7/31/08

दोन घरं




ह्या रविवारी नवीन अपार्टमेंटमधे शिफ्ट व्हायचं होतं. १५ दिवसांपासून तयारी सुरू केली, तरी शेवटच्या ३ दिवसांतल्या युद्धपातळीवरच्या आवरा-आवरीला तोंड फुटलं, आणि गत-जन्मी केलेल्या पापांसारखे प्रत्येक कपाटातून कचरे आणि सामानं निघू लागली. गेल्या जन्मीची जशी मानवाला आठवण नसते, तसंच, हे पहिल्यांदा अमेरिकेत आलेल्या boarding pass चं चिठोरं आपण आजवर जपून ठेवलं होतं, ह्याचीही मला आठवण नव्हती. पण आता ते पुढे आलं म्हटल्यावर, “फेकू की ठेवू?”चा यक्षप्रश्नही आलाच!

अशी मी अनेक घरं बदललीयेत. आणि असे अनावश्यक पसारे जमवून जमवून दरवेळी मूळ सामानात २ तरी नवीन खोक्यांची भर घातलीये. एकीकडे, प्रत्येक क्षणाचा नकाशा आपल्याबरोबर रहावा असा अट्टहास करणारी मी, आणि दुसरीकडे बॅगा भरभरून वस्तू फेकायला निघालेला माझा, “minimalist” नवरा!
पण वस्तू फेकल्या, तरी मनात अक्षरश: “घर.” करून राहिलेल्या, “वास्तू.” कशा फेकाव्या?? माझ्या मनातलं प्रत्येक घर वेगळं, आणि प्रत्येक घरातली मी ही वेगळीच की! माझ्या माहेरच्या बैठ्या बंगल्याच्या गच्चीवरून समोर पसरलेल्या मैदानावर उत्तरायण/दक्षिणायण होतांना खरंच सूर्य north-east/south-east कडे जातोय का, हे निरखून पाहिल्याचं आठवतंय. अंगणातला पारिजाताचा सडा, आणि जिन्याच्या कोनाड्यातून दिवाळीत ठेवलेल्या पणत्या दिसतायत. हिवाळ्यातल्या स्वच्छ आकाशासारखं ते बालपण, आणि ते घर!

तशा प्रत्येक घरात माझ्या काही खास जागा असतात- सहसा दिवसभरातल्या उन्हाच्या विविध छटा जिथून जाणवतील, अशा. त्यातून जर डायनिंग टेबलवर सकाळी कॉफी पितांना उन्हं आत आली, पानांमधली किलबिल, सळसळ ऐकून मनात नव्या दिवसाची नवी पालवी फुटली, तर इतकं मस्त वाटतं!!! तेव्हा लिहायला बसले, की टवटवीत फुलंच पानावर सांडतील असं वाटतं...पण सूज्ञ गृहिणींनी न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सांगते, की अशा टवटवीत सकाळी लेखनासारखा निरूपयोगी उद्योग घेऊन बसण्याचं भाग्य फक्त, “पेशाने कलाकार.” असणाऱ्यांनाच मिळतं. बाकी तुम्हा-आम्हासारख्यांना, “जागा.” आणि, “लेखन.” ह्यांची सांगड घालणं कठीण. आता बघा तरी, एवढं मूव्हींग करून चहूकडे खोकी, पिशव्या, अर्धवट जोडलेलं फर्निचर इकडे टेप तिकडे कात्री, अशा गोतावळ्यात बसून मी लिहिते आहे...

पण कारणच तसं झालं- जुनं घर सोडतांना स्वच्छ करून ठेवायचं, ही इथली पद्धत. आज गेले होते, “त्या.” घरी. कागद, कपटे, फेकायच्या चिंध्या हळूहळू बाजूला सारून, स्वयंपाकघराच्या ओट्यापासून दाराच्या पायरीपर्यंत सगळीकडे घासपूस केली. तिथे राहत असतांना एवढ्या मायेने कधी लक्ष दिलं नसेल, ते आज अगदी जीव तोडून साफसफाई केली. मग ना सामान उरलं, ना धूळ, ना कचरा. घराचा पुनर्जन्म जणू! आणि मी माझ्याच जुन्या घराच्या प्रेमात पडले पुन्हा... किल्ल्या घ्यायला मॅनेजमेंटचा माणूस येईल, त्याने कौतुक केलं पाहिजे, की तुम्ही कित्ती छान वापरलंय घर- अशी विचित्र जिद्दच होती म्हणा ना! एरवी पाहुणे येतांना, “आपलं घर स्वच्छच आहे. कोणी येणार म्हणून मुद्दाम अगदी unnaturally झाडपूस करून ठेवलेल्या शोभेच्या बाहुल्यांसारखं नकोय दिसायला.” असं ठणकावून नवऱ्याला सांगणारी मी....आणि आता चक्क security deposit ही गहाण नसतांना मन लावून घरातला एक-एक डाग काढायला लावणारं माझं मन.

