Showing posts with label स्त्रीवाद. Show all posts
Showing posts with label स्त्रीवाद. Show all posts

4/15/19

बोडण

माझ्या लहानपणी वेटाळातल्या बायका
सतत मानगुटीवर बसून
नियमांचे उपदेश घोकायच्या
डाव्याने वाढू नको- उजव्याने काढू नको
हिला कुंकू लाव- पण तिला लावू नको!

केसांची बट आवर !
गुडघ्यांवर झगा सावर !
हरतालिकेला पत्री आण!
संक्रांतीला देऊन ये वाण !

एरवी कांदेनवमीला झुणका-भजी,
चैत्रात डाळ पन्हं मटकावणाऱ्या खादाडणी
कधीतरी प्रायश्चित्तासाठी घालणार
एक अघोरी प्रकार-
बोडण!

पितळी परातीत अन्नाचं कालवण
पुरणपोळीवर दही, दह्यावर वरण!
माझ्या सूप्त बुलीमियाचं कारण!
काल्यात एकदा हात घातला,
की जाता जात नाही पंचपक्वांनांचंही जेवण.

बायकांचे देहाला जडलेले सोस
त्यांनाच मोडून काढायला लावायचे
भोगू द्यायची नाही
ओटीपोटातल्या विवराची भूक
दुधाच्या पातेल्यावरची साय चोरून ओरबाडतांना
शमलेला त्या भुकेचा आनंद!

गोड गोबरे नि खारट खुसखुशीत
चिरोटे
फराळाची आली 
पाळी
की ह्यांचं मचामचा चावत
बोलणं कानीकपाळी -
खाखा नको- त्रास होईल !
वजन उतरवा - बास होईल !

आईस्क्रीमचा टबात बुडवणे ह्रदयभंग
अलिप्त थंडगार शिस्तीत 
लाड असे सवंग! 
आमच्या वेळी येतच नव्हते हे प्रसंग!

आताच्या पोरींना रस्त्यावरच्या चाऊमेन चा 
भरून घेता येत असेल
नाकपुडीभर श्वास
कदाचित करतही असतील त्या आता 
फक्त स्वत:साठी
रोजे. लेंट. निर्जळी उपवास.



























2/21/19

शब्द दिला!

"तिने बाळाला जन्म दिला!" असं म्हणतात. दिला? जन्म ही कुणी कोणाला देण्यासारखी गोष्ट तर नक्कीच नाही. तो कशाचा 'दाखला' होता, कि तिने दिला? कि तिला तो द्यावा लागला?
जेव्हा जन्म दिला, तेव्हा ज्यांना दिला, त्यांना तो घेण्या किंवा न घेण्याचा अधिकार असतो का?
जाऊदे. ह्या शब्दच्छलात पडण्यापेक्षा- डॉक्टरांनी 'डिलिव्हरी केली' असं म्हणावं, तर डॉक्टर काय पोस्टमन झाली, कि तिने केवळ जिथलं पार्सल तिथे पोचवण्याचं काम केलं?
आपल्या अवघ्या अनुभवविश्वाची मर्यादा, अशी शब्दांनी ठरवली जाते. जन्म देण्याचा अनुभव कसा असतो? त्याचं वर्णन करणारे शब्द एका लेखिकेला सापडू शकतील का?

Margaret Atwood ही कदाचित सध्याची सर्वात मान्यवर इंग्रजी लेखिका आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये, इतकी पारितोषिकं आणि सन्मान तिच्या नावावर आहेत. मार्गरेटचं घट्ट वास्तवाला धरूनच उत्तुंग भराऱ्या मरणारं साहित्य खरंच स्त्री जीवनाच्या खूप खूप जवळ जातं. The Handmaid's Tale लिहिताना म्हणे, तिने स्वतःवर बंधन घालून घेतलं होतं, कि जगात आजवर न घडलेल्या गोष्टी आपल्या कथेत मुद्दाम दुःख-विषाद निर्माण करण्यासाठी घालायच्या नाहीत. तरीही, ह्या डिस्टोपिअन कथेतली भीषणता सर्वांपर्यंत पोचली. तिच्या कथा, कविता मी जास्त वाचल्या - २५ एक कादंबऱ्या, ७-८ कथा संग्रह, कविता संग्रह, शिवाय, समीक्षा, ब्लॉगच नव्हे, तर 'ग्राफिक नॉव्हेल' सारख्या अतिशय नवीन प्रांतातही पाऊल ठेवलेलं. इतकं विपुल लेखन करणारी स्त्री लेखिका, आणि तरीही जे जे लिहिलं ते उत्तम, म्हणून मी अधिकाधिक भारावत गेले!

Dancing Girls मधली तिची कथा, "Giving Birth" च्या सुरुवातिचा थोडासा स्वैर अनुवाद/गोषवारा वर दिलाय. मानव"जन्मा" च्या लिखित इतिहासात, अनुभवकथनात, स्त्रियांच्या अनुभवांचं स्थान दुय्यमच नव्हे, तर केवळ अंशमात्र ठरलं. पृथ्वीच्या उत्क्रांतीपासून विश्वयुद्धापर्यंत अनेक 'महत्वाच्या' घडामोडीमध्ये स्त्रीजीवनाचा विचार फार कमी वेळा पुढे मांडला गेला. १०० प्रसिद्ध लेखकांची नावं घ्या म्हंटल, तर सहज तोंडावर येतील- शेक्सपियर/मिल्टन/चॉसर  पासून कीट्स, वर्डस्वर्थ, हार्डी, येट्स, आणि इकडे अमेरिकेत व्हिटमन, हॉथॉर्न, फिट्सजेराल्ड,आर्थर मिलर, रॉबर्ट फ्रॉस्टच नव्हे, तर लोकप्रिय लेखकात जेफ्री आर्चर, आर्थर हेली वगैरे सर्वांना माहित असतात. आता १०० इंग्रजी लेखिकांची, किंवा स्त्रीविषयक लेखनाची नावं आठवून पाहू बरं?

कठीण च होतं ते! इंग्रजीपेक्षा मग मराठी लेखिकाच लवकर आठवतील. अभिजात साहित्य लिहायला वेळ, पैसा, आणि 'स्थान', ह्या तीन गोष्टींचं गणित स्त्रियांसाठी जुळून येईपर्यंत २०वं शतक उजाडलं. व्हर्जिनिया वूल्फ म्हणाली, तसं, कादंबऱ्यांनी स्त्रियांच्या विश्वाला साहित्यात स्थान मिळवून दिलं. आणि तरीही, साहित्याच्या पुरुषप्रधान निकषांवर ते उतरायला अजून कितीतरी काळ लोटावा लागला. जेन ऑस्टेन, ब्रॉन्टे भगिनी फक्त प्रेम-घर-लग्न-कुटुंब ह्याच परिघात फिरत राहिल्या, कारण त्या पलीकडचं विश्व त्यांच्या परिचयाचंच नव्हतं...

Atwood च्या "Giving Birth" ची लेखिका/निवेदिका स्वतः आई आहे. तिची २ वर्षाची पिल्लूडी मधेच झोपेतून उठल्यावर तिला खाऊ घालणे, न्हाऊ घालणे, हे करता करता ती लिहितेय, विचार करतेय.
तिच्या मुलीला कोणीतरी दिलेली बार्बी बाहुली, त्या बाहुलीचे सगळे कपडे गायब, आणि कशी कोणजाणे, बाहुलीच्या पोटातून मधे अखंड चीर गेलीये! आणि आज बघते, तो चिमुकलीने तोंडात घालून घालून बाहुलीचे पाय पण तोडलेयत! मग लगेच मुलीचं डायपर उघडून तपासणी करावी लागते, कि पाय खाल्ले असतील, तर शी तुन बाहेर पडले का?
आता ती बीभत्स बाहुली बघवत नाही, म्हणून कचऱ्यातच टाकावी लागते!  

हे सोपस्कार पार पडून, शेवटी आपण गोष्टीतल्या नायिकेकडे वळतो- जेनेट. जेनेट सुशिक्षित, बहुधा नोकरदार, सजग स्त्री असल्यामुळे तिने प्रसूतीविषयी पुस्तकं वाचलीयेत, श्वासावर लक्ष केंद्रित करायचे, दहा आकडे म्हणायचे - असे पर्याय ती प्रसूती-कार्यशाळेतून शिकून आलीये. ह्या क्लासमध्ये सांगतात, "थोडा त्रास होणारच, पण तो आपण कसा घेतो, त्यावर आहे!" पण तिथली एक अनुभवी बाई म्हणते- "इंजेकशन घेऊन टाका- नरकयातनांपेक्षा काहीही बरं! त्रास- प्रसूती वेदनांना 'त्रास' म्हणणं म्हणजे!" पण पाहिलटकरीणी तिच्याकडे आक्रसून बघतायत - किती नकारात्मक विचार करावा उगीच!

जेव्हा वेळ येते, तेव्हा मात्र जेनेटला वाटतं- क्लासमध्ये शिकलेल्या वाचलेल्या ऐकलेल्या कितीही गोष्टी असोत, 'ह्या' अनुभवासाठी त्या पूर्णपणे निरुपयोगी आहेत!
कळांच्या वेदनेतून जाताना ती सगळ्या जगापासून तुटल्यासारखी होते. तिच्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टी संथ होतात, आणि शेवटी श्वासोच्छवास, दहा आकडे, शब्द, सगळ्यांच्या पलीकडे ती पोचते. बाळ बाहेर येतं, तेव्हा नवरा म्हणतो, "बघ,वाटलं तितकं कठीण नव्हतं, ना?"

