Showing posts with label घर. Show all posts
Showing posts with label घर. Show all posts

1/9/21

अनिवासी भारतीयांची कोविड डायरी.......

भारताबाहेर राहणाऱ्या भारतीयांची कोविड आणि लॉकडाऊन मुळे फारच बिकट परिस्थिती झाली. एरवी कर्मप्रिय असलेली अमेरिका २४ तास पळत असते. उरला सुरला वेळ 'देसी' मैत्रांबरोबर पार्ट्या झोडण्यात, झालंच तर थोडे सांस्कृतिक कार्यक्रम, आणि टीव्ही त सहज जातो. वीकेंड कमी पडतात, काही वेळा तर दोन ठिकाणी तोंड दाखवून (हो, तेव्हा आम्ही तोंड दाखवू शकत होतो ;) तिसरीकडे बार्बेक्यू करायला जात होतो. पोरांच्या छंदवर्गांमागे धावत होतो..... थंडीत ६ महिने घरी बसायचे म्हणून उबदार हवेत एखादी सुट्टी टाकली, नाहीतर चक्क राहायला जाण्याइतके घरोब्याचे संबंध होते (अजूनही आहेत, अशी आशा आहे) अशा मित्र मैत्रिणींकडे २-४ दिवस जाऊन येत होतो. मुख्य म्हणजे पोरांची बालपणं एकत्र गेलेली, त्यामुळे त्यांना पाहुण्यांचे येणे जाणे म्हणजे पर्वणीच होती. 

कोविड मुळे सर्वात मोठा परिणाम झालाय तो या पोरांवर. त्यांचे आयुष्य थांबल्यासारखे  झालेय, आणि दुधाची तहान झूमवर भागू शकत नाहीये. दोन असली तर वेगळे प्रश्न, आणि एकच असलं तर वेगळे, पण प्रश्न बिकट झाले. एकूणच अनिवासी लोकांची मुळं नवीन मातीत तितकीशी घट्ट रुजलेली नसतात. पैशासाठी, किंवा जीवनशैलीच्या आकर्षणाने परदेशी राहू पाहणारे अनिवासी लोक एकमेकांना धरून असतात, पण कोविडने चांगलाच दणका देऊन भानावर आणले- कि शेवटी Blood is thicker than water! ज्यांचे अगदी जवळचे कुटुंब इथे स्थायिक आहे, ते कितीही दूर  असले, तरी निदान एखादेवेळी भेटण्याची सोय होती, इतकंच नव्हे, तर निदान झूमवर सतत संपर्क करून मानसिक समाधान करून घेता येत होते. शिवाय घरूनच काम करण्याची सोय असल्यामुळे काही कुटुंबं तर बराच काळ एकमेकांकडे जाऊन राहून आली. 

आमच्या एकुलत्या एक मुलाला हे भाग्य मिळणं शक्य नाही, ह्याची मला इतकी टोचणी लागली, कि त्यापायी मीच निराशेच्या गर्तेत जात होते. कधी अती  प्रेम, तर कधी स्वतःसाठी अजिबात वेळ न देता आल्यामुळे चिडचिड होत होती. अर्थात, मुलासाठी जे जे शक्य होतं ते केलं - त्याच्या बरोबर रोज खेळणे, बाहेर जाणे, पुस्तके वाचणे, चित्रकला गाणे नि काय काय, पण आता मार्चचा डिसेंबर झाला आहे, आणि धीर सुटत चालला आहे. हे इतकं अकल्पनीय एकटेपण आहे की म्हंटलं त्याबद्दल लिहायला तरी हवंच. 

मार्च: घरी असण्याच्या आनंदात गेला. स्प्रिंग ब्रेक मध्ये बिचाऱ्या शिक्षकांनी कशीबशी पुढच्या दोन महिन्यांपुरती आखणी केली. पोहण्याचा क्लास बंद झाला. pottery क्लास बंद झाला. 

एप्रिल-मे : ऑनलाईन शाळेच्या पद्धती शिकण्यात गेला. त्यात ही मजा होती, नावीन्य होतं. बाहेरही फुलं फुलायची थांबली नव्हती, त्यामुळे पार्क मध्ये फक्त घरच्यांबरोबर  फिरणे, सायकल चालवणे हे झाले. पण एरवी बाहेर एकत्र खेळणारी कोणीच मुलं दिसेनाशी झाली. प्रत्येक वेटाळात थोड्या फार फरकाने मुलं बाहेर पडत असतील,  नसतील, पण आमच्या दुर्दैवाने आमचा शेजार फारच 'कट्टर कोविडवादी' निघाला. रोज भेटणारे मित्र पोराला २-४ महिने अक्षरश: दिसेनासे झाले. 

ऑनलाईन शाळा होती, तसेच मग पोरांनी आयपॅड वर एकमेकांच्या 'virtual' विश्वात जाऊन खेळायला सुरुवात केली. ज्या स्क्रीनपासून मुलांना लहानपणापासून दूर ठेवायला धडपडलो, तेच स्क्रीन त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यावश्यक होऊन बसले. ऑनलाईन छंदवर्गात जाणे मुलाला अजिबात आवडत नव्हते, पण आठवड्यातून एकदा ते करायला लावले.

जून-जुलै: लोक किंचित सैलावले होते, पण आमच्या गल्लीत अजूनही भीतीयुक्त वातावरण च होतं....पोरं सायकल चालवण्यापुरती मास्क लावून बाहेर पडत होती, पण बोलणे नाही की खेळणे नाही. त्यांचे त्यांचे काय वेगळे 'गट' होते माहिती नाही, पण शेजार मात्र संपल्या सारखा झाला. मी भारतातल्या लोकांना कायम सांगत असे, की आमच्या गल्लीत पोरं खेळतात, एकमेकांकडे जायला यायला वेळकाळ बघावा लागत नाही, ते पार बंद झालं. तो काळ फार फार कठीण होता... रोज घरी प्रचंड वादविवाद, आक्रस्ताळेपणा (मुख्यतः स्क्रीनवरून) होऊ लागले. मुलगा आता संपूर्णपणे स्क्रीनच्या आहारी गेला होता, पण इलाज चालत नव्हता. निराशेमुळे स्क्रीन, की स्क्रीनमुळे निराशा, हे गणित सुटेनासं झालं होतं. मार्चमध्ये निदान वर्गातल्या पोरांची मैत्री होऊन गेली होती, त्यामुळे त्यांना ऑनलाईन गप्पा मारणे सहज शक्य होते, पण शाळा संपल्यावर त्या मैत्र्या आपोआप संपल्या.....

ऑगस्ट-सप्टेंबर: आता उन्हाळ्याचे फार कमी दिवस राहिले, त्यामुळे पुन्हा पाण्याखाली जायच्या आधी खोल श्वास भरून घ्यावा, तसे आम्ही बीच, थोडं बाहेर आपापलेच फिरून आलो. गणपती, दिवाळीला कोणी येणार जाणार नव्हते, ते ही मला जरा सूक्ष्म बरंच वाटलं- किती काम पडत होतं गेल्या वर्षी, ते आठवून. जवळच्या मित्र मैत्रिणींना भेटायला पार्क मध्ये जात होतो, कधी तिथेच गवतावर दूरदूर बसून पिझ्झा, भेळ खाल्ली. शाळेतली पोरं सगळीच एकमेकांना नवीन (अमेरिकेत दरवर्षी वर्गात वेगवेगळी पोरं असतात, त्यांना मिसळता यावं म्हणून, पण इथे त्याचा उलट परिणाम झाला.) गेल्यावर्षीचे कुठलेच जिवलग मित्र आताच्या वर्गात नव्हते. 

ऑक्टॉबर-नोव्हेंबर: बाहेर थंडी असूनही, मास्क लावून Halloween ला चॉकलेटं लुटणे आणि दिवाळीला फटाके उडवणे झाले. हे गल्लीतल्या जरा पुढाकार घेणाऱ्यांनी (मी व माझी एक शेजारीण) घडवून आणलं कारण मुलांचं दुःख बघवत नव्हतं. आता मुला मध्ये एक बदल जाणवला- एरवी गणपती, दिवाळीत अजिबात रस न घेणाऱ्या मुलाने, रांगोळी काढणे, चकल्या खाणे, फटाके अगदी आवडीने उडवले. छोटे छोटे आनंद गोळा करायला मुलं शिकत होती.....कारण तेच पुरवायचे आहेत, हे कळून चुकलं होतं. 

Hybrid School चा प्रयोग: अर्धी अर्धी पोरं शाळेत दोन दोन दिवस जाऊ लागली, पण शिकवण्याचे तास कमीच राहिले. शाळेत जाऊनही शिक्षिका आणि मुलं -लॅपटॉप वरच अभ्यास करू लागली, कारण उरलेली अर्धी पोरं घरून त्यांच्या क्लास मध्ये हजार होती.... तेवढ्या साठी बसमधून येणे-जाणे,खेळ/व्यायामवर्गात जागेवरच (दुरुन) कवायती करणे काही आवडणे शक्य नव्हते. त्यामुळे मुलाने महिन्याभरातच "मी पूर्णवेळ घरूनच शाळा करीन," असं सांगून टाकलं. 

डिसेम्बर: सांता यावर्षी विशेष प्रेमात होता, मुलांना किती सोसावं लागतंय, म्हणून जास्तच केक, कुकीज आणि खेळणी घेऊन आला. ह्याच दरम्यान मुलाचं गोड खाणं ही वाढलं. साखरेने आनंदाची भावना होते - एरवी लाडू गोड पदार्थांकडे ढुंकूनही ना बघणाऱ्या मुलाचा हात डब्याकडे जाऊ लागला. काही चांगले बदल होते, घरातल्या कामांकडे लक्ष देणे, मदत करणे. ६ महिन्यांपासून वळण लावत होते, ते हळू हळू लागताना दिसत होते. आक्रस्ताळेपणा आटोक्यात आला. 

कधी कधी वाटतं - कोव्हिडच्या आधीपासूनच जी मुलं माणसात रमणारी होती, ज्यांना प्रसंगी कमीपणाची भावना, किंवा बुजरेपणा होता, त्यांना कोविडने फार त्रास सहन करावा लागला. भारतात बाहेरचं वातावरण, आणि सामाजिक बांधिलकीमुळे जे कवच मुलांना सहज मिळतंय, ते अनिवासी मुलांना मिळत नाहीये, आणि त्या अभावाने होणारे खोलवर परिणाम पुसण्यासाठी अनेक वर्ष जावी लागतील. 

=====००००००=======

१. सगळं सोडून भारतात परतावं, असं या दरम्यान अनेकांना वाटलं असेल. कोविडमधून बाहेर आल्यावरही तसंच वाटत राहील का? अर्ध्याहून अधिक आयुष्य इथे गेलेल्या माझ्यासारख्या लोकांना मात्र हाच एकटेपणा काही अंशी आयुष्यभर सोसावा लागणार आहे, हे टळटळीत सत्य कसं पचवायचं हे अजूनही कळत नाहीये. "ह्या अनुभवातून जीवना! तुला जे शिकवायचे ते लवकर शिकव, पण बाहेर काढ!" म्हणायची पाळी आली. 

२. दुसरीकडे, ह्या देशाने आपल्याला काय काय दिलंय, त्याचीही जाणीव आहे. लाखो नोकऱ्या गेल्या, हंगामी मजुरांवर ओढवलेलं संकट, छोट्या घरात राहणाऱ्यांची अवस्था पाहून, 'त्यापेक्षा आपण भाग्यवान आहोत' ही जाणीवही झाली. निदान पदार्थ  साठवणे, घरी सगळी आयुधं सज्ज असणे, बाहेर फिरताना गर्दी नसणे, ह्या मोठ्या जमेच्या बाजू होत्या. 

३. मुलासकट आता आम्ही दोघेही रोज 'कृतज्ञतेची प्रार्थना' म्हणायला लागलो आहोत. आजचा दिवस चांगला घालवण्याचा प्रयत्न करीत आहोत. एकमेकांना जपत आहोत. हे ही नसे थोडके. 

3/16/15

सोप्पं गणित

लहान असतो आपण तेंव्हा जग अवाढव्य पसरलेलं दिसतं...
आपण लिलिपूट, राक्षसांच्या जगात.
शाळेच्या भिंती इतक्या उंच की उडी मारून जाता येऊ नये
रस्ते लांब इतके, की पाय दुखतात दोन चौक चालून
तरी दिसत नाही, आईसक्रीमचा गुलाबी कोन काढलेली पाटी
सगळ्या गोष्टीची घाई असते, पण वेळ सरकत नाही भरभर पुढे
“आई, बोअर होतंय, आता काय करू???”