आजवर कोंडणाऱ्या त्या घराच्या भिंतीबद्दल एकाएकी आता आपलेपणा वाटायला लागला. तिथे डिशवाशर नव्हतं, ही २ वर्ष उगाळलेली तक्रार आता फालतूच वाटायला लागली. ती रोजची हिरवळ, ती सवयीची पायवाट, त्यांचं माझं, (आजवर गृहितच धरलेललं) नातं तुटणार, ह्या विचाराने उगीच कासावीस व्हायला झालं. आणि कालपर्यंत अप्रूप वाटायचं, त्याच नवीन घरातले तुटलेले कोयंडे दिसायला लागले.

झालोच कशाला मेलं शिफ्ट? जुन्या घराची किल्ली सूपूर्त करतांना वाटून गेलं... स्वच्छ आंघोळ घालून तयार करून आपल्या बाळाला देवळाच्या पायरीवर ठेवावं, तसं झालं. रविवारपासून नवीन घरी राहत असलो, तरी मन मात्र जुन्या घरीच होतं, आहे...
त्या घरातली काय बरं होती माझी खास जागा? कोणास ठाऊक! थोडे दिवसांनी तिथून विलग झाल्यावर कळेल, तेव्हा सांगीन. तोवर नव्या घरी खोक्यांच्या गराड्यात एखादी, “आपली,” अशी जागा शोधायच्या कामास लागते... :-) :-)

7/25/08

हेलन, सीता आणि हिलरी

आज कवितेबद्दल लिहावं. मराठीत कविता स्त्रीलिंगी आहे हे कित्ती बरं- अगदी समर्पक वाटतं. त्याऊलट, “निबंध.” पुल्लिंगी, ह्यावरून सुज्ञांनी काय समजायचं ते समजावं. असो, तर कवितेशी माझं फार जवळचं नातं. कादंबऱ्या खूप वाचल्या, पण कायम लक्षात राहिल्या त्या कविता!

परवा एका interview मधे सुपरव्हायझर ने विचारलं, “तुम्हाला कोणतं असं एक नॉव्हेल आहे, जे शिकवायला आवडेल? आणि त्या नॉव्हेलच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या संकल्पना मुलांना शिकवाल?” एक मिनिट शांतता. अजून ३० सेकंद, तरी शांतता. सुपरव्हायझरचा चेहरा काळजीयुक्त. आणि मग माझं हळुच उत्तर, “खरं म्हणजे नॉव्हेल माझं आवडतं genre नाहिये. मला कविता आवडतात.” त्याने मनातल्या मनात सोडलेला सुटकेचा निश्वास मला स्वच्छ ऐकू आला. “तर मग कोणती कविता आहे, जी तुला शिकवायला आवडेल?” आता माझ्या मनात शेकडो कवितांची गर्दी. एकीकडून Wordsworth/Keats/Shelley ची Romantic त्रयी, आणि दुसरीकडून Plath, Frost, Eliot, Wallace Stevens सारख्या modernist लोकांचे शब्द शब्द कानावर आदळायला लागले. शेवटी मी, “Plath. Sylvia Plath.” मुलांना तिच्या अभिव्यक्तीतली intensity (तीव्रता?) आवडते. आणि शेवटी फेमिनिस्ट कविता असली, तरी त्यातून आज आपल्या समाजातल्या विषमतेकडे लक्ष वेधून मुलांना त्याबद्दल विचार करायला शिकवता येईल.”

