12/15/18

हैरतों के सिलसिले

लग्न झालं तेव्हा मी डोक्याने बरी पण व्यवहारात माठ होते. सासरी गेल्यावर एखाद आठवड्याने सासूबाईंनी "आज तुझ्या हातचं जेवायचं आहे" असं फर्मान सोडल्यावर "पण मी जे करू शकते ते तुम्ही खाऊ शकाल का?" असं मी अत्यंत निर्मळ मानाने विचारलं होतं! वर अजून स्वाभिमानाची फोडणी घालून "मला कोकणस्थी गोड च भाज्या आवडतात!", असं सांगून फ्लॉवरच्या रश्यात आलं लसूण सोडा, साखर घालून सगळ्यांची तोंडं गोड केली होती. आपल्या स्वयंपाकाच्या अज्ञानाबद्दल लाज किंवा वैषम्य वाटून घ्यायचं असतं, हे हि माझ्या गावीही नव्हतं. जे शिकायला हवंय, ते आपण कधी ना कधी शिकू, त्यात काय मोठं? असा निरागस आशावाद नव्हता, तर स्वतःवरचा (कदाचित थोडा अवास्तव) विश्वास होता. अभ्यासातली हुशारी साधारण बाकी ठिकाणीपण वापरता येते, ह्याचा थोडा अनुभवपण गाठीशी होता.  :)

पण मुलगी म्हणून जन्माला आल्यावर आईबापांनी ज्या धक्क्यांपासून दूर ठेवलं होतं, तेच आश्चर्याचे धक्क्यावर धक्के  मला पुढे जगाने जे दिलेयत,त्यांना तोड नाही! लग्न थोडं उशिरा झालं (त्यांच्या मते), म्हणून "लवकर मुलं होऊ द्या!" असा सल्लाही वरातीच्या साडीबरोबरच मिळालेला, पण नवरा जास्त प्रॅक्टिकल निघाला. एका चाकाच्या गाडीपेक्षा दोन चाकाची चांगली, म्हणून त्यानं तरी लग्नानंतर शिकायचं माझं "खूळ" उचलून धरलं.

पण साधी शाळेची म्हंटली तरी पहिली नोकरीच होती ती. मी नवीन होते, देश नवीन, आणि वातावरण तर कधी न पाहिलेलं! १२ तास काम करणाऱ्या मुलींच्या डोक्यात, संध्याकाळी ६ वाजता घरी जातांना आपोआप, अंत:प्रेरणेने, "आज जेवायला काय बनवायचं?" असे विचार येत असतील तर त्या मुलींना "देवीपद" बहाल करायला माझी अजिबात हरकत नाही, पण ती मुलगी मी नव्हते. पहिली नोकरी लागल्यावर थोडी उधळपट्टी करायचा माझा पण प्लॅन होता...
पण... पुढचा धक्का वाट बघत होता. नोकरीच्या पहिल्या वर्षातून बाहेर पडते न पडते तर "आता कशाची वाट? मुलं होऊ देत!" असा घोर मागे लागला. शिवाय, आजूबाजूच्या सगळ्यांनी नंबर लावले होते, मग त्या स्पर्धेत आम्ही उरापोटी धावायला लागलो, त्या मनस्थितीत कसली होतायत पोरं?? इथवर येता येता तिशी आली, नंतर मूल झाल्यावर जरा त्यातल्या आनंदात सैलावले, तर "आता काय आयुष्यभर घरीच बसणारेस का?" -हा धक्का मात्र नवऱ्यानेच दिला (किंवा धक्का मारला, असंही असेल त्याच्या दृष्टीने!)

एकीकडे, ज्या कामाचे पैसे मिळत नाहीत, त्या कामाची कदर केली जात नाही, पण दुसरीकडे, पैशासाठी घराची गैरसोय होऊ न देण्याची शिकवण मिळालेल्या माझ्यासारख्या बायका! " लग्न झाल्यावर हळूहळू धडे मिळत गेले- कि आपलं आयुष्य हे आपल्यासाठी नसतंच मुळी...! घरासाठी, नवऱ्यासाठी, पोरांसाठी- हे झालंच तर मग उरलेलं जमेल तर आपलं म्हणायचं! संसाराच्या वाटेतले एक एक खड्डे बुजवत राहिली ती नदी, मग तिचं केवळ डबकं होऊन राहिलं. ती वाहणार कशी?

फक्त ह्यावेळी आश्चर्य नाही वाटलं, कारण जखम खोल होत होत स्वत्वाला पोखरून पार पोचलेली होती...
हैरतों के सिलसिले सोज़े निहां तक आ गाये!

एकदा वाटलं, आपली गणितंच मुळात चुकली होती... लठ्ठ पगाराच्या घरी बसून करायच्या नोकऱ्या मिळतात, ते क्षेत्र निवडायला हवं होतं. मग वाटलं, क्षेत्राचं काय? यश कधी पाहिलंच नाही, असंही नाही. आणि शेवटी ह्या निष्कर्षाला पोचले, कि थोडं थोडं सगळंच मिळवायचा हट्ट धरून बसलीस बाई, मग थोडं जे हातात आलं, त्याच बरोबर थोडं थोडं सगळंच हातातून सुटणारच ना!

परवा मात्र एका घटस्फोटाची कथा जवळून बघायचं दुर्भाग्य आलं. लठ्ठ पगाराच्या दोन नोकऱ्या, दोन पोरं, मोठं घर, सगळं असणाऱ्या दोन व्यक्तींच्या हातून प्रेम मात्र निसटलं. जगाच्या डोळ्यात आधी खुपलं काय? बाईचा नोकरीचा माज, घराकडे दुर्लक्ष, नवऱ्यावर सत्ता गाजवणं. ते बघून मात्र जाणवलं. गणित चुकलेलं नाहीये, चुकीचंच गणित आहे.

ख़ुद तुम्हे चाके गरेबाँका शऊर आ जाएगा
तुम वहां तक आ तो जाओ, हम जहांतक आ गए!

उठण्या बसण्यापासून बोलण्या घालण्यापर्यंत, मुलींच्या प्रत्येक आचार विचाराची चिरफाड करायला बसलेलं जग. त्याच चौकटींमधून उपजलेल्या माझ्या सासूबाई, आणि माझी घटस्फोटित मैत्रीण, आणि मी. तिचं संपलेलं लग्न म्हणजे स्त्रीवादाचा सर्वात मोठा पराभव आहे. "आपल्याला नक्की काय हवंय? पुरोगामी तर व्हायचं आहे, पण ते कसं व्हायचं, आणि किती झेपेल" हे न कळलेल्या पुरुषाने तो पराभव घडवून आणला आहे. पण मोलाची साथ मात्र बायकांनी स्वतःच दिली, कसल्या कसल्या चौकटींमधून स्वतःचं प्रतिबिंब बघत अस्मिता शोधत बसल्या! माझा माठपणा माझ्या चांगलाच उपयोगी पडला. नाहीतर जितपत भान आज आलंय, तितकंही आलं नसतं.


11/11/18

शिशिर

हवेत आता लख्ख गारवा
स्वच्छ निळाई, केशरी थवा
पानांचा हा लालस मोहर
जाईल गळून, जरी मज हवा

आठवणी देठात उबेच्या
धग पानांची डोळ्यांमध्ये
जाणवते पण, पोचत नाही
आक्रसलेल्या गाभ्यामध्ये

झाडांनी कोठून आणला
विखार इतक्या सौंदर्याचा
अट्टहास होता का केवळ
बहरानंतरही बहराचा?

बोच पांढरी वाऱ्यामधून
हाक नव्हे ती - घंटा कानी
आभास तो पेटलेपणाचा
गाळण्यापूर्वीच्या निकरानी

7/6/18

अजून थोडे आहे बाकी

शांताबाई शेळके माझे दैवत _/\_ . त्यांची एक 'चारोळी'? मनात घर करून बसली होती.
“अजून थोडे आहे बाकी
या रक्ताचे करणे पाणी
अजून थोडे, आणिक नंतर
सरेल तेव्हा सरो कहाणी”

त्यांची क्षमा मागून:

अजून थोडे आहे तनुवर
मांस मखमली देण्याजोगे
ते सरल्यावर राखेमधुनी
पुन्हा भरारी घेईन म्हणते

भूक शमविण्या कशा-कशाची
कुणा कुणाची होऊनही मी
समर्पणाची आग गिळूनि
लाव्हा ओकत फुटेन म्हणते

भयाण रात्री परिकथेची
स्वप्ने जरी पहिली होती
सोशिक सिंड्रेला का होऊ?
बाबा यागा होईन म्हणते

संस्कारित होऊन बोहल्यावरी
चढवली बाहुली, तिला
"सुखी ठेव" म्हणणारे सारे
"सुखी रहा" का कोणी म्हणते?