खरं म्हणजे ५० वर्ष तेंव्हा वाटत असतात युगांसारखी-
येवढ्या मोठ्या आयुष्याचं काय करतात माणसं?
खरं तर, काही करत का नाहीत? असे बाळबोध प्रश्न!

आणि आता - दिवस घालवायला फारसं काही करावं लागतच नाही
तासचे तास कसे नकळत भरून जातात ते कळतंय
चादरी धुवायच्यात लॉन्ड्रीत, बाथरूम घासायला हवी,
भांडी, तेवढ्यात टी.व्ही बघत बघत स्वयंपाक,
मुलांचे अभ्यास, कपड्यांच्या घड्या,
धूळ झटकायची, न संपणारी आवराआवरी
रात्री डोळे मिटतात तरी वाचायचं असतं
करायचे असलेले फोन, भरायची असलेली बिलं,
जेवायला यावे लागणारे-पाहुणे, जेवायला जावे लागणारे नातेवाईक,
जमलंच तर निसर्ग सौंदर्य, हवाबदल, सुट्ट्या आणि नोकरीचं चक्र...
तेच, तसंच, असंच, थोडसं, कहिसं, काहीतरी...

भरून टाकायचे क्षण, वेगवेगळ्या निरर्थांनी
रंगीबेरंगी खोक्यात लपवून पोकळ्या
मग वाहत जातो, दिवस, अज्ञात प्रवाहाने ढकललेला
वर्ष, गरगरणाऱ्या पृथ्वीसोबत,
शतकं- इतिहासाच्या पुस्तकात......

सोप्पं असतं आयुष्याचं गाणित, लहानपणी न सुटलेलं,
खरं म्हणजे तोवर वाचावंच न लागलेलं...


झाडं

प्रत्येक झाड वेगळं असलं तरी
प्रत्येक झाड सुंदर असतं
कधी कधी मी विचार करते-
माणसांचं असं का नसतं?

मी कुठेही फ़िरायला गेले तरी आधी मला जाणवतात ती झाडं! माझ्या माहेरी मागच्या दारी असलेलं मोठं लिंबाचं झाड असो, किंवा दारापुढे असलेलं जास्वंद- ह्या माझ्या लहानपणापासूनच्या सोबत्यांनी मला वेगवेगळ्या झाडांकडे बघायला शिकवलं.
आता आठवतंय- आम्ही एका पावसाळ्यात फ़िरायला चिखलदय्राला गेलो होतो. तिथला निवांतपणा, पावसाने तकतकीत झालेली हिरवळ मनाला ताजेपणा देत होती. पण तिथेही माझ्या उत्साही आईला शोधून शोधून काय सापडावं??? कढीलिंबाचं बन!!! रोज रोज स्वयंपाक केला की मनाच्या कप्प्यात कायमच भाजी-पाले दिसायला लागतात हे तेव्हा मला कळलेलं नव्हतं! पण तरीही, त्या कढीलिंबाच्या बनातला वास अजूनही एक प्रकारची झिंग आणतो आहे.

नंतर असंच पुण्यात शिकत असतांना युनिव्हर्सिटीतले ॠतु आठवतात- उन्हाळा आला की बाकी सगळीकडे पानगळ सुरु झाली, तरी आमच्या "शांतीनिकेतन" कॅन्टीनवर छत्रछाया धरणारी अजस्त्र चिंचेची आणि वडाची झाडं मात्र सदाहरित असायची... त्यांच्या पानांमधून शितल होऊन येणारी झुळुक उन्हाच्या, आणि परीक्षेच्याही तापातुन थोडा विसावा द्यायची.

गेले ते दिवस. अंगणातल्या सिताफ़ळाच्या पानांची पत्रावळ करुन बघायचे- उंचावरच्या चिंचा नाहीच मिळाल्या, तर चिंचेच्या पानांतला आंबटपणा चोखुन "कोल्ह्याला चिंच आंबट" म्हणायचे!!!

जर्मनीत माझ्या खोलीच्या खिडकीतून दिसणारे तसे "तरुण" झाड- बाकी अनेक झाडांनी थंडी संपल्यावर पसरलेल्या फ़ांद्यांवरची कोवळी पाने बघूनही, ते वेडे झाड आपल्या कोषातुन बाहेर यायला तयारच नव्हते! मग एकदाची त्याला पालवी फ़ुटली. आणि मग थोड्याच दिवसात त्यावर नाजुक राणी-हलक्या गुलाबी फ़ुलांनी गर्दी केली!!!! मग माझ्या खोलीची खिडकी उघडायची सोय उरली नाही- कारण त्या फ़ुलांकडे येणारे असंख्य भुंगे आणि इतर कीडे बरेचदा वाट चुकुन माझ्या खोलीत शिरु लागले.
हे माझे खास झाड होते- त्या अनोळखी प्रदेशात ते एकच मला ओळखीचे वाटू लागले होते. माझी खोली पहिल्या मजल्यावरची. त्यामुळे त्या झाडाच्या फ़ांद्या सरळ माझ्या नजरेसमोर येत. त्यामुळे कधीकधी खिडकीबाहेरच्या दृश्याकडे पाहता आले नाही, की त्याचा राग येई... पण ६ महिन्यांनी घरी परत जातांना इतर कुठलेच पाश नव्हते तरी त्या झाडाकडे बघून वाईट वाटले होते.

त्यानंतर भारतातल्या जुन्या झाडांची नव्याने ओळख करून घेतांना एक दोन पावसाळे कसे गेले कळलंच नाही. लग्नाच्या आधी आम्ही काही झांडांभोवती गाणी म्हटली नाहीत- पण मला आवडलं असतं! पंकजला एकदातरी पुण्याच्या वेताळटेकडीवर न्यायचं होतं. तिथली झाडं संध्याकाळी सुरेख, पण रात्र पडताच भयाण दिसायला लागतात. चंद्र उगवू लागलेला असेल तरी त्याचा प्रकाश रस्त्यावर झिरपत नाही तेव्हा त्यांची भीती वाटते. शहरातल्या दिव्यांना बाजुला सारून बैराग्यासारखी ही झाडं वेताळ-टेकडीवर जाऊन बसलेली!!!

आता मी अमेरिकेत आले. जर्मनीमुळे स्प्रिंग, ऑटम ही ॠतुंची नावं माहिती असल्यामुळे इथे त्या ॠतुंची नकळत मन वाट पाहत होतं. आल्या आल्या भयंकर थंडी आणि बर्फ़ात उभी राहिलेली निष्पर्ण झाडं पाहिली. एका झाडावर तर एक छोटी चिमणी पण दिसली. मी विचार केला- ही बिचारी चिमणी इथे आडोशाला आलिये नेहमीप्रमाणे, पण तिच्या ओळखीच्या झाडांवरची पानं कुठे हरवली?
बर्फ़ातली निष्पर्ण झाडं ना त्या चिमणीच्या ओळखीची होती, ना माझ्या. पण चैत्रात पालवी फुटायला लागल्यावर झाडांचे खरे रूप दिसायला लागले. आणि तरीही मनाला ओळख पटेना! भारतात घेरेदार वृक्ष, वेली, छोटी झुडपं असे वेगवेगळे प्रकार पाहिले होते, पण इथे अमेरिकेत त्यातले एकही दिसले नाही. फ़ार तर फ़ार आमच्या जुन्या घराजवळ "फ़र्न" किंवा "विद्या" ह्या प्रकारांशी मिळतीजुळती एक दोन झाडं होती.

संध्याकाळी फ़िरायला जातांना इकडे तिकडे बघता बघता मनात असे विचार यायचे- की हा देश कित्येक भारतीयांनी "आपला" म्हटला आहे. आपलासा केला आहे. आणि ह्या देशानेही त्यांना सामावून घेतले आहे. पण भारतात जशी मेंदी, मधुमालती, चाफा, नारळ, दुर्वा, बाभळी, चिक काढणारी घाणेरी, हे प्रकार आपल्या अंतर्मनात रूजलेले असतात, तसे इथले कधी रूजतील का? उद्या माझ्या अमेरिकन पोरांना मी ह्या झाडांची ओळख कशी सांगू??? की त्यांच्या पुस्तकातून मला स्वतःला आधी ती करून घ्यावी लागेल???

ऑटम येईपर्यंत ही झाडं नजरेला तरी सवईची वाटू लागली होती. (आपल्या घरी पेपर टाकणाय्रा पोराचं नाव आपल्याला कुठे माहिती असतं? पण आपण त्याला चेहय्राने ओळखतो ना, तसंच काहिसं). मग आमच्या नवीन मित्रांच्या कंपूने न्यू हॅम्पशायरला जायचे ठरवले- खास "ऑटम कलर्स" पाहण्याकरता! गाडीत अंताक्षरी खेळत होतो. भारतात हजारो वेगवेगळ्या सहलींना अंताक्षरी खेळले असले, तरी त्याला किती युगं लोटली होती कोणजाणे! "सुहाना सफर और ये मौसम हसीं" असं गात होतो, तेवढ्यात बाहेर लक्ष गेलं आणि गाणं म्हणायचं विसरूनच गेलो!!!

नेमका पाऊस पडल्यामुळे पर्वतावर विसावलेलं धुकं, आणि त्यातून अधिकच मोहक दिसणारी अक्षरशः शेकडो रंगांची उधळण करणारी झाडं! एरवी भारतात जितकं सृष्टीसौंदर्य आहे, तेवढं मी अजून तरी कुठेही पाहिलेलं नाही. पण हे रंग खरंच वेड लावणारे होते! कुठे बघावे, कुठे नाही? एकीकडे लालसर, गुलाबी, दुसरीकडे केशरी, पिवळी, आणि मधेमधे त्या रंगांच्या असंख्य छटांनी पर्वतरांगा नटल्या होत्या. maple, birch, hickory, red oak अशी सगळी झाडं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लावली होतीच, पण खालची दरी आणि वरचा डोंगरही ते दागिने घालुन मिरवत होता.
जाताजाता उन्हाळ्याने दिलेली अप्रतीम भेट. थंडीची चाहूल लागावी, पण ती थोडी तरी सुखद व्हावी, म्हणून हा झगमगाट!

भारतातली झाडं कशी अस्ताव्यस्त पसरलेली असतात. इथली मात्र एकूणच व्यवस्थितपणाला शोभेशी! उंचच उंच, पण सरळसोट वाढणारी, एकमेकांच्या अध्यात ना मध्यात. खरं सांगायचं म्हणजे इथल्या माणसांसारखीच. सावली देतील, पण आपल्या मुळांनी वेढून टाकणार नाहीत. त्यांची पानं/फळं जेव्हा शिशिरात खाली पडतात, तेव्हा लगेच कोणीतरी ती झाडून टाकणार! आपली मुलं मोठी झाली, की त्याना बाहेरच्या जगात नि:शंकपणे धाडून देणारे इथले आईबाप- तशीच ती झाडं...

आता पुन्हा हिवाळा आलाय. उन्हाळ्यात गुलाबी निळे लाल सगळे रंग घालणारे हे "लोक" एकदम काळ्या, ग्रे, राखी रंगात थोडेसे उदास दिसताहेत. आता क्रिमसचे वेध लागले, पण दिवस लहान होत होत ४.३० लाच मावळायला लागलंय. त्यामुळे आता झाडांनाही आपला पसारा आवरता घ्यायला लागलाय.
नुसत्या राखाडी रंगाच्या काड्या काय त्या उरल्यात.
भारतातही उन्हाळ्यात झाडांची काडं होतातच, पण त्यातही उन्हाची ऊब जाणवते, तिचा इथे लवलेशही उरला नाहिये. नदीकाठावरून आमच्या कॉलेजची बस जाते, ते दृश्य सुंदर म्हणावं की भाकास? बाजूला पाणी असूनही पानांना पारखी झालेली झाडं पाहिल्या बर्फ़ानंतर मात्र पुन्हा डौलदार दिसू लागतील- Christmas Tree बरोबर रस्त्यावरच्या इतर झाडांनाही प्रकाशाची फुलं लाभतील... आणि मग वसंतोत्सवाची वाट बघत बघत हिवाळा कसा गेला कळणारही नाही...

माणसं झाडांसारखी असती,
तर रान झालं असतं,
प्रत्येक माझ्या आठवणीचं
एक पान झालं असतं!