तिकडे माझ्या उत्तराने त्याच्या मनात उमटलेल्या सकारात्मक विचारांमुळे मला चांगले vibes येऊ लागले. काहीतरी होऊ शकेल, अशी आशा निर्माण झाली. मग थोड्या दिवसांनी ह्याच माणसाने मला शाळेत Demo Lesson द्यायला बोलावलं. विषय अर्थातच, “इंग्रजी कविता!” मला फारसा विचार करावा लागला नाही. थोड्या दिवसांपूर्वी poets.org ह्या साईटवर वाचलेली Margaret Atwood ची कविता लगेच डोळ्यांपुढे आली. “Helen of Troy Does Countertop Dancing”. नाव ऐकून नवरा बेशुद्ध झालेलाच, तो कविता वाचल्यावर ओरडायलाच लागला: अगं काय ती कविता! कसले ते शब्द! तुला जगातल्या लाखो करोडो कवितांमधुन हीच एक का दिसतेय? आणि एकदा नोकरी लागल्यावर तू वाट्टेल ते घोळ घाल, पण नेमका तुझा सुपरव्हायझर खडूस निघाला तर कवितेच्या सिलेक्शन वरूनच तुझा पत्ता कट होईल नं??

पुन्हा मनात १०० विचार. खरंच जगात लाखो कविता आहेत. पण ह्या कवितेत मला भावलेल्या layers of meaning, शिवाय हेलन ऑफ ट्रॉय सारखी पुराणकालीन व्यक्तीरेखा घेऊन तिला आपल्या युगातील संदर्भ जोडून कवयित्रीने खरं म्हणजे आपल्याच जीवनशैलीवर एक टीका केलिये. पूर्वी बायकांना एक वस्तू म्हणून वागवतांना केवळ त्यांचं सौंदर्य महत्त्वाचं होतं. आपल्या पुराणातल्या सीता, द्रौपदी असोत, किंवा ग्रीक पुराणातल्या हेलन सारख्या रूपवती. त्यांचं प्राक्तन सारखंच होतं. “Is this the face that launched a thousand ships?” अशा शब्दात मार्लोवने आपल्या नाटकात हेलनला रूपवती म्हणतांनाच तिच्यामुळे ट्रोजन वॉर (ट्रॉय मधील महायुद्ध) झाली, ती युद्ध-संहाराला कारणीभूत झाली, असाही अर्थ प्रतिध्वनित केला.

आणि आज, विशेषत: अमेरिकन संस्कृतीतल्या सौंदर्याच्या अचाट कल्पनांमुळे किती स्रीयांचं आयुष्य त्यांच्या रूपाभोवती फिरत राहतं! शरीरविक्रय आजही होतो, फक्त वेगळ्या तऱ्हेचा! टीव्हीवर बघा, तर डोळ्यांच्या सुरकुत्यांपासून पायाच्या नखापर्यंत सौंदर्यप्रसाधनांचा सुळसुळाट......

अगदी राजकीय बातम्यांतही हिलरी क्लिंटनचा मेक अप आणि ती कॅम्पेनमधे एकदा रडल्यामुळे कितीकांना तिच्या स्रीसुलभ भावनांचं हृद्य दर्शन झालं ह्याची वीट येईतो चर्चा!

आणि ही सगळी चर्चा मला त्या कवितेत दिसली. खऱ्या अर्थाने साहित्य सर्वव्यापी, स्थलकालबाधित नसतं ह्याचा अनुभव देणारी ती कविता. तुम्हाला वाचून बघायची असेल तर जा ह्या लिंकवर, आणि सांगा मला तुम्हाला कोणते अर्थ दिसले त्यात:

Helen of Troy Does Countertop Dancing- Margaret Atwood.

अशा कवितांमधून लिहावसं वाटतं....

PS: आणि हो, तो जॉब मला मिळाला बरं का!

7/23/08

गुंता

काही लोक आपल्यावर इतकं प्रेम करतात की त्याची भीती वाटावी! उदाहरणार्थ माझी आजी- मी पुण्याला शिकायला गेल्यावर जवळजवळ ४ महिने माझा आवाज फोनवर ऐकला की रडायची. तिच्या मैत्रिणींनी तर मला आल्यावर सांगितलं, की तू गेलीस म्हणून आजी आजारी पडली. नको वाटायचं ते प्रेम त्या वयात. नवीन आयुष्य, नवीन मैत्रिणींच्या सहवासात रमलेली मी, मला वाटायचं आजी आपल्यावर इतकी कशी emotionally dependent??? मी आजीला सरळ सांगितलं, “मी येते ना दर दोन महिन्यांनी घरी, मग तू कशाला वाईट वाटून घेतेस?” मग तिला हळूहळू सवय झाली. मी हुश्श केलं. आता थोडे दिवसांपूर्वी नोकरीसाठी माझा लहान भाऊ घराबाहेर पडला, तर झाली पुन्हा हिची रडारड सुरू...!