आईने ज्या अस्तित्वाचे 
डोळे गाळून केले सिंचन 
चिणून मातीमधे तयाचे 
बीज ऐकले पेरीन म्हणते.

हाक अनावर अंतर्मनिची
वादळापुढे ऐकू यावी
पोटातून तुटून येवढा
टाहो आता फोडीन म्हणते.

6/8/18

Say, could that lass, be I?



Sing me a song of a lass that is gone
Say, could that lass, be I?
Merry of soul she sailed on a day
Over the sea to sky

ह्या जुन्या स्कॉटिश गाण्याच्या अनेक आवृत्ती आहेत,  पण Outlander या मालिकेच्या सुरुवातीला ह्या गाण्यामुळे जे गूढरम्य वातावरण निर्माण झालं, त्याने मला खिळवून ठेवलं. एका हरवलेल्या मुलीचं हे गाणं - ती हरवून गेलेली Lass (मुलगी) मीच असेन/असू शकेन का?
Say, could that lass, be I? या ओळीतला 'could' ह्या एका शब्दाने अर्थाची छटा बदलली, आणि तिथे प्रश्न तर निर्माण झालाच, पण एक अध्याह्रत असं स्वप्नरंजन, किंवा कदाचित एखादी अबोल, सुप्त इच्छा पण व्यक्त झाली!

कधी कधी आपल्याला पण वाटतंच नं- स्वतःच्याच आयुष्यातून पळून जावंसं? पण असं, एकाएकी स्वतःला 'हरवून', एकाच जन्मात नवीन आयुष्य जगायला मिळणं, हे केवळ स्वप्नात, किंवा कादंबऱ्यांतच होऊ शकतं! म्हणून तर ह्या मालिका लोकप्रिय होतात, आणि जोरात खपतातही.

१७४५च्या जेकॉबईट क्रांतीच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा "क्लेअर" नावाच्या नर्सच्या दृष्टिकोनातून उलगडते. 
१९४५ मध्ये ब्रिटिश नर्स असलेली क्लेअर युद्धानंतर आपल्या नवऱ्याबरोबर स्कॉटलंडमध्ये येते, तिथे काही गूढ घटनांमुळे काल-पटल भेदून ती चक्क २०० वर्ष मागे भूतकाळात येऊन पडते (अक्षरशः) आणि परत आपल्या 'काळात' जाण्याची धडपड करता करता तिथल्याच घटनांमध्ये अडकून जाते!

अनेक वर्षांपूर्वी मी पण इथे, अमेरिकेत येऊन 'पडले', आणि काळ जरी तोच असला, तरी बाकी ह्या जगाचं त्या जगाशी नातं विसविशीत तंतूंनीच कसंबसं जोडून धरलेलं होतं. घरी ईमेल ने चॅट ची वेळ ठरवून घ्यायची, आणि पलीकडून मिनिटाला एक शब्द, ह्या वेगाने आई-वडील टाईप करत असले, तरी जीव गोळा करून ते वाचायचं! कारण आंतरदेशीय फोन दोन -तीन आठवड्यातून एकदा लावणेच परवडायचे! पुढे वेब कॅमेरा वगैरे आले, आता तर मिनिटा-मिनिटाला मेसेज येतात, पण तेव्हा तशी सोय नव्हती. म्हणजे अगदी देवा-ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न करूनसुद्धा, देशातल्या लोकांसाठी आपण 'मेलो' च की काय? अशी शंका मनात यायची.

क्लेअर जशी आधीच्या आयुष्यात नर्स असते, पण भूतकाळात तिच्या सवयीची वैद्यकीय सामग्री नसते, त्यामुळे मिळेल त्या वनस्पती, कापडी लक्तरं वापरून मलमपट्टी करायची तिच्यावर वेळ येते, तसं मला पण माझ्या व्यवसायाची इथे नव्यानेच ओळख करून घ्यावी लागली.

क्लेअरने शाळेत १७४५ च्या बंडाचा इतिहास वाचलेला असतो, पण त्याचा खरा अर्थ कदाचित तिला त्या ऐतिहासिक घटनांच्या वादळात शिरल्यावरच कळायला लागतो, किंवा, त्या माहितीचा उपयोग करण्याची वेळही तिच्यावर येते. तसे 'युरेका' क्षण मी पण कितीतरी वेळा अनुभवले! Robert Frost च्या कवितेतले Birches, आणि Wordsworth चे Daffodils प्रत्यक्षात कसे दिसतात, ते इथे आल्यावरच कळलं!

या जगातली नवीन जीवनपद्धती बघतांना, आधी नाक उडवून शेरे मारले, पण लख्ख, निरभ्र आकाशाखाली बोचणाऱ्या, न संपणाऱ्या थंडीचा अनुभव हळूहळू रक्तात उतरल्यावर मात्र, मी पण बदलू लागले. अनेक वर्ष भारतात 'कोरडी' साहित्यसाधना केल्यावर अचानक एखाद्या कवितेशी अनुभव जोडला गेला, तेव्हा मी पण क्लेअर सारखी पुन्हा प्रेमात पडले - माझ्या आवडत्या लेखकांच्या प्रेमात!

जर्मन भाषेत 'Ausländer' किंवा इंग्रजीतील Outlander म्हणजे शब्दशः 'बाहेरगावची' व्यक्ती. स्कॉटिश लोकांच्या लेखी इंग्रज बाहेरचे होते. स्कॉटिश प्रथा, लोककथा, लोकसंगीताशी ब्रिटिशांनी नातं सांगितलं नाही, उलट ती 'highland' संस्कृती 'मागासलेली' म्हणून मोडून काढायचे प्रयत्न केले. क्लेअर ह्या सगळ्यांपेक्षा वेगळी होती, तिने काळाचा भेद ओलांडूनही स्कॉटिश लोकांवर, तिथल्या जीवनावर प्रेम केलं, तरी ती 'बाहेरची' च राहिली का? ते मालिका/पुस्तकं वाचल्यानंतरच कळेल कदाचित.

पण माझ्या स्वानुभवाशी क्लेअरचं विश्व ह्या एका अनुभवानं जोडलं गेलं. अमेरिकेचं अनिवासी लोकांशी नातं सध्या बदलू लागलं आहे. आजवर सगळ्यांना सामावून घेणाऱ्या अमेरिकेने आता थोडं कट्टर धोरण स्वीकारल्यावर, मला, इतकी वर्ष इथे राहूनही, पुन्हा परकेपणाची जाणीव झाली का? की इतक्या वर्षाची नवलाई संपली, म्हणून जुन्या आठवणी उफाळून आल्या, आणि मलाच हे जग परकं वाटायला लागलं आहे का? Outlander मालिका पाहून हे विचार मनात आले!


4/24/18

शैक्षणिक तंत्रज्ञान ३

शैक्षणिक तंत्रज्ञानाचे असे अनेक फायदे लक्षात घेऊन मी उत्साहाने वर्गात सांगितलं, "आता तुमचं पुस्तक तुमच्या खिशात! ई-पुस्तकाचं ॲप मोबाईलवर उपलब्ध आहे, ते उतरवून घ्या फक्त."
तर एक मुलगी म्हणाली, "पण मला हाताने मुद्दे अधोरेखित करायला आवडतं."
"अगं ई-पुस्तकात अधोरेखनाची पण सोय आहे!"
"पण एक एक पान लोड व्हायला इतका वेळ लागतोय की गेल्या पानावर काय अधोरेखित केलं होतं, ते ही पटकन दिसत नाही!"
तिचं म्हणणं बरोबर होतं. तंत्रज्ञानाचे अनेक फायदे असले, तरी पुस्तकाचा सरळ थेट साधेपणा त्यात कसा येणार?

मला आधी वाटलं होतं, की मीच एकटी जुन्याला जळमटांना चिकटून बसलेय, पण पुढच्या पिढीला हे तंत्रज्ञान आवडत असणार, सोपं वाटत असणार. पण नंतर लक्षात आलं, की, हे विद्यार्थी, शाळेपासून तंत्रज्ञान कोळून प्याले, पण शिक्षणाच्या बाबतीत मात्र कोरडे पाषाणच राहिले होते! शिवाय, अति-परिचयाने तंत्रज्ञानाचा कंटाळा आलेलेसुद्धा खूपसे होते. एखाद्या विशिष्ट विषयासाठी, विशिष्ट कौशल्य शिकवायसाठी तंत्रज्ञान वापरणं वेगळं, आणि विद्यालयीन जीवनाचा समग्र अनुभवच शैक्षणिक तंत्रज्ञानाने व्यापून टाकणं वेगळं.

ई-पुस्तकांव्यतिरिक्त, आमच्या विद्यालयाने प्रत्येक विषयाची वाचनसामग्री ग्रंथालयाच्या वेबसाईटवर टाकलीये. तर गृहपाठाची 'सूचना' विद्यालयाच्या LMSवर, वाचन ग्रंथालयाच्या पानावर, पण गृहपाठ/चाचणी ई-पुस्तकावर, ही तिहेरी कसरत करतांना मुलांनी 'अभ्यास' नेमका कधी करायचा, हे मला कळत नाही. 