3/13/15

बाल्कनी


पोर्तोरीकोच्या आमच्या घराला एक मस्त मोठ्ठी बाल्कनी होती. "बाल्कनीतून काय काय दिसतं?" म्हटलं, की झालीच पोराची लिस्ट सुरू..."बाल्कनीतून समुद्र दिसतो, नारळाची झाडं दिसतात, बिल्डिंग दिसतात, मोठ्ठी क्रूज शिप दिसते, दिवे दिसतात, रस्ता दिसतो, आणि रस्त्याच्या पलिकडे Luis Munoz Rivera पार्कपण दिसतो! खरंच तो फ्लॅट इतका समुद्राकाठी होता, की सॅन हुआनला क्रूजशिप आलेली दिसायची. मग आम्ही ठरवायचो, "आज गावात गर्दी असणार. आज डिनरला दुसरीकडे जाऊया!" रस्त्यापलिकडचा पार्क इतका ***पाशी होता, तरी बाहेर पडायची आमची अर्धी भूक त्या बाल्कनीतच भागायची, इतके आम्ही तिथे पडीक असायचो. तिला दारं होती, पण रात्रीशिवाय, ६ महिन्यात ६ वेळाही कधी ती कधी बंद राहिली नाहीत. असह्य उन्हातही बेडरूम किंवा टीव्हीच्या खोलीत ए.सी लावला, तरी बाल्कनीला रजा नसे.



पारदर्शी काचांच्या भिंती असलेल्या बाल्कन्या फक्त अब्जाधींशांच्या, जुहूच्या फ्लॅटच्या असतात, असंच ऐकलं होतं. पाहिल्यावर तर वेडेच झालो. एक महिनाभर मस्त वाटलं, पण भर रस्त्याच्या रहदारीमुळे, समुद्रावरच्या वाऱ्यामुळे, बाल्कनीत फार घाण व्हायची, नि तिथली धूळ माती सगळ्या घरभर पसरायची. म्हणून एकदा सरळ बादलीत पाणी घेऊन, पाईप लावून ती धुवायला घेतली, तर आमच्या पिटक्याला काय चेव आलाय विचारता! तो दिवसभर "little helper" होऊन बाल्कनी धूत बसला, आणि शेवटी "किती पाणी वाया घालवलंस बघ, नळातलं सगळं पाणीच संपून गेलं" असं सांगून त्याला उचलून बाथरूममधे न्यायला लागलं. खोटं कशाला सांगू, बाहेरही पडता येत नाही इतकं ऊन झालं, की "बाल्कनी धुणे" हा आमचा आवडता प्रोग्रॅम झाला :)

उन्हाळी प्रदेशात रहायचे सुख त्या बाल्कनीत बसलं, की जाणवे. वीकेंडला सकाळी उठल्याउठल्या नवरा शास्त्रीय संगीत लावतो, ते भरदार, भारलेले, भारावणारे सूर, आणि संगतीला पूर्वेकडून उगवणारा "दिनमणी व्योमराज"! मग दिवस चढत जातो तशी रहदारी वाढायची. सकाळी मी कानोसा घेतच असायचे, की  "कचरू" कधी येेतो, कारण माझ्या छोट्याच्या जीवनातला तो एक मोठ्ठा आनंददायी प्रसंग होऊन बसला होता! (म्हणजे, कचऱ्याची गाडी. माझ्या भाच्याचा शब्दच मी माझ्या मुलाला शिकवला, पण कचरूचं वेड मात्र शिकवावं लागलंच नाही, कारण ते दोघांत अनुवांशिकच असावं :).  न्यू जर्सीत बंगलेवजा घरांच्या कचरागाडीतून दोन कामकरी उतरतात, आणि एकेका घरासमोरची कचराकुंडी गाडीत ओतत पुढे जातात. हा "कचरू" मात्र वेगळा होता.

आम्ही आमचे कचरे खालच्या मोठ्या डंपस्टरात जाऊन टाकायचो, तो डंपस्टर उचलायला ह्या कचरूला दोन यांत्रिक हात होते. एवढा भला थोरला डंपस्टर कचरूच्या वर उचलून त्यात उलटा होतो, आणि कचरा आत पडतो, हा चमत्कार माझ्या पोराने प्रथमच पाहिला. ते ही ६ व्या मजल्याच्या बाल्कनीतून बघतांना अगदी नीट दिसतं. मग कचरूचं खेळणं घरी आलं. त्याच्यावर Tonka हे नाव छापलेलं होतं म्हणून कचरूचं पुन्हा बारसं होऊन "टोंका" झालं. जेवतांना टोंकाची गोष्ट. टोंकाच्या गोष्टीला डिस्ने कार्स ची फोडणी. हे सSSSगळं त्या एका बाल्कनी पासून सुरू झालं.

पोर्तोरीकोत भाषेच्या प्रश्नामुळे, आणि ६च महिने रहायचे असल्यामुळे, आमचा फारसा गोतावळा नव्हता, तरीही, त्या बाल्कनीने आमचे दिवस अळणी जाऊ दिले नाहीत. कधी त्यावरून सायकल मॅरॅथॉनची गडबड, तर कधी PREPA विरोधी रॅली, सर्कशीचे ट्रक गाणी बजावणी करत, तर पोलिसगाड्या किंवा ॲम्ब्युलन्स सायरनने बोंबलत जातांना बघणे, हे उद्योग मी आणि माझ्या मुलाने सारख्याच हिरीरीने केले.

मधमाशी, मुंगळे किंवा भुंगे जर बाल्कनीत आले, तर मग पुढचे दोन तास पिटक्याला ते पुरत. मुंगळा कुठे चढतो, तो पडेल ना! किंवा "बधमाशी" उडाली, कि ती फुलातून मध आणायला गेलीये" अशी वर्णनं ऐकायला मिळत. पक्ष्यांसाठी खरं दाणे ठेवू शकलो असतो, पण मला ज ब र द स्त पक्षी-फोबिया आहे म्हणून ते राहिलं. (नाही, हिचकॉकचा पिक्चर पाहिल्यामुळे तो झालेला नाही, कारण मी तो पिक्चर पाहिलाच नाहिये आणि कधी पाहणारही नाही.)

पाऊस पडू लागला, की तर  माझ्या पोरापेक्षा मलाच जास्त भरतं यायचं, की "चला बाल्कनीत जाऊन पाऊस पाहू. पावसात भिजू!" पाऊस बघतांना झाडांचे इतके वेगवेगळे हिरवे रंग दिसायचे, की हरखून जायला व्हायचं. एरवी एवढ्या उकाड्यात गरम पेक्षा गार लिंबू सरबतच बरे वाटत असले, तरी केवळ त्या बाल्कनीला न्याय द्यायला कित्येकदा पावसात, किंवा संध्याकाळी मी चहा घेऊन तासंतास तिथे काढायचे." पुस्तकं वाचायला फारसा वेळ मला मिळत नसे, पण नवऱ्याने ४-५ ग्रंथ तिथे सहज संपवले.

आमच्या टिपिकल अमेरिकन घरची बाल्कनी म्हणजे, इमारतीला बाहेरून सजावट करावी तशी, आणि तीही privacy च्या दृष्टीने, घराच्या "उलट्या" बाजूला. गावगप्पा आणि चांभारचौकशा करण्यासाठी अगदीच बिनकामाची. सेक्स ॲण्ड द सिटी मधल्या कॅरी ब्रॅडशॉ "घरायेवढं कपडे-बुटांचं कपाट" असं स्वप्नरंजन करत असते, तशी मी, फक्त एका छोट्या खोलीएवढ्या बाल्कनीचे.
"खुर्चीवरी बसावे, रस्त्याकडे पहावे, चा-बिस्किटे चरावे, त्या बाल्कनीत माझ्या." असं संत तुकडोजी महाराजांनी म्हणूनच ठेवलंय ना :) :)




1/6/15

पोळपाटाचे एर्गोनॉमिक्स आणि इतर "पकाऊ गोष्टी"

लग्नाआधी आई-आजींनी भरपूर मागे लागून पाहिले, कि बये, आता तरी थोडा स्वयंपाक शिकून घे. पण मुळातली नावड, आणि नावडीतून निर्माण झालेली भीती, ह्या दोन गोष्टींमुळे माझी स्वयंपाकाची "भट्टी" कधी जमत नव्हती. तरीही, एक दिवस मारून मुटकून मला "पोळ्यांच्या" कामाला जुंपण्यात आले. तुळशी बागेतून मावशांसह खरेदी (हा एक स्वतंत्र विषय होऊ शकेल) करतांना, आईने त्याकाळी नवीन निघालेला प्लॅस्टिकचा पोळपाट (अय्या काय छान आहे!, धुवायला सोप्पा, हलका, दिसतोही स्वच्छ पांढरा! वगैरे वगैरे कारणमिमांसा देऊन) घरी आणला होता. त्यावर काय जमतंय बघू, असं म्हणून मी लाटणे हातात घ्यायची खोटी, कि मला पोळ्या चक्क जमूच लागल्या!

आजी म्हणाली, "पत्रावळी आधी द्रोणा, तो जावई शहाणा!" (ह्या म्हणीबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, सानेगुरूजींचे श्यामची आई वाचणे. माहिती नको असल्यासही, श्यामची आई  जरूरच वाचणे.)
एरवीपण शाळेत असतांना, बहुतांश पोरांना न जमणाऱ्या/आवडणाऱ्या गोष्टींकडेच माझं जास्त लक्ष असायचं. उदा: विज्ञान किंवा गणित हे माझे scoring subjects नसून, इंग्रजी/मराठी हे होते! बहुतांश लोकांना नावडणाऱ्या कामाची, भाज्या चिरायची पण मला फाSSSर आवड, पण फोडणीला घालणे, त्यात वेगवेगळी मसाल्यांची कॉम्बिनेशन्स, शिजवण्याची कसरत, हे येवढे डोकेखाऊ काम कोण करेल? कोथिंबीर, पालक, मेथी तर मी अश्शी बारीक चिरायची, की काड्या घेतल्या असतील तरी कळणार नाही. कलिंगडाच्या एकसारख्या चौकोनी फोडी, पावभाजीवर घ्यायचे लोणी- अगदी कशा-कशाचीही कापाकापी मला आवडते.

मग काय, माझ्या पोळ्यांचंही, माझ्या कवितांइतकच कौतुक होऊ लागलं! "काय सुरेख हलक्या हाताने लाटते! अजून एकसारखे आकार येत नाहीत, पण प्रत्येक पोळी पातळ आहे, गोलच आहे, आणि फुगतेही आहे! मुख्य म्हणजे, त्या प्लॅस्टिकच्या पोळपाटावर घरातल्या इतर कोणाचाच हात (आणि जीव) बसला नव्हता, तरी मला तो आवडू लागला. लग्नानंतर आई म्हणाली, "तसंही प्लॅस्टिकचा पोळपाट मी वापरणार नाहिये, तुला न्यायचा असेल, तर तोच ने. २३किलो वजनातही बसेल सहज."

अमेरिकेत आल्याआल्या, चांगल्या पोळपाटाखेरिजही, पोळ्या नीट व्हायला काहितरी आवश्यक असतं, हे ताबडतोब लक्षात आलं, "कणीक"! गोल्डन टेंपल, सुजाता, नेचर्स बेस्ट, वाट्टेल ते पुडे आणले, तरी सकाळची पोळी संध्याकाळी खायच्या लायकीची उरत नाही, म्हटल्यावर मास्टर्ससाठी युनिव्हर्सिटीज शोधायच्या सोडून, आधी त्याच संशोधनाकडे मोर्चा वळवला. मग लक्षात आलं, पोळी तव्यावर फार पटकन कोरडी पडत्येय. अर्ध्या मिनिटाच्या वर एकीकडे ठेवली, कि गेलीच वाया. सासू-सासरे प्रथम आले, तेंव्हा, सासूबाईंनी उत्साहाने, "मी पोळ्या करते", म्हटल्यावर माझा चेहरा बघण्यासारखा झाला! दाखवण्यासारखा एक गुण, तोही दाखवायची संधी मिळणार नाही का काय? पण कणकेने वाचवले. पहिले काही दिवस तरी, त्यांनाच पोळ्या जमेनात, मग माझं फावलं.