लग्न झालं, तेव्हा निदान माहेरच्यांनी तरी स्वीकारलं, की मुलगी आता सासरी जाणार. तर सासरी गेल्यावर तिथेही same story!!! माझा नवरा गेला प्रथम अमेरिकेला, तेव्हा माझ्या सासूबाईंनी येवढं लावून घेतलं होतं, की त्यांना म्हणे डायबेटिसचा त्रास सुरू झाला... मग आमचं लग्न झाल्यावर दोघं एकदा अमेरिकेत येऊन छान ६ महिने राहून गेले, तरी आता फोनवर, “तुम्ही कधी येताय? तुम्ही कधी येताय?”.

कधीकधी वाटतं, घरच्या लोकांच्या प्रेमाखाली गुदमरून आपल्या स्वत:च्याच भावना बोथट होतायत का काय? त्यांनी शंभरवेळा आठवण काढली, तर आपण एकदा हळुच म्हणायचं, “हो ना, आम्हाला पण आता इंडिया ट्रीपचे वेध लागलेत.” खरं तर गेल्या गेल्या नातेवाईकांचे फोन, ५० माणसांचा गराडा, ह्या सगळ्याची कल्पना आत्तापासूनच नकोशी वाटतेय. नवरा तर हल्ली माणूसघाणाच झालाय- त्याला फोनवर कोणाशी बोलायलाच नको असतं. म्हणजे reporting ची जबाबदारी आली का नाही आपसूक माझ्यावर X( X(

सद्सद्विवेकबुद्धीमुळे कितीही लपवलं, तरी खरं म्हणजे घरच्यांची, त्यांच्या भाबड्या प्रेमाची, त्यांच्या चुकीच्या इंग्रजी व्याकरणाची, लाजच वाटत असते बरेचदा मनात. आमचे बाबा एकदा बोलायला लागले, की थांबतच नाहीत! अमेरिकेत आल्यावर सासूबाईंचं सारखं इथल्या अमेरिकन जेवणाला नावं ठेवणं चाललेलं असतं. आईने कॉईलवर ठेवून माझा प्लॅस्टिक स्पॅट्यूला जाळला! एक ना अनेक. घरच्यांपासूनच पळून जावसं वाटण्याइतके बेरड झालेलो असतो आपण....

आणि मग मध्यरात्री एक स्वप्न पडतं- रात्री वाचायला मी टेबललॅम्प लावला, तरी, “मी डोळ्यावर पदर ठेवला, की मला नाही त्रास होत,” म्हणणारी आजी. मी शाळेतून येईपर्यंत दुपारी जेवायला थांबलेली, माझ्यासाठी पहाटे उठून माझ्या बरोबर मागच्या दाराच्या पायरीवर बसून कॉफी पिणारी. बाबा, “तू वेबकॅमवर दिसलीस की बरंSSS वाटतं,” म्हणणारे. आजोबा, गुपचुप चॉकलेट आणून देणारे. सासूसासरे, “तो काही नीट फोनवर बोलत नाही. तुझ्याशी बोलल्याशिवाय समाधान होत नाही.” म्हणणारे.

माझ्याच खोल अंतरंगात जो जिव्हाळा मी दडपून ठेवला होता, तो freudian slip सारखा उफाळून आल्याची जाणीव. Practical होऊन किती easily जगत असतांनाच हा impractical भावनांचा नाकारलेला गुंता! दोघांच्या संसारातच ४ दिवस सलग स्वयंपाक केला की ५व्या दिवशी कंटाळा येणारी मी. ते लोक इथे आले, तर माझीच कामं वाढणार, आणि शिवाय, “तुम्ही मुली कित्ती पसारे घालता! सकाळी लवकर उठायला नको, आवरायला नको!” असली मुक्ताफळं ऐकावी लागणार, ह्याचं एकीकडे कायम टेन्शन.