विद्यालयाच्या LMS शी ई-पुस्तकाचा ताळमेळ घालण्यासाठी आधी मुलांनी ई-पुस्तक विकत घेऊन त्याचा कोड वापरणे आवश्यक होते. एकदा कोड घेतला, की ३-४ विषयांसाठी तो वापरता येत असतो, पण कोडशी जोडलेला ईमेल पत्ता आणि पासवर्ड माहिती हवा. काही मुलांना कोड घेतल्याचे आठवत होते, पण ईमेल पत्ता आठवत नव्हता. मग त्यांना ग्राहक-सेवेचा फोन नंबर देणे, त्यांचा ईमेल पत्ता मिळाला, की पुन्हा एकदा "विद्यालयाच्या LMS शी ई-पुस्तकाचा ताळमेळ घालण्याचा धडा" शिकवणे आले. 
अशाप्रकारे, सुरुवातीचा एक महिना, वर्गातली पहिली १० मिनिटं माझं Troubleshooting चालायचं. लेखन वाचनापर्यंत अजून गाडी सरकलीच नव्हती...

एकदा ही शिक्षणयंत्रणा कार्यरत झाली, तरी पुढे तंत्रज्ञानाची सबब सांगणाऱ्या विद्यार्थ्यांचा ससेमिरा मागे लागला.

  • "गृहपाठ जिथे 'टाकायचा होता, तो डबा बंद झाला." म्हणजे, उशिराने गृहपाठ आणणाऱ्या प्रत्येक मुलासाठी मी (शिक्षिकेने) विशेषत्वाने सेटिंग बदलायचं. 
  • "ई-पुस्तक उघडायला फ्लॅश अपडेट करावा लागतोय, तो घरच्या संगणकावर होत नाहीये."
  • "माझा गृहपाठ गूगल डॉक्स मध्ये आहे, पण इथे फक्त वर्ड ची परवानगी आहे, तर काय करू? 
  • "निबंध USB वर आहे, पण आज आणायला विसरले, उद्या आणते."
  • "गृहपाठाची तारीख २०, पण तो २७ पर्यंत 'उघडा' आहे, म्हणजे मला वाटलं की २७ पर्यंत दिलेला चालेल.  
  • Turnitin वर माझा निबंध 'चोरलेला' दिसतोय, कारण मीच तो गेल्या वर्षी वेगळ्या प्राध्यापकांसाठी लिहिला होता, पण तो कोर्स मला तेव्हा पूर्ण करता आला नाही, म्हणून पुन्हा आता घेतोय.  

सध्या 'हायब्रीड' किंवा 'मिश्र' कोर्सेसचं अतिशय फॅड आहे. आठवड्यातले २ दिवसच वर्गात बसून प्रत्यक्ष शिकायचं, आणि उरलेले २ दिवस ऑनलाईन स्वाध्याय, वाचन करायचं, आणि चाचण्या द्यायच्या. ह्या मुलांची 'तयारी' तपासण्यासाठी मग ऑनलाइन चर्चासत्र शिक्षकाने घ्यायचं, विद्यार्थ्यांनी त्यात जमतील तेव्हा प्रतिसाद लिहायचे, आणि शिक्षकाने ते तपासायचे! २५ मुलांच्या 'छोट्या' वर्गातही, चर्चेचे १०० प्रतिसाद झाले, तर ते शिक्षकांसाठी किती गधेमजूरीचं काम होऊन बसतं! काही मुलं जर केवळ 'सहमत/असहमत' असे प्रतिसाद देत असतील, तर त्यांना चालना देण्यासाठी पण शिक्षकांना दिवसरात्र त्या वर्गाच्या वेबसाईट वर राबावं लागतं. हा वेळ कदाचित शिक्षकाने मुलांचे निबंध/इतर लेखन वाचण्यात घालवला असता, तर?

ह्यात अनेक समस्या आहेत:
१. शैक्षणिक तंत्रज्ञान बनवणाऱ्या अनेक कंपन्या आपलं घोडं पुढे दामटतात, पण कुठलंही एक ऍप किंवा सॉफ्टवेअर  'सर्वसमावेशक' नसतं, त्यामुळे शिक्षकांना आणि मुलांना, तीन ठिकाणी तीन गोष्टींसाठी फिरावं लागतं.

२. कुठलीही गोष्ट अंगिकारण्यापूर्वी प्रत्येकाला, ती गोष्ट स्वत:साठी 'चालवून' बघता येण्याचं स्वातंत्र्य ही तंत्रद्न्यानाची टूम शिक्षकांना देत नाही, असं वाटतं. आणि त्यातुन आलेले अनुभवांचं 'सरसकटीकरण' केलं जातं, जसं की, "ह्या शिक्षकांना नवीन गोष्टींशी जुळवून घ्यायला नको!"

३. शैक्षणिक तन्त्रद्न्यानाचा प्रयोग अधिकाधिक 'व्यक्तिसापेक्ष' शिक्षण देण्यासाठी करणे योग्यच आहे. फक्त, ह्या मुलांचं 'वर्गीकरण' करुन एकीकडे व्यक्तीसापेक्षतेचा डंका बडवायचा, आणि दुसरीकडे, त्याच ॲपमधील 'डेटा' गोळा करून, मुलांच्या 'स्कोअर वरून' शिक्षकांची "प्रगतीपुस्तकं" लिहायची, पण शिक्षक-विद्यार्थ्यांच्या 'व्यक्तीसापेक्ष-रसायनाला' गृहित धरायचे नाही, हा मला दांभिकपणा वाटतो. (विशेषकरून भाषा-शिक्षणासारख्या सापेक्ष विषयात.)

४. आत्ता 'आई म्हणून' लहान मुलांना तंत्रद्न्यानातुन शिकवणं हे बरोबर वाटत असलं, तरी प्राध्यापिका म्हणून तंत्रद्न्यानात वाढलेली मोठ्या मुलांची पीढी बघून भीती वाटते. हे माझे विद्यार्थी शैक्षणिक तंत्रद्न्यानाचे पहिले 'बकरे' / 'भोक्ते' आहेत. त्यांच्यावेळी हे सगळं नवीन होतं. त्यामुळे शिक्षकांनीपण तेव्हा फार डोळसपणे नवीन गोष्टी न वापरता, सगळीकडे नवीनतेचा उदोउदो होत असल्यामुळे, तोच पंथ आपोआप धरला, किंवा, बहुधा 'सोय' बघून, 'वाहत्या पाण्यात हात धुतले'.

शिक्षणाचं 'तंत्रज्ञान' समजावून न घेता, केवळ शैक्षणिक तंत्रज्ञान पाजळणाऱ्या लोकांना पुढे हेच विद्यार्थी कर्मचारी म्हणून मिळणार आहेत, तेव्हा तरी कदाचित त्यांना जाणवेल, की पुढे पाहून धावताना मागे काय हरवत चाललं होतं... 

4/23/18

शैक्षणिक तंत्रज्ञान २

माझ्या मुलाचं हे पहिलीचं वर्ष, त्यामुळे नोंदणीची शंभर कागदपत्रं भरल्यावर जरा श्वास घेतला. 'मोठ्या' शाळेच्या पहिल्या दिवसात चिटुक काय काय नवीन शिकला ते माहिती नाही, पण मी मात्र शाळेकडून येणाऱ्या अक्षरशः रोज एक इमेलने भांबावून गेले!
१. शिक्षकांचे प्रत्येकी वेगळे वेबपेज, पालक-संगठनेचा वेगळा 'दुवा'.
२. मुलगा आजारी/अनुपस्थित असेल तर शाळेला कळवण्यात यावं, त्यासाठी वेगळा ईमेल-पत्ता!
३. शिवाय, मुलाचं 'प्रगतीपुस्तक' बघण्यासाठी वेगळ्या ठिकाणी आपलं 'पालक-खातं' बनवणे.
४. फावल्या वेळात मुलांना गणिताची गोडी लागावी म्हणून वेगळं 'app', ज्यावर आपल्या पाल्याशी आपलं खातं जोडणे, म्हणजे त्याची प्रगती आपल्याला कळेल.
५. वाचनाच्या गोडीचं तसलंच, पण वेगळं app!
६. मुलांना शाळेतुन 'डबा'/ जेवण विकत घ्यायचं असेल, तरमुलांच्या हाती पैसे सोपवावे लागू नयेत म्हणून एक पालक खातं, त्याचा फक्त 'कोड नंबर' मुलांनी शाळेत वापरायचा आहे. त्यात दर महिन्याला १०-२० डॉ. भरून ठेवता येतात.
७. जेवणाचा मेन्यू शाळेच्या वेब-पत्त्यावर उपलब्ध, तो दर महिन्याला आपण 'उतरवून' घेऊ शकतो.