तर नव्याची नवलाई संपली, पोळ्या करायची हौसही भागली, तरी, त्यात एक तंद्री लागली की मला बऱ्यापैकी मन:शांती मिळते, म्हणून मी रोज पोळ्या करतेच. तर नवरा एकदा म्हणाला, "तुलाच पोळ्यांची हौस आहे. रोज दोन दोन तास (अर्थातच हे त्याचं exaggeration!) त्यात घालवतेस, त्यापेक्षा पोळ्या विकत आणूया. मला काही फरक पडत नाही." ऑ????
माझा मोठ्ठा ऑ झाला, कारण हे म्हणजे, मी त्याला, "तू नोकरी कशाला करतोस?" म्हणण्यासारखं होतं.
तरीपण मी पोराचं, पैशाचं, पोटाचं, अशी कारणं काढत दहा वर्ष पोळ्या करतच राहिले. ("बदडणे" हा शब्दप्रयोग मला लागू होत नाही, ह्याचा मला किती अभिमान!) नवीन लग्न झालेल्या कोणीही बहिणी/मैत्रिणींनी पोळ्या-प्रताप ऐकवले, कि तो आणखीनच वाढतो, हे ही सांगूनच टाकते. "मला बाई आधीपासूनच............." मी लगेच पुराण लावते.

अशी दहा वर्ष, पोळपाट-लाटण्यासह, कणकेच्या गोळ्यासारखी गोल गोल फिरत, पोळीइतकं नाही, तरी बऱ्यापैकी "फुगत-फुगत", स्वयंपाकाच्या रिंगणात मजेने झिम्मा घालत गेली. आणि एक दिवस, माझ्या पाठीराख्या प्लॅस्टिकच्या पोळपाटावर- मीच- गरम डाव ठेवला. तिथे प्लॅस्टिक वितळून खोक पडली. पुढची पोळी अडली. आणि नवीन पोळपाटाच्या शोधात असतांनाच मला माझ्या पोळपाटाचं वैशिष्ट्य कळलं. पूर्वी, लाकडी पोळपाट सुद्धा, मधे फुगीर असायचे. तसाच हा ही होता. त्यामुळे पोळी कडेकडेने लाटणं जास्त सोपं जायचं. शिवाय, लाकडी पोळपाटाला नव्हता, तसा ह्याला, सूक्ष्म खरखरीतपणा होता (बाथरूममधे घसरून पडायला नको, म्हणून टाईल्सला जसा ठेवतात, तसा) त्यामुळे, पोळी चिकटण्याचं प्रमाण बरंच कमी होतं. आणि शेवटचा फरक असा, की हा पोळपाट नेहमीच्या पोळपाटांपेक्षा, निदान २ इंच तरी जास्त उंच होता.

मग मी भारतात, अमेरिकेत किती शोधलं, तरी तसा पोळपाट काही मला सापडला नाही. पण मनात विचार आला, कार, फोन असल्या नित्योपयोगी वस्तूंच्या ergonomics चा भरपूर विचार केला जातो, तसा स्वयंपाकातल्या सुऱ्यांव्यतिरिक्त फार कशाचा होतांना दिसत नाही. विशेषत: पोळपाट, डबे-बरण्या, पाण्याचे ग्लास-वाट्या. नवीन पोळपाटावरही मला पोळ्या करायची सवय झालीच, पण तो पोळपाट "पुन्हा होणे नाही" असं का???

त.टी.: ergonomics = कामातिल कौशल्य/कार्यक्षमतेचा अभ्यास (the study of people's efficiency in their working environment)
त.टी. २: ergonomics चा मी वाक्यात नक्कीच चुकीचा प्रयोग केलेला आहे, पण सूज्ञ वाचकहो, कृपया भा.पो. करून घ्या :)
त.टी. ३: कॉईलवर पोळ्या करायच्या असल्यास एक स्टँड असलेली उंच जाळी सहसा देसी दुकानांत मिळते, ती पोळ्या फुगवायला अनिवार्य आहे. शिवाय, ४-५ पोळ्या आधी लाटून ठेवून मग तवा तापवल्यास, पोळ्या लाटणे, व शेकणे, ह्या दोन्हीची चांगली सांगड घालता येते, कारण कॉईलवर, पोळी शेकायला अगदी कमी वेळ लागतो, पण आपल्या लाटण्याचा वेग त्या मानाने फारच कमी असतो.
त.टी. ४: कणकेचे वेगवेगळे प्रकार वापरून निष्कर्ष असा, की आशिर्वाद/नेचर्स बेस्ट/सुजाता हे प्रकार त्यातल्या त्यात उत्तम आहेत. कणीक जुनी असेल, तर मात्र वाईटच, कारण तिची लवचिकता कमी झालेली असते. शक्यतोवर छोटे पुडे आणल्यास, कणीक फार जुनी होण्याआधी वापरली जाते. अजून एक युक्ती अशी, की २ कप कणकेत १/२ कप Bob's Red Mill ची Whole Wheat Flour मिसळणे. ही महाग आहे, पण अतिशय शुद्ध कणकेप्रमाणे लालसर दिसते, व लवचिक असते, त्यामुळे पोळ्या मऊ राहतात.
त.टी. ५: माझी मावशी उवाच, "बाहेरच्या जगात इतके गड सर करणाऱ्या तुम्हा मुलींना, पोळ्या नाही जमल्या तर काही मोठेसे वाटून घ्यायला नको! Roti Maker घेऊन टाका सरळ, किंवा गुज्जू आंटी शोधा‍ :) :) 



10/21/13

तयाचा वेलू...

माझं बालपण गेलं, ते घर एका परीने अमेरिकनच म्हणायला हवं. तिथे “दिसतं तसं नसतं” चे अमेरिकन नियम अगदी १००% लागू होते. अमेरिकेत कसं, driveway मध्ये park करतात, नि parkway वरती गाडी चालवतात. हायवेवरून Exit करतांना तुम्ही खरं म्हणजे कुठल्यातरी गावात enter करत असता, तुमच्या “cousin” ची मुलं सुद्धा तुमची “cousins” च असतात.....

माझ्या लहानपणी, आमच्या घरातही अगदी तसलाच प्रकार होता. बैठकीच्या, “मधल्या खोलीत” रात्री सोफे बाजूला करून आम्ही गाद्या घालायचो, आणि कोपऱ्यातल्या एका बेडरूमला मात्र “classroom” बनवून तिथे माझे आजोबा इंग्रजीची शिकवणी करत असत. दुसऱ्या बेडरूमला आम्ही चक्क dressing room म्हणायचो, कारण तिथे आंघोळ झाल्यावर तयार व्हायचे असायचे हे एक, आणि गणेशोत्सव, शारदोत्सव, महिला मंडळ, नागरिक मंडळाच्या अनेक कार्यक्रमांची green room सुद्धा तीच होती. करता काय? “टिळकनगर” मैदानाच्या काठावरच आमचं घर पडायचं, त्यामुळे भोज्यासारखं तिथे डोकावूनच शेजारी-पाजारी पुढे जात.

दारं नि खिडक्या तर त्या घराला इतक्या होत्या, की “सातशे खिडक्या नऊशे दारं” हे गाणं आपल्याच घरावरून तयार केलंय, असं मला नेहमी वाटायचं. पुढच्या अंगणातून आत गेल्यावर नावाला सुद्धा “दार” म्हणून नव्हतं. फक्त एक जाळीचा वऱ्हांडा, नि त्याला जोडून जो पॅसेज होता, त्यातून थेट स्वयंपाकघरातल्या ओट्यापर्यंत नजर जाई. म्हणजे नको तिथे दारं, नि हवी तिथे ठेंगा!

पण त्या घरातली माणसं तरी कुठे कुणाच्या “व्याख्येत” बसणारी होती? मी ज्यांना “आजी-आजोबा” म्हणते, ते खरं म्हणजे माझे आत्या-आतोबा होते. माझी खरी आजी फार लवकर वारल्यावर तिनेच बाबांना मोठे केले, म्हणून मग तीच “आजी” झाली. अहो, आमचा कुत्रा “लालू” हा सुद्धा खरं म्हणजे आमचा कुत्रा नसून वाट चुकून आला, नि घरचाच झाला. तर मग त्याच नियमाने, “माझ्यासारख्या “शाण्या” मुलीचा एवढा खोडसाळ छोटा भाऊ नक्कीच नसेल, नक्कीच आई-बाबांनी हॉस्पिटलातून चुकून दुसराच उचलून आणलाय, असंही माझं पक्कं मत झालेलं होतं J

कोण-कुठल्या-देश-वेष-रंगरूप-भाषांच्या विविध लोकांना सामावून घेणाऱ्या अमेरिकेसारखंच ते घर, देशस्थ असो वा कोकणस्थ, मराठे असोत वा मारवाडी, सगळ्यांचंच घर झालं. रक्ताची “खरी” नाती फारशी उरलीच नसतांना, ह्या “मानलेल्या” भाऊ-काका-बहीण-मुलीच्या नात्यांत मात्र अजूनही ओलावा आहे, हक्काची माया आहे. अशी वर्ष सरली, नि पाखरं बाहेर पडली, तसं मला अजून एक सत्य समजत-उमजत गेलं.......
की आपण हे जे “आपलं” म्हणतो, ते घरच खरं म्हणजे “आपलं” नाहिये.
मोगऱ्याच्या सुवासाचं घर
आंब्याच्या रसाचं घर
टिक्करबिल्ला खेळण्याचं घर
लिंबोण्या वेचण्याचं घर
अंगण, ऊन, जाळीच्या कोनाड्यांचं,
गच्ची, पाऊस, वाऱ्याचं घर
कपाटं, माळे, कोठीही भरून
उरलेल्या पसाऱ्यांचं घर...
ते घर आमच्यासाठीच बनलं असावं, कारण गेल्या ३५ वर्षात त्याचे खरे मालक कधीच तिथे राहिलेही नव्हते. आमचं झालं, नि ते हळूहळू भरलं, आमच्यासाठी ते बदललं. त्यातल्या खोल्यांनी आपले रंगच नव्हे, तर रूपही पालटले. आजोबा गेल्यावर त्यांच्या खोलीतल्या भिंतीवर ज्ञानेश्वर महाराजांच्या बाजूला चक्क मायकल जॅकसन येऊन बसला. पण आम्ही पाखरे उडालो, त्याच सुमारास आमच्या कुटुंबावर ते घरही सोडायची वेळ आली. घरमालकांनी तिथे फ्लॅट बांधायचे ठरवले होते!

ऐकून डोळे भरून आले, आणि “माहेर” म्हटल्यावर आता दुसरी कुठली वास्तू डोळ्यासमोर आणू म्हटली तरी आणता येईना. पण नाईलाजाने बाहेर पडलो. माळे, गाळे रिकामे झाले, पण आमच्या आठवणींचे हजारो काजवे अजून त्याच अंधाऱ्या खोल्यांमधून चमचम करत असतील असं मला वाटत राहिलं... काही दिवसांपूर्वी आई म्हणाली, “जुन्या घरच्या शेजारच्या काकूंकडे हळदीकुंकू होतं गं. गेलो, तर घर आपलं बंजर भूतबंगल्यासारखं दिसतंय. तण वाढलं, मोगऱ्याचे वेल पार जळून गेलेत...” आईचा आवाज हळवा झाला.

समोरच्या जाळीवर दोन्हीकडे नक्षीची कमान काढल्यासारखे ते भरघोस वेल डोळ्यांपुढे आले. त्यांचा सुवास मनात दरवळला. आणि त्याच सुमारास, इथे न्यू जर्सीतले आमचे मावशी-काका, त्यांचे अनेक वर्षांचे घर विकून एल. ए. ला स्थायिक व्हायला निघाले. पॅकिंग, नि टाकून द्यायच्या सामानाची आवराआवरी करायला आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. पुन्हा माझ्या मनाने, मागच्याच दु:खावरची खपली काढली. पुन्हा रिकाम्या भिंतींना सामोरं जावं लागणार होतं.

आणि तेवढ्यातच, काकांनी माझ्या हातात मोगऱ्याची छोटी कुंडी ठेवली. “ह्याच उन्हाळ्यात आणलाय हा! त्याला दोन-चार फुलंही आली... मोठ्या कुंडीत लावून बघ, टिकतोय का.” मी अवाक्! त्या घरचा मोगरा, ह्या रूपात इथे आला माझ्यासाठी? तिथल्या आठवणींचा दरवळ आता मी इथे जपावा म्हणून, त्याला पाणी घालायचा वसा मी इथे घ्यावा म्हणून! त्या घराने, त्यातल्या माणसांनी दिलेल्या मायेचा सडा इथे पडावा, नि वाढावा म्हणून!

बघता बघता मीच मग मोगरा झाले. टपटप करीत मोत्यांच्या सड्यातून अंगणात उतरले, हरवलेला सुगंध अंतरात गवसल्यावर घमघमले. कुणी रूजविला, कुणी शिंपिला, तयाचा वेलू, गगनावरी गेला!