आणि दुसरीकडे, छोट्या छोट्या गोष्टीत हळवं होणारं मन. काल काय, एका मित्राच्या धाकट्या भावाने मला, “ताई, पाणी देतेस का?” म्हटलं. परवा काय, माझ्या मैत्रिणीच्या गोडुल्या बेबीला मी दिलेला फ्रॉक घालतांना ती म्हणाली, “ये देखो, तुम्हारी मौसीने दिया है!” ही मी, आणि ती पण मीच? मग खरी मी कोणची? जबाबदाऱ्या टाळणारी, की त्यांच्यामागचं प्रेम दिसलं की विरघळणारी?

“प्रेमाचा झरा,” अशासाठी म्हणत असावेत, की ते पाणी जिथून वाहत येतं, तिथेच परत जाऊ शकत नाही. आपल्या घरच्यांनी जे प्रेम आपल्याला दिलं, त्याची परतफेड करायचा प्रयत्नही करू नये असं वाटायला लागलंय. त्यापेक्षा जे त्यांच्याकडून सहज मिळालं, ते दुसऱ्यांना सहज देता आलं, तरी त्यांचेच पांग फेडल्यासारखं होईल, हो ना?

7/21/08

एक तक्ता:

मोठ्या दृश्यासाठी तक्त्यावर क्लिक करा:














सिंक फॅमिली

आधी घर, किंवा आधी करीयर, असे दोन फाटे बायकांच्या आयुष्यात लग्नानंतर अपरिहार्यपणे फुटतच जातात. आधी हे, मग ते, अशी सरळसरळ क्रमवारी लावणं बहुतेकांना जमत नाहीच. आणि त्यातलीच मी एक, म्हणून मला, “थोडं घर,” मग, “थोडं करीयर,” मग पुन्हा, “थोडं घर.” अशी बिकट आणि तुटक वाट चालावी लागणार हे आता स्पष्ट दिसायला लागलंय. अमेरिकेत नोकरीसाठी इथली डिग्री बरी, अशा स्पष्टीकरणाने दोन वर्ष गप्प बसवलेल्या घरच्यांना आता तोंडं फुटलीयेत, आणि दुसरीकडे, डिग्रीसाठी भांडवल म्हणून खर्च केलेल्या पैशाचे, “पांग,” फेडण्याचीही वेळ हीच आहे, आणि त्याहून अधिक- आत्ता जर लगेच नोकरीला लागले नाही, तर आयुष्यभर घरीच बसावं लागेल की काय, अशी भीती.

पण त्यातूनही एक पॉझिटिव विचार तगून राहिलाय, तो म्हणजे, “इथे जे ज्ञान मिळवलंय, त्याचा उपयोग करायची सुरसुरी- घराबाहेर स्वत:च एक विश्व निर्माण करण्याची आस, अमेरिकन शिक्षण घेतांना मिळालेल्या इथल्या मित्र-मैत्रिणींशी चालू झालेला संवाद टिकवण्याची धडपड, आणि त्यातच आपल्याही संस्कृतीशी प्रामाणिक राहून एका नवीन क्षेत्रावर आपल्या वेगळ्या विचारपद्धतीचा प्रकाश टाकून एक productive member of the society बनण्याचा प्रयत्न...
हे येवढे सगळे विचार घरी फोन करतांना ना आईला सांगता येताहेत, ना सासूबाईंना...त्या पिढीतले choices किती सोपे होते, असं मला वाटतं, तरीही मला घरी ठेवून जातांना आईची कुतरओढ झाली, ते तिच्याकडून ऐकलेल्या, “तुम्ही लहान होतात तेव्हा.....” टाईप गोष्टींमधून अनुभवलेली.

