1/6/08

नातिचरामि...!


नातिचरामि...!
मेघना पेठेंनी लिहिलेली ही कादंबरी मला मझ्या सासरकडून भेट मिळाली- ज्यांनी ही कादंबरी वाचली, त्यांनाच ह्या वाक्यातले अनेक अर्थ समजतील. धक्काच बसला सर्वात आधी, पण मग लक्षात आलं, की त्यांनीही ती मला देण्याआधी वाचलेली नव्हती. नाहितर कितीही उदारमतवादी असले, तरी आई-वडिलांच्या पिढीकडून लग्न झालेल्या मुलीला भेट देण्यासारखं त्यात काहीही नाही, किंबहुना भेट न देण्यासारखंच बरंच काही आहे. पण खरंच ह्या कादंबरीच्या शिर्षकाइतकं फसवं, द्वयर्थी, तरीही सार्थ शिर्षक दुसया कुठल्या लेखनाचं आठवत नाही. (माझ्या वाचनाच्या छोट्या कक्षांत तरी नाही।)

नातिचरामि...! त्रिवार उच्चारण करून केलेला करार, किंवा अगदीच रोमॅंटिक होऊन म्हणायचं असेल, तर, दोन जीवांचं अग्नीला साक्षी ठेवून मीलन, जीवनात कधीही साथ न सोडण्याचं वचन. आमच्या लग्नात गुरूजींनी नीट अर्थ समजावून सांगितला होता त्याचा, सप्तपदीचाही. पण त्या वातावरणात भानच नसतं खरं तर ते ऐकायचं! सगळं मनासारखं असेल, तर ते नातिचरामि त्या क्षणी आपण आपोआपच मनात म्हणून टाकलेलं असतं. नंतर आम्ही एका अमेरिकन+भारतीय लग्नाला गेलो, तेंव्हा तिथे आम्हाला handouts मिळाले इंग्रजीतले- त्यात पुन्हा वाचला तो अर्थ, तेंव्हा माझा नवरा म्हणाला- हं... आता हे कळतं आहे. आपल्या वेळेचं काही आठवत नव्हतं! - मी ३ वर्षात रूळले आहे संसारात, त्यामुळे थोड्या कौतुकमिश्रित रागाने एक कटाक्ष टाकला त्या दिशेने! पण असो।

हे जन्माचं वचन किती विश्वासाने देतो-घेतो आपण... कधीकधी सर्वस्वाचा होम करायला लावणारं (domestic violence, fraud, alcoholics, एक ना अनेक कारणांनी) पण तो अशुभ विचार आपण मनात आणायचा नसतो. सर्वस्वाचा होम तरी परवडला, पण मधेच प्रतारणा? ती ही एका स्री कडून?
संसाराची एक एक वीट बारा वर्षात निखळत, मोडत गेलेली असली, तरी शारिरिक संबंधाचाच मापदंड मानणारा समाज, आणि रडत कुढत का होईना, फसवा का होईना, निरर्थक संसार रेटायला नकार देणारी स्त्री...

त्या स्रीचं अतिशय परखड, तरीही हळुवार आत्मकथन आहे हे. नातिचरामिचा गुंता स्वत:पुरता, आणि केवळ स्वत:पुरताच, सोडवू पाहणारं. मीरेने कोणाला उपदेश करायला, किंवा समाजाशी वाकड्यात शिरायला लिहिलं नाहिये ते (निदान तीचा मूळ उद्देश तरी तसा नाही... ओघाओघाने येतात स्त्रीस्वातंत्र्याच्या गोष्टी, पण त्या येऊ नयेत, हेच पहिलं वचन घेतलं होतं का अग्नीने स्रीयांकडून??? व्यक्तीत्व असण्याची मुभा नव्हती स्रियांना, त्या काळची गोष्ट नव्हे ही- म्हणून तर उभे राहतात प्रश्न- नवर्याला अगदी विचारपूर्वक, विधीवत सोडलं, किंवा त्याने हिला सोडलं म्हणून आठवणी, माया, शारिरिक ओढ- संपते का? कोणत्याही स्त्री-पुरूष नात्याचा खरा पाया कशात असतो हा प्रश्न विचारणारी मीरा... तिला ते उत्तर शेवटी मिळालं का? तिथपर्यंतचा हा प्रवास आहे. आणि तो वैचारिक प्रवास निव्वळ अद्वितीय आहे, असं मला तरी वाटतं!!!