6/26/12

गुळाची चव

तिच्या पुढे गूळ माउंट एव्हरेस्टसारखा अशक्य खडा होता. आता अर्धा तास तरी ती, आणि गूळ, आणि तिच्या विचारांचा पक्का पाक असणार होता. 
तिने रोजचे डोक्यातले सगळेच्या सगळे विषय एका झाडाला उलटे टांगून त्यांना मिरच्यांची आग लावून टाकली आधी. आई, बाळ, घर, संसार, आठवणी असलेच पुचके विषय का म्हणून घ्यायचे सदा न कदा आपण लिहायला? गुळावरचा राग विचारांवर काढत तिने स्वत:लाच खडा सवाल केला.  कुत्रे खांबापाशी मुततात, किंवा स्त्री-पुरूषांचे घामटचिकट संबंध, किंवा कचऱ्यातून अर्धा सडलेला आंबा काढून खाणारी म्हातारी, ह्यांची खरमरीत, सडेतोड वर्णनं घेऊन त्यातून एक कथा लिहायची. विचारच करायचा नाही ह्यापुढे, की कोणाला काय वाटेल. बाई असली म्हणजे काय लिहतांनाही बुरखा घालायचा, की चक्क नावच बदलून George Eliot करून टाकायचं, त्याशिवाय खरं खरं लिहता येत नाही? 

गुळाची ढेप चिरता चिरता सर्र्कन सुरी बोटावरून फिरली, नि क्षणात एक लाल चिरा तिथे टरारून आला. बोट झटकत, हेलपाटत तिने आधी नळाखाली धरलं, तरी हळदीवर-कुंकवासारखे गुळावर पाच थेंब पडून आत झिरपायलाही लागले होते. हा गूळ तरी थोडा मऊ असायला हवा होता ना? फरशी ओटाच काय, ओट्यालगतच्या चटईवरही थोडे थोडे खडे पडून हाता-पायाला चिकट होत होते. त्यात बोटावर बॅण्डेडची चिकट पट्टी घट्ट बसल्यामुळे बोट थोडं बधीर झाल्यासारखं वाटत होतं आणि सुरी अजूनच सटकायला लागली होती. 
लग्न झाल्या झाल्या आपल्या मराठमोळ्या वळणाप्रमाणे तिने आधी मिसळणाचा डबा, नि बाजूला गुळाचा डबा ठेवला होता. गूळपोळ्याही नवऱ्याला आवडत म्हणून लगेच शिकून घेतल्या, नि रोजच्या वरण-भाजीतही चवीला गूळ घालायला ती विसरत नव्हती. पण आज ह्या ढेपीने घाम काढला अगदी. एकतर इथे बत्ता/मुसळ असं काही नाही की दोन दणक्यात ढेकळं मोडतील. शिवाय फरशी पुसायला स्वत:च कंबर कसायला लागणार म्हणून खाली खूप सांडूनही चालणार नाही. 

चिकटला. हाताने मागे सारायला गेले तर केसांनाही चिकटला. नि हाताला एक केस चिकटून तो गुळात मिसळला. झालं, आता हात धुवून, पुसून कोरडे करून आधी तो केस काढा. हे करता करता तिचं टाळकं अजून अजून फिरत चाललं होतं. लेखिका होण्याचं स्वप्नंही खरंतर तिने कधीच पाहिलं नव्हतं, फक्त शाळा कॉलेजात, तर कधी शेजारी पाजारी कविता वगैरे वाचून कौतुक करायचे, तेवढंच. पण आता वाटायला लागलं होतं, की चुकलंच. तेव्हापासूनच ध्यास घ्यायला हवा होता. आपल्या रोजच्या जगाबाहेर जाऊन, तळागाळातलं आयुष्य अनुभवायला हवं होतं. 

गुळात एक मुंगळा, "जुरासिक पार्क" पिक्चरातल्या त्या माशीसारखा, अखंड पुरला गेला होता. घाणेरडा गूळ. आम्ही भारतात नाही, म्हणून आम्हाला काहीही विकतात देसी-ग्रोसरीवाले. आम्ही जाणार कुठे? घाणेरडा तर घाणेरडा, गूळ तर मिळतोय, म्हणत येणार पुन्हा तिथेच. हिम्मतच कमी पडते. स्वत:च टाकायला हवं एक मराठी वस्तूंचं दुकान. दणकून चालेल. चार लोक भेटतील. नाही झोपडपट्टीत जाता आलं तेव्हा, तर आता त्यांच्या अनुभवातून काही मसाला मिळेल. तेव्हाच अशी वेगळी वाट पकडायला हवी होती. एअरहोस्टेस बनायचं, हॉटेल मॅनेजमेंट करून "ताज" मधे काळ्या स्टॉकिंग्जवर काळाच स्कर्ट, टॉप घालून, लाल लिप्स्टिक लावून "व्हाट वूड यू लाईक टू ड्रिंक टुडे?" करायला हवं होतं. किंवा त्या नवीन संगीतकारिणी सारखं बॅकपॅक लावून खेड्यापाड्यात फिरत "ऑथेंटिक इंडियन म्यूझिक" शोधत फिरायला हवं होतं. किंवा एकदा तरी, अपरात्री, एकाट रस्त्यावर, गळ्यातल्या सोन्याच्या चेनने "ते" मिळवून ओढून तरी बघायला हवं होतं. 

पण मानवलं नसतंच ते आपल्याला. बाबांनी "सातच्या आत घरात" पद्धतीने वाढवलं, आणि आईने सानेगुरूजी वगैरे "सकस" वाचनाची सवय लावली, तर एकदम चिंचगूळाच्या वरणाऐवजी तंगडी कबाब खाणार होतीस काय? आज त्या सुरक्षित जगाची किंमत नाही वाटत आहे आपल्याला. परिघाबाहेरचे अनुभव घ्यायला निघालीस, एवढाही विचार केला नाही, की जे तुला सहज मिळालं त्यासाठी रस्त्यावरच्या शेंबड्या पोरीने काय वाटेल ते केलं असतं. अगदी कृतघ्न वाटायला लागलं अगदी, तशी फोर्कने टोचून खसकन तिने गुळातून मुंगळा बाहेर काढला. 

कशाला घुसलास बाबा त्या गुळात? गोडच असतं असं सगळं, मऊपण लागतं आधीआधी. म्हणून काय कुठेही शिरायचं नि कशाचीही हाव धरायची, अशी विचार न करता? किती महीने बसलास त्यात रुतून, की मरूनसुद्धा सुटका होईना!  किती तडफडला असशील, पण त्याने पायच तुटले असतील आधी. मग वाट बघण्यावाचून हाती काय उरलं असेल?
तिला आता त्या गुळाकडे बघवेना. मुंगळ्याचा हात धुवून, पुन्हा पुसून पुन्हा गुळाशी दोन हात करायचं त्राण तिच्यात राहिलं नव्हतं. फेकून देण्याइतकाही काही तो वाईट नव्हता. म्हणजे, गूळ. गूळ वाईट नव्हता. मुंगळाही वाईट नव्हताच. पण मुंगळ्याच्या जन्माला आला ना तो. मग गुळात घुसण्यावाचून दुसरं इतिकर्तव्य तरी काय होतं त्याचं? आपणही अगदीच "हे" होत चाललोय.

तिला एकदम आठवलं, एकदा टीव्हीवर चॅनेल बदलतांना चुकून बलात्काराचा सीन डोळ्यांवर आदळला होता. ती  तशा अवस्थेतही, कण्हत कुथत हातपाय झाडणारी बाई.  दोन सेकंदही झाले नसतील तो पोटात ढवळायला लागलं होतं. दिवाळी अंकातल्या "त्या तशा" कथा, किंवा रेल्वे बॉम्बस्फोटात चिंध्याचिंध्या झालेल्या शरीरांचं एकदाच पाहिलेलं फुटेज, किंवा एका रस्त्यावर मरून पडलेलं हरीण. विसरू म्हटलं तरी विसरता न येणारं असं बरंच काही. 
कुठेकुठे मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यांतून वाचलेलं, पाहिलेलं वर वर यायला लागलं. हातपाय थरथरायला लागले. डोळे उघडले तरी, नि बंद केले तर नक्कीच नक्कीच, हे गरळ सारखं भोवती फिरायला लागलं. ती खाली बसली. पटकन गुळाचा एक खडा तोंडात कोंबला. नि घटाघटा पाणी प्यायली. 

दोन्ही डोळ्यांवर सपासप पाणी मारून तिने पुन्हा डोळे उघडले. जगातली घाण, मनातली घाण ओकून ओकून पुन्हा वाढवायची नाही. खूणगाठ बांधली, नि पुढ्यातला गूळ नव्या जोमाने चिरायला लागली. 

2/8/12

ढीग

ती एकटीच नव्हती. तिच्याबरोबर, तिच्याचसारख्या खूपजणी होत्या. तरीपण, ती नेहमीची मुंबई, पुण्याकडची दिसली नाही, म्हणून तिलाच विचारलं, "बाई, तू कुठची?"
तर ती म्हणाली, "लखनऊची! फीनिक्स मॉल माहितिये? तिकडची!"
मग इथे कुठे नि कशी आलीस?
"साडी नि ड्रेससाठी आयुष्य वेचते बाई मी." ती म्हणाली.

तरीही मला तिची ओळख काही पटेना. बाकीच्यांचे रंग-ढंग एव्हाना परिचयाचे झाले होते. त्यांना सोबत घेऊन कोण कोण आलं असेल, त्याचाही अंदाज येण्यासारखा होता. आणि नाहीच आला, तर प्रत्येकीचं नाव-गाव पत्ता सांगतच होता की एक एक कहाणी...
गिरगावच्या मावशी बरोबर आली तिच्यात मुंबईचा नखरा दिसतच होता, "आशापुरा सिल्क्स" चं रंगीत विश्व तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहतंय. तरीही, आमच्या कुटुंबात अगदी "बडं" प्रस्थ असलेली आत्या चेन्नईहून आली, तेव्हा "नल्ली" वालीसमोर तिचा तोरा काही चालेना. छोटासा भरतकामाचा ब्लाऊजच तर होता आत, पण नल्लीच्या नावाने जादू केली की नाही सगळ्यांवर!

प्लॅस्टिकच्या ऐवजी कागद वापरून ईको-फ्रेंडलीपणा करणाऱ्या सिमी-ताईने फॅब-इंडियाच्या पिशवीतून शुद्ध स्वदेशी, "एक्सपोर्ट क्वालिटी कॉटन" चा, मळखाऊ (तिच्या मते डिसेंट) रंगाचा शर्ट तिच्या लाडक्या भावाला दिला, तेव्हा शर्टापेक्षाही आवडलेली "ती" हीच तर होती........

आणि एकी बरोबर माझा लाडका लेक अहोरात्र खेळत बसला होता... कोणे एके काळी पैठणी लेऊन आलेली, आज खेळणी घेऊन, लाळेत बरबटून बसलेली बघितली आणि मला तिच्याबद्द्ल विशेष सहानुभूती वाटायला लागली. ही कशी, भारदस्त व्यक्तिमत्वाची, ऐसपैस, जरा ’आडवी’च म्हणता येईलशी. पण भक्कम, अगदी प्रेमळ अशी, की छोट्याची मस्ती चालवून घ्यायला तिच्यासारखी दुसरी कोणी नव्हती.

बाकी इवल्या इवल्या बारक्या पण खूप होत्या, पण त्यांची नावं लक्षात कोण ठेवेल? हिरे-मोत्यांचे आहेर घेऊन आल्या, पण आता सेफ्टीपिनांपासून तिळगूळाच्या वड्यांपर्यंत काय वाट्टेल ती लूट त्यांनी घेऊन जायची, म्हणजे त्यांचा अपमानच नव्हता का?

तरीही त्यांची स्थिती बरी म्हणावी, अशी कथा त्या "झिरमिरीत" शेकडोंची होती. पाच पैसे देऊन कोणीही वेठीला धरलेल्या, कचऱ्याच्या भावाने विकल्या गेलेल्या, साध्या ओरखड्याने फाटणारं त्यांचं जिवंत कलेवर सुद्धा, पुन्हा पुन्हा गाठी मारून घेत त्या जगत होत्या. बघवेना, म्हणून डोळे दुसरीकडेच वळवले मी, तर पुन्हा ही लखनऊ वाली समोर आली. म्हणाली,

"अगं बापाकडून भावाकडे, नि नवऱ्याकडून मुलाकडे तुम्ही सोपवल्या जाता, तसाच काहीसा माझा प्रवास झाला. एकदा ते लखनऊचं घर सोडल्यावर, निर्वासितासारखी, जिथे जे काम पडेल तिथे हवी तशी राबवून घेतली, नि उपयोग संपल्यावर पुढच्या हाती सरकवून मोकळे झाले एकेकजण. आता तू तरी काय करणारेस माझं ? किती दिवस निगुतीने सांभाळशील?