आणि त्यातच एक नवीन तिढा: माझा नवरा माझ्यापेक्षा ५ वर्षांनी मोठाय. म्हणजे त्याचे बरेचसे मित्र, ज्यांची लग्न आमच्या २-३ वर्ष आधी झाली, ते आता छान- घर,नोकरी,संसार,मुलं अशा चौकटीत फिट्ट बसलेले आहेत :) त्याउलट, माझ्या समवयस्क मैत्रिणींचे नवरे माझ्या, “गोट्या,” पेक्षा ३ वर्षांनी लहान, आणि अजूनही life is an experiment म्हणून जगण्याच्या मूडमधे. मी माझ्या नवऱ्याच्या प्रेमात पडले, तेच त्याची मॅचुरिटी बघून, त्यामुळे सहसा मी संसारात, आमच्या interpersonal communication वर भारी खूष असते. पण गोची अशी, की आम्ही ना माझ्या ग्रूपमधे बसतोय, ना त्याच्या...... Baby'sRUs, डायपर बॅग, फॉर्म्युला फूड ह्या शब्दांभोवती होणाऱ्या चर्चांचा पटकन वीट येतो, आणि तरीही, “लिव्ह इन द मोमेंट,” म्हणून टाईमपास करणाऱ्या, “तरूणाईचा.”

तर अशा प्रकारे, आम्ही आत्ता, “सिंक फॅमिली,” झालोय. DINK: Double income no kids. आणि त्याउलट SINK: Single income no kids.....
आत्ताच एक इंटरव्ह्यू देऊन आले, आणि आल्याआल्या नवऱ्याला म्हटलं, “ आता ही नोकरी मिळाली, किंवा नाही मिळाली, तरी lose-lose situationच होणारे. म्हणजे नोकरी मिळाली, तर मुलाचा विचार पुन्हा लांबणीवर टाकावा लागणार, आणि नाही मिळाली, तर येवढ्या ताज्याताज्या डिग्रीला शिळं करत घरी बसून चूल-मूल करावं लागणार. आता काही लोकांना, हीच परिस्थिती, win-win situation वाटू शकते. The road not taken.....makes all the difference......म्हणून.

पण कुठला रस्ता घ्यायचा, हा निर्णय घ्यायचं स्वातंत्र्यच सध्या माझ्याकडे नाहीये..... काय मज्जा आहे- आपण ठरवाठरवी करून आयुष्याला वळण वगैरे लावायचा प्रयत्न करतो, आणि ते मात्र उनाड मुलासारखं सैरावैरा पळत सुटतं असं, की कधी घरी येईल, कोणास ठाऊक?

7/19/08

चंद्रकिरणांचे क्षण

ह्या आठवड्यात आम्हाला दुसऱ्या नवीन घरी बस्तान हलवायचं म्हणून "ह्या"ने जुनी खोकी उघडली. खूपसा कचरा, आणि खूपशा आठवणी निघाल्या. पण त्यात मी कुठेच नव्हते. आमचं लग्न होऊन तीन वर्ष झाली, पण त्या खोक्यातल्या गोष्टी मला ऐकूनच माहिती होत्या. काही माझेही फोटो होते, माझीही पत्रं होती. पण मी रस घेऊन त्याच्या आठवणींमधे सहभागी झाले, तसा तो माझ्या स्मृतींमधे समरस झाला नाही. काय की...
एखाद्या व्यक्तिच्या स्वभावाची इतकी सवय होते, की त्याचंही मला फारसं काही वाटलं नाही. पण आम्हा दोघांमधे लग्नाआधी झालेल्या इ-संवादांची सी-डी करून ठेवली होती त्याने, तीच्यातही त्याला काही फारसा रस दिसला नाही. एकतर ती सीडी अशी काही लॉक झालीये, की एका विशिष्ट प्रोग्रॅमशिवाय ती उघडणार नाहीये. तर ह्याने थोडा तरी प्रयत्न करावा की नाही? अशा विचारांनी चिडचिड होऊन बाहेर फिरायला जावं म्हटलं, तर त्यातही फारसा उत्साह त्याला नसतोच, म्हणून एकटीच बाहेर पडले.
आम्हा दोघांमधे प्रेम, जिव्हाळा, काळजी कितीक असली, तरी कविता शेअर करता याव्या असे मित्र-मैत्रिणी फार फार दूर राहिलेत...सगळ्याच अपेक्षांचं ओझं एकट्या "त्या" च्या खांद्यावर टाकावं, असंही मला वाटत नाही. त्यामुळे चंद्रकिरणांनी चमचमणारी झाडं, गाड्या, रस्ते, गवत बघत निघाले, आणि एक अनाम पोकळीची जाणीव मनात दाटून आली. कोणाला द्यावे हे क्षण- जे सक्तीने फक्त माझेच होऊन राहिलेत? देऊ म्हटलं, तरी कसे द्यावे ते क्षण कोणाला, की जे माझ्या मनातून बाहेर पडता पडताच धुक्यासारखे विरून तरी जाताहेत, नाहीतर दगडासारखे घन होऊन त्यातले काव्य हरवून बसतात???