प्रवासात दिसतात अनेक रूपांतले पुरूष- मित्र, स्नेही, सुह्रुद, सखा, पती, प्रियकर... वेगवेगळ्या कारणांसाठी ती त्यांच्यात गुंतुन जाते. तिचं भावविश्व समृद्ध करत जातात ते सगळे. कधी समाजमान्य नात्यांतून, तर कधी विवाहबाह्य संबंधांतून, ती परिपूर्ण होत जाते, असं म्हटलं तर blasphemy व्हायची! पण ते खरं आहे. गालिब पासुन गुलाम अलिंपर्यंत भावनांचा प्रवास आहे. आणि दुसरीकडे तत्त्वांची कोरडी भाषा, किंवा बोली भाषेतली इंग्रजी-मराठी खिचडी आहे. तिच्याच एका परित्यक्ता, दोन लग्नं मोडलेल्या मैत्रिणीच्या तोंडची तीन धोब्यांची कथा तर इतकी खुसखुशीत, की वाचणार्याला कोडं- की ही बाई खरंच धोब्यांचं सांगते आहे, की नवयांच? आणि खरंच त्या कहाण्या इतक्या सरमिसळू शकतात ह्याला हसावं का रडावं? Irony of life, indeed!

नवीन नाती जन्माला येतात ते क्षण फार सुंदर असतात. पुढे माणसं बदलतात, नातंही बदलायला लागतं, आणि त्या रंग बदललेल्या नात्याच्या चष्म्यातून जवळची माणसंच मग माणसंच अनोळखी वाटायला लागतात... किंवा रंग ऊडूनच जातात आणि स्वच्छ दिसायला लागतात. त्या दिसण्याचं काय करायचं? हा प्रश्न मीराला जीवनाने विचारला. आणि ती जे शिकली, तो साया स्रीजातीचा भावनिक इतिहास आहे- राजकिय नव्हे- भावनिक. स्वत:च्या आयुष्याची जबाबदारी सदाच पेलता येत होती तिला. पण ते अस्तित्त्व स्वयंपूर्ण नाही. शारिरिक आकर्षण, भावनिक आधार, मानसिक भूक, ह्या सगळ्या गरजा काही वेगवेगळ्या कप्प्यांत घालून त्यासाठी वेगवेगळी दुकानं शोधता येत नसतात. तिला भेटलेल्या सगळ्या व्यक्तींशी ती त्या ओढीने बांधली जाते (इथे ते पुरुष आहेत, ह्याला कितपत महत्त्व द्यायचं, हा ही प्रश्नच आहे.) पण everything comes with a baggage सारखा प्रकार!

ती शोधते प्रत्येक पुरूषात ते एक element जे प्रत्येक स्री खरं म्हणजे शोधत असते, पण त्याचं नाव घेऊ शकत नाही... स्वातंत्र्य! स्त्रिया स्वतंत्र झाल्या, पण पुरूष जोवर तितकाच स्वतंत्र होत नाहि, तोवर ते स्वातंत्र्य अपूर्ण आहे अशा भ्रमात राहते मीरा. आणि शेवटी तिला तिचाच एक सच्चा मित्र बाहेर काढतो त्या भ्रमातून (किंवा तिला दाखवतो ती दिशा- आणि तिला कळत जातं स्वत:चं खर्या अर्थाने स्वयंपूर्ण अस्तित्त्व!

मराठी भाषेतल्या किती स्री- पात्रांनी केलाय हा इतक्या टोकाचा प्रवास? पुन्हा- माझ्या वाचनक्षेतल्या कोणीही नाही... पाश्चिमात्य ट्रायल- एरर पद्धतीच्या नात्यांकडे मोठ्या तुच्छतेने पाहतो आपण, पण फरक पुन्हा हाच आहे, की जोवर स्वत:चा शोध लागत नाही आपल्याला, तोवर नाती, संबंधांची मिमांसा करत बसतो आपण। जिसने खुद को पा लिया उसके लिये जहान हुआ, न हुआ!!! नात्यांमधे जीव असतोच, असणारच, असायलाही हवा (संत नसाल तर) पण गालिबच्याच शब्दात, त्यांचं सौंदर्यं सांगते मीरा-


तेरे वादे पे जिये हम तो, ये जान झूठ जाना ।
के खुशी से मर न जाते, गर ऐतबार होता ॥

2 comments:

Tulip said...

Surekh post!

Mohan Lele said...

भारतीय संस्कृतीत Relation has no time dimension! तुमच्या सुरेख आणि शुद्ध मराठीतील लेखावर प्रतिक्रियेसाठी मला नेमकेच शब्द सुचत नाहीत.
मात्र व्यावसायिकतेच्या भावविश्वात नाती वेळ आणि काळ ह्या दोन्हीही पट्टीवर आधारित असतात. व्यक्तिगत जीवनात व्यवसाय घुसल्यानंतरच नाती धुसर बनतात. हिन्दू धर्मात पती आणि पत्नी लग्नानंतर वेगळे नाहीतच. म्हणून तर अर्धांगी हा शब्द रुढ पावला.