आता मात्र माझ्या डोळ्यांसमोर हॉलोकास्ट मधला शवांचा ढीग दिसायला लागला. वसुंधरेच्या अंगावर जिथे तिथे बेवारशी पडलेल्या, आगगाडीतून जातांना रुळाजवळ पडलेल्या, झाडाच्या काडांना अडकलेल्या, वाऱ्यात दिशाहीनपाणे फडफडणाऱ्या, प्रत्येक घरातल्या खुंटीवर अस्ताव्यस्त लटकलेल्या, कचराकुंडीतून ओसंडून वाहणाऱ्या, त्या लाखो पिशव्यांचा ढीग!

त्यात्यल्या कितीजणींना रितसर "अग्नी" मिळेल, नि कितींना पुनर्जीवन, कुणास ठाऊक?


8/29/11

चित्तरकथा!

जेमतेम एक-चतुर्थांश वर्षे वयाच्या माझ्या पोराला केवळ मी जन्मच दिलाय म्हणून- अन्यथा सासरची सोडाच, पण माहेरची मंडळीसुद्धा, "अगदी त्याचा बाSSबा दिसतोय" म्हणायला लागली, तेव्हा मी जरा हिरिरीने माझा बाळपणीचा फोटो अ‍ॅल्बम पुस्तकांच्या कपाटातून शोधून काढला. नाक तर निर्विवाद आपलं नाही, पण थोडीशी हनुवटी, किंवा गालांचा भास तरी? माझ्याच फोटोंमधे मी माझंच बाळ कुठे दिसतंय का बघत बसले!

वितभर उंचीच्या मला, फूटभर उंचीचा हलव्याचा मुकुट घातलेला फोटो.
मग मोठ्ठा काळा गॉगल घातलेला, कुरळ्या केसांची नारळाची शेंडी घातलेला फोटो.
मग फ्रिलच्या फ्रॉकवर सोनेरी चांदण्या लावून शाळेच्या गॅदरिंगला नाच करतांनाचा फोटो...

एका फोटोपाशी मन जरा जास्त रेंगाळलं. जवळजवळ माझ्या खांद्यापर्यंत येणाऱ्या मोठ्या बादलीत, माझ्या आबांनी मला आंघोळ घालायला उभं धरलंय! काळ्या-पांढऱ्या मण्यांच्या मनगट्या घातलेल्या इवल्याशा हातांनी मी बादलीची कड धरून ठेवलीये, आणि बोळकं दाखवत हसतेय. माझ्याही आईने केवळ मला जन्म दिला म्हणून. अन्यथा मी सदासर्वदा आजी-आबांना चिकटलेली असायचे, आणि आईजवळ झोपल्यावरही, अगदी मध्यरात्री तिला उठवून "आबांकडे जायचंSSSS" असं भोकाड पसरायचे- ही गोष्ट मला वेगवेगळ्या प्रसंगी आई-मावशी-आजी-बाबांनी सांगून सांगून अगदी पाठ झालीच होती.

शिवाय ह्या बादलीतला फोटोचीपण एक गंमत गोष्ट खुद्द आबांनीच सांगितली, "हा फोटो बघ- मी तुला लहानपणी आंघोळ घातलीये त्याचं प्रूफ, नाहीतर तुला वाटेल आपल्या आबांनी आपल्यासाठी काही केलं की नाही? " "अहो मला असं कसं वाटेल?" हे म्हणण्याइतकी मी मोठी होईपर्यंत, तो फोटोही त्यांनी खास त्यांच्या कपाटाच्या दारावर चिकटवून ठेवला होता. जाता येता मला विचारायचे- "सांग बरं लहानपणी तुला आंघोळ कोण घालत होतं???"

आज तो फोटो बघतांना त्यांची आठवण तर आलीच, पण माझ्या स्वत:च्या पोट्ट्यालाही त्याची आजीच (माझी आईच) अजून आंघोळ घालते, म्हणून जरा कानकोंडंही झालं. मग आईला म्हटलं, "अगं उद्यापासून माझं ट्रेनिंग. मी पायावर नाही तर टबात, पण पिटक्याला आंघोळ घालायची सवय केली पाहिजे. नाहीतर आंबांबरोबर माझा होता, तसा ह्याच्या बरोबर तुझाच- बादलीतला फोटो काढावा लागेल!"
आई एकदम तापलीच, "तुला काय वाटतं- आबा तुला आंघोळ घालत होते? अगं मीच रोज घालत होते... त्यांनी तर चुकुनसुद्धा, एकदाही तुला आंघोळ घातली नव्हती!"

तेव्हा हसायला आलं, पण नंतर उगीच हरवल्यासारखं वाटत राहिलं... गमतीत झालं म्हणून काय, त्यांनी आपल्याला खोटं का सांगितलं? अगदी प्रूफ-प्रूफ म्हणून फोटो दाखवून पाठ करून घेतलं, आणि आपणही त्या फोटोभोवतीच आठवणी विणत बसलो? आधी न दिसलेल्या गोष्टी मग एकएक करून दिसायला लागल्या- बादली कोरडी ठण्ण आहे. ती त्यांच्या खोलीत का ठेवलीये? आंघोळच घालायची तर ती बाथरूम मधे नको का? आणि मुळात बादलीत पाणी असायला हवं- बाळ नव्हे! भारतात असं टब सारखं कोणी पाण्यात बुडवून आंघोळ घालत नाहीत.......

पुन्हा अ‍ॅल्बम चाळला- माझं केवढंतरी आयुष्य केवळ त्या फोटोंमधे उरलंय आता... न आठवणारं बालपण तर सोडाच, पण आठवणारंही बरंच काही आता थोडं धूसर व्हायला लागलं- तर त्या फोटोंमधूनच पुन्हा ठसठशीत अधोरेखित करून घ्यायचं. कॅलिडोस्कोपच्या रंगीत तुकड्यांसारख्या आठवणी- दरवेळी नवीन आकार घेऊन येतात. ते आकार आठवणींचे असतात, की मनाचे? कधी उदास असतांना आठवणीतलं आभाळही भरून आलेलं असावं, नि आठवणीतल्या सख्ख्या मैत्रिणीशी प्रत्यक्षात भेटल्यावर मात्र काय बोलावं ते कळेनासं व्हावं...

जितके फोटो- तितक्या गोष्टी.

एका वाढदिवसाला आम्ही अंगणात "व्हॉट कलर" खेळतोय. नेमकं माझ्यावर राज्य आलेलं, आणि २-३ रंग सांगितले तरी ते जाईना. तेव्हा रश्मीताईने मला बोलावलं. ती माझी आतेबहीण. माझ्याहून ५-६ वर्षांनी मोठी होती, त्यामुळे आम्हा बच्चेकंपनी बरोबर खेळण्यात तिला रस नव्हता. ती कानात म्हणाली, "क्रीम कलर सांग". क्रीम कलर म्हणजे कुठला, हे सुद्धा मला माहिती नव्हतं! तर ती म्हणाली, "तुझ्या फ्रॉकवर जी फुलं आहेत नां, तोच क्रीम कलर आहे." आता माझी चंगळच झाली. क्रीम कलर ला हात लावायचा, म्हणजे सगळ्यांना माझाच फ्रॉक धरायला यावं लागलं असतं, त्यामुळे मी कोणालाही आऊट करावं!

आत्ता क्रीम रंगाची फुलं असलेल्या त्या निळ्या ड्रेसमधला फोटो दिसला, नि ही गोष्ट आठवली. अजून किती क्षणांचा बनलेला होता तो दिवस! आईने केक केला असणार-सकाळी ओवाळलं असणार-मैत्रिणींनी कायकाय भेटवस्तू दिल्या असणार. पण ते आता आठवत नाही. फक्त ही क्रीम कलरची गोष्ट तेवढी ह्या एका क्षणात बंदिस्त झालिये!आता नादच लागलाय- ह्या फोटोंच्या कोलाजमधून आयुष्याची कहाणी सलग लावता येतेय का ते बघण्याचा. लाखो करोडो घटना, पात्र आणि स्थलकालाच्या गर्दीतून हे क्षण तेवढे हाती उरले- आबा म्हणाले तसे- प्रूफ म्हणून!

अजून शेकडो दिवस जातील, माझं बाळ मोठं होईल तेव्हा त्याला, आताच्या पद्धतीप्रमाणे अक्षरश: करोडो फोटोंचं वाण आयतं मिळेल. केवळ त्याचीच नव्हे, तर माझ्या जीवनाची चित्तरकथाही मला शेवटी त्यांच्याकडूनच ऐकायची आहे हेच खरं.



5/22/11

बिम्मची आई



छोट्या बिम्मच्या छोट्याशा विश्वात तो सोडून २-३ च इतर माणसं असतात: त्याची आई, त्याला सतत छळणारी आणि स्वत:ला अतिशय शहाणी समजणारी त्याची मोठी बहीण बब्बी, आणि नेहमी घराजवळच्या मोकळ्या आवारात भेटणारे आजोबा.
पण बिम्मला त्याशिवाय भरपूर मित्र आहेत, हे ही विसरून चालणार नाही- पिवळाधमक नीनम पक्षी, भलाथोरला राहुल हत्ती, पिट्टू नावाचे कुत्र्याचे पिल्लू, कुरकुरीत ऊन खाऊन रंगीत होणारी गाय, आणि असेच कोणी कोणी.

बिम्म कसा, थोडासा खादाड, थोडासा वांड, पण बराचसा गोंडस मुलगा आहे. तो जी.ए. कुलकर्णींच्या बखरीतच भेटतो, असं जर कोणी म्हणत असेल, तर त्याने जन्मात कधी लहान मुलांशी दोस्ती केली नाहिये, किंवा स्वत:चं मूलपणच त्याला आठवत नाहिये, असं आपण ठामपणे समजू शकतो.

बिम्मची आई मात्र तशी नाहिये. आता बिम्म आणि बब्बीसारख्या दोन पोरांना एकटीने सांभाळणं काय सोपं काम आहे का महाराजा? निरनिराळ्या रंगांचे काचेचे तुकडे, चॉकलेटच्या पाकिटातली रिकामी चांदी, एखादा पेरू, बब्बीवर चुकून प्रेम उतू जात असल्यास तिच्या वेणीत घालायला दोन चुरगळलेली चाफ्याची फुलं, दोरे, दगडापासून चिकट बेलफळापर्यंत काही म्हणजे काही ही बिम्मच्या खिशातून बाहेर पडू शकतं, पण त्याच्या सुपीक डोक्यातून काय काय बाहेर पडेल, त्याची तर कोणी कल्पनाच करू शकणार नाही!

ती काही बोलत नाही, पण मनातून तिला खरं म्हणजे बिम्मच्या वेड्या खेळांत मधून भाग घ्यायला आवडतं.
तिने माजघराची नुकती पुसलेली फरशी बिम्मने आपल्या "चित्रांनी" भरून टाकली, तरी ती फारशी रागावत नाहीच, उलट त्यात बिम्मच्या समोर लाडवांचा डोंगर काढलाय, ते बघून चक्क त्याला एका ऐवजी आज दोन लाडू देते! चुकूनसुद्धा ती मुलांना कधी, "बंद करा रे तुमची ती पोरकट प्रश्न!"- असं म्हणत नाही. उलट, "बिम्म, तू आहेस कामाचा माणूस. तेव्हा तू इथेच थांब. तोवर मी ब्रह्मदेवालाच विचारून येते..." अशी दरवेळी खुसखुशीत उत्तरं देत ती दोन्ही मुलांचं मूलपणच नव्हे, तर त्यांचं उपजत शहाणपणही सांभाळत असते.

त्याचा पतंग "उडणारा" नाही, "उडवणारा" आहे, हे ती समजून घेते. बब्बी नसत्या वेळी "खरं बोलण्याचं" अर्धवट शहाणपण मिरवते, तेव्हा तिला जमीनीवर आणायला आई लगेच, "तू ही काही कमी नाहीस...." अशी बब्बीने घातलेल्या घोटाळ्यांची यादी वाचून दाखवतेच की.

पण बिम्मही तिला कधीकधी त्रास देऊन जीव नकोसा करतो. मग ती,
"तू एक नाही, दहा रूळ इंजिनं असलास, तरी मोठ्या रस्त्यावर शिटी फुंकत गेलास, तर हाडे सैल करून देईन!" अशी त्याला खरपूस धमकी देऊन ठेवते. बरं, रूळ इंजीन नाही, तर छत्री, नाहीतर झाड, असं सारखं वेगवेगळं कायकाय होतांना बिम्म त्यातून वेगवेगळ्या उचापत्या करणार, त्याच्या सतत एक पाऊल पुढे राहणं तिला भागच पडतं. "छत्री आहेस म्हणून पावसात भिजायचं नाही", आणि "झाड असशील तर स्वस्थ एका कोपऱ्यात उभं राहायला" बिम्मला बजावते. पावसात भिजायचं नाही, तर छत्री होण्यात काय मज्जा? शिवाय झाडाला लाडू वगैरे खाता येत नाहीत, आणि एका जागी उभं रहावं लागतं... हे तर त्याला मानवणारं नसतंच. मग शेवटी तो आईला, "मी आता खराखुरा बिम्मच आहे" हे सांगून टाकतो!

पण बिम्मचे बाबा असतात मुंबईला. त्यांना सारखं घरी यायला कुठे जमतंय? त्यामुळे पोरांच्या बालपणाची मजा एकटीने लुटतांना, आणि सोसतांना, ती कधीकधी फार हळवी होऊन जाते. ्परवा बिम्मने बाबांना आपल्या रेघोट्यांच्या लिपीत लिहलेलं पत्र घेऊन तर ती कितीवेळ उदास बसून राहिली. एकेदिवशी मुलं मोठी होऊन घरट्याबाहेर पडतील, आणि त्यांना त्यांच्या वस्तू, खेळ, भांडणं, खऱ्या-खोट्या गोष्टी- कश्शा कश्शाची आठवण राहणार नाही.

पण आपल्यापाशी दररोज जमतोय हा ठेवा, तो हदयात साठवून ठेवतांना तिचं मन भरून येतं, आणि ती पोरांचे खूप खूप पापे घेते. तेव्हा बिम्म आणि बब्बीला कळत नाही, आई आज अशी का वागतेय?







3/17/11

घरात...

खोल्यांतून सुबकशा मांडलेल्या कोपऱ्यांना ।
सुखावला जीव बघे रांगोळल्या ओसऱ्यांना ॥

बैठकीस उजळतो स्नेहाचा प्रकाश सोनेरी ।
मैत्रांच्या मैफिलीतून हास्य-विनोदाच्या लहरी ॥

भिंतीच्या भकास भाळी आरसा न दाखविला ।
सौभाग्याचा चित्ररूपी अलंकार चढविला ॥

कोनाड्याच्या जाळीतून ऊन हिरवे पाझरे ।
तसे पडदे शिवले खिडक्यांवरी साजरे ॥

होळी खेळती मसाले काचेच्या बरण्यांतून ।
वाट्या-पातेल्यांचे मनोरे, त्यात दिसती शोभून ॥

शांत निळी झोप येते, ढगांच्या पलंगावरी ।
शुभ्र स्वप्नांचे हिमकण शिंपडलेल्या चादरी ॥

आता मात्र पसाऱ्याचे लागले डोहाळे घराला-
सज्ज झाले चिमुकल्या खेळण्याच्या स्वागताला!

10/29/10

जजमेंट

प्रत्येका कडे पहिल्या डावात १०-१० पानं. हुकुम ठरलेलाच असतो. बदाम.
वडील: "हुकुमाची ३ पानं आहेत, पण त्यातलं एक जरा हलकं. आणि चौकटचा राजा. आपल्याकडे सगळ्या रंगाची पानं असल्यामुळे तसा राजाचा हात व्हायला हरकत नाही. तरीपण, इकडचे तिकडचे सोडून २ च हात सांगावे. नेहमी पदर पाहून पाय पसरावे. नजर आकाशावर, आणि पोच फक्त खिडकीपर्यंत, त्यापेक्षा नकोच ते! अडी-अडचणीला, सणा-सुदीला पैसे लागतील म्हणून जपून जपून शिल्लक टाकायची आपली सवय! ती ह्या नवीन पिढीला काय कळणार?"
नवरा: "ह्या! तुम्ही आग्रह केला म्हणून हे असले फालतू खेळ खेळावे लागतायत." असं आधीच म्हणून टाकलं, की कितीही हात होवोत, न होवोत, उगीच विचार करायचं काम नाय. आता सगळ्या घोड्यांवर थोडी थोडी इस्टेट लावून टाकली, की एखादं तरी घोडं जिंकेल, तश्या ह्या ४ भारी पानांपैकी ३ तरी हात होतील, झालं सांगून टाकावं. मग इतरांचे डिसिजन होईपर्यंत हळूच iphone :)"
आई: "आई म्हटलं की सगळ्या गोष्टींवर प्रेमच करावं लागतं. मुलाबाळांवर प्रेम, आता सुनांवर प्रेम, एवढंच नव्हे, तर भाजी पाल्यावर प्रेम, साड्यांवर प्रेम आणि पत्त्यांवरही प्रेमच. मगाशी नेमका माझा एक्क्याचा हात कापलान सुनबाईने. आपणही त्या एवढ्याशा हार-जीतीवर किती हीरिरीने अडून बसलेलो होतो! शेवटी सगळे हात मोजायला लागल्यावर मी फेकून दिलं ते कापलेलं पान, आणि झालेच माझे बोलल्याप्रमाणे २ हात. तर काय? परवा ५-३-२ खेळत होतो, तिने २ हात काय ओढले माझे- तेव्हाही इतकं लागलं मनाला... ह्यावेळी नाही हं. करूनच दाखवीन ३ हात, तर मज्जा येईल.
इतकी वर्ष हातात एकच धड पान असलं, तरी त्याच्या भरोशावर अगदी १० माणसांचा नाही, पण ४-५ जणांचा संसार चालवतांना कशी जिवाची तडफड झाली, हे आजकालच्या मुलींना नाही कळायचं. त्यांना स्वत:चे हात करून हातभार लावता येतो म्हणून टिमकी मिरवतात... पण आधी रोजच्या भाजीत मीठाचा अंदाज येत नाही अजून, आणि चालल्या जजमेंट खेळायला! आता मात्र मी ठरवलंय. मन म्हणेल तसं जगायचं. आधीही सासूच्या राज्यात आम्हीच मन मारलं, आणि आताही सुनेच्या राज्यात आम्हीच का म्हणून मारायचं? हं. माझे दणकून लिहि रे ४ हात.!"
माऊ: "सध्या माझे मज्जेचे दिवस चाललेत अगदी. दादा-वहिनीने अमेरिकेतून amazing कपडे आणलेत, आणि कॉलेजला सुट्टी असल्यामुळे नुसते पार्ट्यांना, आईसक्रीम खायला जातांना ते अगदी perfect होतायत. परवा शीना म्हणाली, "ए तुझ्या दादा-वहिनीला सांग ना माझ्यासाठीपण next time स्वेटशर्ट आणायला! मी पैसे देईन इथे." मनात म्हटलं, हो, सगळ्यांसाठी आणायला बसलेत माझे दादा-वहिनी रिकामे. प्लस, सगळ्यांनाच आणले, तर माझं स्पेशल काय राहिल त्यात?" हो हो. हातच सांगायचेत ना.......... १० पानं........ बाबांचे २-दादाचे ३ आणि आईला तर absolutely हिशोब येत नाही. म्हणजे आपण रिस्क घेऊन ५ सांगितले तरी होतीलच आपले. वहिनी गोSSड्च आहे. मागच्या डावात म्हणाली, "मार दिया जाए...?" पण सोडला माझा एक critical हात.
तसाही ५ is my lucky number. 12th चा रोल नंबर, आता माझ्या नवीन स्कूटीचा नंबर, आणि अक्षयचा बर्थ डे......इश्य......
मी: सगळ्यांनी नाही नाही म्हणता वेळ घेतलाच हात बोलायला, आणि आता सगळ्यांचे झालेत बोलून, तर माझ्या मागे घाई. सगळ्यांनी भरभरून हात सांगितलेत. एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून ह्यांच्याकडे? आणि नाही झाले, तर स्वत:च नाही, दुसऱ्यांनाही बुडवतील स्वत:बरोबर. बहुतेक तरी बुडणारी मीच एकटी असणार. त्यांच्या सारखा विचार करणं जमतच नाही अजूनही- संसाराला इतकी वर्ष झाली तरी. विचार करण्याची "कुळकर्णी" पद्धत आणि "देशपांडे" पद्धत..... असे क्लास घ्यायला हवे होते दोन्ही पक्षी लग्ना-आधी.
पानं १०च, तरी माऊ ५ हात बोललीये येडी. मागच्या डावात मी सगळे राग-रंग ओळखून शून्य हात सांगितले, तर ते ही होऊ नयेत माझे सुरळीत? हा डावच आपला नाही म्हणा. पत्ते वाटणाऱ्याला स्वातंत्र्य नसतंच, मनासारखे हात बोलण्याचं. तसेही, सगळ्यांचे विचार असे आदळतायत कानांवर चोहीकडून, की मला खरोखर, मनापासून किती हात करायचेत? तेच उमगेनासं झालंय. ओ गॉड, आता मी जितका वेळ लावेन, तितके कॉमेंट्स येतील. "किती हळूहळू काम असतं न हिचं! आंघोळीलाच तासभर लावते रोज." घ्या, आता नवरोबाही त्यात सामील. अहो, देवीजी, तंद्रीतून बाहेर या ना आता....."
हं. शून्य. पुन्हा शून्य? हो. पुन्हा शून्य. आता खेळ संपेपर्यंत शून्यच फक्त. फारसा विचार करावा लागत नाही शून्य बोललो की. पानं जाळत बसायचं आरामात. खेळलोच नाही असं तर होणार नाही....
मग एकदा मज्जा करायची. चांगली पानं आली तरी शून्य. आणि कसे बुडतील सगळे गंमत बघायची. थोडा थोडा आनंद चोरायचा. The one who laughs at last....


10/27/10

ओळख


एकदा ना, एक साधूबाबा होते. ते रोज सकाळी गावातल्या रस्त्यावरून नदीकडे स्नानाला जायचे. आणि रोज एक दुष्ट माणूस आपल्या घराच्या गच्चीवरून त्यांच्यावर कचरा फेकायचा, त्यांना शिव्यांची लाखोली वहायचा. एक दिवस तरी हे साधूबाबा चिडतील, वैतागतील, आणि मग आपण त्यांची मजा पाहू अशी लालसा त्याच्या मनात होती. पण साधूबाबांची मन:शांती एकदाही ढळली नाही. ह्याने कचरा फेकला, की ते शांतपणे जाऊन पुन्हा स्नान करून येत. ह्याने शिव्याशाप दिले, तरी त्याच्याकडे बघून सदैव स्मित करीत.
आपण काहीही केले, तरी साधूबाबांवर परिणाम होत नाही, असे बघून मग एक दिवस ह्याला उपरती झाली. त्यांच्या पायावर लोळण घेऊन ह्याने विचारले- "बाबा, मी तुम्हाला एवढा त्रास दिला, तरी तुम्ही कधीही माझ्यावर संतापला नाहीत. हे एवढं चांगलं वागणं तुम्हाला कसं जमतं?" तर बाबा म्हणाले, "अरे सोप्पंय ते. तू मला शिव्या दिल्यास, त्रास दिलास, पण तो मी घेतला कुठे! त्यामुळे तो मला झालाच नाही."

ही गोष्ट मला परवा आठवली, आणि आरशात स्वत:चाच चेहरा बघून दचकायला झालं. लहानपणचा निरागस चांगुलपणा, परीकथांवर विश्वास, मनाचे श्लोक पाठ करणेच नव्हे, तर त्यातले "संस्कार" मनापासून पाळणारं ते माझं भारतीयत्व होतं, की फक्त कोवळं वय? बालपणातला तो देवत्त्वाचा अंश होता, की एका सुरक्षित, स्वप्नाळू बालपणाची झापडं?