तिचा चष्मा नवऱ्याने आणलेला नसतो, त्यामुळे "काय झालंय" ते तिला दिसू शकत नाही! स्वतःच्याच इतक्या व्यक्तिगत अनुभवाकडेही शेवटी तिला कुणा परक्याच्याच नजरेतून, त्यांनी वर्णन केलेल्या भाषेतूनच बघावं लागणार असतं. थोड्यावेळाने जाग आल्यावर मात्र, खिडकीतून बाहेर बघताना, आजवर ज्या इमारती खंबीर आणि स्थिर दिसत होत्या, त्या अचानक विरघळून जाऊ लागल्या. एक अशक्य अशी कोवळी क्षणिकता जेनेटला दिसली, तेव्हा तिला वाटलं - ती स्वतःच आता एक वेगळी व्यक्ती झाली आहे!















12/15/18

हैरतों के सिलसिले

लग्न झालं तेव्हा मी डोक्याने बरी पण व्यवहारात माठ होते. सासरी गेल्यावर एखाद आठवड्याने सासूबाईंनी "आज तुझ्या हातचं जेवायचं आहे" असं फर्मान सोडल्यावर "पण मी जे करू शकते ते तुम्ही खाऊ शकाल का?" असं मी अत्यंत निर्मळ मानाने विचारलं होतं! वर अजून स्वाभिमानाची फोडणी घालून "मला कोकणस्थी गोड च भाज्या आवडतात!", असं सांगून फ्लॉवरच्या रश्यात आलं लसूण सोडा, साखर घालून सगळ्यांची तोंडं गोड केली होती. आपल्या स्वयंपाकाच्या अज्ञानाबद्दल लाज किंवा वैषम्य वाटून घ्यायचं असतं, हे हि माझ्या गावीही नव्हतं. जे शिकायला हवंय, ते आपण कधी ना कधी शिकू, त्यात काय मोठं? असा निरागस आशावाद नव्हता, तर स्वतःवरचा (कदाचित थोडा अवास्तव) विश्वास होता. अभ्यासातली हुशारी साधारण बाकी ठिकाणीपण वापरता येते, ह्याचा थोडा अनुभवपण गाठीशी होता.  :)

पण मुलगी म्हणून जन्माला आल्यावर आईबापांनी ज्या धक्क्यांपासून दूर ठेवलं होतं, तेच आश्चर्याचे धक्क्यावर धक्के  मला पुढे जगाने जे दिलेयत,त्यांना तोड नाही! लग्न थोडं उशिरा झालं (त्यांच्या मते), म्हणून "लवकर मुलं होऊ द्या!" असा सल्लाही वरातीच्या साडीबरोबरच मिळालेला, पण नवरा जास्त प्रॅक्टिकल निघाला. एका चाकाच्या गाडीपेक्षा दोन चाकाची चांगली, म्हणून त्यानं तरी लग्नानंतर शिकायचं माझं "खूळ" उचलून धरलं.

पण साधी शाळेची म्हंटली तरी पहिली नोकरीच होती ती. मी नवीन होते, देश नवीन, आणि वातावरण तर कधी न पाहिलेलं! १२ तास काम करणाऱ्या मुलींच्या डोक्यात, संध्याकाळी ६ वाजता घरी जातांना आपोआप, अंत:प्रेरणेने, "आज जेवायला काय बनवायचं?" असे विचार येत असतील तर त्या मुलींना "देवीपद" बहाल करायला माझी अजिबात हरकत नाही, पण ती मुलगी मी नव्हते. पहिली नोकरी लागल्यावर थोडी उधळपट्टी करायचा माझा पण प्लॅन होता...
पण... पुढचा धक्का वाट बघत होता. नोकरीच्या पहिल्या वर्षातून बाहेर पडते न पडते तर "आता कशाची वाट? मुलं होऊ देत!" असा घोर मागे लागला. शिवाय, आजूबाजूच्या सगळ्यांनी नंबर लावले होते, मग त्या स्पर्धेत आम्ही उरापोटी धावायला लागलो, त्या मनस्थितीत कसली होतायत पोरं?? इथवर येता येता तिशी आली, नंतर मूल झाल्यावर जरा त्यातल्या आनंदात सैलावले, तर "आता काय आयुष्यभर घरीच बसणारेस का?" -हा धक्का मात्र नवऱ्यानेच दिला (किंवा धक्का मारला, असंही असेल त्याच्या दृष्टीने!)

एकीकडे, ज्या कामाचे पैसे मिळत नाहीत, त्या कामाची कदर केली जात नाही, पण दुसरीकडे, पैशासाठी घराची गैरसोय होऊ न देण्याची शिकवण मिळालेल्या माझ्यासारख्या बायका! " लग्न झाल्यावर हळूहळू धडे मिळत गेले- कि आपलं आयुष्य हे आपल्यासाठी नसतंच मुळी...! घरासाठी, नवऱ्यासाठी, पोरांसाठी- हे झालंच तर मग उरलेलं जमेल तर आपलं म्हणायचं! संसाराच्या वाटेतले एक एक खड्डे बुजवत राहिली ती नदी, मग तिचं केवळ डबकं होऊन राहिलं. ती वाहणार कशी?

फक्त ह्यावेळी आश्चर्य नाही वाटलं, कारण जखम खोल होत होत स्वत्वाला पोखरून पार पोचलेली होती...
हैरतों के सिलसिले सोज़े निहां तक आ गाये!

एकदा वाटलं, आपली गणितंच मुळात चुकली होती... लठ्ठ पगाराच्या घरी बसून करायच्या नोकऱ्या मिळतात, ते क्षेत्र निवडायला हवं होतं. मग वाटलं, क्षेत्राचं काय? यश कधी पाहिलंच नाही, असंही नाही. आणि शेवटी ह्या निष्कर्षाला पोचले, कि थोडं थोडं सगळंच मिळवायचा हट्ट धरून बसलीस बाई, मग थोडं जे हातात आलं, त्याच बरोबर थोडं थोडं सगळंच हातातून सुटणारच ना!

परवा मात्र एका घटस्फोटाची कथा जवळून बघायचं दुर्भाग्य आलं. लठ्ठ पगाराच्या दोन नोकऱ्या, दोन पोरं, मोठं घर, सगळं असणाऱ्या दोन व्यक्तींच्या हातून प्रेम मात्र निसटलं. जगाच्या डोळ्यात आधी खुपलं काय? बाईचा नोकरीचा माज, घराकडे दुर्लक्ष, नवऱ्यावर सत्ता गाजवणं. ते बघून मात्र जाणवलं. गणित चुकलेलं नाहीये, चुकीचंच गणित आहे.

ख़ुद तुम्हे चाके गरेबाँका शऊर आ जाएगा
तुम वहां तक आ तो जाओ, हम जहांतक आ गए!

उठण्या बसण्यापासून बोलण्या घालण्यापर्यंत, मुलींच्या प्रत्येक आचार विचाराची चिरफाड करायला बसलेलं जग. त्याच चौकटींमधून उपजलेल्या माझ्या सासूबाई, आणि माझी घटस्फोटित मैत्रीण, आणि मी. तिचं संपलेलं लग्न म्हणजे स्त्रीवादाचा सर्वात मोठा पराभव आहे. "आपल्याला नक्की काय हवंय? पुरोगामी तर व्हायचं आहे, पण ते कसं व्हायचं, आणि किती झेपेल" हे न कळलेल्या पुरुषाने तो पराभव घडवून आणला आहे. पण मोलाची साथ मात्र बायकांनी स्वतःच दिली, कसल्या कसल्या चौकटींमधून स्वतःचं प्रतिबिंब बघत अस्मिता शोधत बसल्या! माझा माठपणा माझ्या चांगलाच उपयोगी पडला. नाहीतर जितपत भान आज आलंय, तितकंही आलं नसतं.


7/6/18

अजून थोडे आहे बाकी

शांताबाई शेळके माझे दैवत _/\_ . त्यांची एक 'चारोळी'? मनात घर करून बसली होती.
“अजून थोडे आहे बाकी
या रक्ताचे करणे पाणी
अजून थोडे, आणिक नंतर
सरेल तेव्हा सरो कहाणी”

त्यांची क्षमा मागून:

अजून थोडे आहे तनुवर
मांस मखमली देण्याजोगे
ते सरल्यावर राखेमधुनी
पुन्हा भरारी घेईन म्हणते

भूक शमविण्या कशा-कशाची
कुणा कुणाची होऊनही मी
समर्पणाची आग गिळूनि
लाव्हा ओकत फुटेन म्हणते

भयाण रात्री परिकथेची
स्वप्ने जरी पहिली होती
सोशिक सिंड्रेला का होऊ?
बाबा यागा होईन म्हणते

संस्कारित होऊन बोहल्यावरी
चढवली बाहुली, तिला
"सुखी ठेव" म्हणणारे सारे
"सुखी रहा" का कोणी म्हणते?

