4/17/18

शैक्षणिक तंत्रज्ञान 1

आम्ही अमेरिकेतले 'मागासलेले' पालक असल्यामुळे आपल्या मुलाला ६ वर्षाचा होई पर्यंत फोन, टॅबलेट वगैरे पासून दूरच ठेवलं होतं. टीव्ही कधी दाखवला, तर त्यावर वेळेचं बंधन असायचं, आणि मनामध्ये प्रचंड अपराधीपणाची भावना, कारण तिकडे स्वयंपाक करतांना मध्ये लुडबुड नको म्हणून टीव्हीचा "बेबीसिटर" लावला जायचा. काही पालक कौतुकाने 'आमचा गोटू किनई, २ वर्षाचा झाल्यापासूनच, किल्ली लावून आपला आपला फोन उघडू शकतो, आणि YouTube चा लाल त्रिकोण ओळखणं, त्याला A B C D च्या ही आधीपासून येतंय!" असे गौरवोद्गार काढू लागले, कि मला रडू यायला लागायचं, कारण, एकीकडे मी स्वयंपाका साठी, लांबच्या प्रवासा साठी, 'सोयीचं तंत्रज्ञान' वापरत च होते, पण दुसरीकडे त्याला हे तंत्रज्ञान 'शिकवणं' किंवा शिकू देणं, हे मात्र मला जमलं नव्हतं! टीव्ही लावून मी देणार, फोन उघडून मी देणार- ह्या किल्ल्या मी मुद्दाम स्वतःच्या हातातच ठेवल्या होत्या, पण त्या काढून घेण्याची 'हुशारी' माझ्या पोराला सुचत का नाही, ही नसती काळजीपण मलाच सतावत होती!!!

आणि अशा ह्या मुलाला, पहिल्या वर्गात, शाळा सुरु झाल्या झाल्याच, शाळेकडूनच Chromebook वापरण्याचा धडा मिळाला. "आई! माझं Username मी तुला सांगेन, पण पासवर्ड नाही सांगणार बरं का?" पोरगं उत्साहाने सांगत आलं, तेव्हाच माझ्या मेंदूतले दोन भाग कोणीतरी दोन वेगळ्या दिशांना खेचतंय असं वाटू लागलं! लहान मुलांचं शिक्षण, आणि त्यात तंत्रज्ञानाचा वापर, ह्या विषयी सध्या दोन, अतिशय परस्परविरोधी प्रवाह रूढ आहेत:

१. मुलांना २ वर्षांपर्यंत फोन, टॅबलेट वगैरे 'स्क्रीन' दाखवू नये. ते त्यांच्या भावनिक विकासाच्या आड येतं. एकलकोंडेपणा वाढतो. लहान मुलं अनुकरणातून, मोठ्यांशी होणाऱ्या संवादातून शिकतात, त्यामुळे टीव्ही किंवा फोनमधून मिळणाऱ्या ज्ञानाच्या एकमार्गी प्रवाहाने त्यांची सर्वांगीण प्रगती खुंटते.

२. आपल्या पालकांनी ज्या नोकऱ्या केल्या, त्या आपण करत नाही, तसेच आपल्या आजोबांच्या वेळी लागणारी कौशल्ये (skills) आपल्या पिढीसाठी अगदी निरुपयोगी ठरली. त्याच प्रमाणे, आपल्या मुलांनी २१व्या शतकात तगून राहावे असे वाटत असेल, तर त्यांना लागणारी कौशल्यं तंत्रज्ञानाशीच जोडलेली असल्यामुळे, त्यांना तंत्रज्ञान शिकवणे गरजेचे आहे.

विशेषतः भारतात माहिती-तंत्रज्ञानाने आणलेल्या सुबत्तेमुळे, तंत्रज्ञान हे सगळं चांगलंच आहे, आणि तंत्रज्ञानाशिवाय प्रगती शक्य नाही, तेव्हा तंत्रज्ञानाला पर्याय नाही, हे निर्विवाद सत्यच मानलं जाऊ लागलं आहे. अमेरिका मात्र त्यापुढे जाऊन, काहीशी अलिप्तपणे माहिती-तंत्रज्ञानाकडे बघत, चांगल्या-वाईटाचा शहानिशा करण्याच्या प्रयत्नात आहे. मी एक शिक्षिका, तसेच पालक, ह्या दुहेरी भूमिकांमधून जात असल्यामुळे ह्याविषयी माझी काही निरीक्षणे आज इथे व्यक्त करावीशी वाटताहेत.

१. तंत्रज्ञाच्या वापराने आपल्या मेंदूमध्ये घडणारे बदल आपण अजून पुरते समजून घेऊ शकलेलो नाही. आफ्रिकेत एक आदिवासी जमात, त्यांच्या अचूक 'दिशाज्ञाना' साठी प्रसिद्ध आहे. जंगलातून वाट काढण्यासाठी त्यांच्या मेंदूमध्ये दिशाज्ञान कायम कार्यरत असतं, त्यामुळे अगदी डोळे बांधून त्यांना कुठल्या खोलीत सोडलं, तरी ते घराची दिशा अचूक सांगू शकतात म्हणे! मोबाईल आल्यापासून आपल्याला एकमेकांचे दूरध्वनी क्रमांक लक्षात राहत नाहीत. तसेच ईमेल आल्यापासून 'लिहिणं' बंद झालंय! ह्या बदलांमुळे आपल्या मेंदूतल्या न वापरल्या गेलेल्या जागा 'बंद' पडत चालल्या आहेत.

