3/31/13

गाणाऱ्या कविता

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, ह्या झोपडीत माझ्या॥
भूमीवरी निजावे, तारयांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे ह्या झोपडीत माझ्या॥

ही संत तुकडोजी महाराजांची ओवी. ओवी म्हणावी की कविता? पण आमच्या शाळेच्या पाठ्यपुस्तकात होती, म्हणून कविता म्हणते. त्याच वर्षीच्या हिंदीच्या पुस्तकात हे-

हर ग्राम हर नगर के हर राह हर डगर पर
कूचे गली मुहल्ले, बाजार हाट घर घर
हर ओर ही हजारों दीपक जले हुए हैं
जैसे कि रौशनी के अनगिन सुमन खिले हैं
जैसे कि हस उठी है, तारों की आज रानी
या चांद ने हजारों बनने की आज ठानी!

आज इतक्या वर्षांनतरही मला ह्या कविता आठवतायत, त्या खरं म्हणजे ह्या गाण्यामुळे, "ऐ दिल मुझे बता दे, तू किसपे आ गया है? वो कौन है जो आकर ख्वाबों पे छा गया है!"
परवा फिरायला जातांना सहज मी गुणगुणायला लागले, तर गाणं मला आठवेच ना. आठवली ती कविता! मौखिक ग्रंथपरंपरा आणि पाठांतरातला दुवा तेव्हा जाणवला. पाठांतर करायला आवडायचं, आणि त्यातून कविता व्हायच्या ही पटापट पाठ, म्हणून मजा यायची. कवितांना चाली लावून त्या वर्गात म्हणून दाखवायची हौसही खूप :) आता ऐ दिल मुझे बता दे वर सगळ्याच कविता कशा बसायच्या? मग दुसरं गाणं-

आओ बच्चो तुम्हे दिखाऍं झांकी हिन्दुस्तान की
इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की॥

थोडं ठाकून ठोकून त्यावर कुसुमाग्रजांना बसवलं की झालं-

आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे
फेसफुलांचे सफेत शिंपित वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती गात किनाऱ्याकडे.
मऊमऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणा़ऱ्या वाऱ्याच्या संगती
उंच पांढरी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते...

आणि हिन्दीत तर त्या चालीवर वाट्टेल ते म्हणता येऊ शकतं असा भाबडा विश्वासच बसला होता-

लहरोंसे डरकर नौका पार नही होती
कोशिश करने वालोंकी हार नही होती
नन्ही चिंटी जब दाना लेकर चलती है
चढती दिवारोंपर सौ बार फिसलती है
मनका विश्वास रगों में साहस भरता है
गिरकर चढना चढकर गिरना न अखरता है
मेहनत उसकी खाली हर बार नही होती
कोशिश करने वालों की हार नही होती!

परवा फिरायला जातांना सतरा काळज्या आणि पंधरा गोष्टी डोक्यात भुंगा घालत होत्या, तेव्हा ह्या कविता मला वाचवायला आल्या!

आजीने सकाळी पूजा करतांना म्हटलेलं अथर्वशीर्ष असावं तशा ह्या कविता आहेत.
शेजारी भजन-टाळ-गजराचा नाद खोल अंतर्मनात साठवलेला असावा, तशा ह्या कविता आहेत.
रोज दुपारी चणेफुटाणेवाला आपले खास हेल काढून आरोळी ठोकत यायचा, तशा ह्या कविता आहेत.

त्या गुणगुणतांना मला पुन्हा माझ्या स्वत्त्वाची ओळख पटलीशी वाटली. त्यांचा नाद आश्वासक वाटला. गोळाबेरीज करून शेवटी माझ्या वाट्याला फक्त हे शब्द उरले, तरी ते मला खूप पुरतील, ह्याची साक्ष म्हणून त्या कविता.






1 comment:

Naniwadekar said...

> राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
--

ही पंचमात्रिक समूहांवर आधारित रचना आहे, पण या मात्रावृत्ताचं नाव माहीत नाही.
२-५-५ असे मात्राभाग आहेत. शक्य तिथे
गा - गा-ल-गा, ल-गा-गा असेच वर्ण आहेत. पण 'प्रभुनाम' मधे ल-ल सुरवात आहे. मात्राबद्‌धतेसाठी 'भु' र्‍हस्व वापरायला हवा, अशुद्‌ध असला तरी. प्रत्येक ओळीतली पाचवी मात्रा ही सतत लघु वर्णाची आहे.

> जैसे की रौशनी के अनगिन सुमन खिले हैं
---
इथेही अनेकदा एका गुरु वर्णाऐवजी दोन लघु वर्ण आहेत. पण ती ओळ 'जैसे कि' अशी हवी. हिन्दीत तो 'कि' र्‍हस्वच असतो. मात्र षष्ठीचा प्रत्यय 'की' दीर्घ असतो. 'उस की कहानी'.

> निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे
>
हे कुसुमाग्रजांचं आवडतं सूर्यकान्त वृत्त आहे (८-८-८-३ मात्राविभाग); ते तुम्ही 'आओ बच्चो' चालीत बसवत असल्यास तुमची धन्य आहे. 'आओ बच्चों' विषयी एक आक्षेप म्हणजे 'बच्चों' शब्द तिथे नको. संबोधनात अनुस्वार नसतो. 'बच्चों के लिए खिलौने' मधे अनुस्वार असतो. 'मुलांनो' या संबोधनातही शेवटच्या शब्दात अनुस्वार नाही. तोच नियम हिंदीत वापरावा.

आओ बच्चो तुम्हे दिखाऍं झांकी हिन्दुस्ताऽन की
-- हे मराठीतलं 'प्रियलोचना' वृत्त असावं.
८-८-८- ग ऽ ल ग (किंवा ८-८-८-५)
याचं माधवराव पटवर्धनांनी दिलेलं उदाहरण म्हणजे :
आनंदाचा कंद हरी हा देवकिनंदन पाऽहिला ...

तुमची पोस्ट नेहमीप्रमाणेच उत्तम आहे.

- नानिवडेकर