हे इतके 'मायाजाल' लक्षात ठेवता ठेवता माझी सुरुवातीला तारांबळ उडाली, मग सरळ वहीत 'सदस्यनाम' + परवलीचा शब्द लिहून ठेवू लागले. मुलगा मात्र दोन दिवसात जेवणाच्या नंबरपासून अभ्यासाच्या खात्यापर्यंत सगळी नावं/पासवर्ड शिकून तरबेज झाला. मी मनाशी म्हटलं, "आपण जुन्या खोडा प्रमाणे नवीन तंत्रज्ञानाबद्दल उगीचच साशंक झालो आहोत. नवीन पिढीसाठी हे काही कठीण नाही!"

पण त्याच वर्षी, आमच्या विद्यालयानेसुद्धा नवीन Learning Management System (शिक्षण-संस्थापन तंत्रज्ञानाचं) अवलंबन करायचं ठरवलं. फर्मानं सुटली, कार्यशाळा झाल्या. वर्ष सुरु झालं. तेवढ्यातच पुन्हा नवीन फर्मानं निघाली, की इंग्रजी साठी पूर्वीचं साधं पाठ्यपुस्तक बाद करून त्या ऐवजी एक वेगळी LMS पद्धत वापरायची आहे. ह्या दोन्ही पद्धतींचा एकमेकींशी ताळमेळ घालून देण्याची अजून एक नवीन कार्यशाळा झाली!

मी स्वतःला 'जुने खोड' म्हंटले तरी खरं म्हणजे माझं तंत्रज्ञानाशी अजिबातच वाकडं नाहीये, त्यामुळे मी ह्या नवीन पद्धती बऱ्यापैकी लवकर आत्मसात केल्या. खरंतर ह्या नवीन माध्यमातल्या क्षमतांचा विद्यार्थी, तसेच शिक्षकांना खूप उपयोग होऊ शकतो: 

१. पुस्तकातले प्रश्न सोडवतांना बरेचदा पाठ करून/ दुसऱ्यांची बघून लिहिलेली उत्तरं दिसतात, पण त्यातून मुलं खरी संकल्पना (concept) शिकलीयेत की नाही, ते कळत नाही. ह्या ई-पुस्तकात प्रत्येक व्यक्ती आपल्या खात्यातूनच लॉगिन करणार, त्यामुळे उत्तरं चोरायचा प्रश्न येत नाही. शिवाय, प्रत्येक विद्यार्थ्याला, त्याच संकल्पनेबद्दल, पण वेगळे प्रश्न दिसतात! इतकंच नव्हे, तर शिक्षकांनी परवानगी दिली, तर एक 'चाचणी परीक्षा' २-३ वेळा देता येते, आणि त्यातून सर्वात चांगले गुण 'धरले' जातात.
२. अमेरिकाभर वापरली जाणारी अजून एक वेबसाईट म्हणजे 'Turnitin'.  ह्यावर विद्यार्थ्यांचे शेकडो/हजारो निबंध आधीपासून साठवलेले आहेत, त्यामुळे माझ्या विद्यार्थ्याने जर दुसऱ्या कुठूनही वाक्ये/उतारे 'चिकटवली' असतील, तर ते मला, शिक्षिकेला दिसून येतं. प्रत्येक शिक्षकाने ही व्यवस्था वापरली, तर निबंधाची संख्या वाढत जाते, व दुसऱ्याच्या कल्पना चोरून वापरणं अधिकाधिक कठीण होत जातं.
३. विद्यार्थ्यांना तर चक्क 'धडा वाचून दाखवणे' ही पण सोय ह्या नवीन ई-पुस्तकात आहे, म्हणजे अगदी जिम मध्ये व्यायाम करता करता कानाला हेडफोन लावून धडा 'ऐकता' येतोय!

इतक्या सगळ्या सोयी सुविधा असूनही माझ्या अनुभवात, मुलांना हे तंत्रज्ञान आत्मसात करणं, स्वीकारणं, खूप कठीण जात होतं. जोवर एखाद-दुसऱ्या वेबसाईटशी जुळवून घ्यायचं असेल, तोवर ठीक आहे, पण गेल्या १० वर्षात मी शिक्षिका म्हणून अशा ६-७ तरी  वेगवेगळ्या 'पद्धतींशी' जुळवून घेते आहे. नवीन विद्यालयात नवीन तंत्र, नवीन अभ्यासक्रम. 
(माझ्यासारखे 'तात्पुरते प्राध्यापक' (Adjunct Professor) यांची वणवण, हा एक अजून वेगळा घोर लावणारा विषय आहे, ते सोडा च.) 

शिक्षकांची ही कथा, तर मुलांना बहुतेक शालेय-स्तरावर अनेक वेगवेगळ्या विषयांसाठी, १५-२० तरी वेबसाईट/ऍप/सॉफ्टवेअर आत्मसात करावं लागत असणार (असा एक माझा अंदाज आहे). ह्या ओढाताणीत मुलांची स्वयंप्रेरणा मात्र कमी होऊ लागली, तर ह्या तंत्रज्ञानाचे अनेक फायदे सर्वस्वी अपयशीच ठरतील, हे त्या अनुभवातून गेल्याशिवाय पालकांना व शासकांनाही कळणार नाही, हे इथे लक्षात आणून द्यायचा माझा उद्देश आहे.  

4/17/18

शैक्षणिक तंत्रज्ञान 1

आम्ही अमेरिकेतले 'मागासलेले' पालक असल्यामुळे आपल्या मुलाला ६ वर्षाचा होई पर्यंत फोन, टॅबलेट वगैरे पासून दूरच ठेवलं होतं. टीव्ही कधी दाखवला, तर त्यावर वेळेचं बंधन असायचं, आणि मनामध्ये प्रचंड अपराधीपणाची भावना, कारण तिकडे स्वयंपाक करतांना मध्ये लुडबुड नको म्हणून टीव्हीचा "बेबीसिटर" लावला जायचा. काही पालक कौतुकाने 'आमचा गोटू किनई, २ वर्षाचा झाल्यापासूनच, किल्ली लावून आपला आपला फोन उघडू शकतो, आणि YouTube चा लाल त्रिकोण ओळखणं, त्याला A B C D च्या ही आधीपासून येतंय!" असे गौरवोद्गार काढू लागले, कि मला रडू यायला लागायचं, कारण, एकीकडे मी स्वयंपाका साठी, लांबच्या प्रवासा साठी, 'सोयीचं तंत्रज्ञान' वापरत च होते, पण दुसरीकडे त्याला हे तंत्रज्ञान 'शिकवणं' किंवा शिकू देणं, हे मात्र मला जमलं नव्हतं! टीव्ही लावून मी देणार, फोन उघडून मी देणार- ह्या किल्ल्या मी मुद्दाम स्वतःच्या हातातच ठेवल्या होत्या, पण त्या काढून घेण्याची 'हुशारी' माझ्या पोराला सुचत का नाही, ही नसती काळजीपण मलाच सतावत होती!!!

आणि अशा ह्या मुलाला, पहिल्या वर्गात, शाळा सुरु झाल्या झाल्याच, शाळेकडूनच Chromebook वापरण्याचा धडा मिळाला. "आई! माझं Username मी तुला सांगेन, पण पासवर्ड नाही सांगणार बरं का?" पोरगं उत्साहाने सांगत आलं, तेव्हाच माझ्या मेंदूतले दोन भाग कोणीतरी दोन वेगळ्या दिशांना खेचतंय असं वाटू लागलं! लहान मुलांचं शिक्षण, आणि त्यात तंत्रज्ञानाचा वापर, ह्या विषयी सध्या दोन, अतिशय परस्परविरोधी प्रवाह रूढ आहेत:

१. मुलांना २ वर्षांपर्यंत फोन, टॅबलेट वगैरे 'स्क्रीन' दाखवू नये. ते त्यांच्या भावनिक विकासाच्या आड येतं. एकलकोंडेपणा वाढतो. लहान मुलं अनुकरणातून, मोठ्यांशी होणाऱ्या संवादातून शिकतात, त्यामुळे टीव्ही किंवा फोनमधून मिळणाऱ्या ज्ञानाच्या एकमार्गी प्रवाहाने त्यांची सर्वांगीण प्रगती खुंटते.

२. आपल्या पालकांनी ज्या नोकऱ्या केल्या, त्या आपण करत नाही, तसेच आपल्या आजोबांच्या वेळी लागणारी कौशल्ये (skills) आपल्या पिढीसाठी अगदी निरुपयोगी ठरली. त्याच प्रमाणे, आपल्या मुलांनी २१व्या शतकात तगून राहावे असे वाटत असेल, तर त्यांना लागणारी कौशल्यं तंत्रज्ञानाशीच जोडलेली असल्यामुळे, त्यांना तंत्रज्ञान शिकवणे गरजेचे आहे.

विशेषतः भारतात माहिती-तंत्रज्ञानाने आणलेल्या सुबत्तेमुळे, तंत्रज्ञान हे सगळं चांगलंच आहे, आणि तंत्रज्ञानाशिवाय प्रगती शक्य नाही, तेव्हा तंत्रज्ञानाला पर्याय नाही, हे निर्विवाद सत्यच मानलं जाऊ लागलं आहे. अमेरिका मात्र त्यापुढे जाऊन, काहीशी अलिप्तपणे माहिती-तंत्रज्ञानाकडे बघत, चांगल्या-वाईटाचा शहानिशा करण्याच्या प्रयत्नात आहे. मी एक शिक्षिका, तसेच पालक, ह्या दुहेरी भूमिकांमधून जात असल्यामुळे ह्याविषयी माझी काही निरीक्षणे आज इथे व्यक्त करावीशी वाटताहेत.

१. तंत्रज्ञाच्या वापराने आपल्या मेंदूमध्ये घडणारे बदल आपण अजून पुरते समजून घेऊ शकलेलो नाही. आफ्रिकेत एक आदिवासी जमात, त्यांच्या अचूक 'दिशाज्ञाना' साठी प्रसिद्ध आहे. जंगलातून वाट काढण्यासाठी त्यांच्या मेंदूमध्ये दिशाज्ञान कायम कार्यरत असतं, त्यामुळे अगदी डोळे बांधून त्यांना कुठल्या खोलीत सोडलं, तरी ते घराची दिशा अचूक सांगू शकतात म्हणे! मोबाईल आल्यापासून आपल्याला एकमेकांचे दूरध्वनी क्रमांक लक्षात राहत नाहीत. तसेच ईमेल आल्यापासून 'लिहिणं' बंद झालंय! ह्या बदलांमुळे आपल्या मेंदूतल्या न वापरल्या गेलेल्या जागा 'बंद' पडत चालल्या आहेत.

उलट नवीन कौशल्य, जसे कि इंटरनेट वर कुठली माहिती कुठे मिळाली, हे लक्षात ठेवणं आजच्या पिढीसाठी जास्त महत्वाचं आहे. माझ्या पहिलीतल्या मुलाला लिहिता येणं, चांगलं अक्षर काढता येणं, हे किती महत्वाचं आहे? हे आज कोणीच सांगू शकत नाही, कारण कदाचित १५ वर्षांनी त्याला एकहि पेपर लिहून सोडवावा लागणार नाही. मात्र, हातात पेन्सिल किंवा ब्रश धरून अचूक आकार काढता येणं जर जमलं नाही, तर इतर कुठल्या जीवनोपयोगी कौशल्यांवर त्याचा परिणाम होईल, हे आज आपल्याला कळू शकत नाही, आणि केवळ काहीतरी हरवल्यावरच त्याचं अस्तित्व/महत्व जाणवलं, तर काय करणार? ही भीती उरतेच. प्लेटो म्हणाला की लेखन सुरु झाल्यावर 'स्मरणशक्ती' ची गरज उरणार नाही, तसाच हा प्रकार आहे...

२. माहिती साठवणं हे स्मरणशक्तीचं काम आहे, तर ते सहज कंप्यूटरकडे सोपवलं जाऊ शकतं... मात्र त्या माहितीचं संकलन करून, उपयोग करून नवीन कल्पना काढणं, त्या राबवणं, हे मानवी मेंदूचं काम आहे. मेंदूची शक्ती स्मरणात वाया न घालवता संकलनासाठी/निर्मितीसाठी मोकळी ठेवणं शक्य होऊ लागलंय. तंत्रज्ञानामुळे आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत हा मोठा फरक पडलाय, आणि तो स्वीकारणं गरजेचं आहे.

मात्र, मूलभूत शिक्षणात, आपल्या स्मरणशक्तीतुन संकलन--> उपयोग कसा करायचा, हे न शिकवताच पुढची पायरी गाठायचा प्रयत्न करणे म्हणजे 'माकडाच्या हाती कोलीत' दिलं जातंय. विशेषतः चार ठिकाणची माहिती मिळवून तीच पुन्हा 'स्वतःच्या' निबंधात चिकटवण्याची कला नवीन पिढीने चटकन आत्मसात केलीये, पण ह्या विचारहीन Content Generation चा परिणाम खोट्या बातम्या पसरणे, मूलभूत संकल्पना स्पष्ट नसणे- अशा अधोगतीत होतो आहे. अमेरिकेत आज ह्या विचारहीन तंत्रज्ञानाचे परिणाम आज दिसतायत, जे भारतात अजून २० वर्षांनी दिसू लागतील. म्हणून नवीन शैक्षणिक तंत्रज्ञान आंधळेपणाने स्वीकारलं जायला नको, असं मला कळकळीने वाटतं.

३. मुलांना तांत्रिक 'खेळण्यांची' आवड असते. लिहायचा कंटाळा येतो, पण टाईप करायला मजा येते, तेव्हा कधी प्रोत्साहन म्हणून, तर कधी सोयीचा उपाय म्हणून, Substitution केलं जातं. शिकवतांना, किंवा शिकतांना, एका वेगळ्या माध्यमाचा वापरही वेगळ्या तऱ्हेने व्हायला हवा, हे अजून शिक्षकांनाच कळलेलं नाही, तर पोरांना कसं कळणार? Ruben Puentedura यांनी विकसित केलेल्या SAMR मॉडेल प्रमाणे, शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर केवळ 'नगास नग' पद्धतीने न करता, त्यातून मुलांना विश्लेषण, प्रकटीकरण, अन्वय काढता येणं हे अपेक्षित आहे.



४. शिक्षणाचा केवळ वेग आणि व्याप्ती वाढवतांना, खोली (depth) मात्र आपण नष्ट करत चाललो आहोत: पुलंच्या "बिगरी ते मॅट्रिक" मधल्या दामले मास्तरांना पहिली ते सहावी सगळे वर्ग शिकवता येत होते, तो काळ कधी च मागे पडला. आजकाल गणित आणि विज्ञानच नव्हे, प्रत्येक क्षेत्राची इतकी जास्त माहिती उपलब्द आहे, आणि ती मुलांच्या गळी उतरवण्याची इतकी घाई आहे, की 'सुसंगत विचार कसा करायचा' हे शिकवायला कोणाकडे वेळ उरला नाहीये. त्यातच, शैक्षणिक क्षेत्रासाठी नवीन सॉफ्टवेअर, नवीन ऍप्स बनवणाऱ्यांचा बाजार सतत त्यांचं promotion व marketing करण्यात पुढे आहे. खुद्द सर्वव्यापी गूगल सुद्धा "शाळेने आमचं सॉफ्टवेअर वापरावं" ह्यासाठी प्रयत्नशील आहे.

खोटं वाटेल, की आजची पिढी आधीच्या सगळ्यांपेक्षा जास्त वाचते-लिहिते आहे, पण ही मुलं जे वाचतात, आणि जे लिहितात- ते मात्र फार वेगळं आहे. २४० अक्षरांत बसतील इतपतच विचार, आणि सहज मिटवता येतील, अशा Snapchat वरील उक्तींमध्ये शब्दसामर्थ्य, किंवा टिळक/आगरकर/अत्र्यांप्रमाणे प्रदीर्घ मुद्देसूद मत-मांडणे शोधायला जाऊ नका, सापडणार नाही.
माहिती, आणि तंत्रज्ञान हे दोन अतिशय महत्वाचे शब्द, पण आपण त्यांच्या आहारी जाऊन शिक्षणपद्धतीची नासाडी न करता ते डोळसपणे स्वीकारले पाहिजेत असं मला वाटतं.










3/31/18

The Reader: वाचाल तर वाचवाल


Kate Winslet म्हटली, कि Titanic मधली उच्चभ्रू, सुसंस्कृत तरुणी आठवते. तिच्यातली उत्स्फूर्त, प्रखर अस्मिता असलेली प्रेयसी जॅक च्या सान्निध्यात समोर येते. त्या व्यक्तिरेखेचा इतका पगडा मनावर होता, की पुढची अनेक वर्ष अभिनेत्री आणि व्यक्तिरेखेतली सीमारेषाच धूसर होती.

पण The Reader मधली केट, बघताक्षणीच वेगळी व्यक्ती असते. हॅना श्मिट्झ. जर्मनीतली, दुसऱ्या महायुद्धातली साधी ट्राम कंडक्टर असलेली ही एकसूरी जगणारी मध्यमवयीन बाई. पण तारुण्याच्या उंबरठ्यावरच्या एका मुलाची तिच्याकडे चोरून बघणारी नजर ती ओळखते. आधी निरुपद्रवी विरंगुळा म्हणून त्यांचं 'प्रेमप्रकरण' सुरु होतं. पण कोवळ्या वयाचा हा मुलगा तिच्यात गुंतत जातो, ते त्याचं त्यालाही कळत नाही. ती मात्र कायम रोकठोक अंतर राखूनच वागते. प्रत्येक भेटीत त्याला विचारते, "तुझ्या शाळेत कोणतं पुस्तक चाललंय सध्या? वाचून दाखव बरं!" तो वाचतो:
"Sing to me, Muse, of the man of twists and turns........"
ती म्हणते, "किती सुंदर हे शब्द! छान वाचतोस...." तो तिला बरेचदा पुस्तकं देऊ करतो, पण ती म्हणते, "नको, मला तू वाचून दाखवलेलंच आवडतं!"

The Reader हा चित्रपट मूळ कादंबरी Der Vorleser वर आधारित आहे, आणि Der Vorleser चा अनुवाद "वाचणारा" असा नसून "वाचून दाखवणारा/पाठक" असा होतो. हा मुलगा उन्हाळी सुट्टीतला 'पाठक' होतो. हॅना श्मिट्झवरच्या प्रेमापोटी, आपण वाचून दाखवताना बदलणारे, तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचायचा प्रयत्न करतो. पण एके दिवशी ती अचानक दुसऱ्या गावी बदली होऊन निघून जाते.

मुलगा पहिल्या प्रेमभंगातून सावरतो, मोठा होतो, आणि नामांकित 'न्यायशाळेत' वकीली शिकू लागतो. दुसरं महायुद्ध संपलेलं असतं. आउश्वित्झचे खटले (The Auschwitz Trials) सुरु असतात, तिथे सगळे न्यायशास्त्राचे विद्यार्थी उपस्थित असतात, त्यात हा मुलगाही असतो. आणि तिथे त्याला पुन्हा दिसते- हॅना श्मिट्झ. ह्यापुढे रहस्यभंग करू इच्छित नाही. बरेचदा हिन्दी चित्रपटात (रहस्यकथा असो किंवा थरार) प्रत्येक प्रतीक, प्रत्येक घटना, प्रेक्षक ४ वर्षाचे असल्याचे गृहित धरून अती स्पष्टीकरण केले जाते. "द रीडर" तसे स्पष्टीकरण देत बसत नाही, आणि ह्यामुळेच तो विचारप्रवर्तक होतो, हे आवडलं!

ह्यापुढील चित्रपट नायकाच्या अस्वस्थतेचं चित्रण करतो. एकेकाळी आपली प्रेमस्वरूप असलेली "मायभू" जर्मनी (जरी जर्मनीला पितृभूमी म्हणतात, तरी, इथे मायभू म्हणणे समर्पक ठरेल). युद्धानंतर देशप्रेमाचं परिवर्तन लज्जा आणि संभ्रमात झालेल्या पिढीचं प्रतीक आपला नायक आहे. ह्या पिढीला आपल्या इतिहासाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग हवाय, म्हणूनच, आपला तरुण नायक स्वतःलाच प्रश्न विचारून आत्मपरीक्षण करतो आहे, की "ज्यू लोकांचं शिरकाण करणाऱ्या माझ्या देशावर मी प्रेम कसे करू???" माझ्या देशाने हे अघोरी कृत्य केलंच कसं? का केलं?



"वाचाल तर वाचाल" हे आपण ऐकलेलं आहे, पण "वाचाल तर वाचवाल" हे द रीडर बघून कळलं. हे वाक्य केवळ नायकालाच लागू होत नाही, तर नायिकेलाही एका नकारात्मक पद्धतीने लागू होतं, म्हणून चित्रपटाचं आणि कादंबरीचं नाव सार्थक आहे.

आपण वाचतो, वाचन खूप महत्वाचं आहे वगैरे सर्वांना माहिती आहे, पण वाचनाचा खरा अर्थ म्हणजे केवळ माहिती मिळवणे नसून, पुस्तकातील व्यक्तींशी, घटनांशी एकरूप होणे. पुस्तकांच्या स्थल-कालाबाधित अस्तित्वातून जेव्हा आपण समग्र मानवी जीवनाशी जोडलेजातो, तेव्हा 'सहानुभूती' चा खरा अर्थ वाचनातून जाणवतो. एखाद्या सर्वस्वी वेगळ्या संस्कृती/काळातल्या व्यक्तिरेखेच्या भावानुभवाशी जोडल्या गेल्यावर 'नीती' 'दया', ह्या 'मानवी मूल्यांची' किंमत कळते.

आजकाल चमचमीत, झटपट फास्टफूडप्रमाणे वाचनसुद्धा पोषक उरलेलं नाही, कारण दृक्श्राव्य माध्यमांपुढे वाचनाची गोडी लागणे कठीण आहे. पण त्याच दृक्श्राव्यतेचा वापर जर 'द रीडर' सारख्या पोषक, विचारप्रवर्तक चित्रपटांसाठी होत असेल, तर ते हि नसे थोडके.

कथा इतकी सशक्त असल्यावर अभिनय त्या तोडीचा नसेल तर अतिशय त्रासदायक अनुभव येतो, पण इथे केवळ २-३ प्रमुख व्यक्तिरेखा असूनही त्या कलाकारांनी आपल्या अभिनयातून कथा फार ताकदीने पेलली आहे. तरुण नायकाचा (डेव्हिड क्रॉस) अभिनय नंतरच्या राल्फ फिनेसपेक्षाही फार भावला- पण आधीची निरागसता आणि नंतरची प्रौढ निराशा यातील विरोधाभासामुळेही असेल. युरोपचं सुंदर चित्रण, शिवाय हॅनाच्या खोपटेवजा घरातून अप्रतीम वातावरणनिर्मिती होते कारण ते घर, तिच्या रुक्ष जीवनाचा आरसा असतं. पार्श्वसंगीताचं अस्तित्व जाणवू नये, पण त्याने भावनिक उंची नेमकी टिपावी हा ही तोल समर्थपणे सांभाळला गेला आहे. ह्या सर्वांतून दिग्दर्शक स्टीफन डालड्री ची पकड जाणवते.


पुढील वाक्यांतून रहस्यभेद होऊ शकेल, त्यामुळे चित्रपट पाहिला नसल्यास वाचू नये:
हॅनासाठी अधिक लज्जास्पद काय होतं? निरक्षरता? की निर्दयता? जी व्यक्ती आपल्या कर्माचा 'अर्थ' समजून घेऊ शकत नाही, तिला त्यातली निर्दयताही दिसली नाही, त्यात नवल ते काय? पापणीसुद्धा न मिटता तीजन्मठेपेचा स्वीकार करते, पण शिक्षा भोगतांनाही तिच्या मनात खरा पश्चात्ताप निर्माण होत नाही. त्या अर्थी तिचा आत्मा कधीच त्या कृत्यातून मोकळा होऊ शकत नाही.

हॅना ला 'वाचवण्यासाठी', तिला 'वाचता' यावं लागणं अपरिहार्य असतं. अनेक वर्ष हा मुलगा, हॅनावरील प्रेमापोटी, पुस्तकांचा खजिना स्वतः 'वाचून', ध्वनिमुद्रित करून तिला पाठवत राहतो. तिला वाचनाची गोडी लागावी म्हणून धडपडतो. आणि एक दिवस तिचा 'आत्मा' जागृत करण्याचं सामर्थ्य त्या शब्दांमध्ये असतं. त्या अर्थी दुःखांतसुद्धा अतिशय समर्पक वाटतो. नायक आपल्या मुलीला ही गोष्ट सांगतांना स्वतः त्या अनुभवाचा स्वीकार करतो, आणि तीच पुढे जाण्याची एकमेव वाट असते...


3/1/18

चाँदनी रातमें कुछ फीके सितारोंकी तरह

काही दिवसांपासुन फ़ातिमा हसन यांची एक सुरेख गझल मनामध्ये घोळत होती. इतक्या सोप्या शब्दांमधून इतका धारदारपणे मांडलेला विषाद खरोखर मनाला भिडला. मराठीत तो विषाद आणणं मला जमलं नाही, पण निदान अर्थाचा तरी स्वैर अनुवाद केलाय.

चाँदनी रातमें कुछ फीके सितारोंकी तरह
याद मेरी है वहां, गुजरी बहारोंकी तरह

बात बस इतनी है इक मोड़पे रस्ता बदला
दो क़दम साथ चला वो भी हजारों की तरह

कोई ताबीर नही कोई कहानी भी नही
हमने तो ख़्वाब भी देखें हैं नजारों की तरह

बादबाँ खोले जो मैने तो हवाएँ पलटी
दूर होता गया एक शक्स किनारों की तरह

'फ़ातिमा' तेरी ख़ामोशी को भी समझा है कभी
वो जो कहता रहा हर बात इशारों की तरह
=०=०=०=

गत जुन्या वसंताचे मावळले वारे जसे
नक्षत्रांत स्मृती माझ्या फिकटले तारे जसे

इतकेच, थोडे चालुनी साथ त्याने सोडली
शेकडो परकेच होते सोबती सारे जसे

अन्वयाचे काय सांगू? गोष्टही नव्हती कधी
स्वप्नसुद्धा पहिले मी - चित्र की न्यारे जसे

प्रवाही सोडली नौका, शीड माझे फडकले
दूर जाऊ लागला 'तो', गाव किनारे जसे

'फातिमा' तुझा अबोला कसा त्याला ना कळे?
आडुनी संदिग्ध ज्याचे बोल, उखाणे जसे! 

2/18/18

भाग 3: वृक्षवल्ली आम्हा सोयरी

आमचा पहिला आठवडा फक्त प्लॉट स्वच्छ करण्यात गेला, तर आमचे अनुभवी शेजाऱ्यांची बाग दृष्ट लागण्यासारखी नटून सजून तयार झाली. ससे/पाखरांनी भाजी खाऊ नये म्हणून चोहीकडे कुंपण, कुंपणाला मधोमध छोटंसं सुबक दार दोन्हीकडे भाज्यांचे वाफे, आणि मधून विटांची पायवाट वगैरे सुंदर रचना होती. बरं, उन्हात काम करून दमायला झालं, तर खुर्च्या, छत्री, बर्फाच्या डब्यात थंड पेय वगैरे घेऊन दोघे दादा-वाहिनी सकाळपासून उन्हं माथ्यावर येईतोवर राब-राब राबत!

दुसरीकडे मात्र, एक मावशी एकटीच, एकदाच बिया लावून गेली. नंतर कधी दिसली नाही.. पण तीन चार आठवड्यात तिच्या प्लॉटभर पुरुषभर उंचीची सूर्यफ़ुलंच सूर्यफुलं झुलू लागली आणि आमचा कोपरा गजबजून गेला. मग उरल्या सुरल्या जागेत तिने मुळे लावले. कधी कधी तण वाढू नये म्हणून मोकळी जागा ठेवत नाहीत, त्यापैकी. एरवी तिच्या मनात 'मुळ्या' ला फारसं 'मोल' नसावं. झाडं वाढत वाढत त्याला 'ढिंगऱ्या' लागल्या तरी त्या काढायचं तिच्या मनात नसावं. एकदा मी सहज म्हंटलं,"ह्या शेंगांची आम्ही भाजी करतो." तर लगेच म्हणाली, "मग घेऊन जा न सगळ्या!"

माझ्या पोराला त्या दिवशी शेंगा तोडायला इतकी मजा आली, की आमच्या प्लॉटचं भाडं तेव्हाच वसूल झालं! "माझे हात छोटे आहेत, म्हणून मी कोपऱ्यातल्या शेंगा पण तोडू शकतो!" वगैरे 'डिंगऱ्या' तोडतांना 'डिंग' मारून पण झाली :) तण उपटतांना एक गांडूळ दिसलं, आणि हा कार्टा हर्षवायूने जे किंचाळला, की सगळे शेतकरी आपल्या आपल्या पेरणी/कापणीतून माना वर करून बघू लागले :)

पण आमच्या प्लॉटला सांभाळायला आमचे तीन हात कमी पडू लागले. तरी बरं, इथे शेतात 'नांगरणी' करायची गरजच नव्हती. पहिल्याच 'माहितीसत्रात' सांगितलं गेलं, की गेल्या मोसमातल्या झाडाच्या मुळाचंच ह्या मोसमात सडून खत झालेलं असतं. शिवाय शेतकरीमित्र गांडुळं वगैरे मातीत राहत असल्यामुळे, नांगरणी करू नका. पुष्कळ फळभाज्यांच्या बियांना एक पेरभर खोल खड्डा सुद्धा पुरतो.

तरीही, तांबडं फुटल्यावर जितके लवकर बागेत पोचू तितकं ऊन व्हायच्या आत परतता येईल, हे कळायलाही थोडे दिवस गेले. सहसा विकेंडला सकाळी उठायचेच वांधे होते, म्हणून शेवटी 'कलत्या उन्हात' दुपारी संध्याकाळी जाऊ लागलो. तण उपटण्याचे कामच मोठे होते. कारण दुर्लक्षित बाग झाली, तर आपला प्लॉट रद्द होण्याची भीती...

असे काही आठवडे गेले. डाव्या कोपऱ्यात मुळे, मध्ये भेंडी आणि झुकिनी, उजवीकडे पालक/लेट्युस आणि पायवाटेकडे झेंडूची फुलं यायला लागली. एकाच वेळी सगळं उगवू लागल्यावर तर तण कुठलं आणि पानं कुठली तेही कळेनासं झालं :) मटारचे वेल चढवायला जाळी लागते, किंवा टोमॅटोची/भोपळी मिरचीची झाडं वाढायला वेळ लागतो हे आम्हाला माहिती नव्हते.

पण घरी येऊन मग स्वयंपाक कोण करणार! खाली बसून पाठ आणि पाय दुखले आणि नखातली माती अंघोळ करूनही जाता जाईना झाली! शेतात उगवली भाजी, पण आम्ही खातोय टेक-आऊट! हा दैवदुर्विलास शेवटी आई-बाबा आल्यावर संपला. बाप्यांनी शेतावर जावं, इकडे मी आणि आईने भरली वांगी वगैरे रांधवी- असं माती-मुळांशी जवळ जाणारं कामकरी जीवन सुरु झालं- असं मी म्हणणार होते, पण......... खरं तर 'पास्ता विथ बेसिल अँड रोस्टेड गार्डन व्हेजीस' सुद्धा शेतात घाम गाळून आल्यावर इतकं रुचकर लागायचं, की आम्हालाच आम्ही 'साधी माणसं' आहोत असं वाटायला लागलं :)

पहिल्या झाडाची पहिली मिरची!
पहिल्या लेट्युसचं पाहिलंच पान!
ह्याचं आपल्याला जितकं कौतुक असतं, तितकं फोटोत ते काही वेगळं दिसत नाही, असा साक्षात्कार झाला :)
तरीही, कुठलीही अतिशयोक्ती न करता सांगते, जो आनंद 'घरच्या', 'स्वतःच्या हाताने लावलेल्या झाडावरून तोडलेले मटार तिथल्या तिथे फस्त करण्यात आहे, तो विकत घेता येत नसतो. सुपरमार्केट मध्ये येणाऱ्या 'मॅडम तुसाद' च्या मेणाच्या भाज्या खाऊन खाऊन, शेतात ह्यापेक्षा चांगलं काय लागणारे? असा भ्रम होता, तो दूर करण्याची ताकद त्या मटारच्या पहिल्या दाण्यातच जाणवली.

'भारतात भाज्या छान लागतात' वगैरे टिपिकल अमेरिकन अनुभव पूर्वी घेतलेले असले तरी, जंतुनाशके न मारलेल्या टोणग्या भेंड्यासुद्धा इतक्या कोवळ्या, इतक्या गोड, आणि त्यांची तार नसलेली भाजी होते,हा अनुभव माझ्यासारख्या 'झाडंमारी' साठी इतका आश्वासक होता, की दिवसभर काम करूनही आठवड्यातून दोन तीनदा "शेतावर काय लागलं असेल?" म्हणून चक्कर टाकायची सवय झाली.

ह्याच सुमारास मी एक 'लोखंडी पॅन' घेतलं होतं, त्यात शेतातल्या ताज्या भाज्या परतून खरोखर इतक्या सुंदर लागत होत्या, की डिंगऱ्या, भेंड्याच नव्हे, तर summer squash, चपटे मटार, कांदे, बटाटे, बेसिल असे घालून Frittata सुद्धा चटकन आणि चविष्ट झाला. झुकिनी तर इतक्या भरभर आणि भरपूर आल्या, की त्या आजूबाजूला वाटूनही संपेनात! मग झुकिनीची थालिपीठं, झुकिनीचे वडे, झुकिनीची भाजी, झुकिनीचे पराठे, असा झुकिनी-सप्ताह संपन्न झाला!

पण शेती म्हणजे फक्त उगवणे, खाणे, इतकंच नव्हतं...... तर दिवसभर लॅपटॉप, टीव्ही बघून दमलेल्या डोळ्यांना विसावा देणारा खऱ्या, वेड्यावाकड्या, पण तजेलदार भोपळी मिरच्यांचा हिरवा रंग होता.., मुलाला मातीत हात घालण्याची सूटच नव्हे, तर पानांची हिरवी लव मातीत उगवल्यावर हलकेच पाणी घालायची जबाबदारी होती........ ऍमेझॉनचं खोकं घरी यायची वाट पाहण्या ऐवजी भेंडी मोठी होण्याची वाट पाहणे होते, बागेत येणाऱ्या पक्ष्यांचे किलबिल स्वर ऐकणे होते. आणि वृक्षवल्लींशी नाते सांगणे होते.

कदाचित अमेरिकेत राहिल्यामुळे माझ्या मुलाला काका, मामा ही नाती कळणार नाहीत, पण त्याचं मातीशी असलेलं नातं तरी मी त्याला देऊ शकले, हे समाधान होतं.
म्हणूनच, बाहेरच्या बर्फातही, माझ्या हिरव्या स्वप्नांमध्ये 'लाल माठ', रेषांचा 'दोडका', मोहरी वगैरे पेरणी कधीच सुरु झाली आहे.




2/11/18

The Tiny Seed

पहिला भाग: Pancakes, pancakes!  इथे पहा.

आम्ही जमिनीचा तुकडा भाड्याने घ्यायचा ठरवला तर खरं, पण सुखासुखी कोण शेती करायला घेणार? अशा विचारात गाफील राहिल्यामुळे पहिल्या वर्षी तर मला प्लॉट मिळालाच नाही! पण तिथेच पहिला धडा मात्र मिळाला, की आपल्यापेक्षाही कितीतरी वेडी लोकं आधीपासूनच ह्या 'शेतकी उद्योगात' शिरलेली आहेत.

ह्या वेडाची सुरुवात डोरिस ड्यूक पासून झाली, कारण ती केवळ नावाचीच ड्यूक नव्हती, तर खरोखर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला न्यू जर्सीत जन्मलेली, घरंदाज कोट्याधीश 'जेम्स ड्यूक' ची एकमेव वारस होती. वडिलांनी तंबाखू-कारखान्यातून मिळवलेली अमाप संपत्ती तिने उत्तम राज्यकर्ती प्रमाणे कला, संस्कृती आणि निसर्गाच्या संगोपनार्थ दान केली. पूर्वी जिथे ड्यूक मंडळींचा 'वाडा' होता, त्या परिसरातील सगळी जमीन तिच्या मृत्यूनंतर 'ड्यूक फार्म्स' च्या नावाने जनतेला खुली केली गेली, आणि तिथेच न्यू जर्सीतली जैविक विविधता (biodiversity), प्राणिजीवनाचे संगोपन करणारे अनेक उपक्रम तिच्या संस्थेतर्फे राबवले जातात, त्यापैकी एक म्हणजेच हा 'नैसर्गिक, सामाजिक बागकाम प्रकल्प' (Duke Farms Organic Community Garden).

लोकांना नैसर्गिक शेतीच्या पद्धती कळाव्या म्हणून अगदी माफक दरात प्लॉट भाड्याने देऊन, तिथे ऑरगॅनिक बागकामप्रेमी लोकांचा मेळावा तयार व्हावा, अशी ह्या उपक्रमाची रचना आहे. स्वस्त आणि मस्त कुठल्याही गोष्टीपुढे रांगा लागणारच, तशा त्या इथेही लागल्या तर नवल नव्हतंच, पण ह्यावेळी मी चंग बांधलाच होता. नरकचतुर्दशीला भल्या पहाटे अंघोळ करून देवळात जायचो, तसे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी, आदल्या रात्री पार्टीचे जागरण घडूनही सुद्धा, मी मन घट्ट करून उठलेच, आणि खरोखर पोराच्या शाळेसाठी ऍडमिशनच्या रांगेत लागावे (जे अमेरिकेत मला कधी करावे लागले नव्हते), तशी मी ह्या शेताच्या ऑनलाईन रांगेत लागले. काहीजण दरवर्षी प्लॉट रिन्यू करतात, तर अशा 'जुन्या जाणत्या' सभासदांना आधी प्लॉट खुले केले जातात, आणि उरलेले काहीच फक्त नवीन लोकांसाठी उरतात, त्यामुळे ह्या सकाळच्या साधनेचं फळ मिळालं, तेव्हा मी हाती लागेल तो प्लॉट घेऊन टाकला! खरंतर सगळ्यात छोट्या आकाराचा घ्यायचा होता, पण मिळाला नाही.

ही तर केवळ सुरुवात होती. मी नवऱ्याला तेव्हाच सांगून टाकलं, की बाबा रे, इथे अमेरिकेत इतरत्र दिसतो, तसा 'ग्राहक देवो भव' दिसत नाही. हा शेतीचा वसा एकदा घेतला, की सहा महिने तरी टाकता येणार नाही. तुमच्या प्लॉटची निगा राखण्याचे, तिथून तण उपटण्याचे काम तुमचे. प्लॉट दुर्लक्षित दिसला, तर सभासदत्व रद्द. बाजारात मिळणारे रासायनिक खत, किंवा किडे मारण्याचे औषध वापरले, तर रद्द. वर्षातून ४ तास श्रमदान केले नाही, तर रद्द. नवीन बागकामींना एक 'ऑरगॅनिक बागकामाचा' कोर्स घेणे पण आवश्यक होते. शिवाय 'स्वागत-परिचय (orientation) कार्यक्रमातही 'उपस्थिती अनिवार्य' होती!!! मला जमणार नव्हते, म्हणून आयोजकांना इमेल केली, तर 'प्लिज प्लिज जमवा', कारण अनुपस्थित सभासदांचे प्लॉट रद्द केले जातात, अशी प्रेमळ धमकावणी मिळाली, मग नवऱ्याला एक दिवस ऑफिसमधून लवकर ये, असं पाचारण केलं, आणि होता होता प्रवेशाचे सगळे सोपस्कार तर पार पडले.

माहिती सत्रात तण वाढू नये म्हणून रसायनापेक्षा प्रतिबंधावर भर, किंवा उभारलेल्या 'चौकटीत' बाग लावणे (Squarefoot Gardening) वर भर होता. कीड लागल्यास, जैविक औषधांची नावं सांगितली. तसेच, ऑरगॅनिक खताची नावं, वगैरे टिप्पणी काढायला मला तासभर लक्ष देऊन ऐकावे लागले.

भारतामध्ये जुगाड करून असेल त्यात भागवण्याची आपली सवय, तर इथे अमेरिकेत नालीसाठी घोडा घेण्याची पद्धत! एखाद्या सामाजिक, विना-नफा कामाचंही आयोजन इतकं उत्तम होतं की त्यात अथपासून इतीपर्यंतचा विचार केलेला होता. नवशिक्या बागकामींना मदत म्हणून 'Mentor' शी गाठ घालून दिली. शेताचे भाग करून ६-६ च्या गटांमध्ये प्लॉटचा 'शेजार' तयार केला, आणि शेजाऱ्यांची ओळखीचा कार्यक्रम झाला. शिवाय, आपल्या शेतातलं पीक अति झालं, वापरता येत नसेल, तर ते 'Food Bank' मध्ये दान करायचीही सोय होती.

उन्हाळ्याचे जेमतेम चार महिने शेतीला मिळतात, पण मुलांच्या सुट्ट्यांमध्ये लोक फिरायला जातात. तेव्हा शेजारी एकमेकांच्या बागेला पाणी घालू शकतात. 'बिया' च नव्हे, तर मदतीची, अवजारांची पण देवाणघेवाण होते... पण त्याही पेक्षा, बागेत राबून तण उपटतांना, गप्पांची भरपूर देवाणघेवाण होते! सुदैवाने आमचे शेजारी खूपच अनुभवी, पण मदतीलाही पुढे होते. "बागेत काय चूक-बरोबर, असा विचार करून घाबरू नका!" त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं. "अनुभवानेच शहाणपण येईल... हे लेट्यूस जमले नाही, तर ते पालक लावून बघा!" ओळख जुनी झाल्यावर खरंतर 'पाककृतींची', नाहीतर डब्याची देवाणघेवाण पण करूया, असे वायदे झाले, पण माझ्या मनात आता धाकधूक व्हायला लागली.
इतक्या भगीरथ प्रयत्नानंतरही, खरं बागकाम आपल्याला कितपत जमतंय, हे अजून माहितीच नव्हतं. आजवर (कुंडी-साईज संस्कृतीच्या नावाने, अमेरिकेतल्या पहिल्या वर्षी, हौशीने) घरात लावलेली तुळस :), कधी एकदम हुक्की येऊन स्प्रिंगच्या सुरुवातीला आणलेली सूर्यफूलं वगैरे ;), पाण्यात उगवणारा बेसिल (basil), इतकंच काय, तर भेट मिळालेला लकी बाम्बूसुद्धा आमच्या हातून मेलेलाच आहे, त्यामुळे आपण कुंडीत झाडं मारून दमलो, तर शेतात आणखी झाडं मारूया! असले अघोरी पाप तर करत नाही ना, असा विचार करून माझी मलाच कीव यायला लागली. अगदी एरीक कार्लच्या 'Tiny Seed' सारखी आमची सुरुवात जमेल का?,होईल का? असं मागे पुढे पाहतच झाली. सुरुवात छोटी होती, पण बी प्रमाणे तीत कुठल्या कुठल्या अनुभवांच्या शक्यता दडल्या होत्या? पहा पुढील भागात.