उलट नवीन कौशल्य, जसे कि इंटरनेट वर कुठली माहिती कुठे मिळाली, हे लक्षात ठेवणं आजच्या पिढीसाठी जास्त महत्वाचं आहे. माझ्या पहिलीतल्या मुलाला लिहिता येणं, चांगलं अक्षर काढता येणं, हे किती महत्वाचं आहे? हे आज कोणीच सांगू शकत नाही, कारण कदाचित १५ वर्षांनी त्याला एकहि पेपर लिहून सोडवावा लागणार नाही. मात्र, हातात पेन्सिल किंवा ब्रश धरून अचूक आकार काढता येणं जर जमलं नाही, तर इतर कुठल्या जीवनोपयोगी कौशल्यांवर त्याचा परिणाम होईल, हे आज आपल्याला कळू शकत नाही, आणि केवळ काहीतरी हरवल्यावरच त्याचं अस्तित्व/महत्व जाणवलं, तर काय करणार? ही भीती उरतेच. प्लेटो म्हणाला की लेखन सुरु झाल्यावर 'स्मरणशक्ती' ची गरज उरणार नाही, तसाच हा प्रकार आहे...

२. माहिती साठवणं हे स्मरणशक्तीचं काम आहे, तर ते सहज कंप्यूटरकडे सोपवलं जाऊ शकतं... मात्र त्या माहितीचं संकलन करून, उपयोग करून नवीन कल्पना काढणं, त्या राबवणं, हे मानवी मेंदूचं काम आहे. मेंदूची शक्ती स्मरणात वाया न घालवता संकलनासाठी/निर्मितीसाठी मोकळी ठेवणं शक्य होऊ लागलंय. तंत्रज्ञानामुळे आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत हा मोठा फरक पडलाय, आणि तो स्वीकारणं गरजेचं आहे.

मात्र, मूलभूत शिक्षणात, आपल्या स्मरणशक्तीतुन संकलन--> उपयोग कसा करायचा, हे न शिकवताच पुढची पायरी गाठायचा प्रयत्न करणे म्हणजे 'माकडाच्या हाती कोलीत' दिलं जातंय. विशेषतः चार ठिकाणची माहिती मिळवून तीच पुन्हा 'स्वतःच्या' निबंधात चिकटवण्याची कला नवीन पिढीने चटकन आत्मसात केलीये, पण ह्या विचारहीन Content Generation चा परिणाम खोट्या बातम्या पसरणे, मूलभूत संकल्पना स्पष्ट नसणे- अशा अधोगतीत होतो आहे. अमेरिकेत आज ह्या विचारहीन तंत्रज्ञानाचे परिणाम आज दिसतायत, जे भारतात अजून २० वर्षांनी दिसू लागतील. म्हणून नवीन शैक्षणिक तंत्रज्ञान आंधळेपणाने स्वीकारलं जायला नको, असं मला कळकळीने वाटतं.

३. मुलांना तांत्रिक 'खेळण्यांची' आवड असते. लिहायचा कंटाळा येतो, पण टाईप करायला मजा येते, तेव्हा कधी प्रोत्साहन म्हणून, तर कधी सोयीचा उपाय म्हणून, Substitution केलं जातं. शिकवतांना, किंवा शिकतांना, एका वेगळ्या माध्यमाचा वापरही वेगळ्या तऱ्हेने व्हायला हवा, हे अजून शिक्षकांनाच कळलेलं नाही, तर पोरांना कसं कळणार? Ruben Puentedura यांनी विकसित केलेल्या SAMR मॉडेल प्रमाणे, शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर केवळ 'नगास नग' पद्धतीने न करता, त्यातून मुलांना विश्लेषण, प्रकटीकरण, अन्वय काढता येणं हे अपेक्षित आहे.



४. शिक्षणाचा केवळ वेग आणि व्याप्ती वाढवतांना, खोली (depth) मात्र आपण नष्ट करत चाललो आहोत: पुलंच्या "बिगरी ते मॅट्रिक" मधल्या दामले मास्तरांना पहिली ते सहावी सगळे वर्ग शिकवता येत होते, तो काळ कधी च मागे पडला. आजकाल गणित आणि विज्ञानच नव्हे, प्रत्येक क्षेत्राची इतकी जास्त माहिती उपलब्द आहे, आणि ती मुलांच्या गळी उतरवण्याची इतकी घाई आहे, की 'सुसंगत विचार कसा करायचा' हे शिकवायला कोणाकडे वेळ उरला नाहीये. त्यातच, शैक्षणिक क्षेत्रासाठी नवीन सॉफ्टवेअर, नवीन ऍप्स बनवणाऱ्यांचा बाजार सतत त्यांचं promotion व marketing करण्यात पुढे आहे. खुद्द सर्वव्यापी गूगल सुद्धा "शाळेने आमचं सॉफ्टवेअर वापरावं" ह्यासाठी प्रयत्नशील आहे.

खोटं वाटेल, की आजची पिढी आधीच्या सगळ्यांपेक्षा जास्त वाचते-लिहिते आहे, पण ही मुलं जे वाचतात, आणि जे लिहितात- ते मात्र फार वेगळं आहे. २४० अक्षरांत बसतील इतपतच विचार, आणि सहज मिटवता येतील, अशा Snapchat वरील उक्तींमध्ये शब्दसामर्थ्य, किंवा टिळक/आगरकर/अत्र्यांप्रमाणे प्रदीर्घ मुद्देसूद मत-मांडणे शोधायला जाऊ नका, सापडणार नाही.
माहिती, आणि तंत्रज्ञान हे दोन अतिशय महत्वाचे शब्द, पण आपण त्यांच्या आहारी जाऊन शिक्षणपद्धतीची नासाडी न करता ते डोळसपणे स्वीकारले पाहिजेत असं मला वाटतं.










No comments: