3/16/15

मनावेगळी लाट

कुठेतरी एकदा वाचलं होतं, की कविता म्हणजे फक्त शब्द. त्यातून अर्थ, आशय, प्रतीक आणि प्रतिमा उपसून काढण्याचा आपण वृथा प्रयत्न करत राहतो. पण कविता म्हणजे फक्त शब्द. शब्दांच्या प्रेमात पडायला लावते, ती कविता. शब्दांची कधी न पाहिलेली, न चिंतलेली रूपं दाखवते, ती कविता. ती कविता मला ओढून नेते एका नवख्या प्रदेशात...

तुला पहिले मी...
कवीचं प्राक्तन- बघणे. काही बघतात, काही जगतात, पण कवी ते दोन्ही ही करतो. त्याला करावंच लागतं- लेखनातून. लिहण्यासाठी जगणं, आणि जगण्यासाठी लिहणं, स्वत:च्याच अनुभवांकडे तटस्थपणे बघणं.

“तुला पाहिले मी, नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे
इथे दाट छायांतुनी रंग गळतात
ह्या वृक्षमाळेतले सावळे"
ती, मूर्त आणि अमूर्त स्वरूपांच्या सीमारेषेवर उभी. तिच्या मोकळ्या केसांची मोहिनी,की दाट छायांतून गळणाऱ्या रंगांची? की ते दोन्ही रंग एकमेकांत मिसळेत नकळत?

तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळागर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन् तुला सावली
इतक्या अलगदपणे, पावलांचा आवाज न करता ती आली,कवीची प्रेरणा झाली. पण त्या उदास अनामिकेला खरी स्त्री म्हणावे, की नित्य अनुभवलेली सुंदर संध्या?
नभाचा किनारा! दोन अनोळखी शब्द. (किनारा सागराचा असतो, नभाचा नव्हे!) पण मूर्त आणि अमूर्ताशी खेळता खेळता ते दोन अनोळखी शब्द एकमेकांसमोर आले, तर अर्थाचा निळागर्द रंग डोळ्यांसमोर मांडून गेले.

मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू तुझे दु:ख झरते
जसे संचिताचे ऋतू कोवळे
“मनावेगळी लाट"... कवीच्या मनाचं सतत दुभंग होणं. मनावेगळ्या लाटेने व्यापून जाणं. ते टाळता न येऊन खूप व्याकुळतेने विचारणं, “पुढे का उभी तू? तुझे दु:ख झरते!” पुढे उभ्या "तिच्या" दु:खाशी एकरूप होतांनाही, कुठेही सावली नाही,ना त्याला, ना तिला, ह्याची वेदना समजून घेणं.

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुरा
तिचं झरणारं दु:ख आपलंसं करतांना, कवीच्या उरात एक आकांत. आणि तरीही, त्या एकरूपतेच्या क्षणातच कवीच्या अस्तित्वाचं सार्थक असतं. त्या एकरूपतेला कोणी प्रियकर-प्रेमिकेचा एकपणा म्हणतं, कोणी सं-वेदना, कोणी कवीमनाचं स्पंदन. त्या क्षणातच दु:खाला लखलखीत ताऱ्यात परिवर्तीत करण्याची क्षमता असते.
“दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुरा...” दिसणे, बघणे.
जगण्यातून, असण्यातून काहीशा नाईलाजाने, काहीशा अपरिहार्यतेने, कवी बाहेर पडतो. मी ही बाहेर पडते.

मागे वळून बघतांना शोधत राहते,
ही प्रेमिकांची भेट होती?
की एका संध्याकाळच्या आर्ततेचं वर्णन,
की कविता जन्म घेते,त्या एका क्षणाचं?

3 comments:

अवधूत डोंगरे said...

uttam "nirupan" ahe.
kavita mhanaje...
kavita mhanaje...

vijay kumar sappatti said...

hi

i visited first time on your blog .

This is really one of the great work , i came across. I really liked this post.

I read the whole post and enjoyed like anything

mala jaast marathi nahi yete , par mala samajhto ,as I am from Nagpur.

thanks . Please visit my poem blog to read new poems : www.poemsofvijay.blogspot.com

regards

vijay

Asha Joglekar said...

वा सुरेख विश्लेषण. अगदी भाव मधुर निरूपण.