12/29/13

Astray- a ghazal


The sense of loss even keener today 
As the things one stands to lose
Bit by bit
Get taken away

The sense of love
Welling up in misty eyes
Reminds me
Of each passing day.

Who were these people -
with words
you tried to reach?
What do they mean when 
There's nothing left to say?

Blink, again 
And make it real
Take in the black darkness,
Make it gray.

It throbbed- with pain 
Each moment it lived
Each dream it dreamt
My mind - gone astray.

10/21/13

तयाचा वेलू...

माझं बालपण गेलं, ते घर एका परीने अमेरिकनच म्हणायला हवं. तिथे “दिसतं तसं नसतं” चे अमेरिकन नियम अगदी १००% लागू होते. अमेरिकेत कसं, driveway मध्ये park करतात, नि parkway वरती गाडी चालवतात. हायवेवरून Exit करतांना तुम्ही खरं म्हणजे कुठल्यातरी गावात enter करत असता, तुमच्या “cousin” ची मुलं सुद्धा तुमची “cousins” च असतात.....

माझ्या लहानपणी, आमच्या घरातही अगदी तसलाच प्रकार होता. बैठकीच्या, “मधल्या खोलीत” रात्री सोफे बाजूला करून आम्ही गाद्या घालायचो, आणि कोपऱ्यातल्या एका बेडरूमला मात्र “classroom” बनवून तिथे माझे आजोबा इंग्रजीची शिकवणी करत असत. दुसऱ्या बेडरूमला आम्ही चक्क dressing room म्हणायचो, कारण तिथे आंघोळ झाल्यावर तयार व्हायचे असायचे हे एक, आणि गणेशोत्सव, शारदोत्सव, महिला मंडळ, नागरिक मंडळाच्या अनेक कार्यक्रमांची green room सुद्धा तीच होती. करता काय? “टिळकनगर” मैदानाच्या काठावरच आमचं घर पडायचं, त्यामुळे भोज्यासारखं तिथे डोकावूनच शेजारी-पाजारी पुढे जात.

दारं नि खिडक्या तर त्या घराला इतक्या होत्या, की “सातशे खिडक्या नऊशे दारं” हे गाणं आपल्याच घरावरून तयार केलंय, असं मला नेहमी वाटायचं. पुढच्या अंगणातून आत गेल्यावर नावाला सुद्धा “दार” म्हणून नव्हतं. फक्त एक जाळीचा वऱ्हांडा, नि त्याला जोडून जो पॅसेज होता, त्यातून थेट स्वयंपाकघरातल्या ओट्यापर्यंत नजर जाई. म्हणजे नको तिथे दारं, नि हवी तिथे ठेंगा!

पण त्या घरातली माणसं तरी कुठे कुणाच्या “व्याख्येत” बसणारी होती? मी ज्यांना “आजी-आजोबा” म्हणते, ते खरं म्हणजे माझे आत्या-आतोबा होते. माझी खरी आजी फार लवकर वारल्यावर तिनेच बाबांना मोठे केले, म्हणून मग तीच “आजी” झाली. अहो, आमचा कुत्रा “लालू” हा सुद्धा खरं म्हणजे आमचा कुत्रा नसून वाट चुकून आला, नि घरचाच झाला. तर मग त्याच नियमाने, “माझ्यासारख्या “शाण्या” मुलीचा एवढा खोडसाळ छोटा भाऊ नक्कीच नसेल, नक्कीच आई-बाबांनी हॉस्पिटलातून चुकून दुसराच उचलून आणलाय, असंही माझं पक्कं मत झालेलं होतं J