निराकार भावनांच्या त्या क्षणांना मी जपून घरी आणलं. पारदर्शक, नितळ काचेच्या डबीत हळुवारपणे भरून ठेवले, आणि मी पोळ्या-भाजीच्या कामाला निर्धास्तपणे वाहून घेतलं. मग रात्री जेवणं, आवरणी झाल्यावर हळुच काढली ती डबी. उघडून बसले कवाडं आणि हरवून गेले त्या मुक्ततेत. लिहतांना येते तशी धुंदी आली डोळ्यांवर. पुन्हा दिसले चंद्रकिरण, झाडं आणि गवत. आणि मग मी एकटी राहिले नाही...

नभाचा किनारा

"तुला पाहिले मी, नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे..."

सुरेश वाडकरांचा नितळ स्वर आणि कवी ग्रेस यांची अथांग कविता- ऐकता ऐकता मी एका वेगळ्याच विश्वात जाऊन पोचले, जिथे माझ्या पृथ्वीशी निगडीत रंगरूप, वेळकाळ, स्थिती/स्मृतींच्या पलिकडचं एक अस्तित्त्व मला मिळालं. रात्री एकाकी हिंडतांना अचानक चांदण्याची सोबत मिळाली. काव्याचं नवं परिमाण मिळालं.
त्या चंद्रने अधिकच गर्द झालेल्या रात्रीतले कधी निरर्थक, कधी हळवे, कधी काव्यात्म विचार इथे लिहिते...

7/9/08

Stories, Stories...

STORIES, STORIES....
Yesterday was characterized by a stilted sense of what some people call "fun". First, out of sheer compulsion of having to finish what I'd begun, I read up the last half of "Five Point Someone." Of the instant international bestseller, a reviewer says, "It is a book version of 'Dil Chahta Hai' ". Then, things turned out to be so that I made an early binner (brunchish dinner) and we enthusiastically headed to Regal for a first look at "Jaane Tu Ya Jaane Na". Little did I know that my day would end in cliché, stories and outrageous claims as much as it had begun with them. Setting for both: College. Age-group: Just hatched college crowd. Theme: Friendship, Love, Insecurity, Growing up, humanness. Fancy words breed great expectations. But alas! We're only humans.


That said, there are huge differences between the two: most of all, a difference of medium which leads to a compensation for plot through visual in case of cinema. There's a natural spark in Adity (Genelia) that makes Imran look like a block of wood though his effort to act shows. No such visual-compensation in "5 Point" for a person who did not come within 5 miles of IIT ever in her life.

Speaking further of characters, it just struck me that the 3 of 5-point-Someoners are at worst, alter-egos of Hari (the narrator) or at best, the alter egos of the author, Chetan Bhagat. I mean, how many representative approaches to life can there be, given the limited scope of an average-student-life? (Bhagat already makes it clear that he's writing strictly about the average. That's been decided at IIT right after the first 5 pointer assignment anyway). "I don't care, I'm the boss" (Ryan) or "I care so much I'm paralyzed" (Alok) or "I don't know whether I care or not"...(Hari)

There are average people in Jaane Tu too: One thing I totally admire about the movie is how the director never ever even once, hints at the sexuality and attractiveness of characters. He doesn't judge them for their sexiness, nor do we. Nor does Jai look at Aditi differently, the way SRK looks at Kajol after her “feminization” in Kuch Kuch Hota Hai. Obviously, there's a time lag in KKHH, but always, the emphasis was on loveliness, not on "belovedness". Rotlu and Bombs are the most average of average people, who settle for someone who would love and accept them instead of fantasizing for Aditi and Jai, respectively. The story unfolds through a circumference of lively, deep, real interesting characters all around Aditi and Jai, who, even at the center, are not the only focus. What's more, they're mostly flat and unidimensional, as compared to Savitri (the mother) or Meghana (the girlfriend). It is as if those character-perspectives on the love-story light it up rather than a story lighting up characters. There's even a cynic in their midst, who, like the audience, slowly starts buying into the story and eventually can't rest until she is assured that the couple was reunited in the end.
Compare this to Alok, Ryan and Hari. Their alternatively whiny, distant or plainly abusive families have nothing to do but serve as fillers. The author seems to be seriously confused between universality of characters and emotion, in contrast to characters without any face at all. What is Neha? A lovable girl who writes to her dead brother, wondering if Hari loves only her body!!! Why couldn't she simply write a journal? The leap from weeping over her brother's suicide note to having sex with a third year student.