आईने ज्या अस्तित्वाचे 
डोळे गाळून केले सिंचन 
चिणून मातीमधे तयाचे 
बीज ऐकले पेरीन म्हणते.

हाक अनावर अंतर्मनिची
वादळापुढे ऐकू यावी
पोटातून तुटून येवढा
टाहो आता फोडीन म्हणते.

3/1/18

चाँदनी रातमें कुछ फीके सितारोंकी तरह

काही दिवसांपासुन फ़ातिमा हसन यांची एक सुरेख गझल मनामध्ये घोळत होती. इतक्या सोप्या शब्दांमधून इतका धारदारपणे मांडलेला विषाद खरोखर मनाला भिडला. मराठीत तो विषाद आणणं मला जमलं नाही, पण निदान अर्थाचा तरी स्वैर अनुवाद केलाय.

चाँदनी रातमें कुछ फीके सितारोंकी तरह
याद मेरी है वहां, गुजरी बहारोंकी तरह

बात बस इतनी है इक मोड़पे रस्ता बदला
दो क़दम साथ चला वो भी हजारों की तरह

कोई ताबीर नही कोई कहानी भी नही
हमने तो ख़्वाब भी देखें हैं नजारों की तरह

बादबाँ खोले जो मैने तो हवाएँ पलटी
दूर होता गया एक शक्स किनारों की तरह

'फ़ातिमा' तेरी ख़ामोशी को भी समझा है कभी
वो जो कहता रहा हर बात इशारों की तरह
=०=०=०=

गत जुन्या वसंताचे मावळले वारे जसे
नक्षत्रांत स्मृती माझ्या फिकटले तारे जसे

इतकेच, थोडे चालुनी साथ त्याने सोडली
शेकडो परकेच होते सोबती सारे जसे

अन्वयाचे काय सांगू? गोष्टही नव्हती कधी
स्वप्नसुद्धा पहिले मी - चित्र की न्यारे जसे

प्रवाही सोडली नौका, शीड माझे फडकले
दूर जाऊ लागला 'तो', गाव किनारे जसे

'फातिमा' तुझा अबोला कसा त्याला ना कळे?
आडुनी संदिग्ध ज्याचे बोल, उखाणे जसे! 

9/12/16

चौघीजणी समुद्रकिनाऱ्यावर

अनिता: मूळच्या अत्यंत समंजसपणामुळे साधारणतः सदैव कशा ना कशावर किंवा कोणा ना कोणावर चिडलेलीवनिता: घरचा विरोध मोडून मुंबईला, अक्षरशः हातावर पोट घेऊन नोकरी करताना उदंड उत्साह्याला ओहोटी लागली तरी मनाचे पीळ ना सुटलेलीसुनीता: हिची प्रचंड पुस्तकी बुद्धिमत्ता तिच्या एकूण भावनिक विकासाच्या आड येत असल्यामुळे सतत भेटलेल्या यशातही स्वतःच्या क्षमतांबद्दल साशंक प्रणिता: आपली, कृपाभिलाषी. अर्थात, घरच्या 'फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स' मध्ये फारशा भावना न अनुभवता आल्यामुळे इतरांच्या स्पंदानांचे हेलकावे शोधत, साहित्योपासनेत रमलेली. आनंदी-दुःखी निरीक्षिका"आपण बियर पिऊ!" अनिता तिच्या भावांकडून आणि नुक्त्या पटलेल्या 'सख्या' कडून हे बाळ'कडू' पिऊन आल्यामुळे प्रस्ताव मांडते. प्रणिताला प्रथम-जगातील सवयी माहिती असून, बियर पिण्यात अनैतिक काही नसतं, हे नक्की पटलेलं आहे. शिवाय अनेक लेखकांनी अशा गोष्टींना 'अनुभव-विश्व् विस्तारणे' असं म्हंटलेलं आहे. मुळात, इंग्रजी कादंबऱ्यांमध्ये, एक पेक्षा अधिक व्यक्तींबरोबर झोपणे (मादाम बोव्हारी), स्वतःच्या आईबद्दल आकर्षण वाटणे (इडिपस), इथपासून... बायकोचा खून करणे (मॅकबेथ) इथपर्यंत घटनांना सामोरे गेल्यावर बियर पिणं तर अगदीच क्षुल्लक सीमोल्लंघन म्हणता येईल, म्हणून बऱ्यापैकी विचारस्वातंत्र्य अनुभवत असतांना, प्रथमच आयुष्यात 'मोकळे सुटल्याचा' वारा लागलेली आहे. सुनीताची मेडिकल इंटर्नशिप त्या आडगावात- समुद्रकिनारी!!! तेवीस वर्षात प्रथमच त्या आपल्या आपल्या पिकनिकला आल्या आहेत, कारण तिथे सुनीताच्या खोलीत त्या मोजून एक रात्र जागून, पोटभर गप्पा, आणि केवढीतरी भावनांची देवाणघेवाण करू शकणार आहेत. इतका सुवर्णयोग पुन्हा जमून येणे, आणि जमवणेही......... ह्या जन्मी शक्य होईल का? नाहीच. अशक्यच! नुकतीच डिलिव्हरी वार्डमधून येऊन, बायकांचे रडणे ओरडण पाहून थोडी विस्कटलीये सुनीता, पण ते विसरण्यासाठी थोडी घेतली, तर खूप बरं वाटेल यार! शिवाय, बियरचे शारीरिक परिणाम फारसे गंभीर नसतात इतकं व्यावहारिक ज्ञान तरी डॉक्टरीच्या अभ्यासात मिळालेलं आहेच की. वनिता स्वतः पुढाकार घेणारी नाही, तरी वेडगळ साहस तिच्या रोमँटिक रक्तातच आहे. घर सोडून आल्यावर ती खूप एकटी पडलीये, पण ही मैत्री तिचा आधार आहे. पाहिलं प्रेम, पहिली आठवण, पहिल्या मानाचं, पाहिलंच अंगण! तशी पहिली बियर... धिस बियर इज बॉण्डिंग!
एका दारूच्या दुकानापाशी जाऊन त्यांनी शेवटी अत्यंत प्रयत्नपूर्वक कोरा चेहेरा ठेवत, एक बियरची बाटली मागितली. "किती?" त्याने चौघीजणी बघून विचारलं. "एकच." अनिता निग्रहाने म्हणाली. जवळजवळ पळतच त्या खोलीत परतल्या. "निदान रात्री बारा पर्यंत तरी थांबू!" वनिता नेहेमीच रोमँटिक, आणि "नको. इतका काही हा मोठा इव्हेन्ट नाहीये!" प्रणिता चा कठोर अँटी-क्लायमॅक्स. थेट चेकोव्ह सारखा!त्यांनी सुनीताच्या खोलीतले उभे स्टीलचे पेले काढले. गोमुत्रासारखी ती कुणकुणी गढूळ बियर, एक, दोन, तीन! असा जल्लोष करून घोट घेतला. घाण कडू लागली. अनिताची ही दुसरी का तिसरी वेळ, त्यामुळे तिला जरा जरा चव घेता येऊ लागली होती. सुनीता मात्र एका घोटापुढे जाईना. "मला सकाळी राउंड आहे." "हो तू आदर्शवादी डॉक्टर आहेस बाई!""हो तू उगीच रिस्क घेऊ नको""तू पिणार नव्हतीस तर कशाला आणली आपण ही एवढी मोठी बाटली!"इत्यादी संवाद झाल्यावर त्यांना थोडं हलकं हलकं वाटायला लागलं. (त्यामागे त्या बियरचा शून्य हात होता!) "आपण हे नमिता ला सांगितलं तर ती वेडी होईल!" "आपण हे सरिता ला सांगितलं तर ती एकदम आपल्याशी मैत्रीच तोडून टाकेल!""तू घरी सांगशील?" "हो, त्यात काय?" (हे फर्स्ट वर्ल्ड सुनीताच बोलू जाणे!)मग रात्रभर चेकाळल्यासारख्या गप्पांवर गप्पा झोडून त्या सकाळी सकाळी समुद्रावर गेल्या. टिक्करबिल्ला खेळून, तासंतास सायकल पदडुन, दिवसेंदिवस पत्ते, नाच गाणी, कॅरम खेळून कसंबसं बालपण मागे टाकलं. ते-वीस भली थोरली वर्ष निघून गेली,तरी आयुष्य पुढे सरकतच नाहीये. प्रेम? कि लग्न?आधी प्रेम?कि आधी लग्न?"कोण? कुठे? कधी? कसा?" सगळंच अनुत्तरित. "ए तुला आशिष आवडायचा ना?""हो पण त्याचं आहे ऑलरेडी.""मला प्रेमात पडणं अशक्य आहे. केलाही होता एकदा प्रयत्न" "म्हणजे तुला म्हणायचंय की तुला कोणाला स्वतःच्या प्रेमात पाडता येत नाहीये.""हाहाहाहाहा........ हो तसं समज.""चांगली नोकरी पाहिजे यार आधी!""घरी सांगितलं नाहीये अनिताने अजूनही""मग पुढे काय?"बोंबलायला तेवीस वर्षांच्या चढ उत्तरांच्या शेकडो रात्री गेल्या तरी आयुष्याचा निक्काल काय तो लागत नाहीये.  हे असं अजून किती दिवस चालणारे? किती वर्ष चालणारे??? ही इथे लाट पायापर्यंत येते पण डोक्यावरून चिम्ब भिजवून जात नाही. आपल्याला तर खोलात जाणं होतच नाही, पण बोंबलायला ती लाटही मिळमिळीतच निघाली..... बियरसारखी!"हाहाहाहाहाहा........ " दहा वर्षांनी पुन्हा इथेच भेटायला पाहिजे गं... नक्की भेटूया. जमवूयाच कसंही करून. तेहत्तीस वर्षांच्या त्या चौघीजणी आज पुन्हा कदाचित समुद्रकिनाऱ्यावर उभ्या असतील.  