कोण-कुठल्या-देश-वेष-रंगरूप-भाषांच्या विविध लोकांना सामावून घेणाऱ्या अमेरिकेसारखंच ते घर, देशस्थ असो वा कोकणस्थ, मराठे असोत वा मारवाडी, सगळ्यांचंच घर झालं. रक्ताची “खरी” नाती फारशी उरलीच नसतांना, ह्या “मानलेल्या” भाऊ-काका-बहीण-मुलीच्या नात्यांत मात्र अजूनही ओलावा आहे, हक्काची माया आहे. अशी वर्ष सरली, नि पाखरं बाहेर पडली, तसं मला अजून एक सत्य समजत-उमजत गेलं.......
की आपण हे जे “आपलं” म्हणतो, ते घरच खरं म्हणजे “आपलं” नाहिये.
मोगऱ्याच्या सुवासाचं घर
आंब्याच्या रसाचं घर
टिक्करबिल्ला खेळण्याचं घर
लिंबोण्या वेचण्याचं घर
अंगण, ऊन, जाळीच्या कोनाड्यांचं,
गच्ची, पाऊस, वाऱ्याचं घर
कपाटं, माळे, कोठीही भरून
उरलेल्या पसाऱ्यांचं घर...
ते घर आमच्यासाठीच बनलं असावं, कारण गेल्या ३५ वर्षात त्याचे खरे मालक कधीच तिथे राहिलेही नव्हते. आमचं झालं, नि ते हळूहळू भरलं, आमच्यासाठी ते बदललं. त्यातल्या खोल्यांनी आपले रंगच नव्हे, तर रूपही पालटले. आजोबा गेल्यावर त्यांच्या खोलीतल्या भिंतीवर ज्ञानेश्वर महाराजांच्या बाजूला चक्क मायकल जॅकसन येऊन बसला. पण आम्ही पाखरे उडालो, त्याच सुमारास आमच्या कुटुंबावर ते घरही सोडायची वेळ आली. घरमालकांनी तिथे फ्लॅट बांधायचे ठरवले होते!

ऐकून डोळे भरून आले, आणि “माहेर” म्हटल्यावर आता दुसरी कुठली वास्तू डोळ्यासमोर आणू म्हटली तरी आणता येईना. पण नाईलाजाने बाहेर पडलो. माळे, गाळे रिकामे झाले, पण आमच्या आठवणींचे हजारो काजवे अजून त्याच अंधाऱ्या खोल्यांमधून चमचम करत असतील असं मला वाटत राहिलं... काही दिवसांपूर्वी आई म्हणाली, “जुन्या घरच्या शेजारच्या काकूंकडे हळदीकुंकू होतं गं. गेलो, तर घर आपलं बंजर भूतबंगल्यासारखं दिसतंय. तण वाढलं, मोगऱ्याचे वेल पार जळून गेलेत...” आईचा आवाज हळवा झाला.

समोरच्या जाळीवर दोन्हीकडे नक्षीची कमान काढल्यासारखे ते भरघोस वेल डोळ्यांपुढे आले. त्यांचा सुवास मनात दरवळला. आणि त्याच सुमारास, इथे न्यू जर्सीतले आमचे मावशी-काका, त्यांचे अनेक वर्षांचे घर विकून एल. ए. ला स्थायिक व्हायला निघाले. पॅकिंग, नि टाकून द्यायच्या सामानाची आवराआवरी करायला आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. पुन्हा माझ्या मनाने, मागच्याच दु:खावरची खपली काढली. पुन्हा रिकाम्या भिंतींना सामोरं जावं लागणार होतं.

आणि तेवढ्यातच, काकांनी माझ्या हातात मोगऱ्याची छोटी कुंडी ठेवली. “ह्याच उन्हाळ्यात आणलाय हा! त्याला दोन-चार फुलंही आली... मोठ्या कुंडीत लावून बघ, टिकतोय का.” मी अवाक्! त्या घरचा मोगरा, ह्या रूपात इथे आला माझ्यासाठी? तिथल्या आठवणींचा दरवळ आता मी इथे जपावा म्हणून, त्याला पाणी घालायचा वसा मी इथे घ्यावा म्हणून! त्या घराने, त्यातल्या माणसांनी दिलेल्या मायेचा सडा इथे पडावा, नि वाढावा म्हणून!

बघता बघता मीच मग मोगरा झाले. टपटप करीत मोत्यांच्या सड्यातून अंगणात उतरले, हरवलेला सुगंध अंतरात गवसल्यावर घमघमले. कुणी रूजविला, कुणी शिंपिला, तयाचा वेलू, गगनावरी गेला!


8/6/13

स्कार्लेट ओ’हारा सिनिकल का झाली नाही?