After reading "5 Point", I couldn't agree more with the fact that "Tragedy is universal, but Comedy is bound by constraints of time and place." But wait a minute! If Comedy is contextual, why was I rolling in laughter when Jai whined from behind bars, "12.00 baj gaye!!" and Paresh Rawal, the Inspector quipped, "To kya hua? Tu Cinderella hai kya?" If I were living on some remote mountain where Cinderella story had never reached, this wouldn't make any sense to me.
So well, then this should not be just about context either. The fact that I never lived in a hostel, studied (or pretended to study) until 4.00 am, never gawked at girls (or for that matter, boys either), never attempted to steal exam papers, rarely got an equivalent of "5 Point" something on any of my exams- should these things keep me from enjoying the book? Technically, no. Practically, yes yes! I am simply outraged by the ridiculousness of the book, and more outraged by the claims that it shows a piece of life, that it celebrates humanness, that it is a funny take on the over-rated, idolized, glorified cult of the IITs.
  • If anyone could compete with John Donne for his metaphysical conceit, it would be Bhagat. A sampler: "Baku, a lungi-clad human toothpick, and just as smelly is my guess." Bhagat does not stop at metaphors.
  • There're similies that make you feel as if a lizard is crawling up your neck (speaking of which, do you like mine better than Bhagats? ) "Tearing his rotis like a famished UNICEF kid, Alok got chatty."! In similar vein, exam scores are equated to "graffiti written in contempt" and once a month phone-call to Neha seems like a "dentist calling home about an appointment." But which dentists in India call home to remind people of appointments? As far as I can remember, I went to a different one each time, with the frequency of probably twice in 10 years!
  • Top the stylistic charade with alliterative cherries, and this one is my favorite because it combines a similie with alliteration," The instructor sat next to the BLackboard like a BLoated Beetle..."
  • Throw in a 5 versions of the F word, 2 of the A word, three of D*** and the language can be labeled "contemporary". Mention Vodka, joints and smoke, and students who've never strayed in those arenas, voyeuristically enjoying the account, think, "Man, this is super cool!"

In reality, characters get sacrificed for a plot that neither sounds interesting, nor plausible. (Alok had to break 11 bones, Neha had to forgive Hari, Prof. Veera had to be unexplicably sympathetic to the cause of three no-gooders who could not make out the difference between right and wrong.)

At one point, Hari says in his own defense, "We got carried away." I wonder if the author would say the same thing when it comes to the writing of this book: He was trying to create a Hrishikesh Mukherjee film, but came away with a David Dhawan instead.

Mostly I pity the book, but I'm enraged when Nerds are painted black. Venkat, who has a good GPA, but is obnoxiously selfish, heartless and hardly human. I suspect the existence of a twisted cause and effect relationship here: People who have good GPAs are hardly human, primarily because of those GPAs. Prof. Cherian loses his son over his ambition, Venkat loses a friend. Nerds have no friends, at any cost, no good/true/real friends. The book almost makes a case that you should be a Five Pointer if,
a) you want to outshine your bookworm classmates through sheer creativity and independent thinking
b) you will have a much more interesting life than a 10 pointer and
c) you will find true friendship and true love as a bonus.

Now, the psychology of nerd-outcasting phenomenon is known to everyone, but my point is, this is cheap comedy- at the expense of a population who can write what one "Should do while at IIT." I would've loved a maturity in writing which does not cast people in ridiculous straitjackets and call it a touch of humor.
Remember Jai and his mom, genuinely funny, in her desperate attempt to convince an already convinced Jai, not to get into a fight? Remember the likable dimwit "bombs", looking at Jai rush inside the airport on horseback and asking, "Is he going to the US too?" haha! Remember Boman Irani in Munnabhai with his inimitable, "Calm down, calm down!"

Well, the difference was always all too clear. What remains, is a matter of choice.