त्यांना आता वाईनही सवयीची झालेली असेल. 

8/23/14

A Woman in Berlin

कुठल्याही युद्धात, आणि त्यातही दुसऱ्या महायुद्धासारख्या निर्घ्रुण युद्धात स्त्रीयांवर झालेल्या अत्याचारांबद्दल वाचायचे, धाडस मी केले नव्हते. चित्रपटातून बघतांना तर असे विषय इतके क्लेशकारक होतात, की  बरेचदा त्यांच्या कडू जहर सत्यापासून आपण लांबच राहणे पसंत करतो. पण A Woman in Berlin ने त्याच सत्याचे इतके पैलू दर्शविले आहेत, की हादरून जातांनाही कुठेतरी, एक उत्तम कलाकृती बघितल्याचा आनंद मिळाला, म्हणून लिहावेसे वाटले. चित्रपटाची कथाच इतकी प्रभावी आहे, की दिग्दर्शकाचे श्रेय जाणवू नये, पण तरीही, छोट्या दृश्यातूनच नव्हे, तर प्रत्येक शॉट मधून, नजरेतिल प्रत्येक भावातून त्याने ती कथा अधिक फुलवली आहे. काही दृश्यांसाठी मनाची तयारी करूनच बघावा, पण बघावा जरूर, असा हा चित्रपट, Netflix वर उपलब्ध आहे.

मूळ कादंबरी युद्धानंतर प्रसिद्ध झाल्यावर इतके वादळ उठले, की लेखिकेने आजन्मच नव्हे, तर मृत्यूनंतरही "Anonyma" बनून राहणे पसंत केले. लेखिका नाझी जर्मनीतली पत्रकार, आणि देशोदेशी फिरलेली, अनेक भाषा अवगत असलेली, बर्लिनच्या उच्चभ्रू स्तरातली सुसंस्कृत स्त्री आहे. तिचा नवरा जर्मन सैन्यात मोठ्या पदावर असल्याने युद्धासाठी निघून जातो, आणि त्यानंतर तो परत येईपर्यंतची वाताहात तिच्या नजरेतून आपल्याला पडद्यावर दिसते.

बर्लिन काबीज करायला आलेले रशियन सैनिक तिथे उरलेल्या, नि:शस्त्र, निरपराध स्त्रीयांचे शोषण करत असतांना, ही अनामिका-नायिका धैर्याने त्यांच्या कमांडर समोर उभी राहून जाब विचारते, तेव्हा मुळात सभ्य असूनही तो तिला, "थोडावेळ सहन करा, येवढं काय त्यात?" असं उत्तर देतो! जर्मनीने युद्ध सुरू केले, जर्मन सैनिकांनी जेवढे हाल आमचे केले, तेवढे आम्ही तुमचे केले असते, तर तुम्ही अजून जिवंतच राहिला नसता, असे अनेक ताशेरे, अनेक सबबी पुढे करत, हे "जेते" पुरूष निराधार स्त्रियांना जगणं नकोसं करून सोडतात, तेव्हा, अनामिका मात्र आपल्या स्त्रीत्वाचा स्वाभिमान राखत, आपल्या स्त्रीत्वाचेच शस्त्र घेऊन ठाम उभी राहते, आणि तिच्यावर अत्याचार करणाऱ्यालाच कुठेतरी तिचा गुलाम बनायला लावते, ही जया-पराजयाची लढाई  दिग्दर्शकाने अतिशय सूक्ष्म रितीने दाखवली आहे. शेवटी कमांडर तिच्यापाशी येतो, तेव्हाही, ती त्याचे हुकूम न मानता, त्याला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देते. 

हिंसा, प्रेम, राष्ट्राभिमानाचे अनेक अर्थ इथे प्रतीत होतात, तसेच स्त्री-पुरूषांमधल्या नात्याचेही. कारण ज्या पुरूषाने जग जिंकायला पाऊल पुढे टाकले, त्याच्या घरी मागे राहिलेल्या आया-बहिणी मात्र तो या जुगारात केव्हाच हरलेला आहे! ज्या मूल्यांसाठी तो प्राणपणाने लढला, त्याच मूल्यांची होळी तो स्वहस्ते पेटवतो आहे, केवळ आता होळी पेटलेले घर शत्रूचे आहे, येवढाच फरक! हा विरोधाभास चित्रपटामधे दर क्षणी जाणवतो, आणि तोच ह्या स्त्रीच्या कथेचा कणाही आहे. 

देशाला, सैनिकांना प्रेरित करायला हिटलरसारख्या नेत्यांनी नीतिमूल्यांचे शब्द वापरले. नायिकासुद्धा त्या शब्दांनी वहावत जाऊन श्रद्धेने जर्मनीच्या विजयाची, आपल्या नवऱ्यच्या विजयाची आस धरून बसलेली असतांनाच, शत्रूच्या नजरेतून तिला वेगळंच दृश्य दिसतं. आपल्या राष्ट्रीय-व्यक्तित्वाचा कुठला अर्थ आपले देशबांधव त्यांच्या क्रूर-कर्तृत्वाने सिद्ध करताहेत, हे लक्षात आल्यावर, ती मनातून पराभूत होते.

जर्मनीला "पितृभूमी" मानत असले, तरी, बर्लिनचे स्त्री रूपक स्पष्ट आहे. ज्या पुरूषावर प्रेमाने, विश्वासाने विसंबलो, संरक्षक म्हणून त्याची "पूजा" बांधली, तोच आता नजरेतून उतरल्यावर, शत्रूपक्षाच्या कमांडरबरोबर नवीन मांड मांडण्यावाचून नायिकेला गत्यंतर उरत नाही. कमांडरही शेवटी पुरूष असला, तरी इतरांपेक्षा जास्त सभ्य, सुसंस्कृत, आणि पर्यायाने स्त्रियांचा आदर करणारा आहे, म्हणून त्याचे मित्र, हाताखालचे सैनिकही हळूहळू त्या स्त्रियांना सहानुभूतीने वागवू लागतात. त्या स्त्रियांनी आश्रय घेतलेले घर, कुठेतरी त्या सैनिकांचे आश्रयस्थान होते, जिथे आपल्या घराच्या, बायका-मुलांच्या आठवणीत ते रमतात, गातात, नाचतात, रशियाच्या विजयाचा एकत्र जल्लोश करतात, आणि युरोपियन एकतेची स्वप्न बघतात. 

चित्रपटात लक्षात राहणारी एक गोष्ट म्हणजे उत्तम संवाद आणि लेखन. मूळ जर्मन भाषेच्या अनुवादित तळटीपा बघूनही सहज समजणारे, आणि अर्थवाही. शेवटच्या प्रसंगात अनामिका जेव्हा कमांडरला विचारते, "आम्ही तुझ्याविना कसे जगावे?" तेव्हा तो प्रश्न त्याला व्यक्तिश: तर आहेच, पण तो ज्या आदर्शांचा प्रतिनिधी आहे, त्यांनाही आहे. महायुद्धामुळे दिशा, आणि जुनी जीवनपद्धती हरवलेल्या एका संपूर्ण पिढीचा तो प्रश्न आहे!

शेवटी घरी परत आलेल्या नवऱ्याला अनामिका जेव्हा आपले अनुभवकथन वाचायला देते, तेव्हा तो ही पूर्णपुरूष श्रीरामा प्रमाणे तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन निघून जातो. पुरूषांच्या युद्धोन्मादाचे घाव दाखवणारी अनामिका, आणि बर्लिन-नगरी, एकवार पुन्हा स्त्रीस्वभावानुसार जगात सौंदर्य, सृजनता, सुजनता निर्माण करायला सिद्ध होते. पण ह्यावेळी ती केवळ स्वयंसिद्धा आहे, हेच काय ते थोडके समाधान.


8/6/13

स्कार्लेट ओ’हारा सिनिकल का झाली नाही?

स्कार्लेट ओ’हारा चं झालं, तसंच आपलंही होईल असं कधी वाटलं नव्हतं. पण असं असूनही, आपण सिनिकल झालो. आपल्यात कडवटपणा आलाच. तिच्यात मात्र आला नाही. असं का?

स्कार्लेट बिचारी, तिला लहानपणापासून पढवून पढवून, तिच्या मनावर बिंबवलेलं होतं, की सोज्वळ मुलींनी कसं, चारचौघात चिमणीसारखं खावं, बाहुलीसारखं मढावं, नाचावं- गावं, पण शेवटी पुरूषांसाठी जगावं. ह्या नाटकाचा तिला थोडाफार वैताग येत असे, पण त्यात फारसं काही गैर मात्र वाटत नव्हतंच, कारण शेवटी हे खुळचट पोरगे तिच्याच पायांशी आपलं हृदय ठेवणार, आणि त्यांचा ती खुशाल चक्काचूर करीत, फक्त मानाचे मुजरे झेलीत, "तिच्या" ॲश्लीच्या हातात हात देणार.

पैसा? तो काय असतो? आजीबरोबर कीर्तन ऐकतांना तर "भक्ती", "त्याग", "निर्लोभीपणा" - असल्याच गुणांचा ध्यास घ्यायचा असतो हे कळलं होतं. "स्वत:ला ओळखा", म्हणजेच, स्वत:च्या कुवती/आवडीनुसार करीयर करा, केवळ पैशाच्या मागे लागून भलत्याच मार्गाला (चुकीच्या करीयरला) जाऊ नका, असं ही होतं.
पोटापुरता पैसा "असणं", एवढंच फक्त त्याचं महत्त्व होतं. कुणीतरी, कुठेतरी पडद्याआड, पैसे कमावतं, नि जमवतं (आई-बाबा). पैसे "खर्च" करू देण्याइतके लाड त्या काळात कोणत्याच घरात होत नसतील...

स्कार्लेटलाही हे येवढंच समोर दिसत होतं: कापूस पिकतोय, घर भरतंय, गडी राबताहेत, मेजवान्या झडताहेत. "सिव्हिल वॉर" सारख्या कंटाळवाण्या विषयावर चर्चा करायला तिला अजिबात आवडत नसे. तसंही, युद्धाने कधी कुणाचं भलं झालंय? आणि बायकांचा तो प्रांतच नसतो की! गणित वगैरे शिकून, पुस्तके वाचून, फार डोकं चालवलं, तर उगीच नाचक्की व्हायची!
आपण हुशार आहोत, असा थोडा जरी संशय आला, तर सगळे प्रेमवीर पापणी मिटायच्या आत गायब व्हायचे!

पण.......स्कार्लेटचं जग Civil War ने बदललं, आपल्याला तर तेवढीही सबब उरली नाही. आपलं जग बदलतच होतं, बदलंलच होतं, आपणच झापडं लावून चालत होतो... पण तसं म्हणावं, तर "गाणं म्हणतेस का? रांगोळी काढतेस का? कुंकू लावतेस का? स्वयंपाकाची आवड आहे का?" ह्याच गोष्टी लग्नाच्या बाजारात आपल्यालाही विचारल्या होत्या!

ह्या हिशोबात मग १५- २० वर्ष जोडा. आपण, नोकरीच्या शोधात, नि आपली किंमत आता अचानक पैशात कशी मोजली जाते- ह्या कोड्यात! अर्थात् , स्कार्लेट सारखी बिकट परिस्थिती देवदयेने आपल्यावर आलेली नाही, आणि खरं म्हणजे आजूबाजूची माणसंही इतकी काही वाईट नाहीत. पण आयुष्याचा आढावा घेतांना, बेरीज- वजाबाकी फक्त आकड्यांतच करायची असते का? तशी ती करावी लागते का? हे स्वत:लाच विचारतांना, आधी कधीही न घातलेल्या, न बसणाऱ्या चष्म्यातून जग धूसर दिसावं, तसं आपलं डोकं गांगरलेलं.

स्कार्लेट मात्र, पदर बांधून मनाशी पक्का निश्चय करीत, त्या जगप्रसिद्ध ओळी बोलून गेली , "इन्शाल्लाह, मै जी-जान लगा दूंगी, लेकिन भूखी-कंगाल नही रहूंगी!" आणि नीतीमूल्यांचा फारसा विचार न करता, ते बोल तिने खरेही करून दाखविले.

आपण मात्र, नेहमीप्रमाणेच, अजूनही "रोमँटिकली सिनिकल". इतरांच्या तराजून स्वत:ला तोलत फालतू प्रश्न विचारत बसलेलो, की "स्कार्लेट सिनिकल का झाली नाही?" कशी होईल? तिच्या काळी नाटकातला "नाटकीपणा" ही शाबुत होता, आणि खऱ्या प्रेमातला खरेपणाही!


5/16/13

पुस्तक वाचतांनाचा तू

पांढऱ्या शुभ्र मोकळ्या फुसफुशीत भातावर दाणेदार मुगाच्या दालफ्रायचा पिवळा रंग, आणि त्यावर खपून केलेली कुर्कुरीत हिरवी भेंडी वाढली, तरी तुझं लक्षच गेलेलं नव्हतं.
ते बघून माझा थोडा विरस झाला, पण छान जेवण काय मी अन्नपूर्णा द्रौपदीप्रमाणे फक्त दुसऱ्यांसाठीच केलेलं नव्हतं, म्हणून मी त्या चवींमधे गुंग झाले.

हल्ली हे असंच होतंय पण. बोलायला काही फारसं नसतंच. त्यामुळे तू तुझ्या विश्वात नि मी माझ्या. पण तरीही, हे लक्ष नसणं वेगळंच होतं. खाण्याच्या आवडीपलिकडे काहीतरी तुझ्या डोक्यात शिजत असलेलं तुझ्या हातातल्या पुस्तकातून मला दिसत होतं. एरवी जेवतांना आपण ए.आर रहमान ऐकतो, किंवा कधी पावसाळी हवा असेल तर किशोरकुमार, तर आज हे कोण पियानोवर सूर नाचवतंय?

"Keith Jarret." फक्त येवढंच बोलून तू पुन्हा पुस्तकात डोकं खुपसलंस.
आता मला जरा वैतागच यायला लागलेला होता. तो अगस्त्य सेन तुझ्या ऑलरेडी तिरकस डोक्यात थैमान घालतोय म्हणजे साध्या गोष्टींवर तुझे विचार भन्नाट वेगाने वळत-वळत पळत असणार आणि त्या वेगात माझ्या शुद्ध मराठी भाषेचा आणि त्या क्षणी मला पडलेल्या प्रश्नांचा भोंगा तुला अजिबात ऐकू येत नसणार म्हणजे मला एकदम तुझ्यामागून त्या पुस्तकात शिरावं आणि तुला हात धरून खेचून बाहेर काढावंस वाटायला लागलं होतं. किंवा त्या पुस्तकात तुझ्याच चाललेल्या पानात उडी मारावंसं.

मग मी आशाळभूतपणे, "मी तुला read aloud करून सांगू?" असं विचारलं, पण तुला तो मानसिक बदलही तेव्हा नकोसा होता, मग मी पुन्हा तुझ्या वाचणाऱ्या मख्ख चेहऱ्याकडे बघत बघत आपली दालफ्राय चमच्याने संपवून टाकली. त्या पुस्तकापायी मला जेवणाची चवही आली नाही. शी - stupid.

पण हे असं आजच नाही झालंय. ते पुस्तक तिथे टेबलवर धूळ खात असो वा पोराच्या खेळाच्या बादलीत वेडवाकडं मुडपून पडलं असो, मला काही त्याला हात लावायला फुरसत नव्हती, आणि फुरसत मिळेल तेव्हा त्या येड्या अगस्त्य सेनच्या डोक्यात शिरण्याची काहीएक गरजही वाटत नव्हती.
पण परवा पुन्हा, आपल्याकडे आलेल्या पाहुण्याच्या देखत, जेवता जेवता, गप्पांतूनही तुझी त्या पुस्तकावर थबकणारी नजर बघितली आणि मला कळलं....

कोणे एके काळी मीपण ते अनुभवलं होतं. जरी त्याला आता काळ लोटला तरी, ते विसरता येणं मला शक्य नव्हतं. ते महिनोन्महिने एकाच  पुस्तकात राहणं. त्याच्या जगात वावरणं. त्यातली माणसं खऱ्या पुढे बसलेल्या माणसांपेक्षासुद्धा खरी वाटणं. त्या जगाच्या नजरेने आपल्या जगातल्या विसंगती दिसणं.

हे सगळं सगळं मी अनुभवलं होतं. खूप पूर्वी.
पण आता नाही.
उद्या त्रिकोणी पापुद्रे सुटणाऱ्या खरपूस पराठ्यावर लाल-हिरवा टोमॅटो-मिरचीचा साल्सा आणि वर किसून चीज घालून व्हेज फ्रॅन्की करायचा माझा बेत होत.

कोणी म्हणतं, ह्या फेसबूक-इमेलच्या जमान्यातला माणूस अधिक एकटा आहे. पण आता मी विचार करते- पुस्तकांच्या जगातला माणूस? तो ही तितकाच एकटा नव्हता का?





3/22/13

काही साक्षात्कार

Epiphany!
कधीच्या काळी मी इंग्रजी साहित्य शिकत होते तेंव्हा James Joyce च्या पुस्तकातून परिचयाचा झालेला एक शब्द: epiphany म्हणजे साक्षात्कार. 
खरं म्हणजे रोजच आपल्या आयुष्यातल्या अनेक घटना आपण बघतो, नि सोडून देतो. पण त्यात कितीक साक्षात्काराचे क्षण दडलेले असतात. 
खूप महिन्यात काही लिहिलेले नाही- हाही एक साक्षात्कारच होता, म्हणून तिथूनच सुरूवात करावी म्हटले. 