स्कार्लेट ओ’हारा चं झालं, तसंच आपलंही होईल असं कधी वाटलं नव्हतं. पण असं असूनही, आपण सिनिकल झालो. आपल्यात कडवटपणा आलाच. तिच्यात मात्र आला नाही. असं का?

स्कार्लेट बिचारी, तिला लहानपणापासून पढवून पढवून, तिच्या मनावर बिंबवलेलं होतं, की सोज्वळ मुलींनी कसं, चारचौघात चिमणीसारखं खावं, बाहुलीसारखं मढावं, नाचावं- गावं, पण शेवटी पुरूषांसाठी जगावं. ह्या नाटकाचा तिला थोडाफार वैताग येत असे, पण त्यात फारसं काही गैर मात्र वाटत नव्हतंच, कारण शेवटी हे खुळचट पोरगे तिच्याच पायांशी आपलं हृदय ठेवणार, आणि त्यांचा ती खुशाल चक्काचूर करीत, फक्त मानाचे मुजरे झेलीत, "तिच्या" ॲश्लीच्या हातात हात देणार.

पैसा? तो काय असतो? आजीबरोबर कीर्तन ऐकतांना तर "भक्ती", "त्याग", "निर्लोभीपणा" - असल्याच गुणांचा ध्यास घ्यायचा असतो हे कळलं होतं. "स्वत:ला ओळखा", म्हणजेच, स्वत:च्या कुवती/आवडीनुसार करीयर करा, केवळ पैशाच्या मागे लागून भलत्याच मार्गाला (चुकीच्या करीयरला) जाऊ नका, असं ही होतं.
पोटापुरता पैसा "असणं", एवढंच फक्त त्याचं महत्त्व होतं. कुणीतरी, कुठेतरी पडद्याआड, पैसे कमावतं, नि जमवतं (आई-बाबा). पैसे "खर्च" करू देण्याइतके लाड त्या काळात कोणत्याच घरात होत नसतील...

स्कार्लेटलाही हे येवढंच समोर दिसत होतं: कापूस पिकतोय, घर भरतंय, गडी राबताहेत, मेजवान्या झडताहेत. "सिव्हिल वॉर" सारख्या कंटाळवाण्या विषयावर चर्चा करायला तिला अजिबात आवडत नसे. तसंही, युद्धाने कधी कुणाचं भलं झालंय? आणि बायकांचा तो प्रांतच नसतो की! गणित वगैरे शिकून, पुस्तके वाचून, फार डोकं चालवलं, तर उगीच नाचक्की व्हायची!
आपण हुशार आहोत, असा थोडा जरी संशय आला, तर सगळे प्रेमवीर पापणी मिटायच्या आत गायब व्हायचे!

पण.......स्कार्लेटचं जग Civil War ने बदललं, आपल्याला तर तेवढीही सबब उरली नाही. आपलं जग बदलतच होतं, बदलंलच होतं, आपणच झापडं लावून चालत होतो... पण तसं म्हणावं, तर "गाणं म्हणतेस का? रांगोळी काढतेस का? कुंकू लावतेस का? स्वयंपाकाची आवड आहे का?" ह्याच गोष्टी लग्नाच्या बाजारात आपल्यालाही विचारल्या होत्या!

ह्या हिशोबात मग १५- २० वर्ष जोडा. आपण, नोकरीच्या शोधात, नि आपली किंमत आता अचानक पैशात कशी मोजली जाते- ह्या कोड्यात! अर्थात् , स्कार्लेट सारखी बिकट परिस्थिती देवदयेने आपल्यावर आलेली नाही, आणि खरं म्हणजे आजूबाजूची माणसंही इतकी काही वाईट नाहीत. पण आयुष्याचा आढावा घेतांना, बेरीज- वजाबाकी फक्त आकड्यांतच करायची असते का? तशी ती करावी लागते का? हे स्वत:लाच विचारतांना, आधी कधीही न घातलेल्या, न बसणाऱ्या चष्म्यातून जग धूसर दिसावं, तसं आपलं डोकं गांगरलेलं.

स्कार्लेट मात्र, पदर बांधून मनाशी पक्का निश्चय करीत, त्या जगप्रसिद्ध ओळी बोलून गेली , "इन्शाल्लाह, मै जी-जान लगा दूंगी, लेकिन भूखी-कंगाल नही रहूंगी!" आणि नीतीमूल्यांचा फारसा विचार न करता, ते बोल तिने खरेही करून दाखविले.

