव्याचा तिरस्कार नाही, स्वीकार आहे, आणि तोच आमचा सर्वात मोठा गुण आहे. भारताच्या कुठल्या दूरच्या कोपऱ्यात नसून, महाराष्ट्र हा चक्क पोटचा गोळा आहे, त्याचा परिणाम म्हणून गुजराथी असो वा कर्नाटकी, बंगाली असो वा पंजाबी,
 सगळ्या प्रदेशांशी आमची नाळ जोडलेली आहे, हे आमचं सौभाग्यच नाही का?

ह्याचा अर्थ असा नव्हे, की मराठी पदार्थ, मराठमोळी नऊवारी आणि नथ, मराठी बडबडगीतं आणि गाणी, ह्यांचा आम्हाला अभिमान नाही, किंवा त्याचं जतन आम्ही करू नये. पण आपलं ते कार्ट …. असली संकुचित वृत्ती मराठी मनानेच काय, कुणीही ठेवू नये.

अजून एक सांगू, "दुधी, परवल, पडवळ, डींगऱ्या, चपटे वाल, कडवे वाल, दक्षिणेचा नारळ घालून असो वा उत्तरेचा बटाटा, आम्हाला प्रत्येक भाजी करायच्या सतरा पद्धती येतात, आणि आम्ही त्या करतोही. प्रत्येक नावडत्या भाजीलाही आवडते करून खाणे, हे कोणी मराठी माणसाकडून शिकावे! उपलब्ध असलेल्या साध्या सामाग्रीतून रुचकर जेवण असो, वा सजावट, मराठींकडून शिकावी.

म्हणजे, जुगाड- इन्वेन्शनचे आद्य प्रणेते आम्हीच की!"

इतिहासाच्या एका टप्प्यावर, मराठी माणसावर फार संकटं आली. अठरा विश्वे दारिद्र्य आणि दुष्काळात तेरावा महिना असतांना आम्ही जे धडे घेतले, त्यांनी मराठीमाती झालीच असेल, तर जास्त कणखर झालीये.

आज इंग्रजीने जग काबीज केलंय, ते केवळ इंग्रजी राजवटीमुळेच नव्हे, तर इंग्रजीच्या अंगभूत लवचिकतेमुळेही. नाझी जर्मनीत तावून सुलाखून निघालेले ज्युईश लोक अमेरिकेत येऊन अतिशय यशस्वी झाले, ते त्यांनी अंगी बाणवलेल्या चिवटपणामुळे. तेव्हा पंजाबच्या अफाट हिरव्या शेतीचा आणि दक्षिणेच्या द्रविडी संपत्तीचा माज करणाऱ्यांनो, सावध असा. असे न होवो, कि तुम्हालाच तुमच्या मधून मराठी लोकांना वेगळे काढणे अशक्य होवून बसेल!