आता संसारात, सासूरवासात ऐकून घ्यायला लागणारे निरर्थक टोमणे, न पटणाऱ्या अपेक्षा, रोजचे अनाहूत सल्ले ह्यांना तोंड देतांना का आठवत नव्हती मला त्या साधूबाबाची गोष्ट?
"तुम्हा आजकालच्या मुलींना संसाराची आवडच नाही!"
" नवऱ्याला अरेतुरे करता, तिथेच सगळं बिघडतं"
" सकाळी लवकर उठून कशी झटझट कामं झाली पाहिजेत."
" हे झिपरे केस, डोक्याला ना टिकली, ना गळ्यात मंगळसूत्र! ह्या आमच्या मुली-सुना म्हणायची लाज वाटते."
" देवाजवळ रोज दिवा तरी लावत जा- बाकी काही नसेल."
" एवढ्या सुखात रहाता, तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम असतात? ३-४ च महिन्यांसाठी काय तो सासुरवास. अमेरिकन सून ही चालली असती की मग आम्हाला."
" दोघांपैकी एकाने (म्हणजे बायकोने) ऐकून घ्यायलाच पाहिजे. नाहीतर तुम्ही रात्र अशीच भांडणात घालवणार!"

मी साधूबाबा असते तर माझ्याही अंगावरून ओघळून गेल्या असत्या ह्या गोष्टी. पण मग मीच एक का म्हणून भगवे घालून चांगुलपणाच्या वाटेवर कुचुकुचु काटे टोचून घेत चालायचं?" रांगोळ्या घालण्यापासून पुरणपोळी असो, की स्तोत्र असोत, सगळ्या सो कॉल्ड संस्कारांचं बाळकडू माझ्या सुदैवाने मला मिळालं, आणि ते मनापासून आवडत ही होतं.
फरक फक्त येवढा, की माझ्या संस्कारांचा उगम शिक्षणात होता, विश्वासात आणि समर्पणात नव्हे. मोठ्यांनी "हे कर" सांगितलं, की ते करायचं, इतक्या सरधोपट आणि विचारहीन पद्धतीने मी ह्या गोष्टी आत्मसात केल्या नव्हत्या.

चांगलं वागणं नेहमीच जास्त कठीण असतं. लहानपणी तसेही फारसे कलह आपल्या आयुष्यात नसतात, म्हणून ते सोप्पं वाटत असतं. पण आता तेच सालस विचारही "कर्तव्याचा" काटेरी मुकुट घालून पुढे येतात, तेव्हा मनावर ओरखडे उठणारच!

पण मग भारतीयत्त्व, साधूबाबा, चांगुलपणा, हे सगळे आदर्शवाद मी गुंडाळून माळ्यावर टाकले, आणि आधुनिकतेच्या धर्मातला पहिला धडा उघडला- प्रॅक्टिकली विचार करायला लागले. पण खरं म्हणजे आपण साधूबाबांसारखं व्हायचं, ते आपल्या मन:शांती साठी, हे सोप्पं लॉजिक लावलं, आणि प्रश्न सुटला. बोलणं सोप्पंय, वागणं अवघड, पण आता ते तसं का वागायचं, हे तरी कळलंय. आरशातल्या चेहऱ्याची, त्यातल्या बदलांसकट ओळख पटलीये.




10/15/09

दिवाळी

ही कविता मी खूप लहानपणी केली होती, पण आज वळून बघतांना दिवाळीचा सहज सोपा आनंद त्यातून पुन्हा उजळून आला....तुम्हा सर्वांना ही दिवाळीच्या अनेक शुभेच्छा!!! सुख-समृद्धी आणि आरोग्याचा प्रकाश घरा-घरातुन पसरत राहो!

दिवाळी आली, दिवाळी आली
दीप उजळले घरा घरा
त्या दीपांच्या तेजाने
न्हाऊन उठला सारी धरा!

दिवाळी आली, दिवाळी आली
आली नरकचतुर्दशी
देवाजीच्या देवळात
भक्तजनांची गर्दी खाशी!

दिवाळी आली, दिवाळी आली
आले लक्ष्मीपूजन
हळदीकुंकु करायला
मुली बसल्या नटून

दिवाळी आली, दिवाळी आली
आला तसाच पाडवा
ह्या दिवशी लहानांनी
मोठ्यांचा आशिर्वाद घ्यावा!

दिवाळी आली, दिवाळी आली
भाऊबीजही आली
बहिणीने भावाकडून
भेट काही उकळली!

दिवाळी आली, दिवाळी गेली,
फटाक्यांचे बार थांबले
तेव्हापासून आम्हा मुलांना
शाळेचे वेध लागले!

10/2/09

सवयीची...

शेजारी एक जोडपं.
निर्मनुष्य रस्त्यात बेडकाच्या पिलांनी डोळे वटारून जो येईल त्याच्या कडे टक लावून बघत बसावं, तसं.
त्यांना नोकरी-धंदा-काम नाही.
बाई चाळीशीची, बुवा पन्नाशीचा.
वय लपवण्यासाठी मुद्दाम भडक रंगाचे कपडे घालायची त्यांची चढाओढ.
हौस ही दांडगी.
Yankee Game ची जर्सी, Memorial Day ची हाफ-चड्डी, असे अनेक त्या त्या दिवसाचे ठेवणीतले कपडे घालणार.
दारावर कायम दिव्यांच्या माळा- हॉलोवीनला केशरी भोपळे, क्रिसमसला लाल-हिरवे चेंडू, आणि ४ जुलै ला अमेरिकेच्या ध्वजातले निळे-पांढरे-लाल तारे.
ते ही न लुकलुकता स्तब्ध प्रकाश फेकत थांबलेले.
बाकी त्यांच्या दारासमोर कधी पोस्टाची सुद्धा गाडी थांबत नाही.
शेजारी कधी बोलणं काढून रेंगाळत नाहीत, की संध्याकाळी फिरतांना गप्पा रंगत नाहीत.
त्यांच्या घरून कधी पाहुण्यांचा गलका, मुलांचे रडे, आपापसातली भांडणं- कधीही ऐकू येत नाहीत.
हं, त्यांना एक मुलगा आहे. गतीमंद असावा. गोड गुलाबी गालांचा, थोडा गुबगुबीत, गोल डोळ्यांचा. तो फारसा बाहेर दिसत नसला, तरी त्याच्या निमित्ताने त्याच्या आईवडिलांनीच स्वत:भोवती कोष विणलाय, आणि त्यात अडकलाय मात्र तो- असं वाटायला लावणारा.....

पण परवा माझ्या लक्षात आलं- मी गाडी पार्क केली, की आत्याबाई दार उघडून कचरा टाकायला बाहेर निघतात.
जुजबी, हवापाण्याचं सुद्धा खूप कौतुक करत बोलतात.
बुवा तर आत्याबाई कधी दम खायला थांबते, आणि माझी बोलायची पाळी येते, ह्यासाठी टपलेले.
"तुम्ही heating किती ठेवता? ६९ ठेवत जा बरं- त्याने बिल कमी येतं!"
असे सल्ले देतांना त्यांचे डोळे चमकतात.
इकडे भाजीच्या ४ पिशव्या, डबा, ऑफिसबॅग धरून माझ्या हाताला कळ लागलेली असते, पण त्यांच्या धबधब्यापुढे माझं काही चालत नाही.

मात्र गेले ४ दिवस त्यांचं घर बंद दिसलं. दिव्यांच्या माळा नुस्त्या धूळ खात लटकल्या. कचरा टाकायला कोणी बाहेर येईनासं झालं. तेंव्हा ऑक्टोबरच्या पानगळीत मला जरा जास्तच उदासवाणं वाटायला लागलं.

पण आज दुपारी झोपले होते, तोच बेल वाजली. जिवावर आलं तरी माहिती होतं- हे नक्की खालचे शेजारी असणार. दार उघडल्या उघडल्या बुवांनी पुराण चालू केलं. कुणाच्याशा funeral ला गेले, ते सहकुटुंब जरा सहल करून आले होते ते. पण मी जेमतेमच ऐकलं... आणि मनातून मला अखेर सवयीची, त्रासयुक्त जांभई आली.

9/6/09

मी स्वत:वर प्रेम करते!

कुठून कोणजाणे, आमच्या घरच्या सगळ्यांना आत्मविश्वासाचा विंचू चावलाय. श्यामच्या आईसारखं, "माझा मुलगा पोहायला शिकला नाही, हे सांगायला मला किती लाज वाटेल होSS श्याम!" अशी प्रेमळ, पण नकारात्मक धमकी न देता आमच्या आई-बापांनी आम्हाला कायम, "पोहणं काय? सोप्पं असतं, तुला येईल पटकन् ! आमची मुलगी आहेच मुळात हुश्शार!" अशी पाठीवर थापच देऊन पाठवल्यावर मनात कधी शंकाच आली नाही- की हे आपल्याला जमेल का?


आज मोठेपणी मला पदोपदी त्यांची आठवण येते- आमचे निर्णय, आमचे विचार, आमच्या कल्पनांचं नेहमी स्वागतच करणारे माझे आईवडील सगळ्यांनाच का नाही लाभत ?
"तुला कला-शाखेत जायचं का? जा. तू जिथे जाशील तिथे मन लावून काम करशील आणि त्यात तुला यश मिळेल. पण बेटा, हा निर्णयही तू नीट विचार करून घे." हे विश्वासाने सांगणारे ते भेटले म्हणून आज माझ्या आयुष्यात मला जे करायचं होतं ते मी करू शकले.
तुम्ही पण विचार करा- तुम्ही स्वत:ला आवडता का? मला मी आवडते. ह्याला मी overconfidence समजत नाही, तर आईवडीलांनी दिलेली आत्मविश्वासाची देणगी समजते.


तुमचे केस सरळ तर नाहीतच, पण झिपरे म्हणावेत इतके नाठाळ असतांना, गालांवर थोडं अतिरिक्त मास दिसायला लागलं असतांना, लेटेस्ट फॅशनचा गंध नसतांना, किंवा मेक-अप केलेला नसतांनाही- तुम्हाला स्वत:चं रूप सुंदर नव्हे, पण आनंददायक (pleasant) वाटतं का?
उद्या तुमच्या समोर मॅट डेमन येवो, की हॅली बेरी येवो, त्यांनी तुम्हाला, तुम्ही जसे आहात तसं स्वीकारणं तुम्हाला अपेक्षित आहे का? का नसावं? प्रत्येकालाच पुढच्या माणसाकडून काहीतरी शिकण्यासारखं असतंच नं? " रोमन हॉलीडे" सिनेमात खुद्द राजकन्येलाही एका फाटक्या पत्रकाराची मैत्री, प्रेम हवसं वाटतं, ते काय त्याचे कपडे बघून?


मी स्वत:वर प्रेम करते, पण आंधळं प्रेम करत नाही. स्वत:च्या चुका कबूल करायला लाजत ही नाही. पण स्वत:वर प्रेम केल्यामुळे मला इतरांवर प्रेम करायला जमतं. कुणाचं यश बघून असूया वाटणे, पगारांची तुलना करून त्यात कमीपणा वाटणे, हे मला फार विचित्र वाटतं. अरे, झोपडपट्टीत तुम्ही उपाशीपोटी असतांना पुढच्या माणसाकडे वडापाव असेल, त्याची असूया वाटणं सहाजिक आहे, पण तुमचे केस पांढरे, आणि इतरांचे काळे म्हणून असूया वाटावी???


मी खूपदा विचार करते, की नेमकं आपलं स्वत्त्व कशात असतं? कशात असावं? कुणाचं दिसण्यात, कुणाचं पैशात, तर कुणाचं एका आवडत्या ब्रॅन्डच्या सिगरेटीतही स्वत्त्व असतं. मला वाटतं, स्वत्त्व हे असं कुठल्यातरी मूर्त-अमूर्त गोष्टीला चिकटवूच नये. त्याची गरजच नसते. तुम्ही तुम्ही आहात- हेच तुमचं स्वत्त्व असतं.


स्वत:वर प्रेम असेल, तर ते तुमच्या कामात, तुमच्या कपड्यात, आयुष्याच्या प्रत्येक पैलूत सकारात्मक रीतीने प्रकट होतं. मी स्वत:वर प्रेम करते, म्हणून मी स्वत:ला चांगल्या गोष्टी मिळाव्यात म्हणून धडपडते. माझं काम चांगलं व्हावं म्हणून धडपडते. त्यातला आनंद मिळवल्यावर मला त्या आत्मविश्वासाच्या विंचूबद्दल फार कृतज्ञता वाटते. आणि मला हा आत्मविश्वास आहे, म्हणूनही मी स्वत:वर प्रेम करते!
तुम्हाला काय वाटतं? स्वत:वर प्रेम करावं का?