आपण मात्र, नेहमीप्रमाणेच, अजूनही "रोमँटिकली सिनिकल". इतरांच्या तराजून स्वत:ला तोलत फालतू प्रश्न विचारत बसलेलो, की "स्कार्लेट सिनिकल का झाली नाही?" कशी होईल? तिच्या काळी नाटकातला "नाटकीपणा" ही शाबुत होता, आणि खऱ्या प्रेमातला खरेपणाही!


6/27/13

छोट्यांचा देव

प्रेमात, आणि आयुष्यात, कधीकधी छोट्या गोष्टींनी खूप फरक पडतो म्हणतात.
कोणीतरी एक छोटंसं स्वत:च्या बागेतलं म्हणून दिलेलं मोगऱ्याचं फूल.
अगदी आत्ता, ह्या क्षणाला  जोरात कुणाची आठवण आली असेल, आणि नेमका तेव्हाच त्याचा फोन यावा, ह्या योगायोगाला "telepathy" च मानून झालेला आनंद.
छोटेसेच चार आधाराचे शब्द, एका संध्याकाळी सहज गुणगुणलेल्या गाण्याची लकेर.
झाडावर सरसर अल्लद चढणाऱ्या खारूताईची वाटलेली गंमत.

ह्या गोष्टींचा, आणि क्षणांचा, जीव जितका छोटा, तितके ते अधिक लाडके होत जातात  नं? हृदयात खोलवर रूतून बसतात.
छोट्याच गोष्टी असतात त्या. आणि त्यांना जिवाशी घट्ट धरून झाकोळल्या जीवनप्रवासात एकाकी चालणारी माणसंही छोटीच असतात. त्यांचा देव छोटासाच, नि नशीब तर त्याहून छोटं.

मोठ्ठ्या जगात मोठ्ठ्या जगन्नाथांच्या रथापुढे शेकडो चिरडले जातात, नि काही तर चिरडून घेण्यात स्वर्गसूख मानतात. मोठ्ठ्यांचा हा देव पैशात लोळतो, राजकारण खेळतो, दंगलीत अख्खी शहरं जाळतो. तो नियम आणि मर्यादा आखून देतो. न पाळणाऱ्यांची आयुष्यं एका फुंकरीत उध्वस्त करतो.

मग प्रेमाचे चार छोटे क्षण, दोन मायेचे शब्द, नि त्या शब्दांच्या आठवणी जिवाशी घट्ट धरून जीवनप्रवास करणाऱ्या छोट्या दोन मुलांचा विचार त्या मोठ्ठ्या देवाच्या स्वप्नात तरी का यावा? "The God of Small Things" - अरुंधती रॉयच्या ह्या पुस्तकाने छोट्या क्षणांना जपणाऱ्या दोन छोट्या मुलांची जीवघेणी व्याकुळता समर्थपणे मांडली आहे. एस्था आणि राहेल ही जुळी भावंडं. त्यांच्या "अम्मू"च्या प्रेमकहाणीची शोकांतिका फक्त तिथेच न थांबता ह्या दोन निष्पाप बछड्यांची आयुष्यंही उध्वस्त करून जाते.

"कुणी कुणावर प्रेम करावं? कसं? नि किती?" "Who should be loved? And how? And how much?" ह्याचे नियम मोडण्याची फार मोठी शिक्षा त्यांना मिळते. अम्मू, एस्था, राहेल, अम्मूचा प्रियकर वेलूथा, आणि निव्व्ळ योगायोगाने तिथे अवतरलेल्या सोफी मॉलला.
नेमकी एस्थाला छोटी बोट सापडलेली, नेमकी सोफी मॉल इंग्लंडमधून तेव्हाच फिरायला म्हणून आलेली, तिच्याबरोबर बोटीतून पळून जायचा "पोरखेळ" त्या सगळ्यांनाच इतका महागात पडेल असं कुणालाच वाटलं नसतं. नेमकी तीच बोट अम्मू आणि वेलूथामधिल दुवा झाली, आणि "स्पृश्य-अस्पृश्यतेचे" भक्कम तट कोसळून तिथे कोवळ्या प्रेमाचा जन्म झाला.

त्या प्रेमाला भवितव्य नाही, हे मनोमनी कळूनसुद्धा दोघं त्यात "वाहवत" गेली. अम्मूच्या भावाने "गोऱ्या" इंग्लिश स्त्रीशी घरच्यांना न सांगता लग्न केलं, तरी त्या मडमेचं कौतुकाच्या महापूरात स्वागत करणाऱ्या कुटुंबाने, अम्मूच्या प्रेमाला मात्र लांछनास्पद ठरवून ठेचून काढलं.

"Never before has a story been told as if it were the only one". अशा शब्दात गौरविलेली ही कादंबरी, खरोखरच समाजातल्या चिरंतन झगड्याचा, आणि शोकांतिकेचा आरसा आहे. सत्तांध तमापुढे हळूच पेटलेली ठिणगी कधी ज्वलंत वणवा लावो न लावो, तिच्या विझण्यात समाजातल्या सगळ्या सुंदर, छोट्या गोष्टींचा पराभव असतो, आणि तिच्या विझण्यानंतर काळोख अधिकच काळा भासत असतो.

छोट्या निरागस आनंदांचा, प्रेमाचा, स्वप्नांचा देव अशा ठिणग्या लावत स्वैर भटकतो. ज्याच्या असण्या-नसण्याने कुणालाच फारसा फरक पडत नाही, त्याला विनाशाची भीती कुठली? It's a dangerous thing to have nothing to lose. When "Nothing matters much. Nothing much matters."
तेव्हा तो देव मग खदाखदा हसतो. केवळ स्पृश्यास्पृश्यतेवरून  वादळ उठवणाऱ्यांच्या मुस्कटात मारत बहिण-भावाच्या प्रेमाचं एक विलक्षण नाट्य घडवून आणतो. पुन्हा एकवार नियम मोडले जातात. Who should be loved, and how, and how much.











5/16/13

पुस्तक वाचतांनाचा तू

पांढऱ्या शुभ्र मोकळ्या फुसफुशीत भातावर दाणेदार मुगाच्या दालफ्रायचा पिवळा रंग, आणि त्यावर खपून केलेली कुर्कुरीत हिरवी भेंडी वाढली, तरी तुझं लक्षच गेलेलं नव्हतं.
ते बघून माझा थोडा विरस झाला, पण छान जेवण काय मी अन्नपूर्णा द्रौपदीप्रमाणे फक्त दुसऱ्यांसाठीच केलेलं नव्हतं, म्हणून मी त्या चवींमधे गुंग झाले.

हल्ली हे असंच होतंय पण. बोलायला काही फारसं नसतंच. त्यामुळे तू तुझ्या विश्वात नि मी माझ्या. पण तरीही, हे लक्ष नसणं वेगळंच होतं. खाण्याच्या आवडीपलिकडे काहीतरी तुझ्या डोक्यात शिजत असलेलं तुझ्या हातातल्या पुस्तकातून मला दिसत होतं. एरवी जेवतांना आपण ए.आर रहमान ऐकतो, किंवा कधी पावसाळी हवा असेल तर किशोरकुमार, तर आज हे कोण पियानोवर सूर नाचवतंय?

"Keith Jarret." फक्त येवढंच बोलून तू पुन्हा पुस्तकात डोकं खुपसलंस.
आता मला जरा वैतागच यायला लागलेला होता. तो अगस्त्य सेन तुझ्या ऑलरेडी तिरकस डोक्यात थैमान घालतोय म्हणजे साध्या गोष्टींवर तुझे विचार भन्नाट वेगाने वळत-वळत पळत असणार आणि त्या वेगात माझ्या शुद्ध मराठी भाषेचा आणि त्या क्षणी मला पडलेल्या प्रश्नांचा भोंगा तुला अजिबात ऐकू येत नसणार म्हणजे मला एकदम तुझ्यामागून त्या पुस्तकात शिरावं आणि तुला हात धरून खेचून बाहेर काढावंस वाटायला लागलं होतं. किंवा त्या पुस्तकात तुझ्याच चाललेल्या पानात उडी मारावंसं.

मग मी आशाळभूतपणे, "मी तुला read aloud करून सांगू?" असं विचारलं, पण तुला तो मानसिक बदलही तेव्हा नकोसा होता, मग मी पुन्हा तुझ्या वाचणाऱ्या मख्ख चेहऱ्याकडे बघत बघत आपली दालफ्राय चमच्याने संपवून टाकली. त्या पुस्तकापायी मला जेवणाची चवही आली नाही. शी - stupid.

पण हे असं आजच नाही झालंय. ते पुस्तक तिथे टेबलवर धूळ खात असो वा पोराच्या खेळाच्या बादलीत वेडवाकडं मुडपून पडलं असो, मला काही त्याला हात लावायला फुरसत नव्हती, आणि फुरसत मिळेल तेव्हा त्या येड्या अगस्त्य सेनच्या डोक्यात शिरण्याची काहीएक गरजही वाटत नव्हती.
पण परवा पुन्हा, आपल्याकडे आलेल्या पाहुण्याच्या देखत, जेवता जेवता, गप्पांतूनही तुझी त्या पुस्तकावर थबकणारी नजर बघितली आणि मला कळलं....

कोणे एके काळी मीपण ते अनुभवलं होतं. जरी त्याला आता काळ लोटला तरी, ते विसरता येणं मला शक्य नव्हतं. ते महिनोन्महिने एकाच  पुस्तकात राहणं. त्याच्या जगात वावरणं. त्यातली माणसं खऱ्या पुढे बसलेल्या माणसांपेक्षासुद्धा खरी वाटणं. त्या जगाच्या नजरेने आपल्या जगातल्या विसंगती दिसणं.

हे सगळं सगळं मी अनुभवलं होतं. खूप पूर्वी.
पण आता नाही.
उद्या त्रिकोणी पापुद्रे सुटणाऱ्या खरपूस पराठ्यावर लाल-हिरवा टोमॅटो-मिरचीचा साल्सा आणि वर किसून चीज घालून व्हेज फ्रॅन्की करायचा माझा बेत होत.

कोणी म्हणतं, ह्या फेसबूक-इमेलच्या जमान्यातला माणूस अधिक एकटा आहे. पण आता मी विचार करते- पुस्तकांच्या जगातला माणूस? तो ही तितकाच एकटा नव्हता का?





4/30/13

लेखनप्रपंच

वाटे का लेखन। झाले आता बंद
डोके झाले मंद। कशापायी?

दिसामाजी काही । लिहीणे वाचणे
समर्थांचे सांगणे । नित्य असे

तेवढी चिकाटी । आणावी कुठून?
वृक्ष हा वठून । चाललासे

जालावर फार । लेखन सुमार
त्यात लेख चार । आपलेही

शब्दांचे बुड्बुडे। जगती क्षणभर
मनामधे घर। करीत ना

प्रकाशित होता । पुन:पुन्हा पाही
प्रतिसाद काही । आले का ते

स्वार्थाचा डोलारा । शब्दांचा फुलोरा
माझा मी दुजोरा । देत राही

लेखनप्रपंच । नाही बरे सोपा
सुगरणीचा खोपा । आकारतो

अस्तित्वास हवे। नित्य होणे नवे
तेव्हा शब्द-थवे। उडतील

ज्ञानेश माऊली । धरावी साऊली
प्रार्थना पाऊली । तुमच्या ह्या...










3/31/13

गाणाऱ्या कविता

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, ह्या झोपडीत माझ्या॥
भूमीवरी निजावे, तारयांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे ह्या झोपडीत माझ्या॥

ही संत तुकडोजी महाराजांची ओवी. ओवी म्हणावी की कविता? पण आमच्या शाळेच्या पाठ्यपुस्तकात होती, म्हणून कविता म्हणते. त्याच वर्षीच्या हिंदीच्या पुस्तकात हे-

हर ग्राम हर नगर के हर राह हर डगर पर
कूचे गली मुहल्ले, बाजार हाट घर घर
हर ओर ही हजारों दीपक जले हुए हैं
जैसे कि रौशनी के अनगिन सुमन खिले हैं
जैसे कि हस उठी है, तारों की आज रानी
या चांद ने हजारों बनने की आज ठानी!