१. सिग्नलवर थांबलेल्या गाड्यांमधली माणसे बघायला मला फार आवडतं. प्रत्येकजण किती विवंचनेत असल्यासारखा आठ्या घाल-घालून सिग्नल बदलायची वाट बघत असतो! कधी एकाचाही चेहरा प्रसन्न, काळजीमुक्त दिसत नाही. Live in the present असं सारखं म्हणायचं फक्त, पण आपणही हिरव्या दिव्याची वाट बघता बघता दोन क्षण थांबण्यातली मजा अनुभवायला विसरूनच जातो...

२. कधीकधी आपल्याला तारूण्यात ज्या व्यक्तींबद्द्ल चीड येत असते, जसंजसं वय वाढतं तसतसे आपण त्याच व्यक्तींसारखे होत जातो. हे लोक किती त्याच त्या विषयांचं दळण दळतात! एकदा बोलत सुटले, की सुटतातच. आपल्या आठवणी, त्या कितीही emotionally loaded असतील, पण आपल्यासाठी. पुढच्याला त्या ऐकायला लावून बोअर का करतात? आणि मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्द्ल एवढे emotionally कसे react करतात!
ही सगळी वाक्य आता आपल्यालाही लागू होतात, असा भास झाला, की भीती वाटते. 

३. "नुकत्या निवड झालेल्या पोपचा जेसुईट (jesuit) इतिहास" किंवा तत्सम "आपले ज्ञान अद्द्यावत आहे" हे दाखवण्याच्या अट्टहासाच्या चर्चेपेक्षा मला "ओव्हनमधे ठेवलेले नान जळायला नकोत." "पोराने आज काय खाल्ले, व आता त्याची भुकेची वेळ टळून जायच्या आत त्याला भरवले पाहिजे"  - असल्या विषयात जास्त डोके चालू लागते, आणि ते करता करता, कधीकाळी, मी फक्त चूलमूल करणार नाही, ही स्वत:चीच प्रतिज्ञा विसरायला होते, आणि मग घरी आलेले पाहुणे म्हणतात, "हे काय, तू सारखी स्वयंपाकघरात नको गं अडकू आमच्यासाठी", तेव्हा भान येतं. आणि भान आलं की हताश न होता, शिवाय वर, "येवढं काय त्यात!" असं आपणच आपसूक म्हणून जातो, तेव्हा, भीती वाटते. 

४. भारतात न वापरली जाणारी, आणि इथल्या जगाची तिथे आठवलेली एकमेव वस्तू: किचन टॉवेल. फराफरा ओढा, नि पुसा. शी, शू, दूध, ओटा, भांडी, गळणारे पाणी अथवा नाक! ओला करून शिळ्या पोळ्यांवर घाला, किंवा कोरडाच ताज्या पोळयांच्या खाली घाला. 
इथल्या जीवनातल्या केवळ ह्या एकाच गोष्टीत जीव अडकला आपला? असा साक्षात्कार झाला की पुन्हा भीती वाटते. 

५. "वो खार खार है, शाखे गुलाब की मानिंद,
मै जख्म जख्म हूँ, फिरभी गले लगाऊँ उसे। "             किंवा

"दयार-ऐ-दिल की रात मे चरागसा जला गया
मिला नही तो क्या हुआ ? वो शक्ल तो दिखा गया!"  असले शेर लागू पडणारी  आपला " muse-एश्वर" कोण असावा? हे लक्षात आलं, की प्रचंड epiphany होते!

६. जगात "काय म्हटलं" त्यापेक्षा, "कोणी म्हटलं" ह्याला फार महत्व असतं! आज तुझे दिवस चांगले आहेत, त्यामुळे तू माज करून घे. मला पण माहितीये तशा निर्भेळ यशाची चव. तेव्हा कितीही विनम्रतेचा आव आणला, तरी माझ्या यशामागे माझ्यातलेच काही दुर्मिळ सद्गुण आहेत, ह्यावर आपला विश्वास असतो. माझ्यासारखा जीवनविषयक दृष्टीकोन ठेवला, तर सगळेच यशस्वी होऊ शकतील, असंही वाटत असतं. तो फक्त "यशाचा सोनेरी चष्मा" होता, हे तुला कळायची वेळ कधीच येऊ नये, अशी ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना. 
आणि यश आणि अपयशातला नेमका फरक कळल्याचा क्षण: साक्षात्काराचा! 

७. एकाच छपराखाली राहणाऱ्या दोन-किंवा तीन, किंवा त्याहूनही अधिक व्यक्तींचं अनुभवविश्व एकमेकांपासून किती निरनिराळं असतं! शेवटी "मी माझा" नि "तू तुझी". मग "सोबती" चा अर्थ काय असतो? 



2/8/12

ढीग

ती एकटीच नव्हती. तिच्याबरोबर, तिच्याचसारख्या खूपजणी होत्या. तरीपण, ती नेहमीची मुंबई, पुण्याकडची दिसली नाही, म्हणून तिलाच विचारलं, "बाई, तू कुठची?"
तर ती म्हणाली, "लखनऊची! फीनिक्स मॉल माहितिये? तिकडची!"
मग इथे कुठे नि कशी आलीस?
"साडी नि ड्रेससाठी आयुष्य वेचते बाई मी." ती म्हणाली.

तरीही मला तिची ओळख काही पटेना. बाकीच्यांचे रंग-ढंग एव्हाना परिचयाचे झाले होते. त्यांना सोबत घेऊन कोण कोण आलं असेल, त्याचाही अंदाज येण्यासारखा होता. आणि नाहीच आला, तर प्रत्येकीचं नाव-गाव पत्ता सांगतच होता की एक एक कहाणी...
गिरगावच्या मावशी बरोबर आली तिच्यात मुंबईचा नखरा दिसतच होता, "आशापुरा सिल्क्स" चं रंगीत विश्व तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहतंय. तरीही, आमच्या कुटुंबात अगदी "बडं" प्रस्थ असलेली आत्या चेन्नईहून आली, तेव्हा "नल्ली" वालीसमोर तिचा तोरा काही चालेना. छोटासा भरतकामाचा ब्लाऊजच तर होता आत, पण नल्लीच्या नावाने जादू केली की नाही सगळ्यांवर!

प्लॅस्टिकच्या ऐवजी कागद वापरून ईको-फ्रेंडलीपणा करणाऱ्या सिमी-ताईने फॅब-इंडियाच्या पिशवीतून शुद्ध स्वदेशी, "एक्सपोर्ट क्वालिटी कॉटन" चा, मळखाऊ (तिच्या मते डिसेंट) रंगाचा शर्ट तिच्या लाडक्या भावाला दिला, तेव्हा शर्टापेक्षाही आवडलेली "ती" हीच तर होती........

आणि एकी बरोबर माझा लाडका लेक अहोरात्र खेळत बसला होता... कोणे एके काळी पैठणी लेऊन आलेली, आज खेळणी घेऊन, लाळेत बरबटून बसलेली बघितली आणि मला तिच्याबद्द्ल विशेष सहानुभूती वाटायला लागली. ही कशी, भारदस्त व्यक्तिमत्वाची, ऐसपैस, जरा ’आडवी’च म्हणता येईलशी. पण भक्कम, अगदी प्रेमळ अशी, की छोट्याची मस्ती चालवून घ्यायला तिच्यासारखी दुसरी कोणी नव्हती.

बाकी इवल्या इवल्या बारक्या पण खूप होत्या, पण त्यांची नावं लक्षात कोण ठेवेल? हिरे-मोत्यांचे आहेर घेऊन आल्या, पण आता सेफ्टीपिनांपासून तिळगूळाच्या वड्यांपर्यंत काय वाट्टेल ती लूट त्यांनी घेऊन जायची, म्हणजे त्यांचा अपमानच नव्हता का?

तरीही त्यांची स्थिती बरी म्हणावी, अशी कथा त्या "झिरमिरीत" शेकडोंची होती. पाच पैसे देऊन कोणीही वेठीला धरलेल्या, कचऱ्याच्या भावाने विकल्या गेलेल्या, साध्या ओरखड्याने फाटणारं त्यांचं जिवंत कलेवर सुद्धा, पुन्हा पुन्हा गाठी मारून घेत त्या जगत होत्या. बघवेना, म्हणून डोळे दुसरीकडेच वळवले मी, तर पुन्हा ही लखनऊ वाली समोर आली. म्हणाली,

"अगं बापाकडून भावाकडे, नि नवऱ्याकडून मुलाकडे तुम्ही सोपवल्या जाता, तसाच काहीसा माझा प्रवास झाला. एकदा ते लखनऊचं घर सोडल्यावर, निर्वासितासारखी, जिथे जे काम पडेल तिथे हवी तशी राबवून घेतली, नि उपयोग संपल्यावर पुढच्या हाती सरकवून मोकळे झाले एकेकजण. आता तू तरी काय करणारेस माझं ? किती दिवस निगुतीने सांभाळशील?

आता मात्र माझ्या डोळ्यांसमोर हॉलोकास्ट मधला शवांचा ढीग दिसायला लागला. वसुंधरेच्या अंगावर जिथे तिथे बेवारशी पडलेल्या, आगगाडीतून जातांना रुळाजवळ पडलेल्या, झाडाच्या काडांना अडकलेल्या, वाऱ्यात दिशाहीनपाणे फडफडणाऱ्या, प्रत्येक घरातल्या खुंटीवर अस्ताव्यस्त लटकलेल्या, कचराकुंडीतून ओसंडून वाहणाऱ्या, त्या लाखो पिशव्यांचा ढीग!