आज इतक्या वर्षांनतरही मला ह्या कविता आठवतायत, त्या खरं म्हणजे ह्या गाण्यामुळे, "ऐ दिल मुझे बता दे, तू किसपे आ गया है? वो कौन है जो आकर ख्वाबों पे छा गया है!"
परवा फिरायला जातांना सहज मी गुणगुणायला लागले, तर गाणं मला आठवेच ना. आठवली ती कविता! मौखिक ग्रंथपरंपरा आणि पाठांतरातला दुवा तेव्हा जाणवला. पाठांतर करायला आवडायचं, आणि त्यातून कविता व्हायच्या ही पटापट पाठ, म्हणून मजा यायची. कवितांना चाली लावून त्या वर्गात म्हणून दाखवायची हौसही खूप :) आता ऐ दिल मुझे बता दे वर सगळ्याच कविता कशा बसायच्या? मग दुसरं गाणं-

आओ बच्चो तुम्हे दिखाऍं झांकी हिन्दुस्तान की
इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की॥

थोडं ठाकून ठोकून त्यावर कुसुमाग्रजांना बसवलं की झालं-

आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे
फेसफुलांचे सफेत शिंपित वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती गात किनाऱ्याकडे.
मऊमऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणा़ऱ्या वाऱ्याच्या संगती
उंच पांढरी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते...

आणि हिन्दीत तर त्या चालीवर वाट्टेल ते म्हणता येऊ शकतं असा भाबडा विश्वासच बसला होता-

लहरोंसे डरकर नौका पार नही होती
कोशिश करने वालोंकी हार नही होती
नन्ही चिंटी जब दाना लेकर चलती है
चढती दिवारोंपर सौ बार फिसलती है
मनका विश्वास रगों में साहस भरता है
गिरकर चढना चढकर गिरना न अखरता है
मेहनत उसकी खाली हर बार नही होती
कोशिश करने वालों की हार नही होती!

परवा फिरायला जातांना सतरा काळज्या आणि पंधरा गोष्टी डोक्यात भुंगा घालत होत्या, तेव्हा ह्या कविता मला वाचवायला आल्या!

आजीने सकाळी पूजा करतांना म्हटलेलं अथर्वशीर्ष असावं तशा ह्या कविता आहेत.
शेजारी भजन-टाळ-गजराचा नाद खोल अंतर्मनात साठवलेला असावा, तशा ह्या कविता आहेत.
रोज दुपारी चणेफुटाणेवाला आपले खास हेल काढून आरोळी ठोकत यायचा, तशा ह्या कविता आहेत.

त्या गुणगुणतांना मला पुन्हा माझ्या स्वत्त्वाची ओळख पटलीशी वाटली. त्यांचा नाद आश्वासक वाटला. गोळाबेरीज करून शेवटी माझ्या वाट्याला फक्त हे शब्द उरले, तरी ते मला खूप पुरतील, ह्याची साक्ष म्हणून त्या कविता.






3/22/13

काही साक्षात्कार

Epiphany!
कधीच्या काळी मी इंग्रजी साहित्य शिकत होते तेंव्हा James Joyce च्या पुस्तकातून परिचयाचा झालेला एक शब्द: epiphany म्हणजे साक्षात्कार. 
खरं म्हणजे रोजच आपल्या आयुष्यातल्या अनेक घटना आपण बघतो, नि सोडून देतो. पण त्यात कितीक साक्षात्काराचे क्षण दडलेले असतात. 
खूप महिन्यात काही लिहिलेले नाही- हाही एक साक्षात्कारच होता, म्हणून तिथूनच सुरूवात करावी म्हटले. 

१. सिग्नलवर थांबलेल्या गाड्यांमधली माणसे बघायला मला फार आवडतं. प्रत्येकजण किती विवंचनेत असल्यासारखा आठ्या घाल-घालून सिग्नल बदलायची वाट बघत असतो! कधी एकाचाही चेहरा प्रसन्न, काळजीमुक्त दिसत नाही. Live in the present असं सारखं म्हणायचं फक्त, पण आपणही हिरव्या दिव्याची वाट बघता बघता दोन क्षण थांबण्यातली मजा अनुभवायला विसरूनच जातो...

२. कधीकधी आपल्याला तारूण्यात ज्या व्यक्तींबद्द्ल चीड येत असते, जसंजसं वय वाढतं तसतसे आपण त्याच व्यक्तींसारखे होत जातो. हे लोक किती त्याच त्या विषयांचं दळण दळतात! एकदा बोलत सुटले, की सुटतातच. आपल्या आठवणी, त्या कितीही emotionally loaded असतील, पण आपल्यासाठी. पुढच्याला त्या ऐकायला लावून बोअर का करतात? आणि मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्द्ल एवढे emotionally कसे react करतात!
ही सगळी वाक्य आता आपल्यालाही लागू होतात, असा भास झाला, की भीती वाटते. 

३. "नुकत्या निवड झालेल्या पोपचा जेसुईट (jesuit) इतिहास" किंवा तत्सम "आपले ज्ञान अद्द्यावत आहे" हे दाखवण्याच्या अट्टहासाच्या चर्चेपेक्षा मला "ओव्हनमधे ठेवलेले नान जळायला नकोत." "पोराने आज काय खाल्ले, व आता त्याची भुकेची वेळ टळून जायच्या आत त्याला भरवले पाहिजे"  - असल्या विषयात जास्त डोके चालू लागते, आणि ते करता करता, कधीकाळी, मी फक्त चूलमूल करणार नाही, ही स्वत:चीच प्रतिज्ञा विसरायला होते, आणि मग घरी आलेले पाहुणे म्हणतात, "हे काय, तू सारखी स्वयंपाकघरात नको गं अडकू आमच्यासाठी", तेव्हा भान येतं. आणि भान आलं की हताश न होता, शिवाय वर, "येवढं काय त्यात!" असं आपणच आपसूक म्हणून जातो, तेव्हा, भीती वाटते. 

४. भारतात न वापरली जाणारी, आणि इथल्या जगाची तिथे आठवलेली एकमेव वस्तू: किचन टॉवेल. फराफरा ओढा, नि पुसा. शी, शू, दूध, ओटा, भांडी, गळणारे पाणी अथवा नाक! ओला करून शिळ्या पोळ्यांवर घाला, किंवा कोरडाच ताज्या पोळयांच्या खाली घाला. 
इथल्या जीवनातल्या केवळ ह्या एकाच गोष्टीत जीव अडकला आपला? असा साक्षात्कार झाला की पुन्हा भीती वाटते. 

५. "वो खार खार है, शाखे गुलाब की मानिंद,
मै जख्म जख्म हूँ, फिरभी गले लगाऊँ उसे। "             किंवा

"दयार-ऐ-दिल की रात मे चरागसा जला गया
मिला नही तो क्या हुआ ? वो शक्ल तो दिखा गया!"  असले शेर लागू पडणारी  आपला " muse-एश्वर" कोण असावा? हे लक्षात आलं, की प्रचंड epiphany होते!

६. जगात "काय म्हटलं" त्यापेक्षा, "कोणी म्हटलं" ह्याला फार महत्व असतं! आज तुझे दिवस चांगले आहेत, त्यामुळे तू माज करून घे. मला पण माहितीये तशा निर्भेळ यशाची चव. तेव्हा कितीही विनम्रतेचा आव आणला, तरी माझ्या यशामागे माझ्यातलेच काही दुर्मिळ सद्गुण आहेत, ह्यावर आपला विश्वास असतो. माझ्यासारखा जीवनविषयक दृष्टीकोन ठेवला, तर सगळेच यशस्वी होऊ शकतील, असंही वाटत असतं. तो फक्त "यशाचा सोनेरी चष्मा" होता, हे तुला कळायची वेळ कधीच येऊ नये, अशी ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना. 
आणि यश आणि अपयशातला नेमका फरक कळल्याचा क्षण: साक्षात्काराचा! 

७. एकाच छपराखाली राहणाऱ्या दोन-किंवा तीन, किंवा त्याहूनही अधिक व्यक्तींचं अनुभवविश्व एकमेकांपासून किती निरनिराळं असतं! शेवटी "मी माझा" नि "तू तुझी". मग "सोबती" चा अर्थ काय असतो?