त्यात्यल्या कितीजणींना रितसर "अग्नी" मिळेल, नि कितींना पुनर्जीवन, कुणास ठाऊक?


10/29/10

जजमेंट

प्रत्येका कडे पहिल्या डावात १०-१० पानं. हुकुम ठरलेलाच असतो. बदाम.
वडील: "हुकुमाची ३ पानं आहेत, पण त्यातलं एक जरा हलकं. आणि चौकटचा राजा. आपल्याकडे सगळ्या रंगाची पानं असल्यामुळे तसा राजाचा हात व्हायला हरकत नाही. तरीपण, इकडचे तिकडचे सोडून २ च हात सांगावे. नेहमी पदर पाहून पाय पसरावे. नजर आकाशावर, आणि पोच फक्त खिडकीपर्यंत, त्यापेक्षा नकोच ते! अडी-अडचणीला, सणा-सुदीला पैसे लागतील म्हणून जपून जपून शिल्लक टाकायची आपली सवय! ती ह्या नवीन पिढीला काय कळणार?"
नवरा: "ह्या! तुम्ही आग्रह केला म्हणून हे असले फालतू खेळ खेळावे लागतायत." असं आधीच म्हणून टाकलं, की कितीही हात होवोत, न होवोत, उगीच विचार करायचं काम नाय. आता सगळ्या घोड्यांवर थोडी थोडी इस्टेट लावून टाकली, की एखादं तरी घोडं जिंकेल, तश्या ह्या ४ भारी पानांपैकी ३ तरी हात होतील, झालं सांगून टाकावं. मग इतरांचे डिसिजन होईपर्यंत हळूच iphone :)"
आई: "आई म्हटलं की सगळ्या गोष्टींवर प्रेमच करावं लागतं. मुलाबाळांवर प्रेम, आता सुनांवर प्रेम, एवढंच नव्हे, तर भाजी पाल्यावर प्रेम, साड्यांवर प्रेम आणि पत्त्यांवरही प्रेमच. मगाशी नेमका माझा एक्क्याचा हात कापलान सुनबाईने. आपणही त्या एवढ्याशा हार-जीतीवर किती हीरिरीने अडून बसलेलो होतो! शेवटी सगळे हात मोजायला लागल्यावर मी फेकून दिलं ते कापलेलं पान, आणि झालेच माझे बोलल्याप्रमाणे २ हात. तर काय? परवा ५-३-२ खेळत होतो, तिने २ हात काय ओढले माझे- तेव्हाही इतकं लागलं मनाला... ह्यावेळी नाही हं. करूनच दाखवीन ३ हात, तर मज्जा येईल.
इतकी वर्ष हातात एकच धड पान असलं, तरी त्याच्या भरोशावर अगदी १० माणसांचा नाही, पण ४-५ जणांचा संसार चालवतांना कशी जिवाची तडफड झाली, हे आजकालच्या मुलींना नाही कळायचं. त्यांना स्वत:चे हात करून हातभार लावता येतो म्हणून टिमकी मिरवतात... पण आधी रोजच्या भाजीत मीठाचा अंदाज येत नाही अजून, आणि चालल्या जजमेंट खेळायला! आता मात्र मी ठरवलंय. मन म्हणेल तसं जगायचं. आधीही सासूच्या राज्यात आम्हीच मन मारलं, आणि आताही सुनेच्या राज्यात आम्हीच का म्हणून मारायचं? हं. माझे दणकून लिहि रे ४ हात.!"
माऊ: "सध्या माझे मज्जेचे दिवस चाललेत अगदी. दादा-वहिनीने अमेरिकेतून amazing कपडे आणलेत, आणि कॉलेजला सुट्टी असल्यामुळे नुसते पार्ट्यांना, आईसक्रीम खायला जातांना ते अगदी perfect होतायत. परवा शीना म्हणाली, "ए तुझ्या दादा-वहिनीला सांग ना माझ्यासाठीपण next time स्वेटशर्ट आणायला! मी पैसे देईन इथे." मनात म्हटलं, हो, सगळ्यांसाठी आणायला बसलेत माझे दादा-वहिनी रिकामे. प्लस, सगळ्यांनाच आणले, तर माझं स्पेशल काय राहिल त्यात?" हो हो. हातच सांगायचेत ना.......... १० पानं........ बाबांचे २-दादाचे ३ आणि आईला तर absolutely हिशोब येत नाही. म्हणजे आपण रिस्क घेऊन ५ सांगितले तरी होतीलच आपले. वहिनी गोSSड्च आहे. मागच्या डावात म्हणाली, "मार दिया जाए...?" पण सोडला माझा एक critical हात.
तसाही ५ is my lucky number. 12th चा रोल नंबर, आता माझ्या नवीन स्कूटीचा नंबर, आणि अक्षयचा बर्थ डे......इश्य......
मी: सगळ्यांनी नाही नाही म्हणता वेळ घेतलाच हात बोलायला, आणि आता सगळ्यांचे झालेत बोलून, तर माझ्या मागे घाई. सगळ्यांनी भरभरून हात सांगितलेत. एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून ह्यांच्याकडे? आणि नाही झाले, तर स्वत:च नाही, दुसऱ्यांनाही बुडवतील स्वत:बरोबर. बहुतेक तरी बुडणारी मीच एकटी असणार. त्यांच्या सारखा विचार करणं जमतच नाही अजूनही- संसाराला इतकी वर्ष झाली तरी. विचार करण्याची "कुळकर्णी" पद्धत आणि "देशपांडे" पद्धत..... असे क्लास घ्यायला हवे होते दोन्ही पक्षी लग्ना-आधी.
पानं १०च, तरी माऊ ५ हात बोललीये येडी. मागच्या डावात मी सगळे राग-रंग ओळखून शून्य हात सांगितले, तर ते ही होऊ नयेत माझे सुरळीत? हा डावच आपला नाही म्हणा. पत्ते वाटणाऱ्याला स्वातंत्र्य नसतंच, मनासारखे हात बोलण्याचं. तसेही, सगळ्यांचे विचार असे आदळतायत कानांवर चोहीकडून, की मला खरोखर, मनापासून किती हात करायचेत? तेच उमगेनासं झालंय. ओ गॉड, आता मी जितका वेळ लावेन, तितके कॉमेंट्स येतील. "किती हळूहळू काम असतं न हिचं! आंघोळीलाच तासभर लावते रोज." घ्या, आता नवरोबाही त्यात सामील. अहो, देवीजी, तंद्रीतून बाहेर या ना आता....."
हं. शून्य. पुन्हा शून्य? हो. पुन्हा शून्य. आता खेळ संपेपर्यंत शून्यच फक्त. फारसा विचार करावा लागत नाही शून्य बोललो की. पानं जाळत बसायचं आरामात. खेळलोच नाही असं तर होणार नाही....
मग एकदा मज्जा करायची. चांगली पानं आली तरी शून्य. आणि कसे बुडतील सगळे गंमत बघायची. थोडा थोडा आनंद चोरायचा. The one who laughs at last....


9/16/09

पैठणी- शांता शेळके

फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, तोपडी, शेले, शाली,
त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी.

ही कविता मी प्रथम वाचली, तेव्हा "फडताळ", "नारळी पदर" असले शब्द कळतही नव्हते. आईबाबांची कागद-पत्रे ज्या कपाटात होती, तिथे त्यांची काही पुस्तकं अगोचरपणे वाचायला गेले, तर शांताबाई शेळक्यांचं "गोंदण" हाती आलं. एक कविता वाचली, कळेना. पान पुढे. दुसरी. त्यात "आवर्त" असले शब्द म्हणता म्हणता बोबडी वळते म्हणून पुस्तक ठेवून द्यावं, तोच "पैठणी" वर नजर गेली. ह्म्म्म ही कळू शकेल बुवा! बघू तरी...

माझी आजी लग्नामधे ही पैठणी नेसली होती
पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास
ओळखीची...अनोळखीची...जाणीव गूढ आहे त्यास.

(काय बरं ह्या वाक्यात अर्थ प्रतीत होतो? तेव्हा कळण्याचं वय नव्हतं, पण अजूनही ते गूढ मनात रेंगाळलंय.)

धूप-कापूर-उदबत्त्यांतून जळत गेले किती श्रावण
पैठणीने या जपले एक तन...एक मन...
खस-हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली
(ह्या वाक्याशी मी दरवेळी थांबते. खस-हिन्याचा एकत्रित दरवळ! नुसतं खस-हिना म्हटलं तरी अंगावरून झुळूक गेल्यासारखी वाटली.)
शेवंतीची, चमेलीची आरास पदराआडून हसली.

वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला.
(माझ्या आजीची साडी इतकी मऊ कशी लागते? ह्याचं उत्तर मिळाल्यासारखं वाटलं.)
पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले.
(त्यावेळी आजीच्या मरणाच्या कल्पनेनेही रडू आलं होतं!)

कधी तरी ही पैठणी मी धरते उरी कवळून
मऊ रेशमी स्पर्शामधे आजी भेटते मला जवळून
मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यांनो, आजीला माझे कुशल सांगा.


देवाच्या कृपेने माझ्या दोन्ही आज्या अजून खुशाल आहेत, तरीपण, अमेरिकेतल्या माझ्याशी, भारतातल्या आज्यांचा, कालपटाचा धागा जुळतो, तेव्हा गहिवरून येतं. ह्या कवितेबद्द्ल लिहितांना, "कवयित्रीने सर्व संवेदना- स्पर्श, गंध, दृष्टीला खुणावणारं काव्य केलंय" असं काहीबाही लिहायला गेलेही असते कदाचित

पण एवढंच म्हणते- शांताबाई! तुमच्या कवितेने जागवलेल्या माझ्यातल्या निर्मळ मनाला, मनातल्या निरागस आठवणींना, आणि त्या आठवणींनी वाहणाऱ्या झऱ्यांना सलाम!!!

6/25/09

रंग जांभळा

गेले काही दिवस मी Celie ची पत्र वाचत होते. The Color Purple मधली.
तिने देवाला लिहिलेली. "त्या" च्या पर्यंत कधी न पोचलेली...
सेली चं बालपण उमलायच्या आधीच कोमेजलं. आई मरणाच्या दारात असतांना सख्ख्य़ा बापाने अत्याचार केले, तर सांगेल कुणाला? एक देवच तर होता, त्याच्यावर भरोसा, की तो माझा पाठीराखा...
पण तो नाही आला धावून, द्रौपदीच्या कृष्णासारखा... बापाच्या पापाची पोरं बापाने बाहेर विकली, तेंव्हा नाही. त्याने सेली ला एका प्रौढ माणसाला बायको म्हणून उजवली, तेव्हा ही नाही. त्या माणसाने तिला गुरापेक्षा वाईट वागवली, वापरली, तरी ही नाही.

सेलीची पाठची बहिणच एक होती, तिचा कैवार घेणारी. ती म्हणाली, "तू तरी का सोसतेस अशी मुक्याने?"
"I don't know how to fight. All I know how to do is to stay alive!" सेली चं उत्तर आज समजून घेणं अवघड आहे. सेली सारख्या ऍफ्रिकन अमेरिकन बायकांना अगदी विसाव्या शतकातही जे सोसावं लागलं- त्याने पार मोडलेला कणा घेऊन जगतांना, पर्यायांचा नुसता विचार करता येण्याइतकंही बळ नसणं!
देवावरच्या आपल्या भाबड्या विश्वासाने का होईना, सेली त्या मरणाहून वाईट जगण्यातून चिवटपणे तगली. तिच्या बहिणीला मात्र शिक्षणाने नवी वाट दाखवली. आफ्रिकेत मिशनरी म्हणून गेली ती, पण आपल्याच संस्कृतीच्या ह्या "मूळापासून" आपण किती दूर फेकले गेलो, ह्याचं भान तिला आलं, आणि तिच्या "मिशन" ला एक वेगळंच परिमाण प्राप्त झालं.

सेली च्या नव़याने मात्र तिची पत्र सेली पर्यंत कधी पोचू दिली नाहीत.
आशेच्या एका किरणाला पारखी झाली होती सेली, तेव्हा तिला भेटली Shug Avery. प्रसिद्ध गायिका, सौंदर्याची पुतळी, पण आजारी पडल्यावर समाजाने टाकलेली. सेलीच्या शुश्रुषेने ती बरी झाली, आणि सेलीचं आयुष्यच तिने उजळून टाकलं.

"माझ्या देवाने आजवर माझ्यासाठी काय केलं?" सेली ने शेवटी हताश होऊन विचारलं, तर शग म्हणाली,
" तुझ्या डोक्यातला देव, एकतर तो पुरूष आहे, आणि त्याहून गोरा! तर त्याच्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार? तो तुझी निरपेक्ष सेवा मागणार, आणि त्याने वाटलेलं दु:खही तू प्रसाद समजून कपाळी लावावंस असं धर्मग्रंथात लिहून ठेवणार."

"मला वाटतं देव ना स्त्री आहे ना पुरूष. ते एक तत्त्व आहे- आपल्या बरोबरीने जगणारं, सुखात हसणारं, वेदनेने कळवळणारं! भावना ही देवानेच निर्माण केल्या ना? मग त्या सतत दाबून टाकल्याने देव प्रसन्न होईल असं कसं वाटतं तुला? अगं आपल्या सुखातही देवाचं सुख असेल, असा विचार का नाही करत आपण?
आपण देवाला प्रसन्न करायला निघतो, पण देवाने आपल्याला प्रसन्न करण्यासाठी काय काय लीला मांडून ठेवल्यात त्या कधीच का डोळे उघडून बघत नाही आपण?


"I think it pisses God off if you walk by the color purple in a field somewhere and don't notice it.” शग म्हणाली.
सेलीला मग एकदम काहीतरी उमगल्यासारखं झालं... जांभळ्या रंगाने हळूहळू तिचं रंगहीन जीवन उत्फुल्ल होत गेलं...

11/7/08

The Bell Jar

Dying
Is an art, like everything else.
I do it exceptionally well.

- Sylvia Plathहे जळजळीत शब्द जगाच्या मळक्या पाटीवर कोरून ती निघून गेली. आत्महत्या करून.

पण आजही तिचं आत्मकथन वाचतांना प्रश्न पडतो, की काही बदललंय का? काहीच कसं बदललं नाही?
छोट्या गावातून आलेली ती, न्यू यॉर्कमधे स्वत:ची ओळख शोधत असतांना तिला भलतेच काही शोध लागले. स्वत:बद्दल, स्वत:च्या अस्तित्वाबद्द्ल. कुठल्याच मैत्रिणीत, कि कुठल्याच काकी-मामी, एवढंच काय स्वत:च्या आईमधेही तिला स्वत:चं प्रतिबिंब दिसेना, तेंव्हा वाटायला लागलं, "माझं काही चुकत तर नाहिये ना?" Doreen चा तडफदारपणा आवडतो, पण तिच्यासारख्या रूपगर्वितांना मुलं झुलवत ठेवतात, आणि काम साधलं, की फेकून देतात, ह्याची तिला ना जाणीव, ना तमा. Betsy चा आज्ञाधारकपणा म्हणावा, की मूर्खपणा, ते कळेना. आणि Boss असलेली Jay Cee? तिच्या यशाचा द्वेष करावा, की कुरूपतेची कीव?

काहीच कसं सगळं मनासारखं साधत नाही? बायकांनी यशस्वी असलं, की त्यांना काय भावना नसतात, की काय त्यांचं स्त्रीत्व नाहिसं होतं? बायकांनी स्वाभिमान बाळगला, येवढंच नव्हे, तर स्वाभिमान दाखवला, तर कोणती मोठी मर्यादा ओलांडली? आणि खुद्द आईने तिला सांगावं? "तुला काय करायचं कॉलेजशिक्षण? त्यापेक्षा टायपिंग शिकून स्वत:ची भाकरी मिळवायला शीक!" (म्हणजे मुलींना ना शिकण्याची मुभा, ना स्वावलंबित्वाचा अभिमान बाळगायची मुभा!)

राग राग आला, पण त्याहूनही, वाईट वाटलं. किती भाबडेपणाने सगळे नियम पाळले लहानपणी!
ठेवला विश्वास, की जे चांगलं असतं, ते केलं, की कौतुक होईल,
आणि नाहीच, तर निदान प्रेम मिळेल, निदान कोणीतरी पाठीवर हात ठेवून म्हणेल,
"खूप दमतेस. थकलीस का?" पण तसं काही झालं नाही.

A Birthday Present मधे सांगते,
I am sure it is unique, I am sure it is what I want.
When I am quiet at my cooking, I feel it looking, I feel it thinking.
Measuring the flour, cutting of the surplus,
Adhering to rules, to rules, to rules.
स्कॉलरशिप म्हणा, की परिक्षेतलं यश म्हणा- सगळ्या सामाजिक निकषांवर खरं उतरल्यावर तरी मला स्वप्न पाहण्याचा अधिकार मिळेल का? ह्या तडफडीने यशाचा ध्यास घेतला. गणित आवडत नाही का? न आवडू दे- तरीही कायम A Grade! स्वयंपाक करतांनाही मन लावून, की एके दिवशी त्या स्वप्नातल्या राजकुमाराला आवडायला हवा ना?
ती- तिचं भावविश्व उत्तुंग होतं. जे शब्द माझ्या मर्यादेपलिकडे होते, त्या शब्दांना, त्यामागच्या भावनांसकट वापरायचं धैर्य तिच्याकडे होतं.
पण मग का कोणजाणे- थकायला झालं! स्वत:ला किती प्रयत्नाने समाजाच्या चौकटीत बसवूनही, मनाने ती चौकट कधीच स्वीकारली नाही, की खया अर्थाने तिला सन्मानाने वागवणारा, तसंच तिच्या सन्मानाला पात्र असणारा जीवनसाथी ही मिळाला नाही. वरवर बघता सगळं मिळूनही, एखाद्या शापाने सगळं कडूकडू होऊन शेवटी हाती काहीही लागू नये?
आधीच घुसमटलेल्या जीवाला एखाद्या प्रयोगशाळेतल्या Bell Jar मधे भरून ठेवल्यागत झालं. एखाद्या जन्माआधीच मृत्यू पावलेल्या गर्भाला भरून ठेवतात तस! तेच रूपक वापरून तिने तिची तिची आत्मकथा लिहिली.
The Bell Jar.